Pages

Showing posts with label विज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान. Show all posts

Sunday, September 9, 2018

मेंदूचा स्वामी कोण ? - प्रशिक्षण मेंदूचे

*मेंदूचा स्वामी कोण?*
       🧠      _प्रशिक्षण मेंदूचे_
===================
             *माइण्डफुलनेसच्या नियमित सरावाने मी माझ्या मनाचा गुलाम न राहता स्वामी बनू शकतो हे आधुनिक मेंदूविज्ञान मान्य करते.*
*सध्या नैराश्य आणि चिंता या विकारांची साथ वेगाने पसरत असताना मेंदूच्या या संशोधनाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे ही काळाची गरज आहे.*

सौजन्य:  लोकमत

मेंदूतील रसायने बदलल्याने मनातील भावना बदलतात हे जसे खरे, तसेच भावना बदलल्या तर मेंदूतील रसायनेही बदलतात. जाणीवपूर्वक भावना बदलूनही आपल्याला उत्साह, आनंद निर्माण करता येऊ शकतो, हे विज्ञानाने आता सिद्ध केले आहे.

माइण्डफुलनेसचा सराव करायचा म्हणजे आपले मन पुन: पुन्हा वर्तमानात आणायचे. या क्षणी मनात जे काही विचार आहेत, भावना आहेत त्या प्रतिक्रिया न करता जाणायच्या, त्यांचा स्वीकार करायचा. ही भावना पापी आहे, घाणेरडी आहे. ही प्रतिक्रिया झाली. हा विचार निगेटिव्ह आहे हीदेखील प्रतिक्रिया झाली. अशी कोणतीही प्रतिक्रिया न करता या क्षणी मनात ही भावना, हा विचार आहे हे मान्य करायचे.

हे शब्दात लिहिणे सोपे असले तरी प्रत्यक्षात येण्यासाठी *मेंदूला प्रशिक्षण द्यावे लागते. असे प्रशिक्षण म्हणजेच माइण्डफुलनेस मेडिटेशन, सजगता ध्यान होय. रोज किमान दहा मिनिटे वेळ काढून शांत बसायचे आणि शरीरातील संवेदना जाणत राहायचे. असे करताना मनात विचार येणार, त्या विचारांचा, भावनांचा आणि शरीरातील संवेदनांचा परस्परसंबंध अनुभवायचा.* मनात रागाचा विचार आला की शरीरात कोणती संवेदना निर्माण होते, भीती वाटली की काय होते, वासना निर्माण झाली की कोणती संवेदना येते हे साक्षीभावाने म्हणजे त्यामध्ये कोणताही बदल न करता जाणत राहायचे. आपण या संवेदना जाणतो आणि त्यांचा स्वीकार करतो त्यावेळी मेंदूला प्रशिक्षण देत असतो त्यामुळे आपल्या अंतर्मनात साठलेली घाण स्वच्छ होते. चिंता, औदासीन्य, अकारण भीती यांचा त्रास कमी होतो.

माइण्डफुलनेस थेरपीचा मुख्य भाग निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अशी प्रतिक्रि या न करता मनातील भावना, विचार आणि शरीरातील संवेदना जाणत राहणे हा असला तरी थोडा वेळ मनात सकारात्मक भावना निर्माण करणेही आवश्यक असते. कचरा साफ करताना त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून आपण सुगंधी अत्तर लावतो, सेंट वापरतो तसेच हे आहे. *अंतर्मनात साठलेला कचरा साफ करताना* एक आंतरिक आधार, सपोर्ट सिस्टीम आवश्यक असते. त्यासाठी रोज थोडा वेळ कृतज्ञता, करुणा, प्रेम, आनंद अशा भावना प्रयत्नपूर्वक निर्माण करून मनात त्या धारण करून राहायचे.
*संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की मी माझ्या मेंदूच्या हातातील बाहुले नाही, तर माझ्या मेंदूचा शिल्पकार आहे.*

मेंदूतील रसायने बदलल्याने माझ्या मनातील भावना बदलतात हे जसे खरे आहे, तसेच मी माझ्या भावना बदलल्या तर मेंदूतील रसायने बदलतात. मात्र  संशोधनात असेही दिसून आले आहे की अगोदर एकाग्रता आणि सजगता ध्यानाचा नियमित सराव केल्यानंतर करु णा ध्यान केले तर त्याचे परिणाम अधिक प्रमाणात दिसतात. याचे कारण पहिल्या दोन ध्यानाचा सराव न करता एकदम करुणा ध्यान करायला गेलो तर मन एकाग्र होणे आणि प्रयत्नपूर्वक मनातील भावना बदलवणे शक्य होत नाही. एखाद्या ठिकाणी येणारी दुर्गंधी घालवायची असेल तर दुर्गंधी कोठून येते आहे ते शोधून साफ करणे आणि सुगंधी अगरबत्ती, रूम फ्रेशनर, अत्तर लावणे अशा दोन कृती कराव्या लागतात. तसाच *मनात रोज तयार होणारा कचरा साफ करण्यासाठीदेखील रोज सजगता ध्यान आणि करुणा, कृतज्ञता ध्यान अशा दोन्हीसाठी वेळ द्यायला हवा.* रोज झोपताना किमान दोन- तीन मिनिटे कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

*सिद्धांतालाच आव्हान !*

विज्ञानात असे मानले जायचे की माणसाचे मन हे त्याच्या *मेंदूतील रसायनांचा परिणाम* आहे. ही रसायने कमी जास्त होतात त्यानुसार मनातील भावना बदलतात. सेरेटोनिन नावाचे रसायन कमी झाले की नैराश्य येते. हे नैराश्य अधिक काळ टिकले, त्यामुळे माणसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला की त्याला क्लिनिकल डिप्रेशन हा आजार आहे, असे म्हटले जाते. त्यावर औषधे दिली जातात ती मेंदूतील सेरेटोनिन वाढवणारी असतात. त्या औषधाने सेरेटोनिन वाढले की नैराश्य कमी होते. सेरेटोनिन कमी होणे हे कारण आहे आणि नैराश्य हा परिणाम आहे, या सिद्धांतावरच नैराश्यावर औषधे तयार करणार्‍या औषध कंपन्या विकसित झालेल्या आहेत.

मात्र *ध्यानावरील संशोधनाने या सिद्धांतालाच आव्हान* दिले आहे. आपण मनात कृतज्ञता, प्रेम अशा भावना निर्माण करतो त्यावेळी मेंदूतील रसायने बदलतात, सेरेटोनिनची पातळी वाढते असे प्राथमिक संशोधनात आढळले आहे. म्हणजेच या संशोधनानुसार मनातील भावना हा मेंदूतील रसायनांचा केवळ परिणामच आहे असे नसून भावना हे कारण आणि रसायने हा परिणाम असा बरोबर विरु द्ध सिद्धांतदेखील खरा आहे. म्हणजे मला उदास वाटत असेल त्यावेळी माझ्या मेंदूत सेरेटोनिन कमी झालेले असणार. पण मी जाणीवपूर्वक मनातील भावना बदलल्या, मनात उत्साह, आनंद निर्माण केला, आनंदाने दोन उड्या मारल्या, एक शीळ घातली आणि त्या क्षणाचा समरसून आनंद अनुभवू लागलो तर त्याचा परिणाम म्हणून कोणतेही औषध न घेताही माझ्या मेंदूतील रसायने बदलतात, मेंदूतील सेरेटोनिनची पातळी वाढते.


*डॉ. यश वेलणकर*
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)

Wednesday, September 6, 2017

ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प

दूरस्थ दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाल्याचा दावा



पीटीआय, लंडन | Updated: September 3, 2017 2:54 AM


परग्रहावरील प्रगत जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रकल्पात तीन अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील दीर्घिकेतून गूढ संदेश मिळाले आहेत, असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केला आहे. स्टीफन हॉकिंग यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात काम करणाऱ्या विशाल गज्जर यांनी दी टेलीग्राफला सांगितले की, हे संदेश नेमके कोठून आले आहेत याची आम्हाला कल्पना नाही. जर कुणाला दुसऱ्या जैव संस्कृतीतील लोकांना टिपता येतील असे संदेश पाठवायचे असतील तर ते तसे करू शकतात पण आताचे संदेश प्रगत जीवसृष्टीकडून आले असतील असे मला वाटत नाही.

संदेशांचे स्रोत पाहिले तर त्यापेक्षा जास्त शक्यता किंवा सिद्धांत या परग्रहावरील जीवसृष्टीबाबत आहेत. आतापर्यंत तरी उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक आहेत. जितके जास्त खोलात जाऊ तेवढी गुंतागुंत वाढणार आहे. विश्वात कुठेतरी प्रगत जीवसृष्टी असू शकते व ते आपल्या जीवसृष्टीचा शोध घेऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेकथ्रू लिसन प्रकल्प प्रख्यात विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग व रशियाचे अब्जाधीश युरी मिलनर यांनी सुरू केला असून त्यात विश्वाचे सत्य जाणून घेणे व प्रगत जीवसृष्टीचा शोध घेणे हे उद्देश आहेत. आताचे संदेश जिथून आले आहेत ते रेडिओ लहरींच्या स्फोटांचे असून आमची यंत्रणा ठोसपणे काम करीत आहे एवढाच आताच्या संशोधनाचा अर्थ आहे. हे संदेश फिरत्या न्यूट्रॉन ताऱ्याकडून आले असावेत व त्या ताऱ्याचे चुंबकीय क्षेत्र प्रखर असावे. हे संदेश सौरमाला २ अब्ज वर्षांची असताना संबंधित दीर्घिकेतून सुटले व त्यावेळी पृथ्वीवर जीवन नुकतेच आकार घेत होते. सुरुवातीला हा सुपरनोव्हाचा परिणाम असल्याचे सांगण्यात आले होते पण २०१५ व २०१६ मध्ये पुन्हा ते संदेश आल्याने त्याचा स्रोत अजूनही टिकून आहे हे स्पष्ट होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. जास्त कंप्रतेला आताची निरीक्षणे करण्यात आली असून बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाची माहिती प्रसिद्ध होणार आहे.



‘ब्रेकथ्रू लिसन’ प्रकल्प

ब्रेकथ्रू लिसन हा १०० दशलक्ष डॉलर्सचा कार्यक्रम असून तो २०१५ मध्ये हॉकिंग व मिलनर यांनी सुरू केला. त्यात अनेक देशांतील पथके दुर्बिणींच्या मदतीने परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. दहा वर्षांच्या या कार्यक्रमात आपल्या आकाशगंगेच्या दीर्घिका प्रतलातील पृथ्वीजवळच त्या १०००००० ताऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. पृथ्वीबाहेर जीवसृष्टी शोधण्याचा हेतू यात आहे, असे स्टीफन हॉकिंग यांनी ही योजना सुरू करताना सांगितले होते.

Wednesday, July 27, 2016

डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

विज्ञानेश्वराचे प्रस्थान

क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह अवकाशात सोडण्याचे क्षेत्र असो की अणुस्फोट चाचणी, डॉ. अब्दुल कलाम यांचा त्यात मोठा वाटा होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक मानसन्मान मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती बनले. तेथेही त्यांच्या कार्यामुळे त्या पदाची उंची वाढली. कलाम असे उंचच राहिले. या उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले.
कोळ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम या पोरास वैमानिक व्हावयाचे होते. तशी संधी आली असता ती त्यास नाकारली गेली. हवाई दलाचे वैमानिक होण्यासाठी ते अपात्र ठरले. ते योग्यच झाले. कारण विमानास पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बंध तोडण्याचा अधिकार नसतो. कितीही शक्तिशाली असले तरी विमान पृथ्वीच्या वातावरणाच्या मर्यादा सोडत नाही. एखादा काँकार्ड विमानाचा अपवाद. अन्यथा विमान आपल्या अंगभूत मर्यादेतच घुटमळत राहते. एपीजे कलाम यांच्या आकांक्षेस ती मर्यादा मानवली नसती. त्यांना अवकाश खुणावत होते. साध्या समूहगानास अपात्र ठरलेल्या एखाद्या गायकाने पुढे स्वत:ची एकल बठक भरवण्याइतकी गाण्यात प्रगती करावी, तसे हे झाले. आकाशयानासाठी अपात्र ठरलेले एपीजे पुढे इतके वाढले की ते आकाशाच्या सीमा ओलांडून अवकाशाकडे झेपावले. कलाम यांचे उड्डाणप्रेम इतके तीव्र की वैमानिक म्हणून नाकारले गेल्यानंतर त्यांनी या क्षेत्राशी संबंध राहावा म्हणून िहदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये कनिष्ठ पदाची नोकरी पत्करली. रामेश्वरसारख्या दूरस्थ खेडय़ात जन्मलेला, साध्या शालेय शिक्षणासाठीदेखील वर्तमानपत्र टाकण्याचे काम करून अर्थार्जन करावे लागलेला एक गरीब मुलगा देशाचा राष्ट्रपती आणि अवकाश क्षेत्राचा चेहरा बनून जातो, ही कहाणीच विलक्षण प्रेरणादायी आहे. कलाम यांच्याभोवती जी काही प्रभावळ तयार झाली ती या पाश्र्वभूमीमुळे. ज्या समाजात प्रचंड मोठय़ा घटकास वंचित राहावे लागते, ज्या समाजात प्रगतीच्या संधीचा सुग्रास घास मूठभरांच्याच ताटात सहज पडतो त्या समाजात रामेश्वरात मुसलमान कुटुंबात जन्माला येऊन धर्म, जात, प्रांत, भाषा अशी सर्व बंधने ओलांडून अवकाशाकडे झेपावणारे कलाम आदर्श आणि अनुकरणीय ठरतात यात नवल नाही.
वास्तविक कलाम यांच्या आधी अवकाश वा तत्संबंधी क्षेत्रात भारतात काही घडत नव्हते असे नाही. विक्रम साराभाई, त्यांचे पूर्वसुरी होमी भाभा आदींनी विज्ञानक्षेत्राची मजबूत पायाउभारणी आपल्याकडे केली होतीच. या धुरंधरांना पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या द्रष्टय़ाचे नेतृत्व लाभल्याने त्या काळातील प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. परंतु तरीही या सर्व महानुभावांना कलाम यांच्यासारखी लोकप्रियता मिळाली नाही. ते सर्वच आदरणीय होते. पण त्यांच्याविषयीचा आदर दडपणाच्या कोंदणातून यायचा. कलाम यांचे तसे नाही. त्यांची तुलनाच करावयाची झाल्यास ती महात्मा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाशी करावी लागेल. महात्मा गांधी यांच्या आधीही लोकप्रिय राजकारणी होते. परंतु एक बाळ गंगाधर टिळक यांचा अपवाद वगळता ते जनसामान्यांना आपलेसे वाटत नसत. महात्मा गांधी यांनी रस्त्यावरच्या जनसामान्यांच्या देशप्रेमासही किंमत दिली. देशासाठी आपणही काही करू शकतो असे सामान्यांतल्या सामान्यास वाटू लागणे हे महात्मा गांधी यांचे यश. विज्ञान क्षेत्राच्याबाबत हे पुण्य कलाम यांच्या खाती जमा होते. आपणास जे साध्य करावयाचे आहे ते होईपर्यंत प्रयत्न करीत राहणे हे त्यांचे वैशिष्टय़. अशा प्रयत्नांवर निष्ठा असणाऱ्यांना फार दूरचे दिसते. कलामांना तसे दिसत असे. त्यामुळे अमेरिका आदी बडय़ा देशांनी भारतावर र्निबध घातले तरी भारतीय तंत्रज्ञ त्यातून मार्ग काढू शकतात, हा विश्वास त्यांना होता आणि स्वत:चाच विश्वास सार्थ ठरवून दाखवण्याची धमक त्यांच्यात होती. बडय़ा देशांनी १९७४ साली अणुचाचण्या केल्या म्हणून भारतास युरेनियमपुरवठा बंद करण्याची शिक्षा दिली. त्यानंतरही न डगमगता भारतात.. त्यातही रामेश्वरच्या किनारपट्टी परिसरात.. प्रचंड प्रमाणावर आढळणाऱ्या थोरियमचा वापर करून युरेनियम तयार करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवण्याचे महान कार्य ज्या तंत्रज्ञांनी करून दाखवले त्यात कलाम यांचा अंतर्भाव होतो. सामान्य नागरिकास कदाचित याचे महत्त्व कळणार नाही. परंतु थोरियमचे हे गुणदर्शन भारतासाठी अत्यंत दूरगामी महत्त्वाचे आहे, हे नि:संशय. याच काळात भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोठय़ा घडामोडी घडत होत्या. क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह कसे अवकाशात सोडता येतील, यासाठी बरेच संशोधन सुरू होते. कलाम यांचा त्यात मोठा वाटा आहे. आज या क्षेत्रात पाच बडय़ा देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची योग्यता ज्या देशांनी मिळवली त्यात भारतासारख्या दरिद्री देशाचा समावेश होतो. हे यश कलाम, डॉ. अनिल काकोडकर अशा तंत्रज्ञांचे. त्या अर्थाने कलाम हे उच्च दर्जाचे अभियंते होते. आपल्याकडे विज्ञानक्षेत्राशी संबंधित सर्वानाच वैज्ञानिक म्हटले जाते. कलाम हे तसे वैज्ञानिक नव्हते. हे काही त्यांच्यातील न्यून नाही. खुद्द कलाम यांना आपल्यातील या तंत्रज्ञाची जाणीव होती. तरीही एखादा वैज्ञानिकही करू शकणार नाही, असे एक मोठे काम त्यांच्या हातून घडले.
ते म्हणजे विज्ञान प्रसाराचे. कलाम मूíतमंत विज्ञानवादी, प्रयत्नवादी होते. ही बाब आपल्यासारख्या दांभिक समाजात अत्यंत महत्त्वाची. याचे कारण विज्ञान आणि धर्मातील कर्मकांड या दोन्ही डगरींवर तोल सांभाळत जगणाऱ्यांची संख्याच आपल्या समाजात जास्त. ही कसरत कलाम यांनी कधीही केली नाही. जाणीवपूर्वक. देशातील सर्वोच्च पदावर निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात निवास करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा कोणत्या मुहूर्तावर आपण राष्ट्रपती भवनात राहावयास येणार असे सरकारने विचारले असता, कलाम यांनी उत्तर दिले.. प्रत्येक दिवस माझ्यासाठी सुमुहूर्त असतो. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. कलाम त्याप्रमाणेच वागले. भूमिका अशी घ्यावयाची आणि चोरून मुहूर्त पाहावयाचा असली लबाडी करण्याची वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही. विचार आणि वागणे यांच्याशी त्यांचा थेट संबंध होता. त्यामुळे वेगवेगळ्या श्रेयांसाठी ओळखले जात असतानाही आपल्याला विज्ञानवादी शिक्षक ही ओळख सर्वात प्रिय आहे, असे कलाम म्हणत. विज्ञानाची विविध गुह्य़े जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे त्यांना मनापासून आवडे. ते हे काम न कंटाळता करीत. अणुऊर्जा आयोगाशी संबंधित असताना मुंबईत त्यांचे वारंवार येणे असे. त्या वेळी कलाम यांच्याशी अनेकदा संवाद झाला. विज्ञानविषयक वार्ताकन करणारे वार्ताहर त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत. परंतु त्यातील एकाही प्रश्नाला वा प्रश्नकर्त्यांला कलाम यांनी कमी लेखले असे झाल्याचे एकही उदाहरण नाही. काही काही विषयांवर भाष्य करण्यात त्यांना अंगभूत मर्यादा येत. ते कलाम पाळत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने कधीही वाद वगरे झाले नाहीत.
हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़ होते. त्यांच्या हयातीत के. संथानम, होमी सेठना आदींनी कलाम यांच्यावर थेट टीका केली आणि त्यांच्या क्षमतेसंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले. त्यास उत्तर देण्याच्या फंदात कलाम कधी पडले नाहीत. खरे तर अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कालखंडात कलाम भारतीय अणुऊर्जा क्षेत्राच्या केंद्रस्थानी होते. अमेरिका ते सोविएत रशिया या टापूत बरेच काही घडत होते आणि बऱ्याचदा भारतही त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होता. परंतु यातील कशाचीही वाच्यता कलाम यांच्या आत्मचरित्रात नाही. एका अर्थाने ही त्यांची मर्यादादेखील ठरते. पण अशा मर्यादेची एक बाजू चांगुलपणाची असते. कलाम यांच्या राष्ट्रपती भवनातील वास्तव्यात ती दिसून आली. २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ गेल्यावर पंतप्रधानपदी सोनिया गांधी यांची निवड होणार हे स्पष्ट होते. परंतु तसे झाले नाही. गांधी यांनी ऐन वेळी माघार घेतली. त्या वेळी त्यांचे परदेशी मूळ लक्षात घेऊन राष्ट्रपती कलाम यांनी त्यांना पंतप्रधानपद न स्वीकारण्याची मसलत दिली, असे बोलले गेले. कलाम यांनी त्या विषयी कधीही ब्रदेखील काढला नाही. राष्ट्रपती म्हणून मुदत संपल्यावर त्यांना आणखी एक संधी दिली जाणार होती. ती खुद्द कलाम यांनी अव्हेरली. पद नाकारणारे भारतासारख्या देशात दुर्लभच ठरतात आणि तसे कोणी आढळल्यास भाबडी जनता अशा व्यक्तीस आनंदाने ऋषिपद बहाल करते. कलाम यांना ते तसे मिळाले. त्यांचा मोठेपणा हा की या ऋषिपदास तडा जाईल अशी एकही कृती कलाम यांच्या हातून घडली नाही. त्यात जोडीला असलेला अंगभूत साधेपणा. भारतात लोकप्रियतेच्या शिखराचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात. अशा व्यक्तींना पदासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, पदच त्यांचा शोध घेत येते. कलाम यांचे तसे झाले. त्यामुळे पीसी अलेक्झांडर यांच्या ऐवजी राष्ट्रपतिपदाचे सर्वसंमत उमेदवार म्हणून कलाम यांची निवड झाली. अलेक्झांडर हे एके काळी काँग्रेसला जवळचे. दिवंगत इंदिरा गांधी यांचे विश्वासू. तेव्हा त्यांच्या नावास काँग्रेस आक्षेप घेणार नाही, हा अटलबिहारी वाजपेयी सरकारातील प्रमोद महाजन यांचा होरा. तो चुकला. कारण सोनिया गांधी यांनी अलेक्झांडर यांना पािठबा नाकारला. त्यानंतर कलाम यांचे नाव पुढे केले गेले. ते मान्य झाले. त्यांना राष्ट्रपतिपदासाठी उभे करण्यात खरे तर एक राजकारण होते. परंतु या राजकारणाचा गंध राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर दूरान्वयानेही कलाम यांच्या वागण्यास आला नाही. ते होते तसेच राहिले. उलट त्यांच्यामुळे त्या पदाची उंची वाढली.
कलाम हे असे उंचच राहिले. या उंचीचा, अनंत उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले. ते विविधांगी जगले. या सर्व अवतारांत एक सूत्र समान होते. ते म्हणजे विज्ञानप्रेम. ते कधीही आटले नाही. त्या प्रेमाचाच आविष्कार होता विद्यार्थाशी गप्पा. या अशा गप्पांतच त्यांच्या आयुष्याची इतिश्री व्हावी हा एक विलक्षण योगायोग. तो आणखी एका कारणाने उठून दिसतो. भद्र-अभद्र, शुभ-अशुभ वगरे काहीही न मानणाऱ्या कलाम यांचे सोमवारी निधन झाले. श्रद्धाळू, धर्म-अधर्माच्या गत्रेत अडकलेला जनसमुदाय आषाढी एकादशी पाळून आपल्या खात्यात काही पुण्य जमा व्हावे यासाठी मग्न असताना या विज्ञानेश्वराने अनंताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...