Pages

Saturday, June 4, 2016

मधमाशांची गोष्ट

मुल वाचन कसं शिकतं...?

वाचनाचे टप्पे :- एक आराखडा
जीन एस्. चॉल

सारांशात्मक मराठी रूपांतर -
 वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)

वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
⚡पहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे (वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.
⚡दुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.
तिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी (वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.
⚡चौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.

⚡पाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.

मूल वाचन कसं शिकतं...?

मुल वाचन कसं शिकतं...?

वाचनाचे टप्पे :- एक आराखडा
जीन एस्. चॉल

सारांशात्मक मराठी रूपांतर -
 वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)

वाचनपूर्व टप्प्यात मिळवलेले ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता यांचा पहिल्या टप्प्यातील वाचनाच्या यशाशी फार जवळचा संबंध आहे.
मुलाची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आणि त्याते वातावरण या दोन्ही घटकांचा वाचता येण्याशी घनिष्ठ संबंध आहे. म्हणून घरी, तसेच शाळेत वाचनाला पूरक वातावरण कसे तयार करता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
⚡पहिला टप्पा : वाचनाचा आरंभ ‘डी-कोडींग’ अथवा लिपिचिन्हे ओळखणे (वय ६ वर्षे ते ७ वर्षे)
बोलल्या जाणार्‍या शब्दांशी, विशिष्ट लिपिचिन्हांत बद्ध असलेल्या आकारांची जोडणी होणे ही महत्त्वाची गोष्ट या टप्प्यात घडते. मुळाक्षरयुक्त लिपीचे ज्ञान मूल या टप्प्यात मिळते. त्यासाठी अमूर्ताची समज चांगली असावी लागते. शब्द विशिष्ट आवाजांचा बनलेला असतो, हे या वयात उमजते.
काही मुलांच्या बाबतीत अमूर्त चिन्हांपर्यंतचा प्रवास सहज, आनंदाचा ठरतो, तर या टप्प्यातील बरीच मुले जरी ठराविक मजकूर/शब्द, तसेच वाचतात असे दिसले, तरी ‘वाचना’बाबतची त्यांची समज वेगवेगळी असते. ती समज मोजण्याच्या पद्धतींचा शोध घेणे आवश्यक आहे.
१९७० च्या सुमारास झालेल्या एक संशोधनात असे आढळले, की साईट-वर्ड मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने असे आढळले, की साईट-वर्ड-मेथड या ‘पाहून शब्द ओळखणे’ या पद्धतीने वाचन करायला शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत पुढे पुढे चुका जास्त होताना दिसतात. शब्द कठिण होत गेले की मुले ते वाचू शकत नाहीत, किंवा एकाच्या जागी मुले दुसराच शब्द वाचतात.
या टप्प्यात केवळ नजरेने शब्द ओळखण्यापाशी न थांबता त्यातील घटकही मुलाल ओळखता यायला हवेत. मात्र घटक ओळखण्यापाशीच न अडकता शब्दातून व्यक्त होणार्‍या अर्थापर्यंतही पोहोचायला हवे. “खोट्या-खोट्या” वाचनाच्या टप्प्यातून आता मुलांनी पूर्णपणे बाहेर पडायला हवे. पुढे परिपक्व वाचनापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आत्ता प्रत्येक लिपिचिन्ह वाचणे गरजेचे ठरते. लिपिचिन्हांबाबतचे इतके ज्ञान त्यांना व्हायला हवे, की ती त्यापलिकडे जाऊ शकतील.
⚡दुसरा टप्पा : लिपीचिन्हांच्या पुढे जाऊन ओघवते वाचन ; दृढीकरण (७ वय वर्षे ते ८ वर्षे)
पहिल्या टप्प्यात जे कमावले त्याचे दुसर्‍या टप्प्यात दृढीकरण होते. या टप्प्यात नवी माहिती मिळवली जात नाही, तर आधीचेच पक्के होते. तसेच, संदर्भाचा उपयोग करून त्याच्या मदतीने वाचनाचा वेग आणि ओघ वाढावायलाही मुले याच काळात शिकतात.
या टप्प्याबाबत आणि तिसर्‍या टप्प्याबाबत केलेल्या संशोधनात्मक कामामध्ये जमा केलेल्या माहितीवरून असे लक्षात येते, की तिसर्‍या टप्प्याअखेर मुलांचे वाचनातील गुण जर किमान पातळीच्या बरेच खालचे असतील, तर अशा मुलांना संपूर्ण शालेय आयुष्यात वाचनाचा प्रश्न भेडसावतो.
दुसर्‍या टप्प्यात वाचनात यश मिळण्यासाठी कशा प्रकारचे वातावरण हवे ? परिचित विषय, गोष्टी, परिचित वाक्यरचना, परिचित पिरकथा, पुराणकथा यांची पुस्तके मुलांना मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळयला हवीत.
निम्नसामाजिक-आर्थिक स्तरातल्या मुलांमध्ये आणि इतर मुलांमधे या टप्प्यावर अंतर वाढताना दिसते. पुस्तके विकत घेणे, अशा मुलांच्या पालकांना परवडत नाही, वाचनालयातून पुस्तके वा नियतकालिक आणणे हाही यांच्या नित्यक्रमाचा भाग नसतो. अशी मुले सरावापासून वंचित राहतात. पालक मुलांना नेमाने वाचून दाखवत नसतील तर भाषाविकासाचा वेग मंदावतो.
तिसरा टप्पा : नवे काहीतरी शिकण्यासाठी वाचन-पहिली पायरी (वय ९ ते १४ वर्षे)
या टप्प्यात, नवीन माहिती, नवीन ज्ञान, नवे अनुभव, नवीन विचार मिळवण्यासाठी मूल वाचते. मुलांच्या बोधविषयक क्षमता, शब्दसंग्रह, ज्ञान अजूनही मर्यादित असल्यामुळे, खास बनवलेले, कमी गुंतागुंतीचे, विशिष्ट हेतू साध्य करणारे वाचनसाहित्य या टप्प्यात वापरणे श्रेयस्कर ठरते.
पारंपारिक शब्दात सांगायचे तर प्राथमिक टप्प्यांवर मुल ‘वाचायला शिकतात’ नंतर माध्यमिक शाळेत ‘शिकण्यासाठी वाचतात.’
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उच्चारांचे, बोलण्याचे लिपिचिन्हांशी, लिखित मजकुराशी असलेले नाते महत्त्वाचे ठरते, तर तिसर्‍या टप्प्यात लिखित मजकुराचे त्यातील विचारांशी आणि कल्पनांशी असणारे नाते महत्त्वाचे ठरते.
ऐकण्यातून, पाहण्यातून मूल जगाविषयी जे शिकते, त्या तुलनेत या टप्प्यावरील वाचनातून मुलाला जगाबद्दल जे समजते ते अत्यल्प असेत.
⚡चौथा टप्पा : विविध दृष्टिकोण (वय १४ वर्षें ते १८ वर्षे)
विविध दृष्टिकोण समजून घेणे, त्यांची हाताळणी करणे हे चौथ्या टप्प्याशी जोडून येते. संकल्पनांच्या विविध स्तरांशी, वास्तवाच्या विविध पदरांशी भिडणे या टप्प्यात अंतर्भूत केली आहे असा मजकूर या टप्प्यात विद्यार्थी वाचू लागतात. मुक्त अवांतर वाचन वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे वाचन, या सर्वांची जोड पाठ्यपुस्तकांच्या वाचनाला मिळणे या टप्प्यावर महत्त्वाचे ठरते. औपचारिक शिक्षणाची भूमिक या संदर्भात कळीची ठरते.

⚡पाचवा टप्पा : रचना आणि पुनर्रचना : वैश्विक दृष्टिकोण (वय १८ वर्षांपुढे)
हेतूनुसार तपशिलात शिरून शेवटापासून, मधून वा सुरुवातीपासून, लेख आणि पुस्तके वाचायला या टप्प्यात माणूस शिकतो. काय वाचायचे हे तर तो शिकतोच, परंतु काय वाचायचे नाही याबाबतची त्याची समजही या टप्प्यात विकसित होते. आपल्या गरजेप्रमाणे आणि रुचीप्रमाणे वाचन करणे म्हणजेच पाचवा टप्पा गाठणे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तीही पाचवा टप्पा गाठतात किंवा कसे हे अभ्यासाचा विषय होईल.
इतरांना काय म्हणायचे आहे हे वाचनातून समजून घेऊन, वाचक स्वतःसाठी स्वतःच्या अशा ज्ञानाची रचना करीत जातो. काय आणि किती वाचायचे, किती वेगाने वाचायचे, किती तपशीलात वाचायचे हे वाचक ठरवतो. वाचनातून समजलेला विचार, त्याचे विश्लेषण आणि आपला त्याबाबतचा विचार या सगळ्यांचे संतुलन साधण्याची धडपड या टप्प्यात केली जाते.
उच्च पातळीवरील अमूर्त आणि सामान्य अशा ज्ञानाची निर्मिती; इतरांचे ‘सत्य’ समजून घेऊन स्वतःच्या ‘सत्या’ची निर्मिती या टप्प्यावर केली जाते.

व्यथा कलाकार शिक्षकाची

व्यथा कलाकार शिक्षकांची - भाग १..... राहुल भोसले....

 गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षात (२०१५/१६) स्नेहसंमेलने  आणि विद्यार्थी कलाविष्कार सोहळे विशेषत्वाने संपन्न होत आहेत. टीव्हीवरच्या गायन वादनाच्या "रिऍलिटी शो" कार्यक्रमांमुळे पालकांनाही आपली मुले एखाद्या कलेत पारंगत असावीत असे वाटू लागले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमातही चित्र शिल्प, गायन वादन, नृत्य नाट्य कलांना स्थान देऊन शासकिय व्यवस्थेने कलांचे महत्त्व अधोरेखित केले आहे..

 पण हे कला उपक्रम राबविण्यासाठी सर्वच शिक्षक बांधवांकडे कला असत नाही.
पण प्रत्येक शाळेत एक तरी  शिक्षक बांधव किंवा भगिनी असते; ज्यांना या कलांच्या संवर्धनाची जबाबदारी दिली जाते.  
"सांस्कृतिक विभागप्रमुख " ( अर्थात बिनपगारी फुल अधिकारी !! पगारचा अर्थ शिक्षकांचा पगार असा घेऊ नये...बिनपगारीचा अर्थ  पुढे येणार आहे....)

सांस्कृतिक विभागप्रमुख जबाबदारी स्वीकारणारा गुरुजी स्वत:च्या हौसेखातर हे लिगाड स्वीकारतो. त्याच्या मनात असतं," मी शाळा शिकलो तेव्हा एवढ्या सोईसुविधा नव्हत्या. पण आता माझ्या विद्यार्थ्यांना आपली कला व्यवस्थित दाखवता यावी अशी संधी निर्माण करायला काय हरकत आहे ??

नाचणाऱ्या पायांत बाई आपल्या भूतकाळात हरवलेले पदन्यास शोधतात.

गाणाऱ्या गळ्यांत गुरुजी कालपटात विरून गेलेले स्वर शोधतात.

 नाचणा-या इवल्या इवल्या पायांत बाई आपल्या नृत्याची अर्धवट राहिलेली बाराखडी पुन्हा नव्याने गिरवतात.

 नाटकांच्या संवादात गुरुजी  आपल्याच मूक भावनांना बोलके करतात.

 मुलांच्या घणाघाती वक्तृत्वातून आपलेच विचार व्यक्त होताना स्टेजच्या कोपऱ्यात उभे राहून छाती फुगवून टाळ्या वाजवतात.........

खरंतर आपल्या कलेचं तादात्मिकरण गुरूजी बाई अनुभवतात....

 हे सगळं करताना, सांस्कृतिक कार्यक्रम बसवताना बरीच उलाढाल करावी लागते. त्याचा हा शब्दप्रपंच.........

कधीतरी अचानक केंद्रातून निरोप येतो. तुमच्या शाळेत केंद्रसंमेलन घ्यायचे आहे. ते ही चार तारखेला.....

मुख्याध्यापक सगळी तयारी एक दोन तारखेला करतात. आणि मग कुणालातरी दोन तारखेच्या संध्याकाळी करंट येतो......

"अहो संमेलनासाठी स्वागत गीत,ईशस्तवन बसवले पाहिजे....मग सांगा की भोसले गुरूजींना..   "
भोसले गुरूजी म्हणतात, " अहो परवा संमेलन आणि एक दोन दिवसात कसं काय शक्य आहे......??

 मुख्याध्यापक, सहकारी म्हणतात," अहो बसवा की दोन गाणी..... कोण लक्ष देतंय त्या गाण्यांकडं... आपली पद्धत आहे म्हणून म्हणायची दोन गाणी.....""

खरंतर संमेलनाची सुरूवात चांगली व्हावी, प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं अशा इतरही अनेक कारणांसाठी आपण ईशस्तवन, स्वागतगीत बसवतो..... पण वेळेअभावी या कार्यक्रमाला केवळ "करायचं असतंय म्हणून" अशा औपचारिक पातळीवर नेऊन ठेवलं जातं..

पण गुरूजी सगळं विसरून तयारीला लागतात. मुलांची निवड करतात, गाण्यांची योजना करतात. गावात फिरुन तबलजी नाहीतर ढोलकीवाल्याला बोलावून आणतात. त्याला पदरचा चहापाणी देतात...(बिनपगारी फुल अधिकारी).  स्वागतगीत, ईशस्तवन बसवतात.

 संमेलन सुरु होते. कुंई कुंई करणारा माईक असला तरी गुरूजी मुलांना सांगतात, " म्हणा तुम्ही...चुकलं तर चुकू दे... सुरात, तालात म्हणा.""

मुलही अटोकाट प्रयत्न करुन एकदोन दिवसात बसवलेली गीतं सादर करतात......

प्रेक्षकांत बसलेले काही जाणकार (??) म्हणतात " ईशस्तवन जरा बरं झालं,, पण स्वागतगीत काही जमलं नाही..."".

आभाराच्यावेळी एखादं वाळलेलं , सुकलेलं गुलाबाचं फुल घेऊन गुरुजी समाधान मानतो. तबलजीच्या हातावर पदरचे ५०/१००टेकवतो..(बिनपगारी फुल अधिकारी)  आणि स्वत:च स्वत:चे कौतुक करून घेतो...एक दिवसात गाणी बसवली...............

 जी गोष्ट केंद्रसंमेलनाची तशीच तऱ्हा कला (शिल्प) आणि कार्यानुभव उपक्रमांची...

गेल्या दोन वर्षात " ज्ञानरचनावाद" या संकल्पनेने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात चैतन्य आले आणि हातात कुंचले घेऊन गुरूजी स्वत:च चित्रकार झाले. गुरुजनांच्या चित्रप्रतिभेला नवे पंख फुटले आणि शाळांतल्या भिंती, फरशा गुरूजींच्या कलेने संपन्न होऊ लागल्या.

आधुनिक जगाशी नाळ जोडणारं ई लर्निंग साहित्य बनवतानाही हाच कला दृष्टीकोन गुरूजनांना बळ देतो...
व्हीडीओ निर्मिती असो फोटो व्हीडीओ किंवा अन्य काही असो..
प्रत्येक ठिकाणी कलात्मक मांडणी दिसतेच दिसते  ..

 निदान रचनावादाने तरी गुरूजींची स्वप्नं वास्तवाच्या रंगात रंगू लागली.  रंगसंगतीच्या बीजांना नवे धुमारे फुटू लागले. नवनवीन कल्पनेने तयार झालेले शैक्षणिक साहित्य मुलांना कामांत गुंतवू लागले. गुरूजनांच्या कलेला योग्य स्थान मिळू लागले.

पण सगळेच नसतात कलासक्त,
नसतात सगळे कलेचे भक्त .....

परिक्षा किंवा मूल्यमापन करायची वेळ जवळ आली की मग प्रत्येक वर्गशिक्षकाला आपल्या कलाकार मित्रांची आठवण होते.. "भोसले सर माझ्या वर्गात काहीतरी कागदकाम मातकाम करून घ्या. लगेच गुरुजींमधला शिल्पकार आकार घेतो. नॉर्वे पेपर, क्रेप पेपर,
 जिगझॅग कात्री,रद्दी पेपर
सगळ काही स्वखर्चाने आणतो. (बिनपगारी.........फुल अधिकारी )

मुलंही उत्साहाने डींक सांडतात, कागद फाडतात, खराब करतात. त्यांना समजावून घेत घेत गुरूजी मुलांत मूल होतात. पक्षी होऊन आकाशात भरारी घेतात.
 कंदील बनवून मुलांच्या भविष्याचे दिवे त्यात लावतात.कागदकाम लवकर आटपत नाही, गुरूजींना (बाईंना) दुपारच्या घंटेचाही आवाज येत नाही....

 एक ना अनेक वस्तू करताना रंगीबेरंगी कागदांच्या
 ढिगात गुरुजी स्वत:ला हरवून बसतात..

इकडे स्टाफरुममध्ये मात्र दुपारच्या सुट्टीतला चहा रंगतो..एखादा बांधव हळूच कुजबुजतो...
" काय भोसले गुरूजी लय काम करून दाखवाय लागल्यात.... सुट्टी झाली तरी पोरांना सोडायला तयार नाहीत...
.
.
.
.
.
.
तेवढंच जमतंय........ दुसरं काय येतंय. गाणं आणि कागदाशिवाय........!!!

तरी गुरुजी राबत राहतात.
 मुलांना कारक कौशल्यानी भरत राहतात....

मुलांतल्या उत्साहाला कृतीकडे आणतात..

बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आयुष्याला घड्या घालत राहतात.........अगदी अविरत......

 मातकामाचीही काय मज्जा असते.  मातीचा गोळा वर्गात आणून एखादं प्रात्यक्षिक गुरूजी स्वत:च दाखवतात..

कुणीतरी मुलांबाबतही म्हणतं "मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे...शिक्षक त्यांना घडवणारा कुंभार आहे...."

खरंतर मातकाम शिकवणारा गुरुजी मुलांना मातीचा गोळा कधीच मानत नाही. समोरचे बसलेले विद्यार्थी चैतन्याचे पुतळे, सृजनाचे उमाळे, नाविन्याचे नव्हाळे, संवेदनेचे जिव्हाळे आहेत हे सर्व माझ्या गुरू- बंधूला माहीत असतात... तो मुलांना सांगतो." समजलं का रे मुलांनो... उद्या येताना तुम्हाला आवडणारा पक्षी, प्राणी, मातीची वस्तू तयार करून आणा...

मुलंच ती.. त्यांची उर्मी उसळी घेते. दरी डोंगरातली, शेताबांधाची माती प्लॅस्टिकच्या साखरंच्या पिशवीतून पोरं गोळा करून आणतात. गुरूजींच्या सूचनेप्रमाणं मळतात. मोर, बैल, मोबाईल, बैलगाडी, मण्यांच्या माळा आकार घेताना कपडे खराब होतात. ...

आणि पोरांच्या आया बोलतात, " काय रं हे पोरांनो.हेच शिकिवत्यात व्हय रं शाळेत.. अभ्यास सोडून मातीत खेळायला...... कोण त्यो मास्तर तुमचा..... त्येला तुमची कापडं धुवायला बोलवा...  .

दुसऱ्या दिवशी काही मुलं मातीच्या वस्तू आणतात. काही मुलं गुरुजीपुढं रडतात..." मातीत खेळायलो म्हणून आईनं मारलं.....तुमाला बी काय पायजे ते बडबडली...... "

तरीही गुरूजी शांत राहतो.

ज्या मातीतून जन्म घेतला, त्याच मातीला नावं ठेवली जातात...

गुरुजी आतून तिळतिळ तुटतो मात्र मातीशी नाळ कधीच तुटणार नाही यासाठी पुन्हा मातीत हात घालतो....   मुलांल मूल होऊन चिखलांत खेळतो.....


मातीची सृजनशिलता मुलांपुढे मांडतो आणि मातीच्या गोळ्यातून नवनवीन आकृत्या बनवतो.

 हाच गुरूजी निरागस बालकांच्या मनावर  स्वप्नांची पेरणी करतो ती ही माती पुढे ठेवूनच.....

 वार्षिक स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे ही कलाकार गुरूजींच्या सगळ्या गुणांचा कस पाहणारी वार्षिक परिक्षाच असते...........

कुठला कलाप्रकार बसवावा यासाठी कलाकार गुरूजी रात्रंदिवस विचार करतो.. इथंही शाळेतल्या सांस्कृतिक विभागाचं खापर त्याच्या डोक्यावर फुटण्यासाठीच असतं.....

प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक त्या कलाकार गुरूजींना सांगतात, " माझ्या वर्गाचा कार्यक्रम एकदम झकास बसला पाहिजे बघा.. "

आपल्या स्वत:च्या वर्गात जास्त न रमता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गांचे कार्यक्रम बसवत सगळ्या शाळेतून तारेवरची कसरत करतो....
कुणाच्या नृत्यातल्या स्टेप्स, त्याची ड्रेपरी,  कुणाच्या नाटकातले संवाद सांगायचे,
 ऐतिहासिक नाटकासाठी लागणाऱ्या ढाली तलवारी त्यानीच रात्र रात्र जागून तयार करायच्या,
कोळीगीताची वल्ही आपल्याच घरात बसून वल्हवायची,
 मुलामुलींच्या साड्या, कपड्यांची जोडणी त्यांनीच करायची,
प्रसंगी आपल्या बायकोची आवडती साडी शाळेतल्या कार्यक्रमासाठी एखाद्या  मुलीसाठी हळूच मागून न्यायची....

कार्यक्रमात उपयोगी पडेल अशी वस्तू घरात दिसली की नकळत उचलून न्यायचीच..

 एवढी सगळी उलाढाल केली तरी; एखादं गाणं प्रॅक्टिसला मागे पडलं किंवा ऐन कार्यक्रमात कुणाच्या ड्रेपरीचा घोळ झाला तरी सगळ्या स्टाफचं बोलून घ्यायचं, कलाकार गुरूजीनंच.....

काहीजण म्हणतात, " माझ्या वर्गाचं गाणं त्यांनी काही व्यवस्थित बसवलं नाही......."

कुणी म्हणतं," आपल्या वर्गाची तयारी तेवढी चांगली करून घेतली बघा......"

कुणी म्हणतं," गॅदरिंगच्या वेळी गावापुढं मिरवायला मिळतंय म्हणून पुढंपुढं नाचतोय........."

पण सगळे सकार नकार पचवून मुलांसाठी गुरूजी राबतो ........

सगळ्यांचे विखार ऐकूनही जीवनगाणे  गुरूजी बनवतो,

 आमच्याइकडे काही कलाकार गुरूजी लोकांनी प्रत्येक वर्षी गरजेला पडणारे कपडे, साहित्य खरेदी करून, शिलाई करून घेऊन ठेवलं आहे..

पण त्यांना या साहित्याचा जेवढा उपयोग होतो, त्यापेक्षा जास्त उपयोग इतर फुकटे लोक करून घेतात. ("फुकटे" हा शब्द अगदी अनुभवाने व जाणीवपूर्वक वापरला आहे. कृपया कुणी राग मानू नये.) कारण कार्यक्रमासाठी घेऊन जाताना दहा नेहरू शर्ट आणि बारा विजारी नेल्या तरी काही फुकटे लोक जमा करताना दहाला दहा ड्रेस जमा करतात आणि विचारलं तर म्हणतात,"अहो आम्ही बरोबर दहाला दहा ड्रेस नेले होते.( नेणाऱ्यांकडून दोन विजारी हरवलेल्या असतात..)

तरीही हरवलेल्या गोष्टींची खंत न करता गुरूजी मनाचं व मागणाऱ्या मित्राचं समाधान करतो, " बरं जाऊ दे गेले तर कपडे....एखाद्या लहान मुलानं हरवले असतील, कपडे काय पुन्हा घेता येतील पण..मैत्री आण् कलेचा आनंद पुन्हा नाही मिळत..........."

 या आणि अशा अनेक अनुभवानं संपन्न होत कलाकार गुरूजींची कलासाधना सुरूच राहते... याबदल्यात मिळतं काय .....?

" ............गुरूजी व्हय..त्येला गाण्याशिवाय काय येतंय....??  इति पालक मंडळी..

"काय गुरूजी आज वाजाप बंद हाय वाटतं...   ??  इति शा.व्य.समिती सदस्य.....

( २०११ साली आमच्याकडे एक सूर एक ताल कार्यक्रमात १००० विद्यार्थ्यांनी एका वेळी १० गिते म्हटली होती... या कार्यक्रमाच्या प्रॅक्टीससाठी दोन गुरूजी स्वत:च्या गाडीवर हार्मोनियम तबला घेऊन मुलांना शिकवण्यासाठी अनेक शाळांत फिरत होते...आमचेच सहकारी त्यांना म्हणत होते....

" काय गुरूजी आज कुठल्या शाळेत तमाशा.........????

 आमच्याकडे स्पर्धात्मक तयारीसाठी चौथी व सातवी शिष्यवृत्ती परिक्षेला खूप महत्त्व आहे..हे महत्त्व दिलंही पाहिजे.. पण म्हणून एखाद्या कलेसाठी प्रामाणिक पणे राबणाऱ्या गुरूजीला मात्र हीन समजले जाते...हे मात्र थोडे चुकीचे वाटते...

खरंतर स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांना विश्रांती म्हणून विविध छंद, कला, कागदकाम, अवांतर वाचन, संगीत, नृत्य यांचा उपयोग नक्कीत होतो.

इथं कला मुरलेल्या लोणच्यासारखी आनंद देते.  नवीन अभ्यासाला आणि क्लिष्ट संकल्पना समजून घ्यायला मनाला उभारी देते....

नवीन भाषेत स्पर्धा परिक्षा अभ्यासतंत्रातलं टॉनिकच नाही का एखादी कला..?

." यांच्या गाण्यावाजवण्यानं शाळेचं वाटोळ झालं. !"

असं आमचेच काही बांधव आणि पालक तर म्हणतात. पण.....

 तेव्हाही आपलं काम करत गुरूजी अध्यापन आणि कलेची सांगड घालत राहतो..
 जगण्यासाठी कला की कलेसाठी जगणं या वादात न पडता दैनंदिन जीवन जगताना थोडा विरंगुळा, थोडी मस्ती, थोडा विसावा, थोडा आनंद म्हणत कलेची जोपासना करत राहतो....

 दैनंदिन जगण्यासाठी लागणारं व्यावहारिक ज्ञान तो मुलांना देतच असतो, पण ज्या गाण्याची सुरूवात गर्भातल्या हृदयाच्या पहिल्या तालापासून होते आणि हा लयबद्धताल बंद झाल्यावरच जीवनगाणे थांबते त्या कलेचंही देणं तो जगतो...केवळ कलेसाठी.....

ही व्यथा कुणा एकाची नाही...

तमाम महाराष्ट्रात इतर सर्व विषयांसह कला कार्यानुभव उपक्रम राबवणाऱ्या शिक्षक बंधुभगिनींची आहे.  

घामाला मोल मिळवून देणाऱ्या श्रमप्रतिष्ठा मूल्य राबवणाऱ्या व रुजवणाऱ्या गुरूजींची आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी धडपडणाऱ्या कलारसिक गुरूजींची आहे...

रचनावादाची पेरणी स्वत:च्या कलेतून करणाऱ्या कलासक्त कलंदरांची....

आधुनिक जगाशी जोडणाऱ्या, नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये कलात्मक दृष्टीकोन वापरणाऱ्या अवलियांची....

 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना जगापुढे आणू पाहणाऱ्या सूज्ञ कला समिक्षकाची आहे....

अजून बरंच काही भळभळणारं बोलायचं राहिलंय...
पण बेसूर व्यथा आणि बेताल कथा जास्त उगाळणं बरं नाही.....

तरी....
बोलू नंतर कधीतरी.  

राहुल मारूती भोसले..
जोगेवाडी, ता.राधानगरी
जि.कोल्हापूर

मो.नं.९०११२५५७२१
वॉटसप ९५५२२८३३२६

मार्क म्हणजे गुणवत्ता नाही

अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख:

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!

डॉ. अरुण नाईक,
(मानसोपचारतज्ञ) -


नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.

मागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.

एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, "सर्वजण त्यांना काय म्हणतात?"
मुले म्हणाली, की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली, "कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात."
मी समीकरण मांडले.
'अ = ब'

'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'

'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.

जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.

सर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.

हे धोकादायक आहे....

माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी 'वा' म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.

शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.

जेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.

जरा विरोधाभास पाहूया...

मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता?
तर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.

सिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.

चांगला नागरिक,
चांगला माणूस,
चांगला डॉक्टर,
चांगला व्यावसायिक...
आपण जेव्हा काहीतरी चांगले "करतो" तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.

एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, 'आय एम युझलेस'.

या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.

मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस?
 हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.

काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.

ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!

मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
'किंमत' दिली जात नाही.

आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे "आपल्या" लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा "आपण" नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.

मार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.

'थ्री इडियट' सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरून आपली किंमत ठरवणारा,घाबरणारा मुलगा म्हणतो...
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा'..

हा आत्मविश्वास मुलांना द्या!

आवडली तर नक्की शेयर करा...!

तुमचा हा संदेश कित्येक पालक आणि विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो...

भिंतीचा वापर

भिंतींचा वापर...

***********************
मूळ लेख : कृष्णकुमार
मराठी अनुवाद : फारूक एस.काझी.
साभार : दीवार का इस्तमाल  और अन्य लेख, एकलव्य प्रकाशन, भोपाल.
प्रकाशन :2008
***********************

          बिनभिंतींच्या शाळांचा विषय थोडा बाजूला ठेवला तर ब-यांच अंशी आपल्याला असं म्हंमता येईल की बहुंशी शाळा या भिंतींचा वापर मुलांचं रक्षण करण्यासाठी व जगापासून दूर एक वेगळंच वातावरण तयार करण्यासाठी करतात.मुलांचं रक्षण यात ऊन,वारा आणि पाऊस यांच्यापासून रक्षण ह्याबाबत काहीच दुमत असण्याचं कारण नाहीये. पण शंका तेव्हा  येते जेव्हा भिंतीचा आधार घेऊन शाळा मुलांना सामाजिक वास्तवापासून दूर न्यायचा प्रयत्न करतात. शाळाव्यवस्थेच्या दृष्टीने हे मुलांचं एक प्रकारे रक्षणच असतं. आपल्याकडे एक जुनी धारणा आहे की मुलांचं व्यक्तिमत्व वास्तवाची दाहकता सहन करूच शकत नाही. या धारणांचा वापर करून असं गृहित धरलं जातं की सामाजिक वास्तवापासून मुलांचं संरक्षण करणं हा शाळाचां जणू हक्कच आहे. या हक्कापाठोपाठ एक कर्तव्यही जन्म घेतं की मुलांसाठी समाजापासून दूर चार भिंतीत एक वेगळं विश्व निर्माण करावं.
         काही दिवसांपूर्वी भारतभर यात्रा करताना माझं लक्ष शाळांच्या भिंतींवरील सुविचारांवर गेलं. या शाळेत वेळेचा उपयोग अत्यंत विचित्र स्वरूपात होतो,तिथं लिहिलं होतं की "वेळ हीच शिस्त" ! संस्थेच्या आपसातील कलहामुळे व व्यवस्थापनाच्या गोंधळामुळे सतत भांडणे ,वाद सुरू असतात .प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर लिहिलेलं होतं "क्रोध जिंकाल तर जग जिंकाल". अशीच काही वाक्ये होती जी शाळेतील वस्तुस्थितीच्या अगदी विपरित होती. या सुविचारांचा वापर करून मुलांच्या अवतीभोवती नैतिक वातावरण विणण्याचा प्रयत्न सुरू होता. हे वातावरण अशी नैतिकता शिकवण्याचा अट्टहास करत होतं ,जिचा आधार  ना  शाळेत पहायला मिळत होती ;ना शाळेबाहेर. यामुळे अशा सुविचारांचा हेतूच असफल झालेला दिसत होता. हे रोज रोज पाहून मुलांनाही सवयीनं माहित झालं असेल की भाषेचा उपयोग कोणत्याही निरर्थक कारणासाठी  होऊ शकतो. याअनुषंगाने आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की , शाळेतील भिंती अभ्यसक्रमाबाबत नकारात्मक भूमिका पार पाडत आहेत. कारण भारतीय अभ्यसक्रम हा "भाषेच्या अर्थपूर्ण वापर करता येणे " असं भाषेचं उद्दिष्टं मांडतो. आणि शाळा स्वत: च भाषेचा कसा निरर्थक वापर करते हेच जणू मुलांना शिकवत असते.
       पाश्चात्य देशात भिंतींचा वापर मुलांच्या कृतीशीलतेशी जोडला गेलाय. वर्गात मुलं जी काही चित्रं काढतात, कथा-कविता-पत्र लिहितात त्यांना तात्काळ  भिंतीवरती डकवलं जातं. वर्गातील चारी भिंती अशा मुलांच्या विविध कृतींनी भरलेल्या  असतात.  जेव्हा मूल एखादी नवीन गोष्ट तयार करतं ,तेव्हा जूनी कृती काढून घेतली जाते. मूल जेव्हा आपली कृती पाहतं तेव्हा आपण शाळेचा एक भाग असल्याचा व शाळेत आपलं काहीतरी अस्तित्व आहे यााबाबत त्याला विश्वास वाटायला लागतो. म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वाची दखल घेतली गेल्याचा आनंद होतो. हा विश्वास, आनंद केवळ  रजिस्टरला नोंदवलेल्या नावाने मिळत नाही. प्रत्येक मुलाची कृती भिंतीवर लावलेली असल्याने स्पर्धेचा प्रश्नच येत नाही. पाश्चात्य देशात 'व्यक्तीं'ना फार महत्त्व दिलं जातं. त्यामुळे शाळाही मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतात,मला वाटतं हे फार अनमोल उद्दिष्ट आहे.
       याचा अर्थ असा नव्हे की पाश्चिमात्य शाळा भारतीय शाळांहून अधिक सामाजिक वास्तवाशी जास्त जोडला गेलाय. वस्तुस्थिती ही आहे की दोन्ही प्रकारच्या शाळा समाजिक वस्तुस्थितीशी असलेली फारकत; वेगवेगळ्या पध्दतीने लपवत असतात. भारतीय शाळा आपल्या भिंती सुविचारांनी रंगवून मुलांना खोट्या नैतिकतेचे धडे देत असतात. पाश्चिमात्य शाळा मुलांच्या विविध कृती भिंतींवर डकवून ,मुलांच्या सामाजिकीकरणाची बाबदारी टाळून मोकळ्या होतात. (तुमचं काम लावलं आता आमची जबाबदारी संपली.इथं मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडतच नाही)
         इथं महत्त्व आहे याचं की या चार भिंतींच्या आत बसलेल्या मुलांना शाळा काय देते? भिंतीवर काय होतंय याचं एका मर्यादेपर्यंत महत्त्व जरूर आहे. पण सर्वांत महत्त्वाचं आहे ते हे की नेमकं वर्गांच्या आत काय घडतं आहे ?

सिंधुदूर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली.

असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.

सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते.

आजही तेथे लोक वस्ती करुन राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करुन टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यातील देवालय इ.स.१६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले. या किल्ल्यावर २८२ फूट उंचीचा भगवा ध्वज १८१२ पर्यंत फडकत होता. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली.

-श्री. प्रमोद मांडे



माझी शाळा कंची?

माझी शाळा कंची ?
---------------------------------------------
लोकमतच्या संपादकीय पानावरील "जन मन" या सदरातील माझा लेख
दिनांक २६ मे १४
http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=767847

*माझी शाळा कंची?*

- अमर हबीब

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या कुटुंबाची भाषा मराठी. आम्ही घरात मराठी बोलतो. आम्हाला मुलगी झाली. शाळेत घालायची वेळ आली. लोक म्हणाले, ‘उर्दूच्या शाळेत घाला.’ मी म्हणालो, ‘तिच्या आईची भाषा मराठी असल्याने मराठीच बरे पडेल.’ आम्ही आमच्या मुलीला प्रवेश घ्यायला शाळेत नेले. मुख्याध्यापकांच्या खोलीत सरस्वतीची प्रतिमा दिसली. मी विचारले, ‘ही प्रतिमा कशासाठी?’ मुख्याध्यापक म्हणाले, ‘आम्ही दररोज सरस्वती वंदना घेतो. त्या वेळेस या प्रतिमेची पूजा केली जाते.’ मला माझी मुलगी अशा शाळेत घालायची होती, जेथे कोणत्याच धर्माचे संस्कार केले जाणार नाहीत.

मी उठलो. दुसर्‍या शाळेत गेलो. तेथेही तेच. मुख्याध्यापक म्हणाले, ‘आमच्या शाळेत खूप चांगले संस्कार केले जातात. मुलांकडून ‘मनाचे ोक’ पाठ करून घेतले जातात.’ आणखी एका शाळेत गेलो तेव्हा पाहिले की, मुलं चक्क रामरक्षा म्हणत आहेत. मला हवी असलेली शाळा कोठेच सापडेना. शेवटी माझा नाइलाज झाला. अखेर घरापासून जवळ असलेल्या मराठी शाळेत तिचे नाव घातले. एके दिवशी तिने मला तोंडपाठ केलेला गायत्री मंत्र म्हणून दाखविला. तेव्हा माझ्या मनात चर्र झाले. हे लोक लहान लेकरांना माणसासारखे का जगू  देत नसतील? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करीत राहिला.

दरम्यान खूप मोठा काळ गेला. माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची बायको उर्दू भाषक. मी माझ्या मुलाला सांगितले की, ‘आपण आपल्या घरात मराठी बोलतो; कारण आपल्या घरातील आई मराठी आहे. आता तुझ्या घरात उर्दू भाषा बोलली गेली पाहिजे. कारण तुझ्या घरातील आई उर्दू भाषा बोलणारी आहे. जसा मी मराठी शिकलो तसे तुला उर्दू शिकावे लागेल.’ माझ्या मुलाला माझे म्हणणे पटले. त्यांना मुलगा झाला. आम्ही त्याच्यासाठी चांगली शाळा शोधू लागलो. मुलीच्या वेळेसचा अनुभव माझ्या गाठीशी होता. तरी मला वाटले की, मोठा काळ लोटून गेला आहे, परिस्थिती बदलली असेल. त्या काळात कॉम्प्युटर नव्हता, टीव्हीचा एवढा प्रचार झालेला नव्हता, मोबाईलचा पत्ताच नव्हता. आमच्या गावात इंटरनेट आलेले नव्हते. आता जग आधुनिक झालेले आहे. माझ्या मुलीला मिळाली नसली तरी नातवाला ‘माणसांची शाळा’ नक्की मिळेल.

उर्दू माध्यमातून इंग्रजी शिकविणार्‍या शाळेत गेलो. त्यांच्या फलकावरच ‘इस्लामी शाळा’ असे लिहिलेले. दुसर्‍या शाळेचा प्रॉस्पेक्टस पाहिला. त्यात धार्मिक शिक्षणाची खास सोय असल्याचे आवर्जून नमूद केलेले होते. तिसर्‍या एका शाळेत पोचलो तर तेथील मॅडम बुरखा घालून रिक्षातून उतरताना दिसल्या. म्हटलं आपल्याला हवी असलेली ‘माणसांची शाळा’ या माध्यमात देखील मिळणार नाही. ज्या अगतिकतेने मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले होते, सुमारे २५-३0 वर्षांनंतर नेमक्या त्याच अगतिकतेने मला माझ्या नातवाला उर्दू माध्यमाच्या शाळेत दाखल करावे लागले.

एके दिवशी माझा मित्र त्याच्या शाळेत गेला. संस्थाचालकाने म्हणे माझ्या नातवाला बोलवून घेतले. उणे-पुरे चार वर्षांचा नातू. गोड आणि चुणचुणीत आहे. येताच त्याने सगळ्यांना सलाम केला. संस्थाचालक म्हणाला, ‘कलमा याद है?’ ‘जी हां’ म्हणून लगेच त्याने अख्खा कलमा तोंडपाठ म्हणून दाखविला. माझा मित्र त्याचे कौतुक करून हे सांगत होता. पण माझ्या मनात पुन्हा तसेच चर्र झाले. जसे मुलीकडून गायत्री मंत्र ऐकताना काही वर्षांपूर्वी झाले होते. हे लोक लेकरांना माणसासारखे का जगू देत नसतील? हा प्रश्न मला पुन्हा अस्वस्थ करू लागला.

मी वेगवेगळ्या धर्ममार्तंडांना विचारले, ‘लहान मूल वारले तर ते स्वर्गात जाते की नरकात?’ सगळ्या धर्माच्या मार्तंडांनीे एका सुरात सांगितले की, ‘ते थेट स्वर्गात जाते; कारण ते निरागस असते.’ मी म्हणालो, ‘असे असेल तर लहान मुलांच्या शाळांत धार्मिक संस्कार का केले जातात?’ शाळेतील धर्मसंस्कार ही बालकांची गरज नसून ती वडीलधार्‍यांची गरज आहे. थोरांच्या गरजेसाठी मुलांवर ओझे लादले जाते.

बागेत उमललेली सुंदर फुले आपल्या टेबलावरील फ्लॉवरपॉटमधे शोभून दिसेल, म्हणून निर्दयीपणे खुडली जातात. प्रत्येक धर्माच्या टेबलांवर अशा निर्जीव फुलांची सजावट मांडली जाते. या फुलांचा वास येत राहावा म्हणून हे लोक त्यावर आपल्या संस्कारांच्या अत्तराच्या बाटल्या ओतीत राहतात. मुलांचे भावविश्‍व कलुषित करणारे धार्मिक संस्कार लहान मुलांच्या शाळांमधून कधी हद्दपार होतील कोणास ठाऊक?

निदा फाजली म्हणतात,
हिंदू भी मजे में है, मुसलमान भी मजे में
इन्सान परेशां है, यहां भी और वहां भी..

मला अजूनही ‘माणसांची शाळा’ सापडली नाही.

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.
---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते  जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

👍 नियम १० – सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल ........

P.hd धारक प्राध्यापक मजुराची कैफियत

पीएचडीधारक प्राध्यापक मजूराची कैफियत!

शिक्षकांच्या सावकारकीबाबत एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मी इथं फेसबूक वॉलवर शेअर केलेला टिपणवजा मजकूर आज अॅग्रोवन दैनिकाने भवताल सदरात प्रसिद्ध केला. लेखक म्हणून अॅग्रोवनने तिकडे माझा मोबाईल नंबर दिला आहे. मजकूर वाचून नेहमीप्रमाणे वाचकांचे फोन आले. लिहिणारा माणूस म्हणून वाचकांकडून आलेला फीडबॅक मला सतत समृद्ध करत आलाय. आज असे काही फोन येत होते. दिवसभर गाडी चालवून लांबवरचा प्रवास करून सायंकाळी घरी आलो. जराशी पाठ टेकवली, इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. थकलेलो असल्याने खरे म्हणजे त्या क्षणी फोन घ्यायची पण इच्छा नव्हती. फोन घेतला. मराठवाड्यातून एक शिक्षक बोलू लागले...
“सर नमस्कार, मी अमूकतमूक... आताच तुमचा लेख वाचला. आवडला, म्हणून फोन लावला. तुम्ही नेमकं लिहिलं आहे. सध्या शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर प्रतिमाभंजन सुरू आहे. एकजात सारेच शिक्षक वाईट आहेत, असे समाज आणि माध्यमातून बोलले जात आहे. ज्याचा फार त्रास होतो.”
मी आपलं त्यांच्या हो ला होकार दिला. ते पुढे बोलतच राहिले.
“मी बारा वर्षांपासून इकडे ज्युनिअर कॉलेजात शिकवतोय. माझ्या परीने चांगले शिकवत आहे. आमचे विद्यार्थी घडले. चांगल्या नोकऱ्यांना लागले. त्यांची लग्नकार्ये झाली. त्यांना मुलंबाळं झाली. त्यांचे प्रपंच उभे राहिले. आम्ही मात्र आजही विनावेतन काम करत आहोत. मायबाप सरकारला दयेचा पाझर फुटेल. आज अनुदान मिळेल, उद्या अनुदान मिळेल, या आशेवर आम्ही एकेक दिवस मोजत आहोत. मी एम्. ए. एम्. एड., एम्. फील. केलेय. दोन वर्षांपूर्वी पीएच.डी. पण मिळाली.”
“अच्छा, तुम्ही डॉक्टरेट आहात. व्वा सर! इतक्या प्रतिकूलतेत तुम्ही शिकत राहिलात. सलाम सर तुम्हाला...” मी कौतुकानं म्हणालो.
“पण इतकं शिकून तरी काय करायचं? ही शुद्ध फसवणूक आहे सर. आम्ही आज जगायला मोताद आलोय सर. आजपर्यंत संस्थेने पगार म्हणून रोख एक रुपया पण दिला नाय सर. बाजारात कोथिंबीरीची जुडी घ्यायला गेलं तरी पाच रुपये रोख द्यावे लागतात. रविवारी, सुटीच्या दिवशी, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत मी आणि माझी बायको मोलमजुरी करतो. त्यातून कसाबसा घरखर्च भागवतो. आम्ही ज्या मुलांना शिकवतो त्यांच्याच शेतात कामाला जातोय. मला कामाची अजिबात लाज वाटत नाही सर. आता सवय झालीय. पण वाट तरी किती बघायची? यंदा तर मराठवाड्यात दुष्काळ आहे. काम पण नाहीये. उमर कलली सर आता आमची. काहीजण तर रिटायर व्हायची वेळ आली. पुढं पोराचं शिक्षण आहे. आजउद्या लेकीबाळी लग्नाला येतील. या सगळ्याला कसं सामोरं जायचं सांगा सर? आम्ही दारिद्र्यरेषेखालचे जगत आहोत. शिक्षक संघटना काहीच करत नाहीत. यावर तुम्ही आवाज उठवार. तुम्ही लेख लिहा, टीव्हीवर बोला. पण कायतरी करा सर...”
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असताना त्यांच्याशी या विषयावर बोललो होतो. त्यांनी ‘साप्ताहिक साधना’मध्ये या विषयावर लिहायला सांगितले. ‘राज्यातले ३२ हजार शिक्षक जगताहेत वेठबिगारासारखं जिणं’ असा लेख मी लिहिला होता. डॉ. दाभोलकर यांनी तो लेख आणि त्यासोबत त्यांनी लिहिलेलं एक पत्र असं तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना पाठवलं होतं. पुढे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी विनानुदानित शाळांना अनुदान द्यायचं कबूल केलं होतं. पुढे काहीच झालं नाही. मानसिक आधारासाठी काहीतरी बोलायचं म्हणून मी हे त्यांना सांगितलं... मध्येच मी थांबलो. पण पुढे काय बोलावं तेच मला सुचेना. उगीच अपराध्यासारखं वाटलं. दारिद्र्याच्या गर्तेत कोसळलेले शेतकरी, कष्टकरी यांची व्यथा वेदना पाहून मन कळवळतेच. पण पीएचडी मिळालेल्या एका प्राध्यापक मजूराची ही कैफियत ऐकून सुन्न झालो. एकूण शिक्षणाचाच हा पराभव आहे असे मला वाटले...

भाऊसाहेब चासकर
यांच्या फेसबूक वॉलवरुन.

मुलांचे शिकणे

मुलांचे शिकणे समजून घेऊ या!

चिमणा आणि चिमणी वर्गाच्या खिडकीत येऊन बसले. इकडे तिकडे भिरभिर पाहू लागले. वर्गभर फिरून आणि एकमेकांशी विचारविनिमय करून वर्गाच्या भिंतिवरील एका फोटोमागची जागा त्यांनी निश्चित केली. हे जोडपं खिडकीत येऊन बसल्यापासूनच मुलांचं लक्ष या चिमणाचिमणीवर होतं. त्यांचा प्रणय पाहून मुले मला सांगत , " मँडम, त्याई दोघं प्रेम करताहेत. हो न मँडमजी?"  "

मुले आणि मी इतर अभ्यासासोबत या चिमणा चिमणीचाही अभ्यास करु लागलो. काही दिवसांनी त्यांचं घरटं तयार होऊ लागलं. मुलंही त्या घरट्यात गुंतत होती. वर्गात , वर्गाच्या आसपास मुद्दाम तणीस, कापूस, गवत वगैरे टाकून ठेवू लागली.

मुले म्हणायची,  " त्याइनी बिचारे किती दूर दूर जाऊन काडीकचरा, गवत बीन घेऊन येतंत. त्यांना आपन थोडी मदत करु. मंग त्याइचं घरटं लवकर बनीन. चिमणी  आंडी देईन. मंग आंडे फुटून पिले निंगतीन...." मुले एक्साईट होऊन विचार करत होति. दरम्यान वर्गातील दुसऱ्या फोटोमागे दुसऱ्या जोडप्याचेही घरटे तयार होत होते. वर्गात दोन दोन घरटी ! मुले  खूपच उत्तेजित होती. चिमणा चिमणीसाठी वर्गात आणि शाळा परिसरात मुले दाणा पाणी ठेवू लागली . चिमण्या दाणे खाताना , पाणी पितांना  दिसल्या की मुलं खूश होत.

आमचे आणि चिमणाचिमणीचे मजेत चालले होते. एक दिवस शाळेत गेलो नि वर्गसफाई चालू असतांना मुलांना कोपऱ्यात घरट्यातून खाली पडलेलं पिलू दिसलं.  मुलांचा जीव कळवळला. पिलास पंख फुटले होते पण चालता किंवा उडता येत नव्हते. ते पुढे सरकण्याचा प्रयत्न करे आणि कोलमडून पडे. मुले म्हणू लागली , "  मँडम, हे पिलू घाबरल्यावानी दिसते. हो न ? त्याच्या आईबाबापासून ते दूर झालं म्हनून त्याची हालत अशी झाली. याला याच्या आईबाची आठवण येत असीन अन् आईबाबा याले शोधत असतीन आपलं पिलू कोटी गेलं म्हनून "

मुलांनी त्याला तांदळाची कणी चारायला घेतली. पिलाने पटकन चोच उघडली. मुले पिलाच्या तोंडात दाणे टाकू लागले पिलू पटपट खाऊ लागले. पोट भरल्यावर पिलाने चोच उघडणे बंद केले नि शांत बसून गेलं. मुले पिलू परत घरट्यात ठेवू म्हणाली. पण माणसाचा हात लागलेलं पिलू चिमण्या स्वीकारत नाहीत असे ऐकले असल्यामुळे आणि त्याचा अनुभव आला असल्यामुळे पिलू घरट्यात ठेवायचे नाही असे ठरवले. वर्गात एक चिमणीचे जूने घरटे संग्रहीत होते त्यात मुलांनी त्या पिलास ठेवले. शाळा सुटल्यावर मुले त्यास घरी घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत आली तेव्हा त्या पिलासह आली. आता मुलांनी त्या पिलासाठी खोक्याचे घर बनविले होते. त्या घरात ते घरटे व त्यात ते पिलू होते. या अभ्यासाच्या जोडीला मुले भाषा गणिताचाही अभ्यास करीत होतीच. तसं पाहिलं तर या पिलाला वाढविण्यातही मुलांची भाषा आणि गणित समृद्धी होत होतीच. परिसर अभ्यास हा मूळ विषय होताच. मात्र मुले थोडीच जाणून होती , आपण या सगळ्यातून परिसर अभ्यास, विज्ञान शिकत आहोत म्हणून आणि यासोबतच आपला भाषिक आणि गणितीय अभ्यास होतोय म्हणून . मात्र शिक्षक म्हणून मला ही जाणीव होती. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग यांचं शैक्षणिक मूल्य मला ध्यानात घ्यावच लागतं नाहीतर नुसते पाठ वाचून दाखविण्याचा आणि त्यावरील प्रश्नोत्तरे मुलांकडून सोडवून घेण्याचा आणि परीक्षेत पुस्तकातीलच प्रश्न विचारण्याचा निरर्थक, निःसत्व प्रयोग मी करत बसेन. म्हणून मी मुलांना पुस्तकं ' शिकवण्याचा ' प्रयत्न करीत नाही. त्यामुळे 'कोर्स कम्प्लीट ' व्हायचा आहे असं दडपण , टेन्शन मला येत नाही.  मी आणि मुले मजेत असतो.

चिमणा चिमणी जेंव्हा खिडकीत येऊन बसले होते तेव्हाच त्यांनी चिमणा कोणता आणि चिमणी कोणती हे ओळखले होते. सोबतच ' नर - मादी ' ही ओळखही त्यांनी करून घेतली. आता जेव्हा  घरट्यातून पडलेले पिलू मुलांनी उचलले तेंव्हाही त्यांनी ते बेबी चिमणा आहे , की बेबी चिमणी आहे हे ओळखले. हे पिलू बाळ  चिमणी आहे असे मुलांनी मला सांगितले . चिमणा आणि चिमणीत काय फरक असतो , तो कसा ओळखायचा हे ही मला सांगितले . माझे कर्तव्य एवढेच , की मुलांच्या आनंदात सहभागी होणे, मुलांचे आदराने ऐकणे प्रसंगानुसार उत्सुकता वाढविण्यासाठी किंवा शमविण्यासाठी माझ्याजवळ असलेली माहिती पुरविणे किंवा तसली पुस्तके उपलब्ध करून देणे. मुले अधिकची माहिती मिळविण्यासाठी ही  पुस्तके वाचतात. कधी नवीन माहिती मिळाली म्हणून खूश होतात तर कधी पूर्वानुभवाशी सांगड घातली गेली म्हणून खूश होतात पुस्तक वाचताना. त्यांच्या वर्गाचे पाठ्यपुस्तकही ते एक संदर्भ साहित्य म्हणूनच वापरतात.

मुले पिलाची रोज काळजी घेत होती. दाणापाणी तर करत होतीच शिवाय ते कुणाची शिकार बनू नये याचीही काळजी वाहत होती .

पाचव्या दिवशी मुलांनी पिलाचे बारसे केले एक एक रुपया काढून. पिलाचे नाव ठेवले ' चिकू' आणि पूर्ण शाळेला बिस्कुटे वाटली.

नुकताच ' जागतिक चिमणी दिन ' साजरा झाला. आम्ही तो साजरा नाही केला . कारण आमचा रोजच असतो 'चिमणी दिन ' पर्यायाने 'पर्यावरण दिन'

असले दिन साजरे करुन मुलांमध्ये , मोठ्या माणसांमध्ये कितपत जाणीव विकसीत होते हे मला ठाऊक नाही. मात्र मला हे खात्रीने ठाऊक आहे , की निसर्गाशी , मुलांच्या भावनांशी संलग्न राहून शिकल्याने पर्यावरणाची समृद्ध जाणीव , प्रेम मनात फुलून येते. म्हणून मी मुलांना घेऊन भटकत असते , कधी ओढ्यावर , कधी शेतात तर कधी मुंग्यांची वारुळ शोधीत.

नाहीतर परिसर अभ्यासचा तास घेतांना किंवा  मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चिमणीचा   एदा पाठ किंवा कविता शिकवताना खिडकीच्या गजावर बसलेल्या चिमणीकडे पाहणाऱ्या मुलांवर खेकसून नंतर  'जागतिक चिमणीदिन ' किंवा पावसाच्या टपो- या थेंबात चिंब भिजण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना वर्गात बसवून 'जागतिक जलदिन '   साजरा करण्यात अर्थ नाही. म्हणून आम्ही शिकतोच निसर्गाच्या संगतीने.

चिमणीचं पिलू मोठं होतंय माणसांच्या पिलासोबत.

             वैशाली गेडाम
               8408907701

Friday, June 3, 2016

Online Book Reading

पुस्तके वाचने ही उत्तम सवय आहे. पण धकाधकी च्या जिवनात वाचन कमी होते. तर मग आपल्यासाठी कंप्युटर वर पुस्तक वाचने हा एक पर्याय असतो. कारण कंप्युटर आता आवश्यक झाले आहे. ते बहुतेकांनजवळ असते. म्हणूनच मी आपल्या साठी १० मोफ़त जागांची माहिती आणली आहे जेथून आपण विनामूल्य पुस्तके download  करु शकता.
लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

१.   http://www.gutenberg.org
आपण येथून फ़ार छान पुस्तके काढू शकता.

२.   http://www.freebookspot.in/
या जागेवर 72 Gb चे ५००० पुस्तके आहेत.

३. http://www.free-ebooks.net/
येथून तुम्ही पुस्तके घेवू व देवू पण शकता.

४.  http://manybooks.net/
फ़ार छान जागा आहे.

५.  http://www.getfreeebooks.com/
येथे एका ( click ) पुस्तके मिळवू शकता.

६  http://freecomputerbooks.com/
संगणकावरील पुस्तके येथे मिळतील.

७. http://www.freetechbooks.com/
तंत्रज्ञानावरील पुस्तके येथे मिळतील.

८.  http://www.scribd.com/
पुस्तके आपण येथे प्रकाशित सुध्दा करु शकता.

९. http://www.globusz.com/
नवीन लेखकांना येथे संधी मिलते.

१०. http://www.onlinefreeebooks.net/
येथे १५ भागात पुस्तके आहेत.

आपण खालील जागांवर पण जावू शकता.

१.  http://en.wikipedia.org/wiki/List_of_digital_library_projects

२. http://www.archive.org

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

कल्पकतेकरीता शिक्षकांचा सहभाग

एखाद्या शाळेत तुम्ही गेलात, तिथे सर्वत्र शांतता असेल, सगळे विद्यार्थी ठोकळ्यांसारखे एका जागी बसले असतील आणि फक्त शिक्षक एकासुरात शिकवत असतील, एकंदरीतच वातावरणात काहीसे औदासिन्य असेल तर अशी
शाळा तुम्हाला आवडेल का ? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल.

शाळा म्हणजे कसं प्रसन्न वातावरण, हसती खेळती मुले आणि त्यांचा सहभाग घेऊन शिकवणारे शिक्षक असावेत असं अपेक्षित आहे. मात्र सद्यस्थितीत भारतातील अनेक शाळांमध्ये हे वातावरण आढळून येत नाही हे वास्तव आहे.
विद्यार्थ्यांमधील कल्पकता वाढीस लागण्यासाठी शिक्षकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी मुळात शाळेत विद्यार्थ्यांकरीता पोषक प्रसन्न वातावरण असले पाहिजे. तसेच कल्पकतेने विचार करण्याकरीता विद्यार्थ्यांना वेळोवेळी
उद्युक्त करण्याचे महत्वाचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. मग विद्यार्थ्यांनाकल्पक विचार करण्याची सवय लागावी यासाठी शिक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागेल असे मला येथे सांगावेसे वाटते.

ही विशेष मेहेनत म्हणजे वेळोवेळी स्वतःची कल्पकता वापरणे त्याचबरोबर विविध साधनांचा वापर करणे. तसेच उपलब्ध असलेल्या साधनांमध्येच शिक्षकांना विद्यार्थ्यांचा कल्पक दृष्टीकोन विकसित करता येऊ शकतो. त्यासाठी
भरपूर पैसे, महागडे इन्फ्रास्ट्रक्चर यांची अजिबातच गरज नाही.

प्रत्येक शिक्षकाला काही नवीन उपक्रम राबवायचा म्हणजे वर्गातला गोंधळ वाढणार ही सर्वात मोठी भीती वाटते. यावर महत्वाचा उपाय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त रूजवणे हाच होय. किंबहुना हीच कल्पनाशक्तीला चालना देण्याची पहिली पायरी आहे असे म्हणता येईल. समजा गणित हा विषय मैदानात शिकायचा असं ठरवलं तर मुलांनी रांगेत जावं, शांततेत जावं आणि त्याकरीता जो लीडर असेल त्याचं ऐकणं हे नियम स्वतः मुलांनी बनवले तर त्यांचा सहभाग अधिक वाढतो. यामुळे आपोआपच त्यांच्यात जबाबदारीची जाणीव वाढीस लागते. ही जाणीव वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.माझा सहभाग महत्वाचा आहे हे मुलांना वाटल्यानंतरच ही जाणीव रूजते.कल्पकतेकडे नेणारी ही दुसरी पायरी. त्यानंतर शिक्षकांनी विविध साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. त्यासाठी सहज उपलब्ध असलेली साधऩे वापरणे अधिक श्रेयस्कर. उदाहरणार्थ पाने, फुले, दगड, माती, पाने, फुले वगैरे.
याखेरीज तक्ते, कोडी अशाप्रकारच्या विविध बाबींचा अवलंब करण्यात येऊ शकतो. तसेच एकाचवेळी अनेक उपक्रम राबवण्यापेक्षा एकच उपक्रम राबवा त्यावर लक्ष केंद्रीत करा. त्यासाठी मुलांना पूर्वतयारी करण्याचा वेळ द्या. उपक्रम
कोणता राबवायचा, साहित्य काय निवडायचं हे विद्यार्थ्यांचा कल ओळखून ठरवा. उदा. गणित विषय शिकवताना विद्यार्थ्यांचे गट करणे, खेळाच्या माध्यमातून सम विषम संख्या शिकवणे ई.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे उदाहरण येथे घेता येईल. ते जेव्हा टस्कगीच्या शाळेत गेले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ मायक्रोस्कोप हे एकमेव साधन होते. त्यांच्याजवळ प्रयोगशाळा नव्हती. मग त्यांनी मुलांना घेऊन कच-यातून साधनं गोळा केली. जसे पत्र्याला भोकं पाडून चाळणी तयार केली, काचेला काजळी लावून त्याद्वारे फोकस्ड बीम तयार केला आणि असं करत करत प्रयोगशाळा उभारली.

शिक्षकांनी स्वतःच्या वागण्यात कल्पक दृष्टीकोन बाळगला, स्वतःची कल्पकता वापरून ज्ञानदान केले तर त्यांच्याकडून मुलांना प्रेरणा मिळेल आणि कल्पकतेने विचार करण्याची सवयच लागेल. मात्र त्यासाठी शिक्षकांना थोडसं धैर्य दाखवावं लागेल. इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं लागेल.

कल्पकता हा एक गुणांचा समूहच आहे. धैर्य, वेगळा विचार करण्याची क्षमता, तो मांडता येण्याची क्षमता, इतरांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे, आत्मविश्वास असे अनेक गुण या एका माध्यमातून वाढवता येतात. मात्र त्यासाठी सातत्य व
मेहनतीची जोड देणे अत्यावश्यक आहे.

Shirin Kulkarni
Director
Council for Creative Education - CCE Finland Oy

शिक्षणात कल्पकतेचा वापर

शिक्षणात कल्पकतेचा वापर

आजची शिक्षणपद्धती ही केवळ परीक्षा केंद्रीत आहे हे सर्वमान्य आहे. ही शिक्षणपद्धती बदलण्याबाबत मोठ्या प्रमाणावर विचारमंथनदेखील होत आहे.मात्र सद्यस्थितीतील शिक्षणपद्धती अशीच का याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जगाच्या इतिहासात डोकवावे लागेल.
1930 सालच्या जागतिक मंदीनंतर ज्या शाळा सुरू झाल्या त्यांची पद्धत कारखान्यांसारखी होती. कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने काम चालते त्याचपद्धतीने शाळांचे कामकाज चालू लागले. कामगारांच्या शिफ्टस्प्रमाणे विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या वेळा, परीक्षापद्धतीचे प्रमाणीकरण अशा अनेक बाबींचे उदाहरण याबाबत घेता येईल. शाळांधील उत्पादन म्हणजे विद्यार्थी. मग हे उत्पादन चांगले, दर्जेदार असावे याकरीता शाळांकडून एकाच पद्धतीने विचार
करण्यात आला व त्यासाठी सर्व शाळांमध्ये एकच पद्धती अवलंबण्यात आली.

खरे पहाता विद्यार्थी म्हणजे कोणी उत्पादन नव्हे. त्यामुळे त्यांना जोखण्यासाठी किंवा ज्ञान देण्यासाठी त्यांच्या कलाने त्यांना वाढवणे महत्वाचे. परंतु शाळांमधून हा मूळ विचारच नाहीसा झाला. विद्यार्थी परीक्षार्थी बनले. गुण मिळवण्यासाठी शिक्षण असेच समीकरण झाले. त्याचबरोबर शिक्षण पद्धतीद्वारे कारखान्यांना उपयुक्त ठरेल असे उत्पादन निर्माण करण्याकडे कल वाढला.त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला कारखान्यामध्ये उपयुक्त ठरतील अशी कौशल्ये शिकवण्याकडेच शिक्षणपद्धतीचा ओघ वाढला. तत्कालिन परिस्थिती पहाता त्यावेळी तशा पद्धतीचे शिक्षण योग्यच होते. मात्र तशी शिक्षणपद्धती आजच्या काळाला अनुरूप मात्र नाही हे तितकेच खरे आहे.

बाजारपेठेत झालेले मूलभूत बदल हे शिक्षणपद्धती घडवण्यास कारणीभूत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच आजच्या बाजारपेठा बघता नावीन्य आणि कल्पकता या बाबींना अत्यंत महत्व आले आहे. म्हणूनच शिक्षणातील कल्पकतेचा वापर वाढवणे हे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे. विद्यार्थ्यांमध्ये कल्पक दृष्टीकोन विकसित होण्याकरीता शाळा व शिक्षकांबरोबरच पालक देखील तितकेच जबाबदार ठरतात.

आपल्या पाल्याला वाढवताना पालकांनी विशेषत्वाने त्यास कल्पक दृष्टीकोन दिला पाहिजे. किंबहुना त्यास तशी सवयच लावली पाहिजे. याचे कारण विद्यार्थी हे काही कारखान्यातून बाहेर पडणारे उत्पादन नव्हेत. तुमचा पाल्य ही व्यक्ती आहे. त्यामुळेच त्यास भावभावना, विचारक्षमतादेखील आहे. वेगळ्या विचारानी जगण्याकरीता, समाजात काही भरीव कामगिरी करण्याकरीता परंपरेपेक्षा वेगळा विचार करण्याची गरज असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला कल्पक
दृष्टीकोनाची देणगी देणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्याकडे मात्र अनेक पालक व शाळा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने विचार करण्याची सवय लावण्याबाबत काहीसे उदास दिसतात. आपल्या व्यस्त दिनक्रमातून मुलांची जडणघडण नेटकी व्हावी याकरीता ती जबाबदारी पालक
शाळेवर ढकलतात याउलट शाळांवर विशिष्ट शिक्षणपद्धती राबवण्याची सक्ती असल्याने शाळा देखील विद्यार्थ्यांना घडवण्यात अयशस्वी ठरतात. वर्गातील चुणचुणीत मुले कायम सर्व ठिकाणी चमकतात त्यामुळे मागे पडणा-या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. खरंतर शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. याकरीता ज्या विद्यार्थ्याला शिक्षणात ज्या बाबीमध्ये अडचण येते त्याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसते.

फिनलंडमधील शिक्षणपद्धतीचे उदाहरण येथे मला द्यावेसे वाटते. येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या समस्या येतात त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते.शाळेतील विद्यार्थ्याला येणारी अडचण सोडवणे, जे कौशल्य येत नसेल त्यावर
अधिक भर दिला जातो आणि विशेष म्हणजे याकरीता शिक्षक देखील अधिक वेळ खर्ची घालण्यास तयार असतात. आपल्याकडे देखील असे शिक्षक आहेत मात्र दुर्दैवाने त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

कल्पकतेचा शिक्षण पद्धतीत वापर करण्यासाठी पालक व शिक्षकांचा अधिक व नेमका सहभाग अपेक्षित आहे याबाबतचे विवेचन पुढील लेखात ..

शिरीन कुलकर्णी
संचालक,काऊन्सिल फॉर क्रीएटीव्ह एज्युकेशन, सीसीई फिनलंड

कल्पकतेचे मूल्यमापन

मागील लेखापासून आपण कल्पकतेचे मूल्यमापन या गोष्टीवर चर्चा करतो आहोत. ई. पी. टोरांस यांच्या समकालीन अनेक संशोधकांनी कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. जसे कि जे. पी. गिल्फ़ोर्ड , त्यांनी विशेषत: Divergent थिंकिंग या पैलूवर संशोधन करून त्यांची चाचणी विकसित केली. त्यानंतर चीकचेन्क्मिहाली या संशोधकाने एखादी निर्मिती हि त्या क्षेत्रातले तज्ञ कशाप्रकारे स्वीकारतात यावरून ती निर्मिती खरच सृजनशीलतेचा नमुना आहे कि नाही हे ठरवण्याची पद्धत विकसित केली. ही पद्धत फारच संकुचित आणि एकांगी असल्याचं संशोधकांना वाटलं.

या सगळ्या संशोधकांनी विशेषत: व्यक्तिगत कल्पकता मोजण्याचे प्रयत्न केले. एखाद्या निर्मितीचा समाजात कसा स्वीकार होतो यावरून त्या कलाकाराची कल्पकता मोजण्याचे पण प्रयत्न केले पण कल्पकता केवळ याच परीघांमध्ये राहून मोजता येईल का? त्यातून सध्याच्या कालानुरूप कल्पकतेची व्याख्या आणि तिचे मोजमाप करत येईल का?

या प्रश्नान वर जर विचार करू या. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात कल्पकतेचं  मूल्य खूपच वाढलं आहे. दर दिवशी नव्या योजना, नवीन उत्पादने बाजारात येत आहेत. सगळी अर्थव्यवस्था कोण किती कमीतकमी वेळात पुढचं  चांगलं  उत्पादन बाजारात आणु शकतय  आणि विकू शकतय यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत फक्त एक माणूस स्वत:पुरता कल्पक असून चालेल का? तर नाही, त्याला इतरांबरोबर काम करतानाही कल्पक राहावं  लागेल आणि एक संघ म्हणून कल्पक असावं लागेल.

याच संकल्पनेला अनुसरून सध्या फिनलंडमध्ये एक चाचणी विकसित करण्यात आली आहे. त्या चाचणीचं नाव आहे Know Your Creativity Index (KYCI)! या चाचणीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुमची वैयक्तिक कल्पकता तर मोजली जातेच पण तुम्ही इतरांबरोबर काम करत असतांना ती कल्पकता कशी वापरता हेही समजतं. जरा उदाहरण घेऊन समजावून घेऊ या. अमित नावाचा एक चुणचुणीत मुलगा आहे. तो पटापट गोष्टी करून टाकतो. त्याला फारसं एका जागी बसवत नाही. शाळेत गुण वर खाली होत असतात कारण अभ्यासात सातत्य नाही. मित्र मात्र भरपूर आहेत. आता या सगळ्यावरून सामान्यपणे आपण काय अंदाज बांधू? एक म्हणजे हा मुलगा जरा  उनाड दिसतोय. त्याला नुसतीच मजा करायला आवडते. अभ्यासाची आवड नाहीये मग बहुधा कल्पकता पण फार असेल असं वाटत नाही. हे झालं आपल सर्व सामान्य मत.

आता या मुलाची KYCI चाचणी कशाप्रकारे घेतली जाईल ते बघू या. या चाचणीचे दोन भाग आहेत. एक भाग आहे पेपर सोडवण्याचा. यामध्ये अमितला एक पेपर दिला जाईल कि ज्यामध्ये त्याला काही चित्रं काढायची असतील. त्या साठीच्या सूचना त्याला वेळोवेळी दिल्या जातील. हि सगळी चित्रं काढण्यासाठी त्याला एकूण ४५ मिनिटांचा अवधी लागेल. त्यानंतर त्याच्या सारखाच पेपर सोडवलेल्या इतर चार मुलांबरोबर त्याचा एक संघ बनवला जाईल. या संघाला एकत्रितरीत्या करण्यासाठी काही काम दिलं जाईल. हा संघ हे काम जेव्हा करत असेल त्यावेळी एक निरीक्षक तिथे उपस्थित राहून नोंदी घेत असेल. या मध्ये कोण कशाप्रकारे काम करतय? त्यात नेतृत्व कुणाकडे आहे? कोण निर्णय घेतय असे अनेक पैलू बघितले जातात. हा कालावधी साधारणपणे ९० मिनिटांचा असतो. एकुण या चाचणीचा कालवधी जास्तीत जास्त अडीच तास असतो.

चाचणी झाली कि ३-४ आठवड्यात रिपोर्ट दिला जातो. या ३-४ पानी रिपोर्टमध्ये अमितची कल्पकता कशी आहे ते सांगितलं  जातं. कल्पकता मोजण्याचे जे मापदंड आहेत जसे कि एखादी गोष्ट बघून किती कल्पना सुचतात, त्यात किती कल्पना पूर्णत: नवीन आहेत? एखाद्या संकल्पनेच्या मुळाशी जाण्याची क्षमता आहे कि नाही, याबद्दल माहिती दिली जाते. त्यावरून त्याची वैयक्तिक कल्पकता कशी आहे ते कळते. याच रिपोर्ट मध्ये त्याची संघात काम करण्याची क्षमता कशी आहे हेहि सांगितलं जातं. तो इतरांबरोबर काम कसं करतो? त्याला ते आवडतं का? जमतं का? काही सुधारणा करण्याची गरज आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात दिली जातात.
रिपोर्ट तयार होत आला कि एकदा पालकांशी चर्चा करून त्याबद्दलची काही इतर समस्या किंवा पार्श्वभूमी जाणून घेतली जाते जेणेकरुन त्या समस्यांची उत्तरेही रिपोर्टमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतील. यामुळे त्या मुलाची कल्पकता तर समजतेच पण ती कशामुळे तशी आहे हे लक्षात घेतल्याने त्याबद्दलच्या काही उपाय योजनाही सुचवल्या जातात.

आता हि चाचणी नक्की कशी असते हे तर आपल्याला समजलं. अमितची चाचणी घेतली गेली त्याचा रिपोर्ट पुढच्या लेखात वाचू या. निकालाची उत्सुकता थोडी ताणायला नको का?

शिरीन कुलकर्णी
सीसीई फिनलंड
 shirin.kulkarni@ccefinland.org

ज्ञानरचनावाद

रचनावादाचं शास्त्र आत्मसात करायला हवं!
- रमेश पानसे

रविवार, 22 मे 2016

Share Link:
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N769KN
Tags: saptarang, ramesh panse

*जिल्हा परिषदांच्या शाळांमधून रचनावादी शिक्षणपद्धती आता मूळ धरू लागली आहे. क्रमिक पुस्तकांच्या स्वरूपात बदल, मूल्यवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी आदींच्या माध्यमातून ती रुजत आहे. मूल्यवर्धनाचे कार्यक्रम शाळांमधून राबवणं हे या शिक्षणपद्धतीमधलं पुढचं पाऊल म्हणता येईल. महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या काही शाळांमधून पुढच्या महिन्यापासून (जून २०१६) मूल्यवर्धनाचे कार्यक्रम पथदर्शी स्वरूपात सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या रचनावादी शिक्षणपद्धतीविषयी...*



मध्यंतरी माझ्याकडं एका शहरातले एका क्‍लबचे प्रमुख भेटायला आले. मागं पडलेल्या शाळांमधल्या काही निवडक शिक्षकांसाठी त्यांना प्रशिक्षण घ्यायचं होतं. तसं ते ठरवून आले होते. ते म्हणाले ः ‘‘मी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून, त्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावणार आहे’’ नकारार्थी मान हलवली. मी त्यांना सुचवलं ः *‘‘मागं पडलेल्या शाळांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण द्यायचं असेल, तर तुम्ही तथाकथित मान्यवर मराठी शाळा आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा निवडा. सध्याच्या परिस्थितीत त्याच ‘मागासलेल्या’ शाळा आहेत, असा माझा कयास आहे.’’*

आज बहुतांश खासगी मराठी शाळांतून आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांतून, ६० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आणि त्याहीपूर्वी ६० वर्षं जन्माला आलेली, तत्कालीन मानसशास्त्राचा बळकट पाया असलेली वर्तनवादी विचारसरणी अजूनही त्यांच्या व्यवहारात टिकून आहे. पठडीबद्ध, बंदिस्त आणि थोड्यांना यश देऊन, अनेक मुलांना वेगवेगळ्या स्तरांवरचे अपयशी ठरवणारी अशी ही जीवनपद्धती अजूनही अवलंबली जात आहे. या पद्धतीची भलामण करणारे लोक आज जगभरातच फारसे उरलेले नाहीत. फक्त, जुना चर्मरोग जसा खूप काळ टिकतो, तशी ही पद्धती काही शाळांतून टिकून आहे. काही लोक ती अट्टहासानं, तर काही लोक, शालेय शिक्षक व व्यवस्थापन यांच्या सोईसाठी, तर अन्य काही लोक आर्थिक स्वार्थापोटी या जुन्या पद्धतीलाच चिकटून आहेत. त्यामुळं साहजिकच अशा शाळा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात कमी पडत आहेत.

या खासगी शाळांच्या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शेकडो शाळा आपापल्या विद्यार्थ्यांना शिकतं करण्यात आणि आनंदी करण्यात उठून दिसत आहेत.
मी अलीकडं जिल्हा परिषदांच्या शाळांच्या संपर्कात असतो; त्यांच्या शिक्षकांशी बोलतो, त्यांचे वर्ग व विद्यार्थी न्याहाळतो. माझ्या असं लक्षात आलं आहे, की जिल्हा परिषदांचे बरेचसे शिक्षक आणि शिक्षिका, स्वयंप्ररणेनं, प्रत्यक्ष वर्गांमधल्या शिकण्या-शिकवण्याच्या व्यवहारात खूप मोठे, उपयुक्त असे बदल करत आहेत. त्यात त्यांची मानसिक गुंतवणूक मला दिसतं आहे. शिक्षणाच्या वाढत्या गुणवत्तेत त्यांच्याकडून होणारं वर्धितमूल्याचं (व्हॅल्यू ॲडिशन) प्रमाण आहे, हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल. ‘महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे,’ असं ठाम विधान आजच्या घडीला मी स्पष्टपणे करू शकतो.

शिक्षण हक्क कायद्याच्या (२००९) पाचव्या प्रकरणातल्या २९ व्या कलमात म्हटलं आहे ः ‘‘जर विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा रीतीनं वर्गांमधल्या अनुभवांची मांडणी व्हायची असेल तर, शालेय व्यवस्थेत अंगभूत स्वरूपाचे मोठे बदल करावे लागतील.’’
इथं म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात असे बदल होऊ लागले आहेत असं मला वाटतं.
या बदलांचा थोडासा आढावा घेता येईल.
शालेय शिक्षणात, रचनावाद तीन स्तरांवर दृष्टीस पडतो.
एक ः वर्गाच्या, शाळेच्या रचनेत
दोन ः वर्गातल्या शिक्षणप्रक्रियेत
तीन ः शिक्षक-शिक्षिकांच्या मनात
वरील तीनपैकी पहिल्या स्तरावरच्या, म्हणजे शालेय वर्गातल्या-शाळेतल्या रचनेत किंवा व्यवस्थेत, रचनावाद बऱ्यापैकी पसरलेला आहे, असं आज आढळून येतं. अनेक शाळांनी जमिनी हा एरवी शिक्षणप्रक्रियेत न वापरलेला घटक वापरायला सुरवात केली आहे. कित्येकांनी जमिनी शैक्षणिक अंगानं रंगवल्या आहेत. काही खेळ, काही उपक्रम या जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना आकर्षित करू पाहत आहेत. जे काही रंगवलेले आहे, ते छान दिसत आहे; त्यामुळं शाळेत काही बदल होत आहे, हे शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना-गावकऱ्यांना सहजपणे कळतं. सुरवात म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे.

शाळांच्या भिंतींवर मात्र वर्तनवादी आणि रचनावादी अशा दोन्ही विचारांना स्थान दिलेलं दिसतं. अनेक तक्ते, सुविचार, माहिती, शासकीय सूचना अशा गोष्टी प्रामुख्यानं दिसून येतात. हा बदलाचा सुरवातीचा काळ म्हणून मानता येईल. भिंतीच्या वापराबद्दल फारसा सयुक्तिक विचार मात्र होत नाही, असं जाणवतं. रचनावादी शिक्षणात जमिनींवर, भिंतींवर कोणत्याही गोष्टी कायमस्वरूपी असू नयेत, असा संकेत आहे. काही गोष्टी रोज किंवा आठवड्याला बदलतील आणि काही गोष्टी महिना-दोन महिन्यांनी. शाळांच्या भिंतींवर बरेचसे फोटो टांगलेले असतात, त्यातले शक्‍य तेवढे काढून टाकले, तर मुलांना अशा जागा त्यांच्या अभिव्यक्तीसाठी उपलब्ध होतील. (शाळेत केवळ शिक्षणतज्ज्ञांचे फोटो - भारतीय आणि पाश्‍चात्य - का लावले जात नाहीत?) इयत्तांनुसार भिंतींवरच्या जागांची वाटणी अर्थातच करता येईल. भिंतींवर काय नसावं, याचबरोबर काय असावं, हे महत्त्वाचं आहे. यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे, भिंती हा वर्गवातावरणाचा भाग आहे. त्यामुळं वर्गाच्या शैक्षणिक वातावरणात भिंतींना सामावून घेणं इष्ट ठरतं; तसंच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी भिंत ही एक सोईस्कर जागा असते आणि भिंतींवरचं आपल्या कामाचं प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व प्रेरित करणारं असतं.

बाकं हटवून जमिनीवर बसण्याची पद्धत
शासकीय प्राथमिक शाळांमध्ये आणखी एक होत असलेला बदल ठळकपणे लक्षात येत आहे, तो म्हणजे वर्गातल्या बाकांना रजा देऊन मुलांना छोट्या गटांत बसवायला अनेक ठिकाणी सुरवात झाली आहे. कित्येक ठिकाणी, वर्गातून बाकं हलवण्यात काही अडचणी आहेत; पण तिथंसुद्धा बाकं भिंतींशी लावून मध्यभागी मुलांना जमिनीवर बसण्यासाठी जागा मोकळी केलेली आहे. विद्यार्थ्यांनी जमिनीवर छोट्या गटांत बसण्याची पद्धत आता रुळायला लागलेली दिसते. तरीसुद्धा शिक्षकांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी आहे व ती म्हणजे, गट हे त्या त्या वेळच्या अध्ययनाच्या हेतूंनुसार असावे लागतात. गट हे अनेक कारणांनी बदलतही जातात आणि मुख्य म्हणजे गट हे सहकारी शिक्षणाला पायाभूत असल्यामुळं सहकारी शिक्षणातल्या तत्त्वांचीही झालर त्यांना असावी लागते. या दिशेनं शिक्षक-शिक्षकांनी अधिक माहिती घेणं उपयोगाचं ठरेल.

शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग
चौथा महत्त्वाचा आणि सगळीकडं सर्रास आढणारा बदल म्हणजे, आता शाळांतून शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. काही साधनं शासनानं पुरवलेली, काही साधनं शाळांनी विकत घेतलेली, तर काही शिक्षकांनी स्वतः केलेली आहेत. बऱ्याचदा ही साधनं, अन्य ठिकाणी पाहून तशी तयार करून वापरली जात आहेत, तर काही साधनं शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून नव्यानं निर्माण केलेली आहेत. उत्साहानं साधने निर्माण होणं वेगळं आणि त्यांच्या निर्मितीमागं काही शास्त्रीय दृष्टिकोन असणं वेगळं. जे साधन आपण वर्गात मुलांसाठी वापरू इच्छितो, त्याचं स्वरूप मुलांना हाताळण्यास सोईचं, सुरक्षित आणि मुलांना आवडेल असं तर असायलाच हवं; पण तेवढंच पुरेसं नाही. शैक्षणिक साधनांची शास्त्रीयता ही त्यांच्या हेतुपूर्ण वापरात आणि हेतुपूर्ण विद्यार्थि-प्रतिसादात असते. साधनाकरवी जे घडवायचं, ते नेमकं व स्पष्ट असलं पाहिजे आणि तसं त्यातून अंतिमतः घडलंही पाहिजे. साधनांबाबत काळजी घ्यायला हवी ती अशी, की साधन हे केवळ आपल्याला काय वाटतं यावर किंवा इतरांच्या ऐकीव अनुभवांवर बेतलेलं असून चालणार नाही. त्यामागचा दृष्टिकोन अशास्त्रीय तर नाही ना, याची शहानिशा होणं आवश्‍यक आहे. साधनं वयानुरूप, शिकण्याच्या घटकांनुरूप, तसंच ती विद्यार्थ्यांना आव्हानरूप वाटतील अशी अर्थातच असायला हवीत. साधननिर्मिती आणि साधनांचा वापर याबद्दल शिक्षकांचंही सातत्यपूर्ण प्रशिक्षण व्हायला हवं. राज्यस्तरावर नवनवीन साधनांची सूची सतत तयार होत जाऊन ती सर्वांना उपलब्ध होत गेली पाहिजे.

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांतून, शालेय रचनेत होत असलेल्या बदलांचं समाधान देणारं स्वरूप आणि त्याविषयी घ्यायची काही शास्त्रस्वरूपी काळजी इथं व्यक्त केल्यानंतर आजच्या बदलाच्या या पायरीवरून आता अधिक वरच्या पातळीवर जाणं गरजेचं आहे.

शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेवर आता लक्ष हवं
आता वर्गातल्या शिकविण्या-शिकण्याच्या प्रत्यक्ष चालणाऱ्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करायला हवं. रचनावादातल्या या शिक्षणप्रक्रिया प्रामुख्यानं गेल्या ५०-६०- वर्षांतल्या, विविध शास्त्रांमधल्या सिद्धान्तांमधून उगम पावलेल्या आहेत. नेहमीच शिक्षणपद्धतींचा फार मोठा संबंध त्यामध्ये असणाऱ्या सैद्धान्तिक विश्‍वाशी असतो. १९५० च्या दशकापर्यंत वर्तनवादी सैद्धान्तिक विचारसरणी आणि स्किनर यांच्या स्वेच्छाप्रतिक्रियेच्या (ऑपरंट कंडिशनिंग) तत्त्वाची चलती होती. म्हणजे असं, की तत्कालीन सारा शिक्षणव्यवहार या अशा तत्त्वांना मध्यवर्ती ठेवून बेतला जात असे. तीच विचारसरणी अनेक शाळांतून आजही ठळकपणे अस्तित्वात असलेली दिसून येते. ती बदलणं हेच तर खरं आजच्या शिक्षणक्षेत्रासमोरचं आव्हान आहे. पियाजे यांचं १९६० पूर्वीचं संशोधन व बौद्धिक विकासाच्या पायऱ्यांचं सिद्धान्तन (थिअरी), त्यावर व अन्य शास्त्रीय संशोधनावर आधारलेलं १९६० च्या दशकातलं आकलनशास्त्र, वायगोटस्की यांच्या समाजसाह्याचा विचार, त्यानंतरच्या काळातल्या ब्रुनर यांच्या आकलनविषयक विकासाचा सैद्धान्तिक विचार, १९७० च्या दशकापासून वेग आलेली मेंदूविषयक संशोधनाची मांदियाळी, १९८० च्या दशकांतला रॉबर्ट गॅग्ने यांचा अध्यापनविषयक सिद्धान्त व त्यांचे शिकण्याविषयीचे निष्कर्ष, मेल लेवाईन यांचा चेताविषयक रचनांचा विचार या आणि अशा अनेकांच्या सैद्धान्तिक विचारांनी अध्यापन आणि अध्ययन या वर्गशिक्षणातला मध्यवर्ती संकल्पनांचा चेहरामोहराच पार बदलून टाकला आहे. त्यांना नेमकेपणा देऊन शिक्षणव्यवहारांच्या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. गेल्या शतकभरात सारा शिक्षणव्यवहार वर्तनवादाकडून आकलनवादाकडं आणि तिथून तो ज्ञानरचनावादाकडं वळला आहे.

बदलांमागचं तत्त्वज्ञान आत्मसात व्हायला हवं
महाराष्ट्रातल्या शासकीय शिक्षणातल्या बदलांमागचं हे तत्त्वज्ञान, सिद्धान्तन आणि दृष्टिकोन हा शिक्षकवर्ग व अधिकारीवर्ग यांना पुरेसा आत्मसात होण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या हातून घडणाऱ्या शिक्षणप्रक्रियांना शास्त्रीय रूप मिळणे दुरापास्त होईल. आणखी एक गोष्ट अशी, की शिक्षकांनी सैद्धान्तिक विचार आत्मसात करून त्यांची दैनंदिन शिक्षणव्यवहारांशी सांगड घालत गेल्याशिवाय सिद्धान्तन (थिअरी) आणि व्यवहार (प्रॅक्‍टिस) यात आज असलेलं फार मोठे अंतर भरून निघणार नाही आणि अर्थातच शिक्षणात अपेक्षित असलेली उच्च प्रतीची गुणवत्ताही साध्य होणार नाही.

आजवरच्या पठडीबद्ध शिक्षणकेंद्री शिक्षणात सर्वात मोठी उणीव होती ती म्हणजे, शिक्षकांच्या जबाबदारीबाबतची. आजवर शिक्षकांवर केवळ विषय शिकवण्याचीच जबाबदारी होती. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिकणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांचीच जबाबदारी मानली गेली होती. वास्तविक, शाळा ही शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असते. शिक्षकांची नेमणूक व त्यांना दिले जाणारे पगारही विद्यार्थी शिकावेत म्हणूनच दिले जातात. अशा वेळी त्यांनी करायचं काम हे आपसूकच विद्यार्थ्यांच्या शिकण्याशी जोडलं जातं. शालेय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचं शिकणं महत्त्वाचं असतं आणि ते नीटपणे व सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल हे पाहण्याची, ते घडवून आणण्याची अंतिम जबाबदारी शिक्षकांचीच असते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत असं काही घडवून आणतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार-अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची असते. या अंगाने या संबंधित मंडळींचं प्रशिक्षण होत राहिलं पाहिजे. वर्गांतल्या शिक्षणप्रक्रिया शास्त्रीय आहेत की नाही आणि विद्यार्थी शिकत जात आहेत की नाही, याची तपासणी तपासनीसांनी प्रामुख्यानं करायची आहे. रचनावादी शिक्षणपद्धतीत हे सोपंही आहे. वर्गात विषयांमधले घटक रचनात्मक पद्धतीनं विद्यार्थ्यांपुढं येत आहेत की नाही आणि सर्व विद्यार्थी एकाग्रतेनं, आनंदानं त्यात भाग घेत आहेत की नाही, हे तरी सुरवातीला पाहणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ ः कुणी पाहुणे, अधिकारी वर्गात शिरले तर त्यांना मुलं शिकण्यात रमली आहेत, एकाग्र झाली आहेत, परस्परांशी त्यांचा शैक्षणिक विचारविनिमय चालला आहे, असं दृश्‍य दिसलं पाहिजे. आत्ताच्या सारखं कुणीही, केव्हाही वर्गात शिरो, मुलं उठून ‘गुड मॉर्निंग...’ म्हणतात, त्यांच्या स्वतःच्या कामाचा त्यात अनाठायी वेळ जातो आणि एकाग्रताही भंगते. त्यामुळं अशा औपचारिकता पाळल्या जाणार नाहीत, याची दक्षता शिक्षक, अधिकारी यांनी घेतली पाहिजे.

क्रमिक पुस्तकांचं बदलतं स्वरूप रचनावादाला पूरक
शालेय वर्गांमधले (आणि अगदी महाविद्यालयीन व विद्यापीठीय वर्गांमधलेही!) विद्यार्थी आपणहून शिकण्यास प्रवृत्त होणं ही घटना शिक्षणात मूलभूत आहे. रचनावादी पद्धती ही विद्यार्थ्यांना आनंदानं कृतीयुक्ततेनं स्वयंशिक्षणाला प्रवृत्त करते ही या पद्धतीची जमेची बाजू आहे. आज असंख्य शाळांमधले रचनावादी वर्ग मुलांच्या चेहऱ्यांवर समाधान, उत्सुकता, शिकण्याची ऊर्मी दर्शवत आहेत. याचा अर्थ मुलांना शिकायला आवडत आहे. शाळांचं बाह्य रूपही आकर्षक, सौंदर्यपूर्ण असेल तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होतं, हे आता अनेक सरकारी शाळांना आणि त्यांमधल्या शिक्षकांना चांगलं समजलं आहे. शाळा अधिक सौंदर्यसंपन्न व साधनसंपन्न होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पालकवर्ग आणि गावकरी मंडळी शाळा ‘आपली’ मानू लागले आहेत. शाळांच्या आंतर्बाह्य विकासासाठी त्यांच्याकडून भरभरून मदत येत आहे हे शालेय शिक्षणाबाबतची समाजाची मानसिकता बदलत असल्याचं द्योतक आहे.

विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रचनात्मक शिक्षणाकडं नेण्याचा एक खूप मोठा, जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे तो क्रमिक पुस्तकांच्या बदलत्या स्वरूपांतून. धड्यांखालचे प्रश्‍न काही प्रमाणात वर्तनवादी स्वरूपाचे असले तरी, म्हणजे या प्रश्‍नांची उत्तरं धड्यांमध्येच आहेत अशी असली, तरीही त्याचबरोबर मुलांना शोध घ्यायला लावणारे आणि कृती करायला लावणारे असेही प्रश्‍न आले आहेत. शिक्षकांनी त्यांचं नीटस पालन केलं तरी मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक सघन होईल.

वर्गखोल्यांबरोबरच जीवनव्यवहारातूनही शिक्षण
शासनाने क्रमाक्रमानं दरवर्षी क्रमिक पुस्तकं नव्यानं तयार केली. त्यात एक वैचारिक प्रवाहीपणा दिसून येत आहे. क्रमिक पुस्तकांचं स्वरूप अधिकाधिक रचनावादी शिक्षणाच्या अंगानं बदललं जात आहे. नुकतीच आलेली सहावीची पुस्तकं याच मालिकेत पुढचं पाऊल टाकणारी आहेत. या पुस्तकांमधून विषयांतल्या घटकांना भिडणारे पाठ तर आहेतच; परंतु मुलांना केवळ पाठातच गुंतवून न ठेवता, त्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कृतींकडं वळवण्याचा आणि त्याकरवी वर्गाबाहेरच्या समाजजीवनाशी जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानं मुलांच्या शिकण्यासाठीचा परिसर वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता त्यांचं अंगणच विस्तारलं आहे. मुलांचं शिक्षण केवळ वर्गांमधून न होता ते आता काही प्रमाणात बाह्य जीवनव्यवहारांतून व्हावं, असा प्रयत्न यात करण्यात आलेला आहे. हे रचनात्मक शिक्षणाचं पडलेलं पुढचं पाऊल आहे.

विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची जोड
आजवरचं शालेय शिक्षण नैतिक आणि नागरिकत्वाच्या मूल्यांबाबत उदासीन होतं आणि ही शालेय शिक्षणामधील फार मोठी उणीव होती. मूल्यशिक्षणाची सामाजिक जाणीवही फारशी व्यक्त होत नव्हती. शासकीय स्तरांवरून याबाबतचे काही विचार व्यक्त होत होते, काही तुटक आणि त्रोटक प्रयत्नही केले जात होते; पण शाळांमधून ते फारसे गंभीरपणे कधी घेतले गेले नाहीत आणि शिक्षकवर्गानंही ते आवर्जून मनावर घेतले नाहीत. त्यामुळं, क्षमताधिष्ठित शिक्षणाचा प्रयत्न झाला; पण मूल्याधिष्ठित शिक्षणाला वर्गाबाहेर समाजावरच सोपवलं गेलं.

आता आलेल्या सहावीच्या क्रमिक पुस्तकांनी एक मोठा प्रयोग हाती घेतला आहे, असा निष्कर्ष मला काढावासा वाटतो. हा प्रयोग म्हणजे, विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची दिलेली जोड होय. भाषांच्या पुस्तकांमधून हे ठळकपणे प्रत्ययाला येत आहे.

मूल्यवर्धन ः रचनावादी शिक्षणपद्धतीचं पुढचं पाऊल
महाराष्ट्र शासनानं याचबरोबर आणखी एक महत्त्वाकांक्षी आणि जीवनोपयोगी निर्णय घेतला आहे आणि येत्या जूनपासून, म्हणजे जून २०१६ च्या नव्या शालेय वर्षापासून, मूल्यवर्धनाचा नवा कार्यक्रम शाळांमधून सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा कालोचित कार्यक्रम महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी एका केंद्रपातळीवरच्या शाळांमधून पथदर्शी स्वरूपात होणार आहे. बीड जिल्ह्यांतल्या सुमारे ५०० शाळांतून हा मूल्यवर्धनाचा प्रयोग गेल्या सात वर्षांपासून हाताळला जात आहे. रचनावादी पद्धतीच्या शिक्षणानं, मुलांच्या मुक्त वातावरणातल्या शिकण्याला एकीकडं उठाव येईल, मुलं स्वयंशिक्षणाला उद्युक्त होतील, ती ‘शिकणं’ या हेतूनंच शिकतील, तर दुसरीकडं अनुभवाधारित मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमांतून ती अधिक विचारपूर्वक वागायला शिकतील. या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेतली पायाभूत नागरी मूल्यं, भावी समाजाच्या दैनंदिन व्यवहारांत उतरतील, अशी आशा आपण करू शकतो.

आजच्या शिक्षणानं नेहमीच उद्याच्या जीवनाची घडी घालून द्यायची असते. मुलांच्या शिकण्या-वागण्याला वळण देऊनच हे साध्य होण्यासारखे असतं. महाराष्ट्रात या दिशेनं पडू लागलेली दमदार पावले, उद्याच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतील.

Thursday, June 2, 2016

प्राचीन साहित्यकृती

प्राचीन साहित्यकृती :

महाभारत - महर्षी व्यास
  रामायण - वाल्मीक ऋषी
  तुलसी रामायण - तुलसीदास
  पंचतंत्र - विष्णु शर्मा
  गीतगोविंद - जयदेव
  मुद्रराक्षस - विशाखादत्त
  स्वप्न, वासवदत्ता - भास
  अकबरनामा, ऐने अकबरी - अब्दुल फजल
  अर्थशास्त्र - कौटिल्य
  मृच्छकटिक - शुद्रक
  बृहत्कथा - गुणाढय
  शाकुंतल, कुमारसंभव, मेघदुत - कालीदास
  भवभुत्ती - मालती माधव
  शाहनामा - फिरदौसी
  बुद्ध चरितम - अश्वघोष
  नाट्य शास्त्र - भरतमुनी
  नितीशतक - भर्तूहरी
  राजरंगिणी - कल्हन
  कादंबरी, हर्षचरित - बाणभट्ट
  अष्टाधायी - पाणीनी

Wednesday, June 1, 2016

अच्छाई

अच्छाई पलटकर आती है:-

ब्रिटेन में फ्लेमिंग नाम का एक किसान था. एक दिन वह अपने खेत में काम फकर रहा था. तभी उसने किसी के चीखने की आवाज़ सुनी. आवाज़ की दिशा में जाने से किसान ने देखा एक बच्चा दलदल में धस रहा है. आनन-फानन में उसने एक लंबी सी टहनी खोजी और उसके सहारे से बच्चे को दलदल से बाहर निकाला।

दूसरे दिन किसान के घर के पास एक घोड़ागाड़ी आकर रुकी. उसमे से एक अमीर आदमी उतरा और बोला मैं उसी बच्चे का पिता हूँ, जिसे कल फ्लेमिंग ने बचाया था. अमीर व्यक्ति ने आगे कहा मैं इस अहसान को चुकाना चाहता हूँ, लेकिन फ्लेमिंग ने कुछ भी लेने से साफ मना कर दिया और कहा यह तो मेरा कर्तव्य था. इसी दौरान फ्लेमिंग का बेटा बाहर आया. उसे देखते ही अमीर व्यक्ति के मन में एक विचार आया. उसने कहा मैं तुम्हारे बेटे को अपने बेटे की तरह पालना चाहता हूँ. उसे भी वो सारी सुख-सुविधायें और उच्च शिक्षा दी जायेगी, जो मेरे बेटे के लिये होगी. ताकि भविष्य में वह एक बड़ा आदमी बन सके. बच्चे के भविष्य की खातिर फ्लेमिंग भी मान गया।

कुछ वर्षो बाद किसान फ्लेमिंग का बेटा लंदन के प्रतिष्ठित सेंट मेरीज हॉस्पिटल मेडिकल स्कूल से स्नातक हुआ और पूरी दुनिया ने उसे महान वैज्ञानिक, पेनिसिलिन के आविष्कारक ‘सर अलेक्जेंडर फ्लेमिंग’ के रूप में जाना।

कहानी अभी बाकी है. कई बरसों बाद, उस अमीर व्यक्ति का बेटा बहुत ही गंभीर रूप से बीमार हुआ. तब उसकी जान पेनिसिलिन से बचाई गई. उस अमीर व्यक्ति का नाम, रैंडोल्फ़ चर्चिल और बेटे का नाम, विंस्टन चर्चिल था, जो दो बार ब्रिटेन के प्रधानमंत्री भी रहे।

इस कहानी से यह प्रेरणा मिलती है कि जीवन में किसी भी तरह किसी की मदद की जायें, तो अच्छाई पलट-पलट कर आपके जीवन में ज़रूर आती है।

Computer /Laptop Shortcut Keys

कुंजी (Shortcut Keys)
Ctrl + N
नई फ़ाइल बनाने के किए
Ctrl + Shift + A
केपीटलाइज करने के लिए
Ctrl + O
फाइल खोलने के लिए
Alt + Ctrl + M
कमेंट देने के लिए
Ctrl + W
फाइल को बंद करने के लिए
Alt + F10
एप्लिकेशन को मिनीमाइज़ करने के लिए
Ctrl + S
वर्ड डॉकयुमेंट को सेव करने के लिए
Ctrl + F
फ़ाइल में किसी भी अक्षर या शब्द को ढूंढने के लिए
Alt + Ctrl + Y
कर्सर को अगले पेज पर ले जाने के लिए
Alt + F5
एप्लिकेशन को रिस्टोर करने के लिए
Alt + Ctrl + 1 - Apply Heading 1
( टेक्स्ट की स्टाइल हेडिंग 1 के लिए )
Alt + Ctrl + 2 - Apply Heading 2
टेक्स्ट की स्टाइल हेडिंग के लिए )
ctrl +H
टेक्स्ट को रिप्लेक्स करने के लिए
Ctrl+ G
दिये गए पेज नंबर पर पाहुचने के लिए
Alt + Ctrl + Home
डॉकयुमेंट को ब्राउज करने के लिए
Ctrl + Z
अन्डु करने के लिए
Ctrl + y
रिडु करने के लिए
Ctrl + Shift + L
लिस्ट में बुलेट देने के लिए
Alt + Ctrl + K
ऑटो फॉरमेट के लिए
F3 or Alt + Ctrl + V
ऑटो टेक्स्ट के लिए
Ctrl + B or Ctrl + Shift + B
बोल्ड करने के लिए
Ctrl + Shift + F5
बुकमार्क देने के लिए
Ctrl + Page Down
अगले पेज पर जाने के लिए
Ctrl + Shift + F
फॉन्ट को बदलने के लिए
Ctrl + Shift + P
फॉन्ट की साइज को बदलने के लिए
Ctrl + Shift + >l >
फॉन्ट की साइज को 2 प्वाइंट बड़ाने के लिए
Ctrl + Shift + l
फॉन्ट की साइज को 2 प्वाइंट घटाने के लिए
Ctrl + ]
फॉन्ट की साइज को एक-एक प्वाइंट बड़ाने के लिए
Ctrl + [
फॉन्ट की साइज को एक एक प्वाइंट घटाने के लिए
Ctrl + I
फॉन्ट को इटालिक करने के लिए
Ctrl + U
फॉन्ट को अंडरलाइन करने के लिए
Ctrl + Shift + D
फॉन्ट को डबल अंडरलाइन करने के लिए
Ctrl + Shift + K
फॉन्ट स्टाइल को बदलने के लिए
Ctrl + = Ctrl + =
सबस्क्रिप्ट करने के लिए
Ctrl + Shift + +Ctrl + Shift + +
सुपर स्क्रिप्ट करने के लिए
Ctrl + 1
एक लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 2 Ctrl + 2
दो लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 5
1.5 लाइन स्पेस देने के लिए
Ctrl + 0
लाइन के स्पेस को लगाने व हटाने के लिए
Ctrl + E
पेरेग्राफ को सेंटर एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + J
पेरेग्राफ को जस्टीफाइ करने के लिए
Ctrl + L
पेरेग्राफ को दायां एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + R
पेरेग्राफ को बायां एलाइन मेंट मे सेट करने के लिए
Ctrl + Shift + Enter
कॉलम को ब्रेक करने के लिए
Ctrl + Shift + F8
कॉलम को सलेक्ट करने के लिए
Ctrl + C
किसी भी फ़ाइल, फोल्डर व टेक्स्ट मेटर को कॉपी करने के लिए
Ctrl + Shift + C
किसी भी टेक्स्ट फारमेट को कॉपी करने के लिए
Alt + Shift + F7
डिस्कनरी को ऑपन करने के लिए
Ctrl + F5
डॉकयुमेंट को रिस्टोर करने के लिए
Ctrl + T
हेन्डिंग इन्डेंन्ट करने के लिए
F1
किसी प्रकार की मदद के लिए
Ctrl + Shift + H
छिपाने (Hidden करने) के लिए
Alt + F8
मेक्रो को ओपेन करने के लिए
Alt + Shift + K
मेल मर्ज को चेक करने के लिए
Alt + Shift + E
मेल मर्ज मे डेटा सोर्स को बदलने के लिए
Alt + Shift + M
मेल मर्ज को प्रिंट करने के लिए
Ctrl + Enter
पेज को ब्रेक करने के लिए
F2
सलेक्टेड फाइल व फोल्डर को रिनेम करने के लिए
F4
लास्ट एक्सन को रिपिट करने के लिए
F9
सलेक्टेड फिल्ड को अपडेट करने के लिए
F10
मीनू बार को एक्टिव करने के लिए
F11
अगली फिल्ड पर जाने के लिए
F12
फाइल को सेव एज करने के लिए.

मैत्र जीवांचे

॥ मैत्र जीवांचे…….. तसे पण ........॥
-:श्रीरंग चितळे

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केलं की 'ह्यात जे जे कोण आहेत त्यांनी संपर्क करा'. एक महिन्यात सुमारे ३०-३५ मित्र-मैत्रिणी  ४० वर्षांनी पहिल्यांदा कनेक्ट झाले. पुढे व्हॉट्स अपवर ग्रुप झाला. सगळ्यांचे स्मार्ट फोन दिवसभर किणकीणायला किंवा खणखणायला लागले. मग “हा कुठे आहे?” “ती कुठे असते?” अशी शोधाशोध पण होत राहिली. हळूहळू बालपणीचा वर्ग स्मार्ट फोनवर ‘भरायला’ लागला. नंतर त्यांचं एक गेट टुगेदरपण झालं. बालपणीच्या वर्ग मैत्रिणी नव्या रुपात भेटल्यानी आणि आता पुढेही भेटत राहतील ह्या कल्पनेनी मुलं जास्त एक्सायटेड होती...

एकदा ग्रुपवर कोणीतरी विचारलं "हल्ली मीना कुठे असते?" दुसऱ्या दिवशी रीस्पोंस आला "मीना तिच्या घरीच बेड रिडन आहे. पाच वर्षानपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्यामुळे विकल होऊन पडलीय. तिला चालता पण येत नाही. नवरा आणि दोन मुलं हेच तिचं सर्व काही करत आहेत." ग्रुपला शॉक आणि मग सन्नाटा…..

मग चार-पाच मित्र मैत्रीणीत पर्सनल मेसेजेसची देवाण घेवाण झाली. ग्रुपवर मेसेज आला की "आपण मीनाला भेटायला जाऊया". सगळ्यांनी जाणं व्यवहार्य नव्हतं, म्हणून मग मीनाशी फोनवर आगाऊ वेळ ठरवून १०-१२ मित्र-मैत्रिणी तिच्या घरी गेले. तिच्या छोट्या घरात गेल्यावर आपली ही बाल मैत्रीण अशी अंथरुणाला खिळलेली पाहून बराच वेळ सगळे निशब्द होते.....पण हीच कोंडी फोडायची होती !! एकेकांनी तिच्याशी संवाद सुरु केला. तिची चौकशी केली....अंथरुणावर पडून राहिलेली मीना भरभरून बोलत होती.....तिचं चेहरा, तिचे डोळे....सगळंच बोलत होतं....मैत्रिणीनी तिचा हात हातात घेतल्यावर मात्र मीनाचा बांध फुटला.....ते आनंदाश्रू होते? का तिला उठून बसता येत नाहीये ह्याचं दुख्ख होतं? हे काही कळत नव्हतं. सगळ्यांचेच डोळे भरून आले. ह्या मित्र-मैत्रिणींचा तिच्याशी संवाद चालू असताना तिच्या नवऱ्यानी आणि मुलांनी खाण्या पिण्याची व्यवस्था केली. ते पाहून सगळ्यांना कौतुक वाटणं आणि गहिवरून येणं हे एकदमचं झालं. "कोणी मदतीला नसताना कसं करत असतील हे सगळे इतकी वर्ष? आणि मीनाचं काय?" हे भाव सर्वजण लपवायचा प्रयत्न करत होते. मित्र- मैत्रिणी परत जाताना मीनाला सांगून गेले की ह्यातून तिला बाहेर पडायला हवं. त्यांपैकी कोणी न कोणीतरी तिला दर आठवड्यात येउन भेटून जातील, तिच्याशी बोलतील आणि तिला अंथरूणमुक्त व्हायला मदत करतील.

त्या दिवसानंतरची बदललेली मीना ही नवऱ्यानी आणि मुलांनी पाच वर्षांनंतर पहिल्यांदा पहिली होती. तिच्या मनानी आता उभारी घ्यायला सुरुवात केली. "आता ह्यातून बाहेर पडायला पाहिजे" असं तिला "आतून" वाटायला लागलं होतं. ह्यात तिला साथ द्यायला तिचं "मैत्र" होतं !! दिलेल्या शब्दाला जागून मित्र मैत्रिणी दर आठवड्याला तिला भेटत राहिले. तिचा आत्मविश्वास दुणावला.

दोन महिने झालेत, ती आता घरातल्या घरत चालायला लागलीय. पंधरा दिवसांपूर्वी मीनानी आपणहून एका मैत्रिणीला फोन करून सांगितलंय की "तुझ्या नविन गाडीतून मला चक्कर मारून आण". मीनाच्या
बरोबर गाडीतून सोबतीला कोणी कोणी जायचं ह्यावरून ग्रुपवर प्रेमळ भांडणं सुरु झालीयत.
……………………..मैत्र जीवांचे, तसे पण !!

तंत्रस्नेही शिक्षण, ब्राझील

🔵जगभरातील  तन्त्रस्नेही शिक्षण पद्धतीचा आढावा घेणारा  लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे🔵



 तंत्रस्नेही शिक्षणाचा ‘ब्राझिलियन’
प्रयोग….@ रणजितसिंह डिसले




ब्राझील म्हटले
कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे
आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला
दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी
ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल २०१६ मध्ये या
देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा
जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला
आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या
अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली
आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
सेंट लुईस हा
अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा
मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस
अन त्याचा मित्र फर्नांडीस हे दोघे यावर्षी ११
वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच
उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची
परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण
घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय
होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे
—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा
मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी
गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा
प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने
अंमलात आणलेला कृती आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही
शिक्षणाचा ब्राझिलियन प्रयोग’.
सन २००९
साली आपला भारत देश १४ वर्षाखालील मुलांना
मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला
म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी
ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन
याची उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६
अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात
गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला
गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य
करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये
एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात
वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,०००
मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील
ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या
गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक
स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा
शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले
ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच
शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे
उभारण्यात आली.सरकारी मालकीची
दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार व
स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या
टप्प्यात तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही
सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत
सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला
नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण
देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात
कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली
गेली.ब्राझील मधील विख्यात
शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र
अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या
मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या
मुलांची भौगोलिक
परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय
यांच्या अभ्यासातून व्यवसायाभिमुख कौशल्ये
विकसित करत शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट
साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला.
कौशल्याधीष्ठीत अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट
प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी
ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड
केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील
केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत
राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात
होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन
(Classroom-Management ) व
मूल्यमापनाचे ( Evaluation) चे विशेष
प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न
होता अधिक परिणामकारक होण्यासाठी
द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात
आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली
अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत
होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी
ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या
मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित
मुल्यमापनाचा अवलंब करण्यात आला.मुलांचे
मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक
करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या
आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला
गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या
आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील
आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.
प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक
अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना
वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
सलग ३ वर्षे
याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता
पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील
याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा
प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच परिणाम म्हणून
संयुक्त राष्ट्राने ब्राझील मधील एक ही मूल
माध्यमिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून
वंचित नाही असे प्रशस्तीपत्र दिले.संयुक्त
राष्ट्राने घोषित केलेली शाश्वत विकासाची
उद्दिष्टे गाठण्यासाठी सारे जग प्रयत्न करत
असतानाचा ब्राझीलच्या या यशाने सर्वांसमोर
आदर्श उभा राहिला आहे.
लोकसंख्या व
अर्थव्यवस्थेचा आकार याबाबत भारताशी काही
प्रमाणात साम्य असणारा हा देश जे यश साध्य करू
शकला ते आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी
आहे.ब्राझीलच्या या शैक्षणिक मॉडेल मधील बऱ्याच
बाबी आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.जिथे
वैद्यकीय शिक्षणासाठी सबंध भारतभर ‘नीट’
नेटकी परीक्षा असावी असा आग्रह आम्ही धरत
असतानाच स्थानिक गरजांचे प्रतिबिंब
अभ्यासक्रमात उमटले तर त्याची उपयुक्तता वाढते
हेच ब्राझील च्या नव्या मॉडेल ने दाखवून दिले
आहे.पारंपारिक शिक्षण व अभ्यासक्रम यांची
वास्तविक जीवनाशी असणारी फारकत या
निमित्ताने पुढे आली आहे.महाराष्ट्रासारख्या
राज्यात जिथे मराठवाड्यातून दरवर्षी लाखो मुले
उसतोडीच्या निमित्ताने किमान ६ महिन्यासाठी
शाळाबाह्य राहतात. या मुलांच्या गरजा,
कौटुंबिक परिस्थिती यांचा अभ्यास करून वेगळा
अभ्यासक्रम आखला जाणे गरजेचे आहे.बीड सारख्या
जिल्ह्यात या धर्तीवर पथदर्शी प्रयोग राबवता
येवू शकेल.या पायलट प्रोजेक्ट मधील येणाऱ्या
समस्यांचा अभ्यास करून काही उपाय निश्चितपणे
समोर येतील.या पर्यायांची उपयुक्तता पडताळून
मगच याचे सार्वत्रिकीकरण केले जाणे उचित
ठरेल.मुलांचे होणारे स्थलांतर व गळती
रोखण्यासाठी पालकांचे मन वळवण्याचा पर्याय
दरवर्षीच लागू पडेल याबाबत शंकाच वाटते.मात्र
साखर शाळांचे पुनरुज्जीवन करून तिथे या मुलांच्या
गरजानुरूप अभ्यासक्रम आखून त्याच्या
अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ
शकेल.केवळ शैक्षणिक सुविधा पुरवण्यात RTE चे यश
मानणे म्हणजे अल्प संतुष्टपणा ठरेल.शैक्षणिक
सुविधांची उपलब्धता याही पुढे जाऊन आपल्याला
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल
करायला हवीय.. ब्राझीलचा हा पॅटर्न आपल्या
गरजानुरूप बदल करून अंमलात आणायला काहीच
हरकत नाही. स्थलांतर स्थानिक गरजा लक्षात घेत
अर्थार्जनासाठी शिक्षण देण्याबाबत आम्हा
भारतीयांना विचार करावा लागेल.असे शिक्षण
देताना ते अधिक लवचिक असण्याची गरज
आहे.संगणक,टॅबलेट आदी साधनाच्या मदतीने
तंत्रस्नेही शिक्षण देण्यात बाबत आपला देश
गोंधळलेल्या अवस्थेत असताना ब्राझील चे
तंत्रस्नेही प्रारूप मार्गदर्शक आहे. तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर करून घनदाट जंगलात देखील
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गंगा अव्याहतपणे वाहू
शकते हे यातून दिसून येते. प्रचंड पाऊस व महापूर
हा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अमेझॉन
मधील मुलांच्या अभ्यासक्रमात आपत्ती
व्यवस्थापन,पर्यावरण संरक्षण यांचा जाणीवपूर्वक
समावेश केला गेला. विषारी साप ओळखणे व साप
पकडण्याचे तंत्र अवगत करण्यासाठी सिम्युलेशन ची
मदत घेतली गेली.त्यामुळे सर्प दंशाने मृत्युमुखी
पडण्याचे प्रमाण ब्राझील मध्ये लक्षणीयरीत्या
घटले आहे, असेही निरीक्षण संयुक्त राष्ट्राने
नोंदवले आहे.मुलांना शाळेत शिकण्यासाठी त्यांचे
सामाजिक अभिसरण होणे महत्वाचे असते हा आपला
भारतीय समज देखील यानिमित्ताने फोल ठरला
आहे.कारण अमेझॉन मधील अनेक शाळांमध्ये केवळ २-४
मुलेही शिक्षण घेत आहेत.मुलाच्या दैनंदिन जीवनाशी
निगडीत शिक्षण असेल तर ते शाश्वत शिक्षण ठरते
हेच या निमित्ताने समोर आले आहे.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...