Pages

Monday, September 26, 2016

मुलांना काही सांगायचंय

मुलांना काही सांगायचंय...

वैशाली गेडाम

```Maharashtra Times | Sep 25, 2016, 03.00 AM IST```

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. याबाबत सरकारने प्रसिद्ध केलेल्या टिपणावर सर्व संबंधित घटकांच्या प्रतिक्रिया आजमावल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या मुलांसाठी हा सारा खटाटोप आहे, त्यांना काय वाटते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मुदलीयार आयोग १९५२-५३, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९६८, (कोठारी आयोग) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ यामधून आपण मुलांच्या यशस्वी शिक्षणाची व भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघितली आहेत. कोठारी आयोगाच्या अहवालातील 'भारताचे भवितव्य वर्गाखोल्यांतून घडत आहे' हे वाक्य अंगावर रोमांच आणणारे आहे. खरेच कोणत्याही देशाचे भवितव्य त्या देशाचे शिक्षण कसे आहे, मुले शाळेत काय शिकत आहेत यावर अवलंबून असते. काळानुरूप शैक्षणिक धोरणांचा पुनर्विचार होणे आणि त्यात योग्य ते बदल व नवीन संकल्पनांचा, घटकांचा, विषयांचा समावेश होणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण साकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
मुलांबाबत धोरणे आखताना मुलांना नेमके काय हवेय, मुले काय विचार करतात, याचा कधी विचार केला गेलाय का, असा प्रश्न पडतो. मुलांबाबतचे सर्वच निर्णय मोठी माणसे घेऊन मोकळी होतात. आपण जोपर्यंत मुलांना पूर्णपणे समजून घेत नाही, तोपर्यंत मुलांच्या हिताचे निर्णय आपल्या हातून होणे शक्य नाही. प्रत्येक वेळी मुलांच्या मताचा आदर करून, स्वातंत्र्य देऊन व सोयीसुविधा देऊन शिकण्याची संधी दिल्याने मुले किती प्रतिभावान, कल्पक, आत्मविश्वासाने परिपूर्ण होतात, ते मी गेल्या १९ वर्षांत शिक्षिका म्हणून अनुभवले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्यांच्या मतांचे, कल्पनांचे, इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब पडावे या हेतूने मी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कल्पना माझ्या शाळेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दिली. त्यावर चर्चा केली. मुलांना काही प्रश्न विचारून त्यावर त्यांची मते, विचार मांडायला सांगितले. मुलांनी मांडलेली मते, विचार आपल्याला विचार करायला भाग पडणारी आहेत.
मी मुलांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१६ च्या प्रस्तावित आराखड्यामधील प्रकरण ४ मधील मुद्द्यांना अनुसरून पुढील प्रश्न विचारले : शाळा कशी हवी? शिक्षक कसे हवेत? अभ्यास कसा हवा? पाठ्यपुस्तके कशी हवीत? तुम्हाला कोणते विषय महत्त्वाचे वाटतात? शिक्षण कोणत्या भाषेत हवे? मुलांना नापास करावे काय? नापासाबाबत तुमचे मत काय? परीक्षेबाबत तुमचे मत काय?

*यावर मुलांनी मांडलेली मते, विचार असे :*
आम्हाला मुळीच न मारणारे, मुळीच न रागावणारे, आमच्यावर प्रेम करणारे, आमच्यावर विश्वास ठेवणारे, चांगले वागणारे व आम्हाला समजून घेणारे शिक्षक पाहिजेत. शिक्षकांनी रागावल्यावर मुलांची शिकण्याची इच्छा कमी होते. शिक्षा न करण्याचा कायदा झाला, तरी आम्हाला शिक्षा होते. मुलांच्या डोक्यात चांगला विचार यावा म्हणून त्यांना घरी किंवा शाळेत त्रास देऊ नये. घरी आई-बाबा रागावल्यास शाळेत गेल्यावर मुलाचे शिक्षणाकडे मुळीच लक्ष लागत नाही आणि डोक्यात घरचाच विचार सुरू राहतो. त्यामुळे आई-वडिलांना समजावून सांगावे. आई-वडिलांना समजावून सांगण्याचं काम शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आहे आणि शिक्षकांना समजावून सांगण्याचे काम सरकारचे आहे. शाळेत आम्हाला दुपारी दोन वाजता पोषण आहार मिळतो. मात्र, त्यापूर्वी १२ वाजता आम्हाला भूक लागलेली असते. त्यामुळे आम्हाला दोन वेळ खायला पाहिजे. आम्हाला दररोज एक फळ खायला मिळावे असे वाटते.

मुलांचे आणखी काही मुद्दे असे : शाळा मजबूत बांधलेल्या असल्या पाहिजेत. आमची शाळा पावसाळ्यात गळते. शिक्षक गावात राहिले पाहिजेत. शाळेत वाचनालय पाहिजे आणि ते पूर्ण दिवसभर सुरू पाहिजे. म्हणजे जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेथे जाता आले पाहिजे. शाळेचे गेट सदैव उघडे पाहिजे. वाटेल तेव्हा शाळेत जाता आले पाहिजे. आम्हाला परिपाठ बिलकुल आवडत नाही. कोणतीच आणि एकच एक प्रतिज्ञा व प्रार्थना आमच्याकडून रोजच्या रोज म्हणवून घेतल्या जाऊ नयेत. आम्हाला खेळायला खूप म्हणजे खूपच आवडते. आमच्या शाळेला आणि आमच्या गावात सुद्धा आम्हाला खेळायला क्रीडांगण नाही. प्रत्येक शाळेत क्रीडांगण असलेच पाहिजे. खेळाचे साहित्य आणि खेळ शिकविणारे शिक्षक असले पाहिजेत. खेळाला खूप महत्त्व दिले पाहिजे. दिवसभर शाळेतच, एकाच वर्गात बसून शिकवू नये. आम्हाला कोंडल्यासारखे वाटते. आठव्या वर्गापासून शाळेत एक, दोन तरी शिक्षिका असल्याच पाहिजेत. काही शिक्षकांची नजर चांगली नसते. ते मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहतात. मुलींना ते कळते. मुलींना हे आवडत नाही. त्यामुळे काही मुली जीव देतात. काही मुलींवर बलात्कार होतात. असे होऊ नये. मुलामुलीत भेदभाव करू नये.
शालेय शिक्षणाच्या फलनिष्पत्तीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना मुलांनी दिलेला प्रतिसाद असा होता : शिक्षक खूप हुशार पाहिजेत. आम्हाला विषय समजेपर्यंत त्यांनी तो समजावून दिला पाहिजे. चौथ्या वर्गापासून खूप अभ्यास असतो. तो आम्हाला समजत नाही. लक्षात राहत नाही. गणिताचा अभ्यास खूपच जास्त असतो. जगातले कोणतेही गणित आम्हाला शिकवा; पण एका वर्षात खूप सारे आमच्या डोक्यात भरण्याचा प्रयत्न करू नका.
इंग्रजी भाषा सोपीकडून कठीणकडे शिकवली पाहिजे. इतकी पुस्तके पाठविण्याची काय गरज आहे? भाषा आम्ही परिसरातून व वाचनालयातील पुस्तकातून शिकू शकतो. पुस्तक पाहूनच वाचायची इच्छा होत नाही; कारण पुस्तकात बारीक अक्षरे असतात. दिवसातून दोनच विषय शिकवावेत; पण समजण्यालायक शिकवावे. परीक्षेत पुस्तकातील माहिती विचारू नये.
शिक्षण हक्क कायद्याद्वारे सध्या आठवीपर्यंत नापास केले जात नाही. त्यात आता बदल करण्यात येणार आहे. त्याबाबत मुले म्हणतात : नापास करू नये. आम्हाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणून मुले नापास होतात. काही मुले नापास झाल्यावर शाळा सोडून देतात. एकदा नापास झाल्यावर पुढे शिकण्याची इच्छा जागृत होत नाही. काही मुले आत्महत्या करतात. मुलींचे लग्न लवकर केले जाते. नापास मुलांना घरकामाला जुंपले जाते. आई-वडील मारतात, शिव्या देतात. नापास झाल्यावर काही तरी करण्याची इच्छा मरून जाते.
परीक्षेबाबत मुले काय म्हणतात, याचाही वेध घेतला. परीक्षा म्हणजे काय हेच समजले नाही, तर परीक्षा कठीण आहे की सोपी आहे हे आम्हाला कसे कळणार? आणि परीक्षा म्हणजे काय हेच माहीत नसले, तर आम्ही परीक्षा कशी देणार? आपण शिकतो तीच परीक्षा असते. परीक्षा कधीच संपत नाही, अशा प्रकारचे मत विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत मांडले.
याखेरीज मुलांनी मांडलेले इतर मुद्दे : शाळेला शेती पाहिजे. भाजीपाला, फळे यांचे उत्पादन आम्ही शाळेत करू शकलो पाहिजे. गावातील समस्या सोडविण्यात शाळेने पुढाकार घेतला पाहिजे. त्यात मुलांचा सहभाग असला पाहिजे व हे शिक्षणातूनच शिकविले पाहिजे. आम्हाला पुस्तके सुटसुटीत आणि लवकर समजतील अशी व आकर्षक पाहिजेत. वर्षभर एका विषयाचे एकच पुस्तक नकाे. एका विषयासाठी वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळाली पाहिजेत. आम्हाला सहलीला जावे वाटते; पण आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आम्ही सहलीला जाऊ शकत नाही. इतिहास विषय आम्हाला इतक्या लवकर शिकवू नये असे आम्हाला वाटते. गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय महत्त्वाचे आहेत. खेळ, नृत्य, गायन, चित्र, शिल्प, अभिनय वगैरे विषय तर शिकविण्यातच येत नाहीत. आम्हाला हे विषय शिकायला खूपच आवडतात. आणि हे विषय पुस्तकातून नाही तर प्रत्यक्ष शिकवावेत. हे विषय शिकविण्यासाठी खास शिक्षक असावेत. आठव्या वर्गापासून शरीराबद्दल माहिती असावी.
आपल्याच भाषेतून शिकवले पाहिजे. कारण आपल्या भाषेतून आपल्याला छान समजते. आमच्या गावातील काही छोटी छोटी मुले अंगणवाडीत जाण्याऐवजी इंग्रजी शाळेसाठी बाहेरगावी जाणेयेणे करतात. ते त्यांना लांब होते. असे होऊ नये. मुलांना त्रास होतो, हे मुद्देही मुलांनी आवर्जून मांडले. कितीही चांगले धोरण आखले, तरी मुले म्हणतात त्या मूलभूत गोष्टींचा विचार न केल्यास ते यशस्वी होणार नाही, हे यावरून स्पष्ट होते.

(ले‌खिका चंद्रपूर जिल्ह्यातील मसाळा (तुकूम) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षिका आहेत.)

Sunday, September 18, 2016

'या' मुलांशी वागायचं कसं?

‘या’ मुलांशी वागायचं कसं?

दोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर.

नीलिमा किराणे | September 17, 2016 1:15 AM



‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर मुलांवर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. आणि तुमच्याही त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या नाहीत, पण अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे आणि अपेक्षा मुलांच्याही असतात, हेही तुम्ही समजून घ्यायला हवं ना?’’ टीन एजर्स वा पौगंडावस्थेतील मुलांशी वागताना याचं भान हवंच..

‘‘हाय. कसली जोरदार चर्चा चाललीय?’’ कॉलनीतल्या बागेच्या कट्टय़ाजवळ, जोरजोराने हातवारे करत एकमेकांशी बोलणाऱ्या विशाखा आणि मनोजला पाहून मानसीनं विचारलं. तसा मनोज वैतागलेल्या स्वरात म्हणाला,

‘‘या मुलांशी कसं वागायचं तेच कळत नाहीये मानसी. दोघंही सतत मोबाइल नाही तर इंटरनेटवर. आदित्यची पुढच्या वर्षी दहावी, रविवारशिवाय माझ्या मोबाइलला हात लावायचा नाही असा आजच दम भरलाय. त्याच्यात क्षमता आहे, पण अभ्यासाला तासाभराचीही बैठक नाही. सगळं लक्ष खेळात.’’

‘‘अगं, आर्या तर हल्ली पुस्तकंसुद्धा मोबाइलवर वाचते. कशाला डोळे खराब करायचे? स्वयंपाकात मदत शून्य, घरभर पसारा. मुलांच्या अशा वागण्यामुळे सतत वादावादी, शांतता नाहीच. आजही अति झाल्यामुळे बाहेरची थंड हवा खायला आम्ही इथे येऊन बसलो.’’

‘‘पण हवा एवढी गरम होण्याइतकं घडलं काय?’’

‘‘अगं, काल रात्री आर्या उशिरापर्यंत कॉलेजची असाइनमेंट करत होती. मग सकाळी उठायला उशीर. रविवारी घर आवरायचं ठरलेलं, म्हणून हाक मारली, तर ‘रविवारी तरी झोपू दे’ म्हणून माझ्यावर खेकसली. निवांत उठली, गाणी ऐकत, रमतगमत स्वत:चं आवरलं, तेव्हाच माझा पेशन्स संपला होता. मग कपाटातली क्रोकरी पुसायला काढली, तेवढय़ात ‘सरप्राईज पार्टी ठरलीय’ असं सांगत तिची मैत्रीण आली. त्याबरोबर काढलेला पसारा तेवढा फटाफट आवरून बाईसाहेब निघाल्या.’’

‘‘अगं, मुलींनाही रविवारच मिळतो मोकळा. तरी मदतीला आली, काढलेलं फटाफट आवरलं, पुष्कळ झालं की? आणि आदित्य कुठेय?’’

‘‘आदित्य पण थोडासा नाराजीतच खेळायला गेलाय. मागच्या वेळी मित्रांबरोबर हट्टानं जाऊन एक बाही हिरवी, एक पिवळी असले मवाल्यासारखे कपडे आणले, म्हणून आज मी माझ्या पसंतीनं त्याला नवे कपडे घेतले. तो भांडला नाही, पण ‘चम्या’सारखे कपडे म्हणाला. गेलाय ग्राऊंडवर खेळायला..’’ मनोजनं तक्रार मांडली.

‘‘अरे मग छान झालं की. तुम्हाला दोघांना अचानक एक मस्त संध्याकाळ मिळाली भटकायला.’’

‘‘आम्हाला काय पिळतेयस मानसी? तेही एवढे दडपणात असताना?’’

‘‘पिळत नाहीये. मुलं नाराज असूनही या क्षणी मजा करतायत आणि तुम्ही घडून गेलेल्या गोष्टींवर चिडून चिडून बोलण्यात तुमचा मोकळा वेळ वाया घालवताय. ‘या मुलांच्या नादात आम्ही कित्येक र्वष एकमेकांसाठीसुद्धा वेळ दिला नाही’ अशी उद्या तुम्हीच तक्रार कराल.’’

‘‘.. आहे खरं तसं, पण तूच सांग, मुलांचं असं वागणं बरोबर आहे का? आम्ही काही चुकीचं थोडंच सांगतो? मुलांच्या भल्यासाठीच सांगतो ना?’’

‘‘बरोबर की चूक? मध्ये उत्तर शोधलं तर काहीच हाती लागत नाही गं विशाखा. मुलांचं वागणं चुकतंय हे समजा मला किंवा कुणालाही मान्य असल्यामुळे ते बदलेल? की तुझी चिडचिड थांबेल?’’

‘‘म्हणजे त्यांनी कसंही वागायचं आणि आम्ही चिडायचं पण नाही?’’

‘‘चिडण्यामुळे हवा तो परिणाम मिळत असेल तर चिडावं कधीमधी. पण त्यातून मनस्ताप आणि वादावादीच होत असेल तर तिथला ‘इश्यू’ नव्यानं तपासायला हवा. तुम्हाला त्रास देण्यासाठी मुलं मुद्दाम अशी वागतात का?’’

‘‘अंऽ, मुद्दाम नसेल, ती त्यांच्याच नादात असतात हे जास्त खरं.’’

‘‘हे माहितीय तरीही ‘एवढा’ राग?’’

‘‘हजारदा सांगूनही आर्यानं दुर्लक्ष केलं की संताप होतो. घरातलं काहीच कसं करावंसं वाटत नाही तिला? या वयात मी आईला किती मदत करायचे. घर नीटनेटकं ठेवायचे. उद्या हिच्या सासरचे माझाच उद्धार करणार.’’

‘‘अगं, किती काळ एकत्र मिसळतेयस तू! ‘आमच्या लहानपणी..’ म्हणजे भूतकाळ आणि ‘आर्याच्या सासरचे’ म्हणजे भविष्यकाळ. असा गोंधळ केल्याने चिडचिड वाढते, मुद्दा सुटतो.’’

‘‘??’’

‘‘असं बघ, तू तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं वागून सगळ्यांचं कौतुक मिळवलंस तसंच आज्ञाधारक, गुणी वागणं तुला बरोबर वाटतं. मुलं त्याकडे दुर्लक्ष करतात, बिनधास्त राहतात, म्हणजे काही तरी चुकतंय, त्यांच्यात काही तरी कमी आहे असं वाटतं ना? मुलं बिघडली, आयुष्यात मागे पडली तर? उद्या ‘लोक’ काय म्हणतील? अशा असंख्य भीती छळतात. मग समजुतीनं घेणं सुटून मुलांवर फटकन टीका करणं घडतं.’’

‘‘म्हणजे आमच्या अपेक्षा चुकीच्या..’’

‘‘नाही, अपेक्षा तशाच्या तशा पूर्ण झाल्या नाहीत तर होणारी अतिरेकी चिडचिड, त्यातच अडकून राहणं आणि मुलांना पुन:पुन्हा तेच सांगत राहणं यात गडबड आहे विशाखा. अपेक्षा मुलांच्याही असतात. या पिढीच्या स्वातंत्र्य, मोकळेपणा, स्मार्टनेसच्या कल्पना वेगळ्या आहेत. त्यांचं जगही आपल्यापेक्षा वेगळं असणार आहे. मोबाइल-इंटरनेटमध्ये त्यांचा भविष्यकाळ आहे. स्वयंपाक येणं, नीटनेटकेपणा हे गुण हवेतच, पण त्या कौतुकापेक्षा नवनवी अ‍ॅप्स शोधून वापरणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. पालकांच्या सक्तीमुळे त्यापासून दूर राहावं लागलं तर ग्रुपमध्ये ती मागास ठरतात, मित्र हसतात त्यांना. या वयात ग्रुपमध्ये ‘भारी’ दिसणं फार महत्त्वाचं असतं. तिथे चेष्टा, अपमान चालत नाही. मग अशा ‘नियंत्रक’ पालकांबद्दल मुलांचाही आदर कमी होतो. तीही फटकन उलटून बोलतात.

‘‘हो, आर्याला काही सांगताना, ‘ती नाहीच ऐकणार’ अशी एक खात्री असते मला. त्या वेळी खूप अगतिक, दुर्लक्षित वाटतं.’’

‘‘हो, पण तू तिची आई. वयाने, अधिकाराने मोठी. त्यामुळे लगेच ‘कशी करत नाही तेच पाहते’पर्यंत पोहोचतेस. तुझ्या आवाजातली हुकूमत, अविश्वास, आर्याला जाणवल्यावर, ‘आता नाहीच ऐकणार’ ही तिचीही ताठर प्रतिक्रिया येते आणि तुमचं युद्ध सुरू.’’

‘‘अगदी असंच घडतं. पण हे बदलायचं कसं?’’

‘‘अशा वेळी मुलांना काय वाटत असेल?’’

‘‘आर्या म्हणतेच की, आमचं तुम्हाला काहीच पटत नाही. वाचलं नाही, तरी रागावणार, मोबाइलवर अभ्यासाचं वाचत असले, तरी ऑनलाइन का वाचतेस? रात्री जागून असाइनमेंट पूर्ण केली तर सकाळी लवकर का उठत नाहीस? मित्र-मैत्रिणी उनाड आहेत..’’

‘‘आदित्यही कुरकुरतो, की ‘मी कितीही अभ्यास केला तरी बाबा तुम्ही माझ्या फुटबॉल मॅचला येतसुद्धा नाही’ म्हणून.’’

‘‘विशाखा, तुला जिमला जायला आवडत नव्हतं. मी चार-पाचदा विचारल्यावर एकदा वैतागून सांगितलंस, ‘मला बोअर होतं जिम.’ माझा हेतू तुझ्या भल्याचाच होता ना?’’

‘‘माझं वेगळं आणि आता जिमला येतेय ना मी?’’

‘‘रागावू नकोस पण न्याय सर्वाना सारखा हवा. तुला दुखवायचं नव्हतं, पण मुलांना कसं वाटत असेल त्याची ‘जाणीव’ होण्यासाठी आठवण दिली. आपण जिमला जायला पाहिजे हे तुलाही कळत होतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य नव्हतं. वजनकाटय़ानं ‘जाणीव’ जागी केल्यावर तुझं प्राधान्य बदललं, नंतर आवडायलाही लागलं. मुलांचंही तसंच होतं. अभ्यास करायला पाहिजे हे आदित्यला कळतं, पण त्याची आवड आणि प्राधान्य खेळ आहे. आर्याला तुला मदत करण्याची इच्छा असते पण तिच्या वयाला तर फारच आकर्षणं असतात. अशा वेळी, मुलांमध्ये जी मूल्यं रुजवायला हवीत, त्याबद्दलची ‘जाणीव’ जागी करण्यावर फोकस हवा. ‘तुम्ही कसे चुकता’वर फोकस जाऊन मुलं ‘टार्गेट’ होतात, दुखावतात. मग बिघडतं सगळं. प्रत्येक गोष्टीवर वारंवार टीकाच झाली की आर्यासारखी बंडखोर मुलं भांडतात, काहीच ऐकेनाशी होतात. आदित्यसारखी साधी सरळ मुलं त्यांच्या फुटबॉलसारख्या कौशल्यालाही कमी लेखलं गेलं की हिरमुसतात, आत्मविश्वास संपतो.’’

‘‘पण म्हणजे वागायचं कसं मानसी?’’

‘‘प्रत्येक प्रसंगात कसं वागायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं. पण बदल हवा जुन्या अपेक्षा आणि अप्रोचमध्ये. संवाद, सन्मान, स्पेस आणि सोबत या चार गोष्टींकडे नव्याने पाहायला हवं. मुलांना आपली सोबत हवी, आधार हवा, पण मध्येमध्ये करून ‘आमचंच बरोबर’चा अतिरेकी आग्रह टाळायचा. त्यांच्या आवडी, अभ्यासाच्या, जगण्याच्या पद्धती त्यांनी  अनुभवातून, प्रयोगातून ठरवण्यासाठी ‘स्पेस’ द्यायची. ती त्यांचा रस्ता शोधतील, यावर विश्वास ठेवायचा. कारण विश्वासासारखी मूल्यं आणि संस्कार वागण्यातून रुजवावे लागतात. मुलांकडून गंभीर चुका होऊ  नयेत एवढं लक्ष अवश्य ठेवायचं.’’

‘‘तारेवरची कसरतच आहे.’’

‘‘सवयीनं जमतं रे आणि हो, बहुतेक मुलांना अभ्यास आणि बंधनं आवडत नाहीत हे जागतिक सत्य आहे. त्याबाबत काल्पनिक आदर्शवादात पालकांनी अडकायचं नाही. तरच पालकांशी संवाद करायला मुलांना मोकळेपणा वाटतो.’’

‘‘आणि चांगल्या सवयी?’’

‘‘मुलांच्या आवडींचा थोडा जरी स्वीकार झाला तरी मुलं पालकांचं ऐकण्याच्या मानसिकतेत येतात. तेव्हा योग्य वेळी, मुलांचा पसारा, आळशीपणा, शिस्त, इलेक्ट्रॉनिक गॅजेटसच्या अतिरेकातले धोके या जिव्हाळ्याच्या विषयांबाबत थोडक्यात, नेमका संवाद परिणामकारक होऊ  शकतो.’’

‘‘हं. पचायला अवघड आहे, पण प्रयत्न करून पाहू. नाही तरी असंही आमच्या पद्धतीनं काही बदलत नाहीये. आता तरी मुलांची चिंता सोडून आम्ही सुट्टी एन्जॉय करतो.’’ असं म्हणून हसत विशाखा आणि मनोज भटकायला बाहेर पडले.


प्रगत शाळा 25 निकष

📕 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 📕

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

शैक्षणिक आत्मभान

शैक्षणिक आत्मभान

गेल्या दोन दशकांत देशातील मुस्लीम समाजात काही महत्त्वाचे बदल होत आहेत

फरीदा लांबे | September 17, 2016 1:16 AM



‘‘वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक- सामाजिक स्थितीतल्या फरकातूनच मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली आणि शिक्षणाचं प्रमाण वाढू लागलं. ग्रामीण व शहरी भागात मुस्लीम मुलींमध्ये शिक्षणामुळे एक आत्मनिर्भता निर्माण झाली आहे. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले आहे.’’ मुस्लीम समाजातील बदलत्या शैक्षणिक आत्मभानाविषयी.

फरीदा लांबे यांनी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सच्चर समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय मुंबईतील ‘निर्मला निकेतन’ महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या, ‘प्रथम’ या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरलेल्या संस्थेच्या सहसंस्थापक अशीही त्यांची ओळख आहे. सुमारे २५ वर्षांचा शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव त्यांच्याकडे असून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय सल्लागार समिती आदी अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सरकारी समित्यांवरही त्यांनी काम केले आहे.

गेल्या दोन दशकांत देशातील मुस्लीम समाजात काही महत्त्वाचे बदल होत आहेत आणि ते बदल प्रत्येक ठिकाणी वेगळे आहेत. त्याचे कारण देशभरातील मुस्लीम समाज हा विविध राज्यांत विखुरलेला आहे. उदाहरण घ्यायचे झाल्यास उत्तर प्रदेशमधील मुस्लीम समाज आणि केरळातील मुस्लीम समाज यांच्या स्थितीत नक्कीच फरक आहे. त्या त्या राज्यातल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रक्रियांचे परिणाम तिथल्या मुस्लीम समाजावर झाल्याने प्रत्येक राज्यांतील मुस्लीम समाजाची स्थिती वेगळी आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाकडे पाहिले तर आपल्या असे लक्षात येते की इथला मुस्लीम समाज हा तसा मुख्य प्रवाहात आलेला आहे. सांस्कृतिकदृष्टय़ा महाराष्ट्रातील मुस्लीम समाज हा पूर्वीपासूनच इथल्या संस्कृतीशी तादात्म्य पावलेला आहे.

मी स्वत: रत्नागिरीतील एका मुस्लीम कुटुंबातील. त्यामुळे मला स्वत:ला जशी उर्दू भाषा बोलता येते तशीच कोंकणी आणि मराठीही येते. माझे वडील महाराष्ट्र शासनात सचिव पदावर कार्यरत होते. आमच्या घरी सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते. वडिलांचा तर आग्रहच होता की आम्ही सर्व भावंडांनी सरकारी शाळांमध्ये शिकावे. साहजिकच आमचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत झाले. मला स्वत:ला अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही गती होती. हॉकी वगैरे खेळांत मी हिरिरीने सहभागी होत असे. आमच्या ओळखीतल्या काहींना हे फारसे रुचत नसे. पण घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहन अन् पाठिंब्यामुळे ते चालू ठेवण्यात आडकाठी आलीच नाही. मुख्य म्हणजे घरून पाठिंबा मिळाला म्हणून मी हे करू शकले याचा अर्थ इतरही मुलींना जर घरून पाठिंबा मिळाला तर त्या या गोष्टी करू शकतील. ही एक गोष्ट आणि दुसरी म्हणजे, ‘तू मुस्लिमांसारखी दिसत नाहीस.’ असं अगदी शाळेपासून मी आत्ताही कधी कधी हे वाक्य ऐकते तेव्हा ते खटकतं. मुस्लिमांसारखी म्हणजे काय नेमकं? मुस्लीम म्हणजे जी काही ठरावीक प्रतिमा डोळ्यासमोर येते तीच त्यांना अभिप्रेत असते का? अगदी आजही? पण या काही गोष्टी सोडल्यास मुस्लीम असण्याचे फारसे वेगळे अनुभव वाटय़ाला आले नाहीत किंवा आपण मुस्लीम असल्यामुळे  इतरांचे आपल्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले असेही झाले नाही.

परंतु ही सर्व परिस्थिती थोडी बदललेली दिसली ती मुंबईतील १९९३च्या दंगलींनंतर. या दंगलींनंतर हिंदू- मुस्लीम दोन्ही समाजांत आपापल्या अस्मिता जपण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. दोन्ही बाजू  घेटोइझमकडे वळल्या. आपापले गट होत गेले. त्यातच त्यांना सुरक्षितता जाणवू लागली. याच काळात अल्पसंख्याकांकडे देशभक्तीचे पुरावे मागितले जाऊ लागले. अशा गोष्टींचा तर मला फार राग येत असे. मुस्लीम समाज मुख्य प्रवाहापासून बाजूला पडतो की काय अशी स्थिती जाणवू लागली. याचे कारण मुस्लिमांकडे स्वत:चे सामाजिक नेते नाहीत. इमाम, मौलवी हे त्यांचे सामाजिक नेते नाही होऊ शकत. ही कमतरता तर त्यांच्यात होतीच, परंतु याबरोबरच वेगवेगळ्या राज्यांतील मुस्लिमांच्या आर्थिक-सामाजिक स्थितीतही बराच मोठा फरक होता. (आजही काही प्रमाणात तो आहेच.) या फरकाबद्दलच मुस्लीम समाजात खंत होती. त्याचा सकारात्मक परिणाम मात्र असा झाला की, मुस्लीम समाजाला स्वत:च्या उन्नतीसाठी शिक्षण घेण्याची आवश्यकता ध्यानात आली. मुस्लीम समाजात आपल्या राजकीय- सामाजिक स्थितीबद्दल जागरूकता वाढू लागली. त्यातून शिक्षण घेण्याकडे मुस्लीम समाजाने लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे मागच्या दोनेक दशकांत चित्र निर्माण झाले. पुढे मुस्लीम समाजातील मुलीही शिक्षणाकडे वळल्याचे याच काळात दिसू लागले.

मी स्वत: सच्चर समिती, रहमान समिती आदी मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करणाऱ्या समित्यांची सदस्य होते. या अभ्यासांतून पुढे आलेला महत्त्वाचा निष्कर्ष मुस्लीम समाजातील शिक्षणाच्या स्थितीबद्दलचा होता. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लीम समाजातील मुले-मुली सरकारी नोकरीत फारशी दिसत नाहीत. कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम समाजाचा ओढा असल्याचेही अनेक अभ्यासांतून पुढे आले आहे. अशा परिस्थितीत मुलींचे शिक्षणातील प्रमाण फारच कमी असले तर आश्चर्य वाटायला नको. आठ -दहा वर्षांपूर्वीपर्यंत ही स्थिती प्रकर्षांने जाणवे. समजा, १०० मुली इयत्ता पहिलीमध्ये शिकत असतील, तर त्यातील अध्र्याहून कमी मुली माध्यमिक शिक्षणाकडे वळायच्या, अशी आधीची परिस्थिती होती. विद्यापीठ पातळीवरील शिक्षणात तर मुस्लीम मुलींचे प्रमाण फारच नगण्य होते. पण मागच्या काही वर्षांत यात अधिक वेगाने बदल होऊ लागला. आता ही स्थिती राहिलेली नाही. मुली शिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर उच्च शिक्षण घेण्यापर्यंत मुलींची प्रगती झाली आहे. सरकारच्याच एका अहवालानुसार मुलींपेक्षा मुलांचं उच्चशिक्षणातील गळतीचं प्रमाण अधिक आहे. पालकही मुलींना शाळेत पाठवू लागले आहेत. त्यांनाही आपल्या मुलींनी शिकावे असे वाटू लागले आहे. १०वी, १२ वीनंतर मुलांना नोकरी- व्यवसायासाठी शिक्षण थांबवावे लागते. परंतु पालक मुलींचे शिक्षण सुरूच ठेवतात. शाळा, महाविद्यालये ही मुलींसाठी अधिक सुरक्षित आहेत, अशी या पालकांची भावना आहे. सरकारी पातळीवरही सर्व शिक्षा अभियान, उपस्थिती भत्ता यांसारख्या योजनांमुळे मुलींचे शालेय शिक्षणातील प्रमाण वाढले आहे.

मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षणातही काही विशेष लक्षणे दिसतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी घेण्याकडे कल आहे. यातील काही मुली आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही देऊ लागल्या आहेत. परंतु हे प्रमाण तसे कमी आहे. फॅशन, टेक्सटाईलसारख्या क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण अथवा कौशल्याधारित शिक्षणाकडे मुस्लीम मुलींचा ओघ असल्याचे मात्र प्रकर्षांने दिसून येते. ग्रामीण भागातील मुस्लीम मुलींच्या शिक्षणात एक महत्त्वाची बाब म्हणजे, शिक्षणाचा अधिकार हा कायदा झाल्याने आठवीपर्यंतच्या शिक्षणात मुस्लीम मुलींचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. परंतु आठवीनंतरचे शिक्षण देणाऱ्या माध्यमिक शाळांची संख्या आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक गावात माध्यमिक शाळा नसल्याने आठवीनंतर या मुलींना शिक्षणासाठी लांबच्या गावात जा-ये करावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागात आठवीनंतर पुढील शिक्षणात मुलींची गळती होते. इच्छा असूनही केवळ शाळांच्या अनुपलब्धतेमुळे शिकता येत नाही अशी स्थिती आहे. यावर उपाययोजना झाल्यास ग्रामीण भागातही मुलींचे उच्च शिक्षणापर्यंत जाण्याचे प्रमाण वाढेल. शहरी भागात शालेय शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण घेण्याकडेही मुस्लीम मुलींचे प्रमाण दखल घेण्याजोगे झाले आहे.

फक्त या मुलींना शिक्षणानंतर नोकरीही मिळणे आवश्यक आहे. मुस्लीम समाजाच्या मुलींनी नोकरी करण्याच्या दृष्टीने काही विशिष्ट धारणा आहेत. मुलींनी नोकरी करण्याकडे कुटुंबीयांचा सहसा कल नसतो. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या मुस्लीम कुटुंबात मुलीही नोकरी करताना दिसतात. या मुलींनी बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्यास पालकांची सहसा ना नसते. मुलींनी सुरक्षित ठिकाणी नोकरी करावी, अशी पालकांची भूमिका असते. त्यामुळे अनेक मुली शिक्षणाबरोबरच काही कौशल्ये आत्मसात करून त्यावर आधारित घरगुती व्यवसाय करताना दिसतात. आम्ही ‘प्रथम’ संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रांत काम करताना शिक्षण आणि त्यावर आधारित उपजीविका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. यात आमचे काम वस्ती पातळीवर सुरू असल्याने विविध वस्त्यांमधील बालवाडींमध्ये तिथल्या माध्यमिक शिक्षण घेतलेल्या मुस्लीम मुलींना शिक्षिकेची जबाबदारी किंवा वस्ती पातळीवरील संस्थेच्या कार्यक्रमांसाठी वस्ती समन्वयक म्हणून काम सोपवतो. अनेक मुस्लीम पालक आमच्या कामात आपल्या मुलींना पाठवण्यास अनुकूलता दाखवतात.

शिक्षण घेतलेल्या व नोकरी-व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. संवाद माध्यमांच्या सहज वापरातून जगभरची माहिती त्यांच्या हाती येऊ लागली आहे. त्याचेही सकारात्मक परिणाम या मुलींवर होऊ लागले आहेत. आपले चांगले-वाईट त्यांना कळू लागले आहे. स्वत:च्या आयुष्याविषयी निर्णय घेण्यास त्या समर्थ होऊ लागल्या आहेत. शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, ग्रामीण व शहरी अशा दोन्ही ठिकाणी मुस्लीम मुलींच्या लग्नाच्या सरासरी वयातही वाढ झाली आहे. शिक्षणामुळे त्यांच्यात एक आत्मनिर्भरता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता त्या बोलू लागल्या आहेत. धार्मिक व वैयक्तिक पातळीवरील अनेक बाबींविषयी त्या कुटुंबात

आपले मत ठामपणे व्यक्त करू लागल्या

आहेत. शिक्षणामुळेच त्यांना हे बळ प्राप्त झाले

आहे. कुटुंबीयांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले तर या मुली शिक्षणात चांगली कामगिरी करत आहेत. हे प्रमाण आता वाढू लागले आहे हे निश्चित.

आता गरज आहे ती तसेच वाढते ठेवण्याची व त्याला दिशा देण्याची!

द्वेष

द्वेष

‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे

डॉ. केतकी गद्रे | September 18, 2016 1:01 AM



‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे; किंबहुना अनिवार्यच! कल्पनाविलासात रमलो की आपल्यातील बहुतांश लोकांना असेच वाटते की, मानवी जीवन हे प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, विश्वास, आशा, कृतज्ञता या व अशा सकारात्मक भावनांनी भरलेलं असावं. या सकारात्मक भावनांमुळे किंवा तीव्रतेमुळे कदाचित आपण नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्यास अधिक कचरतो, भितो. भीती हीसुद्धा एक ‘भावना’च आहे, परंतु अशीही एक भावना आहे जिला सगळेजण घाबरतात. ती म्हणजे ‘द्वेष’. फारसे न रुचणारे- नावडते-  न पटणारे- तिरस्कारास पात्र ठरणारे- दुस्वास  आणि अखेर द्वेष.. हे द्वेषापर्यंत पोहोचतानाचे काही टप्पे. पण बऱ्याचदा या टप्प्यांची जाणीव न होता, त्यांना थारा न देता, द्वेषाची ही सौम्य रुपांकडे लक्ष न देता आपण द्वेषयात्रेस निघतो. परंतु हाच द्वेष जेव्हा एखाद्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणासंबंधी दर्शवला जातो, तेव्हा द्वेष सकारात्मक रूप धारण करतो. म्हणण्याचा अर्थ असा की, उदाहरणार्थ- ‘I hate a particular person, caste, religion’ (म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचा, धर्माचा, पंथाचा, जातीचा द्वेष करतो) हे म्हणणे जसे तीक्ष्ण, घातक आणि ऐकण्यास,अनुभवण्यास नकोसे वाटणारेतसेच, ‘I hate unjust, abusive tendencies’ (अन्याय आणि शोषण करणाऱ्या प्रवृत्तींविषयी मला द्वेष वाटतो) याचे समर्थन होऊ शकते. द्वेषाची ही भावना इतरांप्रति किंवा स्वत:प्रति प्रदर्शित होऊ शकते. यात इतरांप्रति, स्वत:प्रति, एखाद्या गोष्टीप्रति, कल्पना -संकल्पनेविषयी किंवा एखाद्या विशिष्ट वर्तनाविषयी एक प्रकारची तीव्र, खोलवर रुजलेली, टोकाची अप्रीती व घृणा असते. ‘द्वेष’ हा बऱ्याचदा ‘राग’, ‘हिंसा’, ‘तिटकारा’, ‘किळस’ अशा भावना- वर्तनांशी संबंधित असतो. ‘द्वेष’ ही भावना अनेकांमध्ये दीर्घकाळ रुजणारी असल्याकारणाने मानसोपचारतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ती एका घटकेची भावनिक स्थिती नसून, ती एक प्रकारची वृत्ती आहे. ती एक प्रकारची मनोरचना आहे. कदाचित, साध्या ‘नावडी’पासून सुरू झालेल्या  द्वेषाच्या या प्रवासाला स्वैररीत्या वाढू दिल्याने, त्याला खतपाणी घातल्याने, वेळीच आळा न घातल्यान त्याचे रानटी रोपटे आपले भाव-वर्तनाचे विश्व व्यापून टाकत असावे. इतकंच नव्हे, तर मेंदूच्या चाचण्यांमधून नावडत्या व्यक्तींचे चेहरे पाहून होणारी मेंदूची हालचाल अभ्यासली गेली, तेव्हा मेंदूतील काही विशिष्ट स्थानं कार्यरत असल्याचे लक्षात आले. द्वेष हे ‘गुन्हा’ करण्यामागचं एक मोठं कारण समजलं जातं. बऱ्याचदा ‘आपण’ आणि ‘ते’/ ‘इतर’ असे विभाजन झाले की एकमेकांविषयी असहिष्णुता निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणजे ‘आपण’, ‘आपल्यातील लोक’, ‘आपल्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन हे आपल्याला आपलेसे व श्रेष्ठ वाटतात. ज्या क्षणी ‘ते’, ‘त्यांचे’ लोक, ‘त्या’ लोकांचे मत, म्हणणे, मूल्य, दृष्टिकोन अशी विभागणी झाली की एक अदृश्य भिंत तयार होताना दिसते. विभाजन टिकवून ठेवणारी, भेदभावाचा पुरस्कार करणारी ही विशाल भिंत म्हणजेच आपण आपल्या मानलेल्या लोकांसारखा जो नाही, जो भिन्न आहे, तो द्वेषास पात्र  आहे असे मानणे. याचे मुख्य कारण म्हणजे, ही भिन्नता विविधतेच्या दुर्बिणीतून न पाहता उच्च-नीच या मापदंडातून पाहिली जाते. परिणामी विविधता स्वीकारण्यात आपण असमर्थ ठरतो, हे कटू सत्य आहे. म्हणजे प्रथम एखाद्या व्यक्तीबद्दल ‘ऐकिवातल्या’ मताप्रमाणे ग्रह करून घेणे, तो ग्रह ग्रा आहे हा ठाम विश्वास असणे; तसेच त्या ग्रहाला बळ देणारी बाजू उचलून धरणे आणि ग्रहाला छेद देणारी बाब दुर्लक्षित करणे- ही प्रक्रिया वारंवार करत राहणे. तसेच काही काळाने आपोआप (सवयीमुळे) घडणे आणि (नकारात्मक) ग्रह पक्का होत जाणे आणि कालांतराने अशीच वर्तनशैली बनणे ही विचारांची साखळी द्वेष वाटण्याच्या, वाटत राहण्याच्या संदर्भात आपला कार्यभाग जबाबदारीने सांभाळते. मग अशा व्यक्तीने केलेली वक्तव्ये, घेतलेल्या भूमिका, मांडलेली मतं, धरलेले आग्रह हे किती तीव्र, नकारात्मक असतील, याचा आपल्याला सहज अंदाज बांधता येईल. अशी  व्यक्ती जर ही मानसिकता समाजात रुजवू लागली तर  नातेसंबंध, त्यातील विश्वास, त्यातील सहिष्णुता, त्यातील स्वातंत्र्य यांची राखरांगोळी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडणारे, दुफळी निर्माण करून वातावरण धगधगतं ठेवू पाहणारे, थोडक्यात द्वेषाचे पुरस्कर्ते आपल्या आजूबाजूस बरेच पाहायला मिळतात. लोक त्यांच्या आहारीही जाताना दिसतात. कधी दबावामुळे, कधी सक्तीने, कधी स्वेच्छेने, कधी समविचाराने, तर कधी अजाणतेपणाने, अविवेकामुळे तर कधी निव्वळ मूर्खपणामुळे द्वेष ही भावना मानवाला स्वस्थ बसू देत नाही. ही भावना मग मनाचे स्थैर्य हिरावून नेते. द्वेष म्हणजे आदराचा अभाव. द्वेष भावना मनात जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुकांच्या प्रतीक्षेत असते. द्वेषभावनेच्या अंमलामुळे कोणावरही विश्वास ठेवणे अशा व्यक्तींना जड जाते. आणि त्यामुळे नातेसंबंधांच्या यशाबाबतीत यांची पाटी कोरीच राहते. ‘‘कोणाचाही द्वेष करू नये’’ हे या सर्वावरचं स्वाभाविक आणि सोपं उत्तर नाही का? पण म्हणणं जितकं सोपं, आचरणात आणणं तितकंच कठीण असतं.

धर्मग्रंथांनी द्वेष या भावनेला तुच्छ मानलं आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु ‘धर्म’ जाणणाऱ्या, जोपासणाऱ्या तथाकथित व्यक्तींना या बोधाचा नेमका विसर पडताना दिसला की नवल वाटतं. परंतु हेही खरं की, आपल्या मनाशी ठरवून जोपासलेला सहेतुक द्वेष, कोणाच्यातरी चिथावणीमुळे उत्पन्न झालेली द्वेषाची भावना याला आळा घालणे, हे स्वाभाविक उत्पन्न होणाऱ्या द्वेषाच्या भावनेपेक्षा कठीण आहे. म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं हे गाढ झोपलेल्यापेक्षा कठीण, तसंच द्वेष या भावनेविषयी आहे. कोणाचाही द्वेष करू नका, हा विचार स्तुत्य आहे, परंतु ते एक ध्येय म्हणून गाठणे तितकेच कठीण आहे. हे ध्येय गाठणे मोठय़ा धैर्याचे काम आहे. परंतु हे ध्येय  जो गाठतो तो आपले जीवन प्रफुल्लित करण्याची क्षमता स्वत:मध्ये बाळगतो. हे ध्येय गाठण्याची प्रक्रिया वरकरणी कॉमन सेन्सची गोष्ट वाटेल. आहेसुद्धा.  पण ती, ते ध्येय गाठण्याचे टप्पे व्यक्तिमत्त्वावर आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत.

सुरुवात द्वेष-केंद्र ओळखण्यापासून करू या. म्हणजे आपली ही भावना कोणत्या गोष्टीमुळे, व्यक्तीमुळे, घटनेमुळे, परिस्थितीमुळे, काय घडले वा न घडल्यामुळे उत्पन्न होते, याचा अंदाज घेऊ या. यांचे वर्गीकरण करू या. म्हणजे आधी चर्चिल्याप्रमाणे भावनिक तीव्रता लक्षात ठेवून मग वर्गीकरण करू या. उदा. एखादी गोष्ट मला रुचत नाही की आवडत नाही, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो.. म्हणजे दुस्वास की द्वेष वाटतो याची वर्गवारी केल्यास (विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे, प्रगल्भतेने केल्यास) द्वेषाची केंद्रे लक्षात येतील. हे वर्गीकरण महत्त्वाचं, कारण त्या तीव्रतेच्या अमलाप्रमाणेच त्याची उपचारपद्धती ठरते. यानंतर द्वेषाची भावना निर्माण होण्यामागचे नेमके कारण शोधावे. हे कारण काही ऐकिवातल्या तर काही प्रत्यक्षातल्या अनुभवांत दडलेले आहे का ते पाहावे. द्वेषभावना अभंग राखल्याने, मला स्वत:ला, आजूबाजूच्या व्यक्तींना, कुटुंबाला, समाजाला काय प्रकारच्या आव्हानांना, परिणामांना तोंड द्यावे लागत आहे? ही भावना जोपासून माझा (वरकरणी) फायदा झाला असला, तरी मी त्याला खऱ्याअर्थी फायदा म्हणू शकेन का? लाभ घेण्याच्या अट्टहासात एकीकडे काय गमावलं याचाही आलेख मांडलेला बरा. हा पारदर्शक आलेखच पुढे निर्माण होणाऱ्या (संभाव्य) द्वेषाच्या भावनेला उत्तेजन देण्यापूर्वी आपल्यापुढे, फी िर्रॠल्लं’ च्या  रूपात उभा राहील. या प्रक्रियेत, या प्रक्रियेवर अविश्वास असणाऱ्या व्यक्ती आपले पाय खेचतील, आपल्या पूर्वीच्या वचनांचा.. तथाकथित सिद्धान्तांचा, समूह-निष्ठेचा वगैरे दाखला देतील. याने आपण विचलित होऊ शकू. परंतु हे कायम लक्षात ठेवा की, आपल्या मानसिकतेचे नियंत्रण हे (जवळजवळ) नेहमी / बऱ्याचदा आपल्या अखत्यारीत असू  शकते आणि इतरांचा त्यावर प्रभाव व्हावा की न व्हावा, झालाच तर कितपत व्हावा, हे ठरवणे हेही बऱ्याच अंशी आपल्या हातात असते. परंतु आपण वाहवत जातो आणि आपल्या मनाला अंकित ठेवण्याचा हा मोठा अधिकार गमावून बसतो. हे कटाक्षाने टाळू या. या बाबीची सतत उजळणी केल्यास, ही बाब जास्त स्मरणात राहील आणि प्रत्यक्ष वर्तनात उतरेल.

द्वेषाने द्वेषच मिळतो, द्वेष वाढतो, वाढतच जातो, या वणव्याला वेळीच आळा घातला नाही, तर ही आग, आपल्या विचार – आचार – भावनांच्या डोलाऱ्याला राखेचं स्वरूप देण्यास वेळ लागणार नाही. द्वेष करणारी व्यक्ती काही काळ आपल्या आत्मविश्वासपूर्ण शब्द – विचार – वर्तनांनी लोकांना भुरळ घालू शकते. परंतु सुज्ञपणे विचार करणाऱ्या, प्रगल्भ आचार आणि सूक्ष्म दृष्टिकोन जोपासणाऱ्या व्यक्तीला हे अधिक काळ रुचणार नाही. त्यामुळे आता स्वत:ला कोणत्या साच्यात घालायचे आहे हे आपणच ठरवायचे आहे, नाही का? द्वेषभावना जोपासून स्वत:पासून, इतरांपासून दूर जायचे की सशक्त आणि स्वीकाराची मानसिकता बहरवण्याच्या प्रयत्नात राहावं हे वेळीच ठरवू. आपण स्वत:ला समाजाचा महत्त्वाचा घटक म्हणवत असू, तर तो घटक सहिष्णु आणि जबाबदार असणं अपेक्षित आहे- नीतिमत्तेच्या मापदंडांनी आणि सांविधानिकदृष्टय़ासुद्धा! त्यामुळे या सार्थ अपेक्षेस पोषक आणि साजेशा भावनांचा गुच्छ उराशी-दाराशी बाळगलेला बरा!

डॉ. केतकी गद्रे –

Friday, September 16, 2016

उल्कापाषाण

अर्जेटिनातील कॅम्पो डेल सिएलो येथे जगातील आतापर्यंतचा दुसरा मोठा उल्कापाषाण उत्खननात सापडला आहे. वैश्विक कचऱ्याचा तीस टनांचा भार यात समाविष्ट आहे. तो जगातील दुसरा मोठा उल्कापाषाण आहे. विशेष म्हणजे हा उल्कापाषाण अखंड आहे. कॅम्पो डेल सिएलो या ब्युनोस आयर्सच्या उत्तरेला असलेल्या भागात सापडलेला हा उल्कापाषाण मोठा असून, त्यामुळे २६ विवरे तयार झाली आहेत. ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी हा उल्कापाषाण पडला असावा. त्याची पहिली नोंद स्पॅनिश गव्हर्नरांनी १५७६ मध्ये केली असून, काही लोक लोहखनिज गोळा करीत असताना त्यांना तो त्या वेळी दिसल्याचे सांगण्यात येते. हे लोह आकाशातून पडलेले आहे असे त्यांनी म्हटले होते व स्पॅनिश अधिकाऱ्यांना उल्कापाषाण कोसळला ते ठिकाण दाखवले होते. कॅप्टन डी मिरावेल यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत काही लोहयुक्त उल्कापाषाण आणण्यात आले. त्यातील मेसॉन ड फिएरो हा सर्वात मोठा लोहयुक्त उल्कापाषाण होता. भारतीय लोकांना तो सापडला होता व स्पॅनिश लोकांपेक्षा आकाशातून लोह पडते अशी भारतीय लोकांची परंपरागत समजूत होती. या गोष्टी हजारो वर्षांपूर्वीच्या असून, कॅम्पो हा त्यातील मोठा उल्कापाषाण आहे. तेथून काही टन भाग बाहेर काढण्यात यश आले आहे. कॅम्पो डेल सिएलो उल्कांमुळे काही छोटी विवरेही तयार झाली. त्यात ७८ बाय ६५ मीटरचे विवर सर्वात मोठे आहे. १० सप्टेंबरला या उल्कापाषाणाचे उत्खनन करण्यात आले. उल्कापाषाणांचे वजन मोजण्यासाठी काही शास्त्रीय पद्धती आहेत. त्यांची खनिजरचना व कालावधीही सांगता येतो. आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा उल्कापाषाण हा होबा नावाचा असून त्याचे वजन ६० टन होते, तर तो नामिबियातील एका शेतात पडला होता. ८० हजार वर्षांपूर्वी तो जेथे पडला तेथेच तो अजून आहे. अ‍ॅस्ट्रॉनॉमी असोसिएशन ऑफ चॅको या संस्थेने अलीकडेच एक मोठा उल्कापाषाण शोधला असून, तो १९६७ मध्ये सापडलेल्या ३७ टनांच्या उल्कापाषाणापेक्षा मोठा आहे. आतापर्यंत दुसरा मोठा उल्कापाषाण कोणता याबाबत वाद आहेत. अर्जेटिनात जगातील तीन मोठय़ा उल्कापाषाणांपैकी दोन आहेत. अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल असोसिएशनचे मॅरिओ वेस्कोनी यांनी सांगितले, की उल्कापाषाणांच्या वजनाची तुलना केली जात असते. आताच्या पाषाणाचे पुन्हा वजन केले जाईल. या उल्कापाषाणाचे वजन प्राथमिक अंदाजापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Thursday, September 15, 2016

होम स्कूलिंग - शिक्षणाची नवी दिशा

होम स्कूलिंग – शिक्षणाची नवीन दिशा

मुलांचा पहिला वाढदिवस झाला की वेध लागतात शाळेचे ! आजच जग सुद्धा खूप फास्ट आहे, तेव्हा मूल स्मार्ट’च’ असायला हव.अगदी सकाळी सहा ते रात्री दहा – सगळे क्लास लावू आम्ही –त्याला सगळ यायला हव ; अभ्यास,खेळ ,डान्स ,गाण, गेलाबाजार कविता सुद्धा करता यायला हवी – किती विदारक आहे हे ? कधी स्वत:च लहानपण आठवून पाहिलं आहे ?किंवा कधी हा विचार केला आहे का ,की खरोखरच आपण जे शिकलो त्यातलं नक्की किती उपयोगाच आणि किती खर्डेघाशी होती ?
हाच विचार आम्ही केला- आणि ठरवलं मुलीला शाळेतून काढायचं ! शाळा छानच होती ,सगळ्या सुविधा ,लक्ष देणारे शिक्षक , जागतिक दर्जा – पण आम्हाला हवा होता –शिकण्यातला  मोकळेपणा !!
बरेचदा भारताबाहेर फिरताना होम-स्कूलिंग बद्दल ऐकल होत; पण तिथल्यासारखी आपल्याकडे ही पद्धती सर्वमान्य नाही ,तरीही एखाद वर्ष करून तरी बघू म्हणून ,हे शिवधनुष्य उचलल ,इथे ते मोडून चाणार नव्हत- पेलायच होत तोलायचं होत!! त्यातून आम्ही दोघही वर्किंग.तेव्हा पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला.
शाळा नाही म्हटल्यावर सुरुवातीचा सगळा वेळ टीवी बघण्यात घालवला जाऊ लागला ,पण पंधरा दिवसातच त्याचा कंटाळा ही येऊ लागला ,मग भन्नाट खेळून झाल ,मग टिवल्याबावल्या करून झाल्या –दोनेक महिन्यांनी अभ्यासाला सुरुवात झाली .
पण नेमका अभ्यास करायचा म्हणजे तरी काय ? मग शुद्धलेखन ,पाढे, पुस्तक वाचन ,वेगवेगळ्या विषयावर घरात गप्पा सुरु झाल्या. कधीतरी मुख्य प्रवाहात यावच लागल तर म्हणून शालेय पुस्तक आणून ठेवलेली SSC /CBSE/ICSE सगळीच पुस्तक घरात असायची ,जे आवडेल त्याचा अभ्यास करायचा.भाषेच कोणताही बंधन नव्हत,दोन्ही भाषांमध्ये पुस्तक आणून ठेवली होती .
खरा होम-स्कूलिंगचा धडा सुरु झाला तो – प्रवासात ! आम्ही कामानिमित्त फिरत असतो – मग वेगवेगळे प्रदेश ,तिथली वैशिष्ट्य ,त्याची ऐतिहासिक-पौराणिक पार्श्वभूमी, तिथल्या भाषा ,मातीचे प्रकार,घरांचे प्रकार ,बोलीभाषा,वेशभूषा आणि मुख्य म्हणजे तिथले प्रसिध्द असे खाण्याचे पदार्थ – भूगोल,इतिहास,भाषा विषय असेच शिकवत आहोत. वेगवेगळी राज्य ,त्यांच्या सीमा ,त्या सीमाभागातील चालीरीतींची देवाण-घेवाण ,सगळचं मनोरंजक होऊ लागलं.
आपण वयाने मोठे असलो तरी ,आईवडील म्हणून आपण मुलांच्याच वयाचे असतो ,तेव्हा आपणही शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत असतो- हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. मुलीच्या वयासोबत आमचा पण आईबाबा म्हणून त्याच वयाचा वाढदिवस असायचा. एक म्हटलं जात किंवा तसा एक गोड गैरसमज आहे ,जे आम्हाला मिळाल नाही ते मुलांना मिळायला हवं,आणि यासाठी आईवडील काहीही करायला तयार असतात. आम्ही जरा वेगळा विचार केला ,आपण किमान पक्षी एवढतरी नक्की देऊ जे आपल्याला आपल्या आईवडिलांनी दिल; हे खूप उपयोगी पडलं. आईवडील म्हणजे ’देव’ नव्हेत,आपल्यावर खूप प्रेम करणारी दोन माणस ,हा विचार आधी रुजवला.
मुळात एवढ्या चांगल्या शाळा असताना होम्स्कुलिंगच का ?घरातून-बाहेरून खूप विरोध झाला,तुमच्या भलत्या विचारांपायी तुम्ही मुलीच्या भवितव्याशी खेळताय; हे सगळ कानाआड करत आम्ही तिघेही पुढे निघालो. मुळात आपल्या पाल्याने ‘शिकायचं कसं ? ‘ एवढ आधी शिकव हा आमचा अट्टहास होता. अभ्यास आणि अभ्यासक्रम नंतर.
शिकायचं म्हणजे घोकंपट्टी किंवा भरपूर मार्क्स असली कोणतीच स्पर्धा नव्हे.एखादी गोष्ट शिकताना तिच्या मुळापर्यंत जाता यायला हवं. सगळेच विषय हे एकमेकांना धरून असतात हे दाखवून दिल.कशाला पाहिजे मराठी, किंवा इतिहास किंवा गणित ;असा नसत. उद्या मोठे होऊन इंटेरियर डिझाईनर झालात आणि मोगलकालीन डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला इतिहासाची जाण हवीच ना !अशा पद्धतीने आमचा अभ्यास पुढे पुढे सरकत गेला.
घरीच अभ्यास असल्यामुळे, ठराविक काम ह्या आठवड्यात झालं पाहिजे,असा दंडक आहे.मग तुला हव तेव्हा कर.उरलेला वेळ तिने तिच्या छंदासाठी वापरावा.कधी रेडीओ जोकी तर कधी कार्यक्रमच निवेदन अशा गोष्टी ती यातून शिकत गेली.
आईवडील म्हणून आम्हा दोघांनी यातील जबाबदा-या चक्क वाटून घेतल्या.काही विषय त्याने तर काही मी घ्यायचे.मग आम्हीच तिला विचारलं तुला कोणत्या विषयासाठी कोण हवंय ते,तू निवड. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा हीच पद्धती वापरली. तिचा बाबा सोफ्टवेर इंजिनियर असल्यामुळे,कॉम्पुटर त्याने शिकवायचा,त्याचा आकाशदर्शनाचा अभ्यास आहे,तो उत्तम गातो ,गाणी कम्पोज करतो ,त्याला पेंटिंग मधल खूप कळत, खेळ कसा बघायचा ,मूवी पाहायचा दृष्टीकोन कसा असू शकतो ;हे सगळ ती बाबाकडून शिकतेय. इतिहास ,भाषा ,कविता, नीटनेटकेपणा ,उत्तम स्वयंपाक ,बिझनेस सुरु करणे म्हणजे काय.चालवताना येणा-या अनेक अडचणी ,त्यावर मात कशी करायची ? हे सगळ आईकडून . अर्थात ह्या गोष्टी काही पुढ्यात बसवून शिकवायच्या नसतातच ;इथे मोकळेपणा उपयोगी पडला. एकत्र बसून जेवताना नानाविध विषय मिळू लागले.
बरेचदा दोघांनाही कामासाठी जावं लागत ,कोणीतरी एकजण तिला सोबत घेवून जातो. त्यातूनही नकळत ती खूप शिकली. मान-सन्मान बघण ही एक बाजू झाली; कधीकधी घ्यावा लागणारा कमीपणा,अपमान तसेच त्या कामासाठी केले गेलेले कष्ट –सगळ तिला पाहता आलं. ह्याचा फायदा म्हणून आम्ही एकमेकांचे जिवलग मित्र झालो.
आपल मूल आत्मविश्वासी असाव , ही प्रत्येक पालकाची इच्छा असते . पण हा आत्मविश्वास येतो कुठून? एखाद्या गोष्टीच संपूर्ण ज्ञान ‘आत्मविश्वास’ निर्माण करत. उथळपणाने ,नको ती स्पर्धा करत, मला कसं सगळ्यांच्या आधी उत्तर आलं –असल्या गोष्टीना जागाच शिल्लक ठेवली नाही.
आता महत्त्वाचा मुद्दा आपण शिकतो ते पोटापाण्याच्या सोयीसाठी. त्याच काय? अशा शाळेत न गेलेल्या मुलीचं भवितव्य काय ? इथे सुद्धा आपण पालक मोठी चूक करतो,खरतर आपण मुलांना पाण्यापर्यंत नेऊ शकतो,पाणी पिऊन तहान भागावण,त्यांच्या हातात आहे. आज आम्ही मुलीला वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीबद्दल नेहमी सांगत असतो. परंतु,तुला हेच करायचं आहे ,ह्यात प्रसिद्धी आहे, ह्यात पैसा आहे अश्या गोष्टी प्रकर्षाने टाळतो.
वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक वाचायला उपलब्ध करून ठेवली आहेत,तिला हवं तर तिने वाचावीत. सुरुवातीला कंटाळा यायचा ;मग तिला त्यातली मज्जा दाखवून दिली.तू टीव्ही वर पाहतेस त्या कथा कोणाच्या तरी इम्याजीन करण्याचा पार्ट आहे,तेव्हा यामध्ये तुझ्या मेंदूला चालना मिळण्याच कामच राहत नाही.उलट पुस्तक वाचनात वर्णनानुसार आपला मेंदू आपण पाहिलेल्या आणि आपण इम्याजीन केलेली चित्र डोळ्यासमोर उभी करतो ; त्यातून चालना मिळत राहते, नवनवीन सुचत जात. हे मान्य आहे की व्हिडीओमुळे गोष्ट चटकन समजते, हाच त्यातील धोका पण आहे.
अभ्यास म्हणजे फक्त पाठ्यपुस्तक असू नये यावर आमचा आजही कटाक्ष आहे.चांगली भाषा बोलता येण,काळाची गरज आहे.भाषा कोणतीही असो.शब्दांचे उच्चार ,पाठांतर ,जीभ आणि मेंदूवरील हे संस्करण अतिशय आवश्यक आहे.ही जबाबदारी मात्र माझ्या आईबाबांनी पार पडली.संस्कृत श्लोक असोत की ज्ञानेश्वर ,तुकाराम आपली ज्ञानाची परंपरा जपलीच पाहिजे. ह्यात धर्म किंवा जातीचा कोणताही संबंध नाही ,हे सुद्धा तिला नीट समजावून सांगितले.
होम स्कूलिंगचे फायदे आहेत यात शंकाच नाही;परंतु ह्यासाठी आईवडिलांना मात्र शब्दशःतारेवरची कसरत करावी लागते. एकतर होम स्कूलिंग म्हणजे चोवीस तासांची शाळाच बनून जाते,शिकत राहणे या अर्थाने.
ह्यात बरेचदा मूल सोशल होत नाहीत ,त्यांना मधली सुट्टी –डब्बा ,मित्र मैत्रिणी ह्यातील आनंद उपभोगता येत नाही –असं ब-याचजणांनी विचारलं. खरतरंआमच्या बाबतीत असा अजिबात घडलेलं नाही.उत्तम ज्ञान असल्याने ती आत्मविश्वासाने बोलते ,गल्लीभर तिचे मित्रमैत्रिणी आहे. आतापर्यंत जिथे जिथे राहिलो तेथील मित्र मैत्रिणींशी आजही ती संपर्कात आहे. माझ्या मते सोशल असण एक स्वभाव आहे. राहिला प्रश्न डब्बा आणि शाळेतल्या गमतीजमतींचा –ह्या पेक्षा तिचं ‘परिपूर्ण’ होण आम्हाला जास्त महत्त्वाच वाटल.
गेली ६/७ वर्ष तिला होम स्कूलिंग आहे.सध्या ती रूढार्थाने सातवीला आहे.पण गणितात आठवीला आणि भूगोलात सहावीला आहे.अभ्यास उमजून पुढे जायचं आहे,तेव्हा हे होणारच.
तिच्या भवितव्यात तिने जे काही व्हायचं आहे ,त्यातील सगळी स्किल्स तिच्याकडे असण;हा यामागील हेतू आहे.
गम्मत म्हणून एक उदाहरण देते,कराटे क्लासला ती जात होती,आणि ज्या दिवशी त्यांची परीक्षा होती त्या दिवशीच नेमकी आजारी पडली,अर्थात परीक्षा बुडली म्हणजे सर्टिफिकेट नाही .तेव्हा तिला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली- उद्या तुला कुणी त्रास दिला तर तू सर्टिफिकेट दाखवणार आहेस का स्किल्स ? बस्स, तेव्हापासून सर्टिफिकेटची क्रेझ आमच्यातून हद्दपार झाली.
अलीकडेच अशा पद्धतीने शिकणाऱ्या एका भारतीय मुलीची अमेरिकन MIT मध्ये निवड झाली, त्या निमित्ताने आम्हालाही आपण योग्य दिशेने जातोय ह्याची जाणीव झाली.
अलीकडे CBSE/ICSE अशा बोर्डानी होम्स्कुलरसाठी थेट दहावीची सोय केली आहे.त्यामुळे बरेच अडथळे कमी झाले आहेत.
मुळात शिक्षणाचा उद्दात हेतू ,स्वतःला काहीतरी ज्ञान प्राप्त व्हाव, त्यातून चांगल काही घडावं हाच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथपर्यंत पोहोचलो.समाजऋण अर्थात देशाची सेवा देशाचा विकास ही बीज रूजन अत्यंत आवश्यक आहे.’जरि उद्धरणी व्यय न तिचा हो साचा, हा व्यर्थ भर विद्येचा’ याप्रमाणे वाटचाल झाली तर आणखी काय हव?
अर्ध्या तपाहून जास्त सुरु असलेली आमची शाळा ,मुलीसोबत आम्हालाही आनंद देत आहे.शालेय अभ्यासक्रमाला धरून सोबतीने गाणी,चित्र,खेळ, वाचन आणि तिला आवडणा-या गोष्टीवर वेळ खर्च होतो आहे. ह्यातच समाधान आहे.
तसं पाहिलं तर प्रत्येकच पालक होम स्कूलिंग करत असतो,८ तासांची शाळा झाली की १६ तास मूल घरच्यांसोबत असतं. होम स्कूलिंग हा काही फोर्मुला नाही,ती वैयक्तिकरित्या आपल्या सोयीने आणि विचाराने करण्याचा भाग आहे.अगदी शाळा सोडूनच हे सगळ करायला हवं,असं अजिबात नाही.मुलांना आपला वेळ देऊन त्यांना त्यांच्या कलाने वाढू द्याव ,ह्या प्रक्रियेत आपणही ‘मोठे’होत जातो.मुलांना काय दिल पाहिजे तर हा चिरंतन ठेवा ,आनंदी जगण्याचा वसा द्यायला हवा
एक संस्कृत सुभाषित आहे –
 विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनम्
विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः ।
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्याविहीनः पशुः ॥

जान्हवीला घडवत असताना मी आणि ऋतुराज ही घडत गेलो,डोळ्यादेखत मूल वाढताना ,शिकताना पाहण-अनुपम्य सोहळाच तो !चला मुलांना घडवू या ,सोबतीने घडू या !!
 - नीलिमा देशपांडे

Saturday, September 10, 2016

School Portal

*सरल शाळा माहिती भरणे*

💎💎💎💎💎💎💎💎

*माहिती भरणे लवकरच सुरु होणार आहे*

*सन २०१६-१७ या साठी शाळा माहिती offline पद्धतीने भरायचे आहे*

*माहिती भरण्याचे स्टेप मी थोडक्यात सांगत आहे*

*या माहिती भरण्यासाठी आपले संगणाकात internet explorer हा browser चे वर्सन ९ किंवा त्या पेक्षा जास्त असावे*

*१)Internet explorer  open करा*

*२)होम पेज ओपन होईल त्या मध्ये उजव्या बाजूला वर setting चा symbol असेल त्या वर click करा*

*३)दिसणाऱ्या बरेच options पैकी internet option या वर click करा*

*४) या नंतर वरचे बाजूला General चे पुढे Security आहे त्या वर click करा*

५)त्या खाली custom म्हणून लिहले असेल
त्या खाली  एक box आहे त्या मद्ये right mark ✔ असेल.
त्या समोर
*Enable protected mode आहे.आता फक्त तुम्ही त्या box मध्ये असलेले right mark काढून टाका(box वर click करा box खाली होईल)*

*६)custem level या button वर click करा*

*आता Active X control and plug ins वर खालील प्रमाणे change करुन घ्या*

७)Allow. Active x filtering = *enable*

८)Allow priviosely used Active X = *enable*

९)Allow Scriptlet = *Disable*

१०) Atomatic prompting for ActiveX control = *Disable*

११)Binary and script behaviors= *Enable*

१२) Display video and animation = *Disable*

१३)Download signed Active x control= *Prompt*

१४) Download unsigned Active x control= *Prompt*

१५)Initialize and script Active X control = *Prompt*

१६) Only Allow approved domains = *Enable*

१७) Run Active X control and plug ins = *Enable*

१८) Run anti malware software on amActive X control = *Enable*


१९)  Only Allow approved domains = *Enable*


२०) Run Active x control and plug ins = *Enable*

२१)Run anti malware software in Active X control = *Enable*

२२) Run antiMalware software on Active X Control = *Enable*

२३) Script Active x control marked safe for = *Enable*

२४) *Ok या button वर  click करा, नंतर Apply या button वर click करा*

२५)  *browser बंद करुन ,परत एकदा चालु करा (Restart)*

२६) *internet explorer 9+ ने* education.maharashtra.gov.in
*वेवसाईट ओपन करा*

२७) *शाळा या button वर click करा व login व्हा*


२८) *होम tab मध्ये offline project आहे त्या वर click करा*

२९) *आपले ज्या भाषेत offline school data भरणे सोपे वाटते ते भाषा English, किंवा Marathi एका वर click करा*


३०) *Download offline data या button वर click करा*

३१) *file download करायचा का* ? विचारतो
*OK वर click करा*

३२) *आपले शाळेचा Udise code चा एक Zip file (तीन पुस्तक चिन्ह) दिसतो*

*Save या button वर click करा*


३३) *file पूर्ण download होई पर्यत वाट पाहा.*


३४) *file download झाल्यावर त्याला select करुन right click करा*


३५) *extract to udise code असतो त्या वर click करा*

३६)तुमच्या शाळेचा udise क्रमांकाच्या एक folder तयार होईल

३७) *पण file extract करण्यासाठी तुमचे संगणकात Winzip किंवा WinRAR हे software असणे आवश्यक आहे*

३७) *अता तुमच्या शाळेचा udise code असणाऱ्या folder select करुन open  करा*

*Open केल्या नंतर तिथे बरेच folder दिसेल*

३८) *आता Index.html या folder ला select करुन right click, open with, internet explorer करा*

३९)तुमच्या शाळेची माहीती भरायची offline project ओपन होईल

४०) *वेब पेज वर Allow blocked content या button वर click करा*

४१) *डाव्या बाजुचे सहा tab शाळा संबंधित आहे, व उजव्या  बाजुचे सहा tab student summery संबंधित आहे*


 ४२) *दोन्ही input format वर*
*Click करून आपली शाळेची माहिती print करुन घ्या*

४३) *School data entry प्रत्येक पेज ओपन करा,माहिती भरा सेव करा, finalize करा*

४४) *progress बार वर आपण किती माहिती भरले तपासा*

*१००% finalize झाले असेल तर prepare data for school वर click करा*

*एक नविन file तयार होईल ते file school portal login करुन upload करा*

४५) *जसे शाळा माहीती सेव finalize केले तसेच students summary data entry करा*

४६) *माहिती १००% finalize झाले तर Prepare data for student वर click करा, तयार झालेला नविन file school portal वर त्याच ठिकाणी upload करा*

४७) *लक्षात असु द्या आपण file download एक वेळ करुन upload दोन वेळ करायचा आहे*

४८) *शाळा इमारत व क्रिडांगणाच्या फोटो online upload करायचा आहे*


*हा मेसेज जतन star करुन ठेवा माहिती भरताना उपयोग होईल*

*धन्यवाद*

Tuesday, September 6, 2016

जपानमधील शिक्षण

माणसाला घडवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील नागरिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्या त्या देशातील सरकार प्रयत्न करत असते. पण सध्या जपानमधल्या एका गावात जपान रेल्वे प्रशासनाने जो निर्णय घेतला त्याचे जगभर कौतुक होत आहे. जपानमधल्या एका गावातील रेल्वे सेवा प्रवासी नसल्यामुळे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला होता. परंतु या मार्गावरील रेल्वे सेवेचा वापर शाळेत जाणारी एक मुलगी नियमितपणे करते हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले. जर ही सेवा बंद झाली तर त्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते त्यामुळे प्रवासी नसतानाही फक्त त्या मुलीसाठी जपान रेल्वेने सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
जपानमध्ये कामी शिराताकी नावाचे स्टेशन आहे. येथे प्रवासी नसल्याने या स्टेशनवरची रेल्वे सेवा थांबवण्याचा निर्णय जपान रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पण या स्टेशनवरून एक मुलगी रोज शाळेत जात असल्याने रेल्वे प्रशासनाने ही सेवा सुरू ठेवली होती. या मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून रेल्वेचे नुकसान होत असताना देखील हा निर्णय घेण्यात आला. काहीही झाले तरी या मुलीचे शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचे प्रशासनाने ठरवले. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जपानमध्ये फक्त एका प्रवाशासाठी ही ट्रेन सुरू होती. याचवर्षी या मुलीचे शिक्षण पूर्ण झाले त्यामुळे या गावातील रेल्वे सेवा आतापूर्णपणे बंद झाली आहे. जपान रेल्वे प्रशासनाने या रेल्वेची वेळ या मुलीच्या शाळेच्या वेळेप्रमाणे ठरवली होती. ती सांगेल तेव्हा ही वेळ बदलण्यात यायची. जपानमधील शिक्षणाला प्राधान्य देण्याचा या निर्णयाची गोष्ट आज इंटरनेटवर फिरत आहे. या निर्णयातून खरेच शिकण्यासारखे आहे.

Monday, September 5, 2016

साने गुरुजींची शाळा

शिक्षक दिन विशेष


साने गुरुजी ६ वर्षे शिक्षक म्हणून अमळनेर ला होते..पण त्यांनी शिक्षक म्हणून कसे काम केले याविषयी फार माहिती नसते .शिक्षकदिनानिमित्त आज लोकमत च्या रविवार पुरवणीत मी साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कोणते उपक्रम केले ?ते कसे शिकवत ?यावर लेख लिहिलाय ((शेअर करून शिक्षकापर्यंत हे पोहोचवावे


साने गुरुजींची शाळा

- हेरंब कुलकर्णी

आज  शिक्षक दिन. शिक्षकांचे शिक्षक असलेल्या साने गुरुजींनी सहा वर्षांच्या नोकरीत शिक्षक म्हणून जे प्रयोग केले त्यांची चर्चा फारशी झाली नाही. गुरुजींच्या हयातीचा अर्धशतकाचा कालखंड हा महाराष्ट्रातील शिक्षणाचा, शिक्षणविचारांचा, शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अत्यंत महत्त्वाचा प्रयोगकाळ म्हणता येईल. टिळक, अण्णासाहेब विजापूरकर, महर्षी कर्वे, र. धों. कर्वे, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख हे सारे मूलभूत प्रवृत्तीने शिक्षक व शैक्षणिक तत्त्वज्ञ होते.

साने गुरु जी अमळनेरला १९२४ ला शिक्षक झाले. त्यांचा स्वभाव संकोची होता. त्यामुळे त्यांच्याकडे शिक्षणशास्त्राची पदवी नसताना कसे शिकवणार हा प्रश्न होता. सुरुवातीला ते पाचवीला इंग्रजी व संस्कृत आणि सहावीला मराठी शिकवत. पुढे मॅट्रिकला इतिहास व मराठी शिकवत. गुरुजींचा स्वभाव शांत असूनही त्यांना वर्ग शांत करण्यासाठी फार काही करावे लागले नाही. बोलण्यात इतकी माहिती आणि जिव्हाळा असे की मुलांना त्यांचा तास संपूच नये असे वाटे. त्यांच्या बोलण्यात करुणरस असे आणि नकळत गुरु जींच्या डोळ्यात पाणी येत असे.

त्यांचे शिकवणे मुले पुढेही विसरली नाहीत. कवी दत्त यांचा शिकविलेला पाळणा आणि शेक्सपिअरच्या नाटकातला शायलॉकचा संवाद नंतर अनेक वर्षे मुले एकमेकांना सांगत असत. गुरुजींनी कवी दत्त यांचा पाळणा शिकवताना दारिद्र्यामुळे झालेल्या श्यामच्या आईच्या आशा- आकांक्षाचे उद्ध्वस्त स्मशान त्यांच्या डोळ्यांपुढे आले. गुरु जी म्हणाले की, ‘आई असणं ही मानवी जीवनातील अति महत्त्वाची घटना आहे. आईचे प्रेम तेच खरे प्रेम.’ गीत संपल्यावर गुरुजींनी आणि मुलांनी डोळे पुसले.

मधली सुटी सुरू झाली पण तरीही मुले हलली नाहीत. इतर वर्गातील मुले डोकावून बघत की हा वर्ग का सुटला नाही. ‘माझी जन्मभूमी’ ही कविता शिकवताना डोळे भरून आले. कवितेतील ‘नि:सत्त्व निर्धन तुला म्हणताती लोक’ ही ओळ त्यांनी म्हटली. डोळ्यातून अश्रू येऊ लागल्याने पुढे शिकविणेच त्यांना अशक्य झाले. पुस्तक बंद करून ते वर्गाच्या बाहेर निघून गेले.

गुरु जी शाळेत वेळ अजिबात वाया घालवत नसत. तास जेव्हा नसे तेव्हा ते थेट सरळ वाचनालयात जात. दररोज पाचपंचवीस पुस्तके आपल्या नावावर घेत असत. इतिहास हा विषय गुरुजी खूप छान शिकवत. यावेळी त्यांचा देशाभिमान, मातृभूमीवरील भक्ती उचंबळून येत असे. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त किती तरी अवांतर माहिती ते विद्यार्थ्यांना देत असत. त्यांच्या इतिहासाच्या तासाला बसता येत नाही म्हणून इतर शिक्षक त्यांचा तास दाराच्या बाहेर लपून ऐकत असत. गुरु जी जरी शिक्षणशास्त्र शिकलेले नव्हते तरी त्यांनी त्यांचे स्वत:चेच तंत्र बनविले होते. ते आजच्या भाषेत ज्ञानरचनावादी होते. मुलांना ते खूप प्रश्न विचारून सतत विचार करायला भाग पाडत असत.

वात्सल्याशिवाय आणि प्रेमाशिवाय सद्गुणसंवर्धन करणे केवळ अशक्य असते यावर गुरुजींचा भर होता. त्यांनी छात्रालयाचे काम बघायला सुरुवात करताच छात्रालयाचे अनाथपण गेले. ते मुलांना शिस्तीतून बदलवण्यापेक्षा प्रेमाने बदलवण्याचा प्रयत्न करीत. गुरु जी गोड प्रार्थनागीते म्हणून मुलांना उठवत. ‘जागिये रघुनाथ कुवर, पंछी बन बोले’ अशी गाणी म्हणत गुरु जी मुलांना उठवत. कोरडेच रुक्ष उपदेशाचे घोट उठता बसता त्या बालजिवांना पाजण्याऐवजी वात्सल्यपूर्ण कृतीचा आश्रय देत.

छात्रालयात मुले कपडे धूत नसत. खोल्या स्वच्छ ठेवत नसत. पुस्तके, सामान इकडे तिकडे पडलेले असे. कंदिलाच्या काचा स्वच्छ केलेल्या नसत. मुले शाळेत गेली की साने गुरु जी गुपचूप मुलांच्या कपड्याच्या घड्या घालत, कंदिलाच्या काचा पुसून ठेवत. मुलांचे कपडे धुवून ठेवत. मुले म्हणायची, ‘‘आम्हाला लाजविण्यासाठी करता की काय?’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘अरे, आई का मुलाला लाजविण्यासाठी हे सारे करत असते?’’

मुलांची त्यांना टोकाची काळजी असे. कृष्णा परळीकर हा विद्यार्थी आजारी पडला आणि गावाकडे गेला. गावाकडून तो पत्र पाठवायचा. पुढे पत्र येणे बंद झाले. तेव्हा गुरुजी त्याच्या गावाला गेले. त्याला विषमज्वर झालेला होता. गुरुजी तिथेच राहिले आणि त्याची सेवाशुश्रूषा केली. मुलांच्या मदतीने गुरु जींनी बाग तयार केली. एका गुलाबाला कळी लागली. त्या रात्री छात्रालयातील मुलांना घेऊन बगीच्यात बसून गुरुजींनी त्या गुलाबाच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. त्या रोपट्याला रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांनी गुरु जींनी सजविले. मुलांनी गाणी म्हटली. बासरी वाजवली. यातून मुलांना निसर्गाविषयी वेगळेच प्रेम निर्माण झाले. गुरु जी एकदा शिकवत होते. तेवढ्यात पाऊस सुरू झाला.

गुरु जींनी शिकविणे थांबविले आणि म्हणाले, ‘‘बाहेर पाऊस पडताना मी का शिकवत बसू?’’ आणि त्यांनी वर्ग सोडून दिला. समानतेची शिकवण गुरु जी मुलांना कृतीतून देत. छात्रालयात जेवण एकाच पंगतीत दिले जाई. एकदा मुले आणि गुरु जी सहलीला गेली. रात्री झोपताना मुलांनी गुरुजींसाठी गादी आणली. पण गुरुजी म्हणाले, ‘‘जर मुले सतरंजीवर झोपली आहेत तर मग मी गादीवर झोपणार नाही.’’

सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी गुरुजी खूप काही मुलांशी बोलत. जगातल्या विविध महापुरुषांची माहिती सांगत. वर्तमानपत्रात मुलांनी नेमके काय वाचावे यावर खुणा करून ठेवीत. महात्मा गांधींचा ‘यंग इंडिया’ तिथे येत असे. अमृतबझार पत्रिकाही तिथे येत असे. त्यातील निवडक माहिती मुले वाचत असत.

छात्रालय दैनिक अशी एक वेगळीच कल्पना गुरुजींना सुचली. ते रोज रात्री- पहाटे उठून दोन तास एकटेच ते संपूर्ण दैनिक लिहून काढत आणि सकाळी मुलांसाठी लावत. इतके टोकाचे कष्ट ते मुलांसाठी घेत होते. देश-विदेशातील विविध घटनांची नोंद असे. थोरांची चरित्रे, विज्ञानातील विविध प्रयोगांची माहिती, कधी आठवणी दिल्या जात. स्थानिक गावातील शाळेतील आणि छात्रालयात जे घडायचे तेसुद्धा या दैनिकात असायचे. एखाद्या विद्यार्थ्याने काही चांगले काम केले की त्याची माहिती असे आणि एखाद्याच्या वागण्यात काही उणेपणा असला तरी त्याचे नाव न घेता निनावी नोंद केलेली असे. यातून त्या मुलाला आपली चूक दुरुस्तीचा संदेश आपोआप मिळायचा.

या दैनिकात मुलांच्या खोल्यांची वर्णने येत. मुलांच्या गुण-दोषांची चर्चा असे. मुलांमधील भांडणे, अबोला सर्व काही असे. विनोद, कविता असे. देशाविषयी चिंतन असे. इतिहास, समाज, शिक्षण, धर्म असे नाना प्रश्न असत. कधी चरित्र, कधी निबंध, कधी गोष्ट, कधी संवाद, कधी चुटके, स्फुट विचार असे खूप काही असे. जगातील विविध देशांचे स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन असे, तर कधी रवींद्रनाथ, इकबाल, व्हीटमन, गटे, बायरन, शेले यांच्या कवितांची सुंदर रूपांतरे असत.

मुले मैदानावर असताना गुरुजी तिथे जात. त्यांच्यात भाग घेऊन खेळत. विटीदांडूचाही खेळ खेळत. मुलांमध्ये भूतदया जागृत व्हावी म्हणून गुरुजींनी शिमग्याच्या दिवसांत मुले गाढवांना जो त्रास देतात त्याविरोधात काम करणाऱ्या ‘गर्दभ क्लेशनिवारण मोहिमे’ला प्रोत्साहन दिले. त्यानुसार मुलांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी गाढवांची मुक्तता केली.

साने गुरु जींनी सुरुवातीला वाचनालय काढले. विद्यार्थ्यांना दरमहा दोन आणे वर्गणीत पुस्तके, मासिके वाचायला मिळत. गुरु जी मुलांनी गांधींचा ‘यंग इंडिया’ वाचावा म्हणून त्यावर लाल पेनने खुणा करून ठेवत. गुरुजी मुलांची खानेसुमारी करीत. त्यात लेखक, चित्रकार, खेळाडू असे मुलांचे वर्गीकरण करीत.

असाचा एक उपक्र म हा मुलांनी आपल्या गावांची वर्णने लिहायची. त्यातून गावातील जातिव्यवस्था, भांडणे, दारूचा परिणाम, ऐतिहासिक-पौराणिक ठिकाणे, शिक्षणाची स्थिती, पाण्याच्या बाबतीत स्थिती, पिके व शेतीची अवस्था, कर्ज, अनेक गावांत सांगितल्या जाणाऱ्या दंतकथा अशी विविध माहिती जमवायला सांगत.

१९४६ मध्ये ‘कुमारांपुढील कार्य’ या भाषणात ते म्हणतात की, ‘‘तुम्ही गोष्टी, गाणी, ओव्या, दंतकथा सारे गोळा करा.

एकेका तालुक्यात ४/४ कुमारांनी हिंडावे व ते गोळा करून त्याचे नीट संपादन करा. ते अमर कार्य होईल.’’

गुरु जींनी जरी शिक्षकी पेशा सोडला तरीसुद्धा त्यांना पुन्हा शिक्षक होण्याची ओढ होती. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर ते मित्राला म्हणाले की, ‘‘मला कुठे तरी ग्रामविभागात मुलांत राहावे, त्यांच्यासोबत खपावे, त्यांना चार अक्षरे शिकवावी असे वाटते.

परंतु देवाने येथे गुंतवून टाकले आहे.’’

साने गुरुजींचे

शिक्षणासंबंधी विचार..

मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. आदळआपट आणि शिक्षा, दंड यांनी मुलांचा खरा विकास होत नाही. खरा विकास हृदयात शिरल्याने व प्रत्यक्ष सेवेने होईल. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो. आजपर्यंत जगाने काय केले याची कल्पना देऊन उद्या मानवजातीला काय करायचे याची सूचना देतो. अशा विशाल दृष्टीचे शिक्षक लहानपणी मुलांना मिळायला हवेत. मुलांना कितीही देशभक्तांच्या गोष्टी सांगितल्या तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. उलट त्यांना याच गोष्टींचा कंटाळा वाटू लागतो. मुलांच्या मनावर जर संस्कारच नाही तर एकदम तुमच्या गोष्टी त्यांना कशा आवडू लागतील? शिक्षकांनी प्रथम ५ ते ६ मिनिटे सामाजिक, राष्ट्रीय विषय मुलांशी बोलावे. सर्वच शिक्षक जर असे करू लागले तर मुलांची मने फुलतील...

(लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

herambkulkarni1971@gmail.com  phone 9270947971

------------------------------------------------
शिक्षक दिनानिमित्त गुरुजींचा हा प्रेरणादायी लेख आपल्या  शिक्षक मित्रांना पाठवा 

Friday, September 2, 2016

झिका रोग

ब्राझिलमध्ये थैमान घालणारा झिका रोग आशियायी खंडात देखील पसरत आहे. आशिया खंडातील काही देशांमध्ये हा रोग अधिक जलद गतीने पसरू शकतो असे नव्या संशोधनातून समोर आहे आहे. एडिस एजिप्ती या डासामुळे होणा-या झिकाने आधिच ब्राझिल आणि दक्षिण अमेरिकी देशांत थैमान घातले आहे. पण नव्या माहितीप्रमाणे भारतात देखील हा रोग पसण्याची शक्यता आहे. भारताबरोबर चीन, फिलीपिन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, नाजेरिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांना या झिकाचा धोका अधिक आहे.
या देशांमध्ये पर्यटकांचा राबता हा जास्त आहे. ज्या देशांत झिकाचा प्रार्दुभाव आहे अशाच देशांतून भारत आणि वर नमूद करण्यात आलेल्या देशांत अधिक पर्यटक येतात त्यामुळे झिकाचा प्रसार या देशांत होऊ शकतो अशी भिती या संशोधातून व्यक्त करण्यात आली आहे. कमरन खान यांनी केलेल्या संशोधनातील प्रंबधात याविषयी अधिक माहिती मांडण्यात आली आहे. तसेच झिकाचा विषाणूचा प्रसार होण्यासाठी या देशातील बदलते हवामान कारणीभूत आहे त्यामुळे झिकाचा धोका या देशांना अधिक असल्याचे म्हटले आहे. या देशांतील लोकसंख्या ही सगळ्यात जास्त असल्याने यातून होणारे नुकसान हे मोठे असणार आहे असेही त्यात म्हटले आहे. झिकाची लागण होऊ नये यासाठी अनेक देशांत आधीच उपाययोजना केल्या आहेत पण मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवर हे अवलंबून असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात सिंगापूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यानंतर गुरूवारीच तेथील १३ भारतीयांना झिकाची लागण झाल्याचे पराराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. मलेशियामध्ये देखील झिकाचा रुग्ण आढळला त्यामुळे आशियायी देशांत झिकाचा प्रसार होण्यास सुरूवात झाली हे नक्की. आता भारतासहित अनेक देशांची नावे समोर आल्याने भारताला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपायोजना कराव्या लागणार आहेत.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...