Pages

Monday, February 13, 2017

सृजनरंग

#सृजनरंग

लोकसत्ता
11 फेब 2017
- आभा भागवत

स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. ते समजून घेणं गरजेचं आहे.

बालचित्रकलेतील टप्पे हे सर्वाना माहीत असणं आणि पालक व शिक्षकांनी मुलाचं निरीक्षण करताना ते लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं ठरतं. एकाच वर्गातील दोन समवयस्क मुलं वेगवेगळी चित्रं का काढतात हे समजून घेण्यात याचा उपयोग होतो. एखादं मूल त्या टप्प्याच्या ढोबळ आराखडय़ापेक्षा खूपच निराळं काही करत असेल तर ते लक्षात येणं आणि त्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळणं हेही यातून घडू शकतं किंवा आपलं मूल कसं सर्वसामान्य आहे हेही समजू शकतं. ‘तारे जमीं पर’मधल्या ईशानच्या पात्राप्रमाणे एखादा जन्मजात चित्रकार असेल तर ते वेळीच लक्षात आलेलं केव्हाही चांगलंच ना? बालकाची नैसर्गिक वाढ – शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बोधनिक तसंच सांस्कृतिक पाश्र्वभूमी आणि मिळणारं शिक्षण अथवा प्रशिक्षण या सर्वाचा बालचित्रकलेवर मोठा प्रभाव असतो.

बालचित्रकलेतील तिसरा टप्पा ‘नियोजित चित्र’ या नावाने ओळखला जातो. यामध्ये मूल स्वयं ऊर्मीने काही प्रतीकं चित्रित करू लागतं. ही प्रतीकं म्हणजे मुलाच्या मनात, डोक्यात जे विचार चालू आहेत त्यांचं दृश्य प्रदर्शनच असतं. तुम्ही पाहिलं असेल की सातव्या वर्षांच्या आसपास अनेक मुलं एकाच प्रकारची असंख्य चित्रं पुन:पुन्हा अथकपणे काढतात. बुजगावणं वाटावं असे हातपाय, ताठ असणाऱ्या असंख्य मानवाकृती किंवा मोटारी आवडत असतील तर मोटारीच, विमानं आवडत असतील तर विमानंच, असं नियोजन चित्रात दिसतं. मुलांची निरीक्षणशक्ती या वयात वाढलेली असते, त्यांना प्रश्न पडत असतात, उत्तरं सापडत असतात. हा सर्व सृजनाचा खेळ त्यांच्या चित्रांतून व्यक्त होत असतो. माहितीमध्ये एक महत्त्वाची भर पडलेली असते ती म्हणजे आपण आईच्या पोटात होतो. आणि आजूबाजूच्या अनेक गर्भवती आया आणि प्राणी यांचं निरीक्षण मूल करू लागतं. आपल्या डोळ्याला दिसत नाहीत अशा कित्येक गोष्टी या जगात आहेत याची जाण हळूहळू याच वयात येऊ लागते. आणि त्याची विलक्षण चित्र अभिव्यक्ती म्हणून मूल एक्स-रे चित्र काढू लागतं. मोठय़ा माशाने खाल्लेले छोटे मासे, मोठय़ा प्राण्याच्या पोटात छोटा प्राणी, प्राणी आणि आत सांगाडा, झाडाच्या खोडामध्ये किडय़ांचं घर, मातीच्या खाली लपलेली झाडाची मुळं, मुंग्यांच्या वारुळाच्या आतली रचना असे मजेदार विषय मुलं हाताळू लागतात.

अजून एक निरीक्षण असं आहे, की स्वतंत्र होण्यातली मजा चाखून बघायच्या प्रयत्नात असलेली सात-आठ वर्षांची मुलं, त्यांना वाटणारी भीती चित्रातून व्यक्त करतात. आणि पुन:पुन्हा एकाच प्रतीकाचा वापर उपचारासारखा करून घेतात. एका मुलाला समुद्राच्या तळाशी काय असतं याची खूप उत्सुकता असे. काही पुस्तकांतून, गोष्टींतून, फिल्म्समधून त्याने ते समजून घेतलं होतं. आणि जवळजवळ तीन र्वष तो फक्त समुद्राखालचे वेगवेगळे मासे काढत होता. मित्रांसोबतही याच गप्पा होत आणि असं लक्षात आलं की त्याच्या मित्रांचा पाच- सहा जणांचा गट चित्रात फक्त मासेच काढत असतो आणि माशांची माहिती गोळा करकरून एकमेकांना सांगत असतो. ही नुसती उत्सुकता किंवा आकर्षण नव्हतं. रागावणाऱ्या मोठय़ा माणसांची भीती, अंधाराची भीती, खोल पाण्याची भीती आणि न समजणारी असंख्य प्रकारची भीती यांवर वर्चस्व मिळवायचा तो चिमुकला प्रयत्न होता. या वयाचं मूल पूर्ण स्वावलंबीही नसतं आणि परावलंबीही नसतं. या अधल्यामधल्या परिस्थितीवर मात करण्याच्या मार्गापैकी एक म्हणजे तीच तीच प्रतीकं वापरून चित्रं काढणं. या स्वयंउपचाराच्या चित्रपद्धतीत ‘हे काय तेच तेच चित्र काढतोयस’ असं म्हणून आपण त्या मुलाने शोधलेल्या थेरपीला नाकारत असतो. त्यामुळे त्या मुलाला हवी तशी चित्रं काढू देण्याचं स्वातंत्र्य मिळालं तरच आपोआप ते मूल स्वत:ची काळजी स्वत: कशी घ्यायची हे शोधून काढतं आणि स्वतंत्र झाल्यामुळे अर्थातच समाधानी होतं.

या वयात मुलांना चित्र कसं काढावं याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. खरं तर क्लासला पाठवायचं हे वयच नाही. तरीही पाठवायचंच असेल तर ज्या क्लासेसमध्ये चित्रं काढायची मोकळीक दिली जाते तिथेच मुलांना पाठवावं. जिथे असं असं चित्र काढ, आकारात नीट रंग भर असा आग्रह धरला जातो त्या चित्रकलावर्गात मुलाचं भरपूर नुकसान होतं. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता यातून मारली जाऊ शकते. मूल कोमेजू लागतं आणि अकाली चित्र काढेनासं देखील होऊ शकतं. शाळांनी देखील ही गरज लक्षात घेणं अत्यावश्यक आहे.

यापुढचा चौथा टप्पा आहे तो ‘बदलाचा काळ’. दहा ते बारा र्वष वयोगटातील मुलं, मोठय़ांनी काढलेल्या चित्रांच्या प्रभावाखाली असतात आणि मोठय़ांसारखी चित्रं काढायचा प्रयत्न करतात. तरीही नियोजित चित्रटप्प्यातील काही प्रतीकांचा मोह मुलाला आवरत नाही. त्यामुळे एखाद्या फ्रेम केलेल्या सूर्यास्ताच्या निसर्गचित्राची नक्कल करता करता अगदी निरागस, बालिश अशी मानवाकृती मुलांच्या चित्रात डोकावते. चित्रात जवळच्या वस्तू मोठय़ा तर लांबच्या लहान दिसू लागतात. क्षितिजरेषेचा अंतर्भाव होतो आणि तिसरी मिती दिसू लागते, अर्थात चित्र फक्त लांबी आणि रुंदीत द्विमितीय चपटं न वाटता खोली म्हणजेच डेप्थमुळे त्रिमितीय वाटू लागतं. वस्तू या शेजारी शेजारी मांडून ठेवलेल्या न वाटता काही मागे, काही पुढे, एकमेकांमागे झाकल्यामुळे काही भाग दिसतो असे सूक्ष्म बारकावे टिपून मुलं चित्रात उतरवतात. ज्या उत्स्फूर्ततेने, न बिचकता मूल यापूर्वी चित्र काढत असे ती कमी होऊ लागते. चित्र काढायचं तंत्र ज्यांना जमत नाही ती मुलं नाराज होऊन चित्र काढेनाशी होऊ लागतात. सुचतं खूप पण ते चित्रात उतरवता येत नाही, अशी या टप्प्यात अनेक मुलं असतात.

याच काळात मुलांचा चित्रातला रस टिकून राहावा यासाठी इतर विषयांशी सांगड घालून कलाकृती करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. ज्या मुलांना गोडी असते आणि चित्रकलेचं अंग असतं त्यांना नक्कल करण्यापासून परावृत्त करावं लागतं आणि जास्तीत जास्त ओरिजिनल, स्वत:ची चित्र काढायचा आग्रह धरावा लागतो. पण अनेक ठिकाणी तसं घडताना दिसत नाही. जे चांगलं जमतंय तेच ते काढायला प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे मूल बंदिस्त विचार करू लागतं. स्वत:च्या चित्र काढण्याच्या कक्षा अरुंद करून ठेवतं. या टप्प्यातील मुलांना विशिष्ट चित्रपद्धतीच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक माध्यमं देणं – जसं कोलाज, दोरा कागदाला शिवून चित्र, नैसर्गिक रंग तयार करून चित्र, मातीने चित्र, मोठे चित्रकार समजून घेऊन विविध शैलींचा अभ्यास करणं इत्यादी तसंच विज्ञान व कलेची सांगड घालणं – जसं रंग कसे तयार होतात, कागद कसे तयार होतात, कला अभ्यासण्यासाठी विज्ञानही कसं महत्त्वाचं आहे आणि कलाकुसरीचा चित्रात वापर करणं – जसं रांगोळीचे प्रकार, अलंकारणाचे विविध प्रकार इत्यादीमधून या विचारकक्षा रुंदावू शकतात.

चित्रांची गोडी टिकून राहिलेल्या मुलांचा बालचित्रकलेतील पाचवा टप्पा असतो ‘वास्तववादी’ चित्रांचा. साधारण तेरा ते सोळा वयोगटातील या मुलांच्या हातात चित्रं चांगली काढण्याचं कसब आलेलं असतं. तंत्र शिकून, सराव करून चित्रकलेतील मूलतत्त्व अभ्यासून या वयातील मुलं चांगली चित्र काढू शकतात. हात स्थिर होणं, साधनांशिवाय उत्तम आकार, रेषा, बिंदू परिणामकारक काढू शकणं, रंगांची समज येणं, काय सुंदर आहे याबद्दल मतं व्यक्त करता येणं, रचनामूल्य समजणं, प्रमाणबद्ध आकृती काढता येणं म्हणजेच सौंदर्यदृष्टी तयार होणं अशी अनेकांगानी चित्रकलेतील समज मुलं दाखवू लागतात. म्हणूनच या सुमारास चित्रकलेच्या परीक्षा मुलांनी द्याव्यात. रंगसंगती, रंगछटा, रेखाकृती, छाया-प्रकाशाचा अभ्यास अशा चित्रकलेतील मूलतत्त्वांवर या टप्प्यात प्रभुत्व मिळवता येते. ज्या मुलांच्या हातात कसब कमी आहे पण चित्रकलेची गोडी आहे त्यांनी चित्रं काढण्यापासून परावृत्त न होता नेटाने जी चित्रं आवडतात ती काढत राहिली पाहिजेत. कारण चित्रकला हे एक सहजसुंदर अभिव्यक्तीचं, आनंद अनुभवण्याचं माध्यम आहे. बाल्यावस्थेतून तारुण्यात प्रवेश करताना चित्र काढण्याचा आनंद लोप पावू नये म्हणून आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
- आभा भागवत

Wednesday, February 8, 2017

तीन लाडू

#तीन #लाडू
..............................
सचिन सरांनी अलफाजला तीन राजगिरा लाडू दिले.
त्यापैकी अलफाजने एकच खाल्ला व दोन ठेवून दिले.
सरांनी विचारलं, " खाऊन टाक. दोन लाडू कशाला ठेवले?"
अलफाज आधी थोडा लाजत लाजत हसला.
मग बोलू लागला
"एक लाडू अर्धा मम्मीला अन अर्धा अब्बूंना देणार. आनी एक आपुट गजलूला देणार. म्हणून नाही खाल्ले मी."
...............
वर्गात घडलेला प्रसंग सचिन सर मला सांगत होते.
खरंतर एक अब्बू म्हणून माझा आनंद मला मांडताही येणार नाही. लेकरू एवढं प्रेम करत असेल तर अजून अम्मी अब्बूला काय हवं असतं?
............................
घरी आल्यावर मी हा प्रसंग समूला, अम्मींना सांगितला.
अम्मी म्हणजे अलफाजच्या अम्माजी कितीतरी वेळ अलफाज कडे पाहत होत्या.
अलफाज ने अर्धा अर्धा लाडू आम्हा दोघांना दिला अन आपुट गज़लला. ती ही हरकून जाऊन लाडू खाऊ लागली. बदल्यात अलफाजला एकच गोष्ट हवी होती, गज़लची गोड गोड शेंबूडभरली पापी.
......................
या क्षणांना चिमटीत पकडायचा प्रयत्न करतोय खरा...पण शब्दांनाही मर्यादा असतातच.
 अम्माजी -अब्बाजीच्या मांडीवर बसून तो जगण्याची रीत शिकतो आहे. एक माणूस बनून जगाची वाट चालतो आहे. अलफाजच्या आसपासचे लोक त्याला समृध्द करत आहेत.आणि या समृध्दीत आम्ही दोघंही (मी आणि समू) न्हावून निघत आहोत. चिंब होत आहोत.
अलफाजने दिलेल्या लाडूचा गोडवा अजूनही जीभेवर रेंगाळतो आहे. त्याला दुआंखेरीज आम्ही काय देणार?
..............................
#जाता #जाता...

तुम्ही रागवाल तर मुलं भ्यायला शिकतील
तुम्ही चिडाल तर मुलं चिडायला शिकतील
तुम्ही काळजी घ्या तर मुलं काळजी घ्यायला शिकतील
तुम्ही प्रेम द्याल तर मुलं प्रेम द्यायला शिकतील.
मुलं आरसा असतात, अस्सल प्रतिबिंब दाखवतात....
..................................
#फारूक #एस. #काझी
नाझरा, ता. सांगोला, जि. सोलापूर

शाळासिध्दी गुणदान तक्ता 2017





Thursday, February 2, 2017

नई तालीम

महात्मा गांधींच्या शिक्षण विचारावर व त्या आधारे सुरू असलेल्या शाळेवर आज मी सकाळ च्या  सप्तरंग पुरवणीत लेख लिहिला आहे
नई तालीमः काळाच्या पुढचा शिक्षणविचार (हेरंब कुलकर्णी)

‘नई तालीम’ हा महात्मा गांधी यांचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता; पण सरकारनं हा विचार पाहिजे तितक्‍या प्रभावीपणे अमलात आणला नाही. ‘नई तालीम’ पद्धतीच्या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी-ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज ‘बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ’ आणि ‘कष्ट करणारा कमी दर्जाचा’ असं समीकरण आहे व त्याआधारे पगार दिला जातो. गांधीजींची शिक्षणपद्धती प्रभावीपणे राबवली गेली असती, तर हा प्रकार कमी झाला असता. आता तरी नव्या शैक्षणिक धोरणात ‘नई तालीम’ स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गांधीजींच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्‍टोबर) विशेष लेख...

‘मी जगाला व देशाला देत असलेली सर्वोत्तम देणगी’ असं वर्णन महात्मा गांधी यांनी ‘नई तालीम’ या त्यांच्या शिक्षणपद्धतीचं केलं होतं. आजच्या (२ ऑक्‍टोबर) गांधी जयंतीनिमित्त या शिक्षणपद्धतीवर चर्चा व्हायला हवी. सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी ‘नई तालीम’ हे साधन आहे, अशी गांधीजींची भूमिका होती. त्यांची ही शिक्षणपद्धती सरकारनं स्वीकारली नाही, हे दुर्दैव. स्वीकारली असती तर आज भारत हे आगळवेगळं राष्ट्र बनलं असतं. आज बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कौशल्याधारित शिक्षण मिळेनासं झालं आहे. गरिबांविषयीची कणव वेगानं हरवत चालली आहे. अशा वेळी गांधीजींच्या या शिक्षणपद्धतीची तीव्रतेनं आठवण येते.

वर्धा ः सेवाग्राम इथं पुन्हा सुरू झालेल्या ‘आनंदनिकेतन’ या ‘नई तालीम’ धर्तीवरच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाणारे विविध उपक्रम.

दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी तिथल्या आश्रमात असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धती वापरली होती. त्यातून त्यांचं चिंतन विकसित झालं. १९३७ मध्ये काँग्रेस सरकारे स्थापन झाल्यावर वर्धा इथंल्या शिक्षण संमेलनात गांधीजींनी पायाभूत शिक्षणाची अत्यंत सविस्तर मांडणी केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रवींद्रनाथ टागोरांसोबत काम केलेल्या आर्यनायकम दांपत्यानं शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्ध्यात तसंच भारतात बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, काश्‍मीर अशा अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्या. १९५६ मध्ये २९ राज्यांत ‘नई तालीम’ पद्धतीच्या ४८ हजार शाळा होत्या आणि त्यांत ५० लाख मुलं शिकत होती. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर गांधीजींच्या शिक्षणविचाराचा प्रसार झाला होता; परंतु हा शिक्षणविचार आधार मानून शासनानं शिक्षणरचना न केल्यानं या शाळा बंद पडत गेल्या व आज भारतात ‘नई तालीम’ पद्धतीच्या केवळ पाचशेच शाळा सुरू आहेत.

महात्मा गांधी ः ‘नई तालीम’ हा गांधीजींचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता.

गांधीजींनी ‘नई तालीम’ची प्रमुख चार तत्त्वं मांडली होती. १) प्राथमिक शिक्षण हे सात ते १४ या वयोगटाचं असेल २) शिकवण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातल्या लोकांच्या मुख्य व्यवसायातला असावा ३) सर्व विषयांचं शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिलं जावं ४) असं दिलं जाणारं शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावं; याबरोबरच शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं, अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. शाळेत इतिहास, भूगोल, गणित, भाषा, चित्रकला, संगीत, स्वास्थ्य, समाजशास्त्र हे विषय होते; पण हे सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात. चित्रकला, संगीत व लोकनृत्य हेही विषय होते. प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश त्यांनी केला होता. ‘जीवनाकडं बघण्याची सौंदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती’ या दृष्टिकोनातून गांधीजी सफाईकडं पाहत असत. सफाई करताना मुलांच्या मनात अशी कामं करणाऱ्यांविषयी तिरस्काराची भावना निर्माण न होता समान भाव निर्माण होईल, हे अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे आहारशास्त्रामुळंही ‘स्वयंपाक हे केवळ महिलांचं काम’ असं मुलांना वाटू नये, त्यातलं विज्ञान मुलांना नकळत कळावं, तसंच ‘नई तालीम म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण’ एवढाच संकुचित अर्थ नसावा, तर त्या उद्योगाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जावं, असं गांधीजींना अपेक्षित होतं. वस्त्रोद्योग शिकवताना टकळी, धागा यातली भूमिती, कापसाच्या निर्मितीमधलं विज्ञान, वस्त्रनिर्मितीमधल्या अर्थकारणातलं अर्थशास्त्र व गणित, वस्त्र निर्माण करणाऱ्या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत, असं गांधीजींना अपेक्षित होतं. या शिक्षणातून उच्च-नीच भाव नसलेला, शहर व खेडी असा भेदभाव नसलेला, बुद्धीचं काम व श्रमाचं काम यात फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी गांधीजींची दृष्टी होती. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा मुलांच्या वास्तव जगण्याशी संबंध जोडला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार म्हणतात ः ‘भारतीय समाजातल्या दबलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांना शिक्षणात महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न गांधीजी करत होते. शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही त्यांचा भर होता. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून प्रशिक्षणात संगीत, कला, सण-उत्सव यांचा समावेश असावा, असं ते म्हणत.’

वर्धा ः ‘आनंदनिकेतन’ या शाळेतली सूत कातणारी विद्यार्थिनी.

अनुभवातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून मेंदूचा विकास अधिक चांगला होतो व सर्वांगीण शिक्षण दिलं जातं, हे आज जेनेटिक सायन्स व मेंदूआधारित शिक्षणातून सिद्ध होत आहे. हे संशोधन तेव्हा झालेलं नसतानाच्या काळात गांधीजींनी ८० वर्षांपूर्वी ही मांडणी केली होती. हे त्यांचं द्रष्टेपणच होतं.

आजही शिक्षणाचं स्वरूप गरीब-श्रीमंत यांच्यात भेद अधिकाधिक वाढवणारं, समान शिक्षण नाकारणारं, शिक्षणाचा व्यापार वाढवणारं असंच आहे. पुस्तकी शिक्षणावर भर, वाढणारी व्यक्तिकेंद्रितता, वाढती उपभोगप्रधानता व त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्‍न, श्रमाकडं व श्रमकर्त्याकडं बघण्याची अधिक तीव्र झालेली नकारात्मक दृष्टी हे बघता ‘नई तालीम शिक्षणपद्धती’ हेच त्यावरचं उत्तर वाटतं. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर विकासाच्या धारणेबाबत सगळ्यांनीच फेरविचार करणं आवश्‍यक आहे.

या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्जाचा व त्याआधारे दिला जाणारा पगार अशी भांजणी झाली आहे, ती या शिक्षणातून कमी झाली असती. नव्या शैक्षणिक धोरणात नई तालीम स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

------------------------------------------------------------------
आनंदनिकेतन ः ‘नई तालीम’ची पुन्हा सुरवात
वर्धा इथल्या आश्रमात ‘नई तालीम’ची शाळा १९७० च्या दशकात जिथं बंद पडली होती, तिथंच ती २००५ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या इथल्या संचालक आहेत. या शाळेची विद्यार्थिसंख्या २४० आहे. सर्व सामाजिक गटांचं योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व आहे की नाही, हे इथं कटाक्षानं पाहिलं जातं.

‘प्रीती’, ‘मुक्ती’ आणि ‘अभिव्यक्ती’ हा या विद्यालयातल्या शिक्षक-विद्यार्थी संबंधांचा आधार आहे. इयत्ता सातवीपर्यंत बागकाम व शेती, स्वयंपाक, वस्त्रकला यांसारख्या कामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रं यांसारख्या विषयांच्या अध्ययनासह मुलं वस्त्रं विणतात. कला, संगीत यावर विशेष भर असतो. सामाजिक विषयांवर सतत बोललं जातं व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तूर, बाजरी, ज्वारी, मका यांची पावसाळी लागवड करायला शिकवलं जातं. मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या हिवाळी भाज्यांची लागवड व देखभाल करायलाही शिकवलं जातं. हे काम करत असताना जमिनीचं मोजमाप व परिमिती काढणं, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणं, जमिनीवर भौमितिक आकृत्यांचा उपयोग करत बागेची रचना करणे आदी गोष्टीही इथली मुलं शिकली आहेत. विविध ऋतूंमधलं किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतल्या पाण्याची पातळी यांचं मोजमाप, नोंदी ठेवणं, आलेख काढणे हेही इथं सहज शिकता येतं. गांडूळखत, कंपोस्टखत तयार करणं, द्रवरूप झटपट खत करणं, कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणं, मित्रकीड, नुकसान करणारी कीड आदींची तोंडओळख, मधमाश्‍या व कीटकांचं निसर्गातलं महत्त्वाचं स्थान समजून घेणं, अहिंसक पद्धतीनं मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय, अळिंबीची शेती करण्याची पद्धत अशा बाबी इथली मुलं शिकतात. महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची प्रत्येक मुलाला संधी मिळते; ज्यातून पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचं शास्त्र आदींचे धडे इथली मुलं शिकतात. यातून स्वावलंबन व लिंगसमभावाचं महत्त्व रुजण्यास अनुकूल वातावरण तयार करणं शक्‍य होतं. आज शिक्षणशास्त्रात ‘ज्ञानरचनावाद’ या पद्धतीत शिकवण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकाऊ मानण्यात आलेली आहे. ‘नई तालीम’ ज्ञानरचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्यं विकसित करत त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारी आहे. शिक्षकांनी-पालकांनी ही शाळा बघायला हवी.
------------------------------------------------------------------
अभय बंग ः ‘नई तालीम’ शाळेचे विद्यार्थी
डॉक्‍टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या ‘नई तालीम’चे विद्यार्थी होते. त्यांच्याकडून ही पद्धत समजून घेतली. ते म्हणाले ः ‘‘शेतकरी-मजूर कसे जगतात, याचा विद्यार्थिदशेत अनुभव देणारी ही पद्धत होती. दिवसभरात तीन तास उत्पादककाम करणं सक्तीचं होतं. सूतकताई, विणकाम, गोशाळेची स्वच्छता, शौचालयसफाई, स्वयंपाकगृहात काम, भांडी घासणं ही कामं प्रत्येक जण करत असे. आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्यांची मुलं मुलाखत घेत. स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास खुद्द स्वातंत्र्यसैनिक येऊन समजून देत. आकाशातले तारे दाखवले जात, तर कधी झाडावर चढून कवितेचं पुस्तक आम्ही वाचत असू. ‘कालच्या पेक्षा तू आज पुढं सरकलास का?’ असा महात्मा गांधीजींचा दृष्टिकोन परीक्षेत होता. प्रात्यक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव,’ ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसं कराल?’ असे प्रश्‍न विचारले जात... स्वयंपाकानंतर भांडी घासण्याचीही कामं करावी लागत असत.. जीवशास्त्राचे शिक्षक आम्हाला परिसरात फिरायला नेत व झाडांविषयी प्रश्‍न विचारत व त्यावरून विद्यार्थ्यांचं आकलन तपासत...
टॉलस्टॉयच्या ‘इव्हान द फूल’ या कथेत एक अंध म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत, त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते. मला वाटतं, ही मूल्यव्यवस्था शिक्षणात आणायला हवी. ‘नई तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणं मला योग्य वाटत नाही. कारण, शाळेत मी केवळ शेती शिकलो नाही, तर शेतकऱ्यांचा सन्मान करायला शिकलो, त्यामुळं ती जीवनदृष्टी आहे.

‘नई तालीम’चं आकर्षण वाढत आहे ः बरंठ
‘‘देशभरात वेगवेगळ्या राज्यांत आज पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. या शाळा ‘नई तालीम’चा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. श्रमाला महत्त्व, परिसराशी शिक्षण जोडणं, मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होत आहे,’’ असं ‘नई तालीम’ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘नई तालीम’कडं आम्ही एक शाळा म्हणून बघत नसून, सर्वोदयी समाजरचनानिर्मितीचं साधन म्हणून पाहतो बघतो.’’ http:/www.naitalimsamiti.org/ ही समितीची वेबसाइट असून, http://www.lokbharti.org व http://puvidham.in/puvidham-learning-centre/ अशा काही शाळा या शिक्षणविचारावर प्रभावीपणे काम करत आहे

हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१)

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...