Pages

Thursday, September 15, 2016

होम स्कूलिंग - शिक्षणाची नवी दिशा

होम स्कूलिंग – शिक्षणाची नवीन दिशा

मुलांचा पहिला वाढदिवस झाला की वेध लागतात शाळेचे ! आजच जग सुद्धा खूप फास्ट आहे, तेव्हा मूल स्मार्ट’च’ असायला हव.अगदी सकाळी सहा ते रात्री दहा – सगळे क्लास लावू आम्ही –त्याला सगळ यायला हव ; अभ्यास,खेळ ,डान्स ,गाण, गेलाबाजार कविता सुद्धा करता यायला हवी – किती विदारक आहे हे ? कधी स्वत:च लहानपण आठवून पाहिलं आहे ?किंवा कधी हा विचार केला आहे का ,की खरोखरच आपण जे शिकलो त्यातलं नक्की किती उपयोगाच आणि किती खर्डेघाशी होती ?
हाच विचार आम्ही केला- आणि ठरवलं मुलीला शाळेतून काढायचं ! शाळा छानच होती ,सगळ्या सुविधा ,लक्ष देणारे शिक्षक , जागतिक दर्जा – पण आम्हाला हवा होता –शिकण्यातला  मोकळेपणा !!
बरेचदा भारताबाहेर फिरताना होम-स्कूलिंग बद्दल ऐकल होत; पण तिथल्यासारखी आपल्याकडे ही पद्धती सर्वमान्य नाही ,तरीही एखाद वर्ष करून तरी बघू म्हणून ,हे शिवधनुष्य उचलल ,इथे ते मोडून चाणार नव्हत- पेलायच होत तोलायचं होत!! त्यातून आम्ही दोघही वर्किंग.तेव्हा पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला.
शाळा नाही म्हटल्यावर सुरुवातीचा सगळा वेळ टीवी बघण्यात घालवला जाऊ लागला ,पण पंधरा दिवसातच त्याचा कंटाळा ही येऊ लागला ,मग भन्नाट खेळून झाल ,मग टिवल्याबावल्या करून झाल्या –दोनेक महिन्यांनी अभ्यासाला सुरुवात झाली .
पण नेमका अभ्यास करायचा म्हणजे तरी काय ? मग शुद्धलेखन ,पाढे, पुस्तक वाचन ,वेगवेगळ्या विषयावर घरात गप्पा सुरु झाल्या. कधीतरी मुख्य प्रवाहात यावच लागल तर म्हणून शालेय पुस्तक आणून ठेवलेली SSC /CBSE/ICSE सगळीच पुस्तक घरात असायची ,जे आवडेल त्याचा अभ्यास करायचा.भाषेच कोणताही बंधन नव्हत,दोन्ही भाषांमध्ये पुस्तक आणून ठेवली होती .
खरा होम-स्कूलिंगचा धडा सुरु झाला तो – प्रवासात ! आम्ही कामानिमित्त फिरत असतो – मग वेगवेगळे प्रदेश ,तिथली वैशिष्ट्य ,त्याची ऐतिहासिक-पौराणिक पार्श्वभूमी, तिथल्या भाषा ,मातीचे प्रकार,घरांचे प्रकार ,बोलीभाषा,वेशभूषा आणि मुख्य म्हणजे तिथले प्रसिध्द असे खाण्याचे पदार्थ – भूगोल,इतिहास,भाषा विषय असेच शिकवत आहोत. वेगवेगळी राज्य ,त्यांच्या सीमा ,त्या सीमाभागातील चालीरीतींची देवाण-घेवाण ,सगळचं मनोरंजक होऊ लागलं.
आपण वयाने मोठे असलो तरी ,आईवडील म्हणून आपण मुलांच्याच वयाचे असतो ,तेव्हा आपणही शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत असतो- हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. मुलीच्या वयासोबत आमचा पण आईबाबा म्हणून त्याच वयाचा वाढदिवस असायचा. एक म्हटलं जात किंवा तसा एक गोड गैरसमज आहे ,जे आम्हाला मिळाल नाही ते मुलांना मिळायला हवं,आणि यासाठी आईवडील काहीही करायला तयार असतात. आम्ही जरा वेगळा विचार केला ,आपण किमान पक्षी एवढतरी नक्की देऊ जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिल; हे खूप उपयोगी पडलं. आईवडील म्हणजे ’देव’ नव्हेत,आपल्यावर खूप प्रेम करणारी दोन माणस ,हा विचार आधी रुजवला.
मुळात एवढ्या चांगल्या शाळा असताना होम्स्कुलिंगच का ?घरातून-बाहेरून खूप विरोध झाला,तुमच्या भलत्या विचारांपायी तुम्ही मुलीच्या भवितव्याशी खेळताय; हे सगळ कानाआड करत आम्ही तिघेही पुढे निघालो. मुळात आपल्या पाल्याने ‘शिकायचं कसं ? ‘ एवढ आधी शिकव हा आमचा अट्टहास होता. अभ्यास आणि अभ्यासक्रम नंतर.
शिकायचं म्हणजे घोकंपट्टी किंवा भरपूर मार्क्स असली कोणतीच स्पर्धा नव्हे.एखादी गोष्ट शिकताना तिच्या मुळापर्यंत जाता यायला हवं. सगळेच विषय हे एकमेकांना धरून असतात हे दाखवून दिल.कशाला पाहिजे मराठी, किंवा इतिहास किंवा गणित ;असा नसत. उद्या मोठे होऊन इंटेरियर डिझाईनर झालात आणि मोगलकालीन डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला इतिहासाची जाण हवीच ना !अशा पद्धतीने आमचा अभ्यास पुढे पुढे सरकत गेला.
घरीच अभ्यास असल्यामुळे, ठराविक काम ह्या आठवड्यात झालं पाहिजे,असा दंडक आहे.मग तुला हव तेव्हा कर.उरलेला वेळ तिने तिच्या छंदासाठी वापरावा.कधी रेडीओ जोकी तर कधी कार्यक्रमच निवेदन अशा गोष्टी ती यातून शिकत गेली.
आईवडील म्हणून आम्हा दोघांनी यातील जबाबदा-या चक्क वाटून घेतल्या.काही विषय त्याने तर काही मी घ्यायचे.मग आम्हीच तिला विचारलं तुला कोणत्या विषयासाठी कोण हवंय ते,तू निवड. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा हीच पद्धती वापरली. तिचा बाबा सोफ्टवेर इंजिनियर असल्यामुळे,कॉम्पुटर त्याने शिकवायचा,त्याचा आकाशदर्शनाचा अभ्यास आहे,तो उत्तम गातो ,गाणी कम्पोज करतो ,त्याला पेंटिंग मधल खूप कळत, खेळ कसा बघायचा ,मूवी पाहायचा दृष्टीकोन कसा असू शकतो ;हे सगळ ती बाबाकडून शिकतेय. इतिहास ,भाषा ,कविता, नीटनेटकेपणा ,उत्तम स्वयंपाक ,बिझनेस सुरु करणे म्हणजे काय.चालवताना येणा-या अनेक अडचणी ,त्यावर मात कशी करायची ? हे सगळ आईकडून . अर्थात ह्या गोष्टी काही पुढ्यात बसवून शिकवायच्या नसतातच ;इथे मोकळेपणा उपयोगी पडला. एकत्र बसून जेवताना नानाविध विषय मिळू लागले.
बरेचदा दोघांनाही कामासाठी जावं लागत ,कोणीतरी एकजण तिला सोबत घेवून जातो. त्यातूनही नकळत ती खूप शिकली. मान-सन्मान बघण ही एक बाजू झाली; कधीकधी घ्यावा लागणारा कमीपणा,अपमान तसेच त्या कामासाठी केले गेलेले कष्ट –सगळ तिला पाहता आलं. ह्याचा फायदा म्हणून आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र झालो.
आपल मूल आत्मविश्वासी असाव , ही प्रत्येक पालकाची इच्छा असते . पण हा आत्मविश्वास येतो कुठून? एखाद्या गोष्टीच संपूर्ण ज्ञान ‘आत्मविश्वास’ निर्माण करत. उथळपणाने ,नको ती स्पर्धा करत, मला कसं सगळ्यांच्या आधी उत्तर आलं –असल्या गोष्टीना जागाच शिल्लक ठेवली नाही.
आता महत्त्वाचा मुद्दा आपण शिकतो ते पोटापाण्याच्या सोयीसाठी. त्याच काय? अशा शाळेत न गेलेल्या मुलीचं भवितव्य काय ? इथे सुद्धा आपण पालक मोठी चूक करतो,खरतर आपण मुलांना पाण्यापर्यंत नेऊ शकतो,पाणी पिऊन तहान भागावण,त्यांच्या हातात आहे. आज आम्ही मुलीला वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीबद्दल नेहमी सांगत असतो. परंतु,तुला हेच करायचं आहे ,ह्यात प्रसिद्धी आहे, ह्यात पैसा आहे अश्या गोष्टी प्रकर्षाने टाळतो.
वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक वाचायला उपलब्ध करून ठेवली आहेत,तिला हवं तर तिने वाचावीत. सुरुवातीला कंटाळा यायचा ;मग तिला त्यातली मज्जा दाखवून दिली.तू टीव्ही वर पाहतेस त्या कथा कोणाच्या तरी इम्याजीन करण्याचा पार्ट आहे,तेव्हा यामध्ये तुझ्या मेंदूला चालना मिळण्याच कामच राहत नाही.उलट पुस्तक वाचनात वर्णनानुसार आपला मेंदू आपण पाहिलेल्या आणि आपण इम्याजीन केलेली चित्र डोळ्यासमोर उभी करतो ; त्यातून चालना मिळत राहते, नवनवीन सुचत जात. हे मान्य आहे की व्हिडीओमुळे गोष्ट चटकन समजते, हाच त्यातील धोका पण आहे.
अभ्यास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक असू नये यावर आमचा आजही कटाक्ष आहे.चांगली भाषा बोलता येण,काळाची गरज आहे.भाषा कोणतीही असो.शब्दांचे उच्चार ,पाठांतर ,जीभ आणि मेंदूवरील हे संस्करण अतिशय आवश्यक आहे.ही जबाबदारी मात्र माझ्या आईबाबांनी पार पडली.संस्कृत श्लोक असोत की ज्ञानेश्वर ,तुकाराम आपली ज्ञानाची परंपरा जपलीच पाहिजे. ह्यात धर्म किंवा जातीचा कोणताही संबंध नाही ,हे सुद्धा तिला नीट समजावून सांगितले.
होम स्कूलिंगचे फायदे आहेत यात शंकाच नाही;परंतु ह्यासाठी आईवडिलांना मात्र शब्दशःतारेवरची कसरत करावी लागते. एकतर होम स्कूलिंग म्हणजे चोवीस तासांची शाळाच बनून जाते,शिकत राहणे या अर्थाने.
ह्यात बरेचदा मूल सोशल होत नाहीत ,त्यांना मधली सुट्टी –डब्बा ,मित्र मैत्रिणी ह्यातील आनंद उपभोगता येत नाही –असं ब-याचजणांनी विचारलं. खरतरंआमच्या बाबतीत असा अजिबात घडलेलं नाही.उत्तम ज्ञान असल्याने ती आत्मविश्वासाने बोलते ,गल्लीभर तिचे मित्रमैत्रिणी आहे. आतापर्यंत जिथे जिथे राहिलो तेथील मित्र मैत्रिणींशी आजही ती संपर्कात आहे. माझ्या मते सोशल असण एक स्वभाव आहे. राहिला प्रश्न डब्बा आणि शाळेतल्या गमतीजमतींचा –ह्या पेक्षा तिचं ‘परिपूर्ण’ होण आम्हाला जास्त महत्त्वाच वाटल.
गेली ६/७ वर्ष तिला होम स्कूलिंग आहे.सध्या ती रूढार्थाने सातवीला आहे.पण गणितात आठवीला आणि भूगोलात सहावीला आहे.अभ्यास उमजून पुढे जायचं आहे,तेव्हा हे होणारच.
तिच्या भवितव्यात तिने जे काही व्हायचं आहे ,त्यातील सगळी स्किल्स तिच्याकडे असण;हा यामागील हेतू आहे.
गम्मत म्हणून एक उदाहरण देते,कराटे क्लासला ती जात होती,आणि ज्या दिवशी त्यांची परीक्षा होती त्या दिवशीच नेमकी आजारी पडली,अर्थात परीक्षा बुडली म्हणजे सर्टिफिकेट नाही .तेव्हा तिला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली- उद्या तुला कुणी त्रास दिला तर तू सर्टिफिकेट दाखवणार आहेस का स्किल्स ? बस्स, तेव्हापासून सर्टिफिकेटची क्रेझ आमच्यातून हद्दपार झाली.
अलीकडेच अशा पद्धतीने शिकणाऱ्या एका भारतीय मुलीची अमेरिकन MIT मध्ये निवड झाली, त्या निमित्ताने आम्हालाही आपण योग्य दिशेने जातोय ह्याची जाणीव झाली.
अलीकडे CBSE/ICSE अशा बोर्डानी होम्स्कुलरसाठी थेट दहावीची सोय केली आहे.त्यामुळे बरेच अडथळे कमी झाले आहेत.
मुळात शिक्षणाचा उद्दात हेतू ,स्वतःला काहीतरी ज्ञान प्राप्त व्हाव, त्यातून चांगल काही घडावं हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथपर्यंत पोहोचलो.समाजऋण अर्थात देशाची सेवा देशाचा विकास ही बीज रूजन अत्यंत आवश्यक आहे.’जरि उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यर्थ भर विद्येचा’ याप्रमाणे वाटचाल झाली तर आणखी काय हव?
अर्ध्या तपाहून जास्त सुरु असलेली आमची शाळा ,मुलीसोबत आम्हालाही आनंद देत आहे.शालेय अभ्यासक्रमाला धरून सोबतीने गाणी,चित्र,खेळ, वाचन आणि तिला आवडणा-या गोष्टीवर वेळ खर्च होतो आहे. ह्यातच समाधान आहे.
तसं पाहिलं तर प्रत्येकच पालक होम स्कूलिंग करत असतो,८ तासांची शाळा झाली की १६ तास मूल घरच्यांसोबत असतं. होम स्कूलिंग हा काही फोर्मुला नाही,ती वैयक्तिकरित्या आपल्या सोयीने आणि विचाराने करण्याचा भाग आहे.अगदी शाळा सोडूनच हे सगळ करायला हवं,असं अजिबात नाही.मुलांना आपला वेळ देऊन त्यांना त्यांच्या कलाने वाढू द्याव ,ह्या प्रक्रियेत आपणही ‘मोठे’होत जातो.मुलांना काय दिल पाहिजे तर हा चिरंतन ठेवा ,आनंदी जगण्याचा वसा द्यायला हवा
एक संस्कृत सुभाषित आहे –
 विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः ।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः ॥

जान्हवीला घडवत असताना मी आणि ऋतुराज ही घडत गेलो,डोळ्यादेखत मूल वाढताना ,शिकताना पाहण-अनुपम्य सोहळाच तो !चला मुलांना घडवू या ,सोबतीने घडू या !!
 - नीलिमा देशपांडे

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...