Pages

Thursday, February 2, 2017

नई तालीम

महात्मा गांधींच्या शिक्षण विचारावर व त्या आधारे सुरू असलेल्या शाळेवर आज मी सकाळ च्या  सप्तरंग पुरवणीत लेख लिहिला आहे
नई तालीमः काळाच्या पुढचा शिक्षणविचार (हेरंब कुलकर्णी)

‘नई तालीम’ हा महात्मा गांधी यांचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता; पण सरकारनं हा विचार पाहिजे तितक्‍या प्रभावीपणे अमलात आणला नाही. ‘नई तालीम’ पद्धतीच्या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी-ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज ‘बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ’ आणि ‘कष्ट करणारा कमी दर्जाचा’ असं समीकरण आहे व त्याआधारे पगार दिला जातो. गांधीजींची शिक्षणपद्धती प्रभावीपणे राबवली गेली असती, तर हा प्रकार कमी झाला असता. आता तरी नव्या शैक्षणिक धोरणात ‘नई तालीम’ स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गांधीजींच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्‍टोबर) विशेष लेख...

‘मी जगाला व देशाला देत असलेली सर्वोत्तम देणगी’ असं वर्णन महात्मा गांधी यांनी ‘नई तालीम’ या त्यांच्या शिक्षणपद्धतीचं केलं होतं. आजच्या (२ ऑक्‍टोबर) गांधी जयंतीनिमित्त या शिक्षणपद्धतीवर चर्चा व्हायला हवी. सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी ‘नई तालीम’ हे साधन आहे, अशी गांधीजींची भूमिका होती. त्यांची ही शिक्षणपद्धती सरकारनं स्वीकारली नाही, हे दुर्दैव. स्वीकारली असती तर आज भारत हे आगळवेगळं राष्ट्र बनलं असतं. आज बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कौशल्याधारित शिक्षण मिळेनासं झालं आहे. गरिबांविषयीची कणव वेगानं हरवत चालली आहे. अशा वेळी गांधीजींच्या या शिक्षणपद्धतीची तीव्रतेनं आठवण येते.

वर्धा ः सेवाग्राम इथं पुन्हा सुरू झालेल्या ‘आनंदनिकेतन’ या ‘नई तालीम’ धर्तीवरच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाणारे विविध उपक्रम.

दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी तिथल्या आश्रमात असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी ही पद्धती वापरली होती. त्यातून त्यांचं चिंतन विकसित झालं. १९३७ मध्ये काँग्रेस सरकारे स्थापन झाल्यावर वर्धा इथंल्या शिक्षण संमेलनात गांधीजींनी पायाभूत शिक्षणाची अत्यंत सविस्तर मांडणी केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रवींद्रनाथ टागोरांसोबत काम केलेल्या आर्यनायकम दांपत्यानं शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्ध्यात तसंच भारतात बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, काश्‍मीर अशा अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्या. १९५६ मध्ये २९ राज्यांत ‘नई तालीम’ पद्धतीच्या ४८ हजार शाळा होत्या आणि त्यांत ५० लाख मुलं शिकत होती. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर गांधीजींच्या शिक्षणविचाराचा प्रसार झाला होता; परंतु हा शिक्षणविचार आधार मानून शासनानं शिक्षणरचना न केल्यानं या शाळा बंद पडत गेल्या व आज भारतात ‘नई तालीम’ पद्धतीच्या केवळ पाचशेच शाळा सुरू आहेत.

महात्मा गांधी ः ‘नई तालीम’ हा गांधीजींचा शिक्षणविचार काळाच्या पुढचा होता.

गांधीजींनी ‘नई तालीम’ची प्रमुख चार तत्त्वं मांडली होती. १) प्राथमिक शिक्षण हे सात ते १४ या वयोगटाचं असेल २) शिकवण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातल्या लोकांच्या मुख्य व्यवसायातला असावा ३) सर्व विषयांचं शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिलं जावं ४) असं दिलं जाणारं शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावं; याबरोबरच शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं, अशी आग्रही मांडणी त्यांनी केली. शाळेत इतिहास, भूगोल, गणित, भाषा, चित्रकला, संगीत, स्वास्थ्य, समाजशास्त्र हे विषय होते; पण हे सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात. चित्रकला, संगीत व लोकनृत्य हेही विषय होते. प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश त्यांनी केला होता. ‘जीवनाकडं बघण्याची सौंदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती’ या दृष्टिकोनातून गांधीजी सफाईकडं पाहत असत. सफाई करताना मुलांच्या मनात अशी कामं करणाऱ्यांविषयी तिरस्काराची भावना निर्माण न होता समान भाव निर्माण होईल, हे अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे आहारशास्त्रामुळंही ‘स्वयंपाक हे केवळ महिलांचं काम’ असं मुलांना वाटू नये, त्यातलं विज्ञान मुलांना नकळत कळावं, तसंच ‘नई तालीम म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण’ एवढाच संकुचित अर्थ नसावा, तर त्या उद्योगाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जावं, असं गांधीजींना अपेक्षित होतं. वस्त्रोद्योग शिकवताना टकळी, धागा यातली भूमिती, कापसाच्या निर्मितीमधलं विज्ञान, वस्त्रनिर्मितीमधल्या अर्थकारणातलं अर्थशास्त्र व गणित, वस्त्र निर्माण करणाऱ्या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत, असं गांधीजींना अपेक्षित होतं. या शिक्षणातून उच्च-नीच भाव नसलेला, शहर व खेडी असा भेदभाव नसलेला, बुद्धीचं काम व श्रमाचं काम यात फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी गांधीजींची दृष्टी होती. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा मुलांच्या वास्तव जगण्याशी संबंध जोडला गेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार म्हणतात ः ‘भारतीय समाजातल्या दबलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांना शिक्षणात महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न गांधीजी करत होते. शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही त्यांचा भर होता. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून प्रशिक्षणात संगीत, कला, सण-उत्सव यांचा समावेश असावा, असं ते म्हणत.’

वर्धा ः ‘आनंदनिकेतन’ या शाळेतली सूत कातणारी विद्यार्थिनी.

अनुभवातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून मेंदूचा विकास अधिक चांगला होतो व सर्वांगीण शिक्षण दिलं जातं, हे आज जेनेटिक सायन्स व मेंदूआधारित शिक्षणातून सिद्ध होत आहे. हे संशोधन तेव्हा झालेलं नसतानाच्या काळात गांधीजींनी ८० वर्षांपूर्वी ही मांडणी केली होती. हे त्यांचं द्रष्टेपणच होतं.

आजही शिक्षणाचं स्वरूप गरीब-श्रीमंत यांच्यात भेद अधिकाधिक वाढवणारं, समान शिक्षण नाकारणारं, शिक्षणाचा व्यापार वाढवणारं असंच आहे. पुस्तकी शिक्षणावर भर, वाढणारी व्यक्तिकेंद्रितता, वाढती उपभोगप्रधानता व त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्‍न, श्रमाकडं व श्रमकर्त्याकडं बघण्याची अधिक तीव्र झालेली नकारात्मक दृष्टी हे बघता ‘नई तालीम शिक्षणपद्धती’ हेच त्यावरचं उत्तर वाटतं. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर विकासाच्या धारणेबाबत सगळ्यांनीच फेरविचार करणं आवश्‍यक आहे.

या शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचं शहरी ग्रामीण दुभंगलेपण त्याच्या वाट्याला आलं नसतं. आज बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्जाचा व त्याआधारे दिला जाणारा पगार अशी भांजणी झाली आहे, ती या शिक्षणातून कमी झाली असती. नव्या शैक्षणिक धोरणात नई तालीम स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

------------------------------------------------------------------
आनंदनिकेतन ः ‘नई तालीम’ची पुन्हा सुरवात
वर्धा इथल्या आश्रमात ‘नई तालीम’ची शाळा १९७० च्या दशकात जिथं बंद पडली होती, तिथंच ती २००५ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या इथल्या संचालक आहेत. या शाळेची विद्यार्थिसंख्या २४० आहे. सर्व सामाजिक गटांचं योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व आहे की नाही, हे इथं कटाक्षानं पाहिलं जातं.

‘प्रीती’, ‘मुक्ती’ आणि ‘अभिव्यक्ती’ हा या विद्यालयातल्या शिक्षक-विद्यार्थी संबंधांचा आधार आहे. इयत्ता सातवीपर्यंत बागकाम व शेती, स्वयंपाक, वस्त्रकला यांसारख्या कामांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रं यांसारख्या विषयांच्या अध्ययनासह मुलं वस्त्रं विणतात. कला, संगीत यावर विशेष भर असतो. सामाजिक विषयांवर सतत बोललं जातं व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तूर, बाजरी, ज्वारी, मका यांची पावसाळी लागवड करायला शिकवलं जातं. मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या हिवाळी भाज्यांची लागवड व देखभाल करायलाही शिकवलं जातं. हे काम करत असताना जमिनीचं मोजमाप व परिमिती काढणं, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणं, जमिनीवर भौमितिक आकृत्यांचा उपयोग करत बागेची रचना करणे आदी गोष्टीही इथली मुलं शिकली आहेत. विविध ऋतूंमधलं किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतल्या पाण्याची पातळी यांचं मोजमाप, नोंदी ठेवणं, आलेख काढणे हेही इथं सहज शिकता येतं. गांडूळखत, कंपोस्टखत तयार करणं, द्रवरूप झटपट खत करणं, कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणं, मित्रकीड, नुकसान करणारी कीड आदींची तोंडओळख, मधमाश्‍या व कीटकांचं निसर्गातलं महत्त्वाचं स्थान समजून घेणं, अहिंसक पद्धतीनं मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय, अळिंबीची शेती करण्याची पद्धत अशा बाबी इथली मुलं शिकतात. महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची प्रत्येक मुलाला संधी मिळते; ज्यातून पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचं शास्त्र आदींचे धडे इथली मुलं शिकतात. यातून स्वावलंबन व लिंगसमभावाचं महत्त्व रुजण्यास अनुकूल वातावरण तयार करणं शक्‍य होतं. आज शिक्षणशास्त्रात ‘ज्ञानरचनावाद’ या पद्धतीत शिकवण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकाऊ मानण्यात आलेली आहे. ‘नई तालीम’ ज्ञानरचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्यं विकसित करत त्यांचा आत्मविश्‍वास वाढवणारी आहे. शिक्षकांनी-पालकांनी ही शाळा बघायला हवी.
------------------------------------------------------------------
अभय बंग ः ‘नई तालीम’ शाळेचे विद्यार्थी
डॉक्‍टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या ‘नई तालीम’चे विद्यार्थी होते. त्यांच्याकडून ही पद्धत समजून घेतली. ते म्हणाले ः ‘‘शेतकरी-मजूर कसे जगतात, याचा विद्यार्थिदशेत अनुभव देणारी ही पद्धत होती. दिवसभरात तीन तास उत्पादककाम करणं सक्तीचं होतं. सूतकताई, विणकाम, गोशाळेची स्वच्छता, शौचालयसफाई, स्वयंपाकगृहात काम, भांडी घासणं ही कामं प्रत्येक जण करत असे. आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्यांची मुलं मुलाखत घेत. स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास खुद्द स्वातंत्र्यसैनिक येऊन समजून देत. आकाशातले तारे दाखवले जात, तर कधी झाडावर चढून कवितेचं पुस्तक आम्ही वाचत असू. ‘कालच्या पेक्षा तू आज पुढं सरकलास का?’ असा महात्मा गांधीजींचा दृष्टिकोन परीक्षेत होता. प्रात्यक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव,’ ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसं कराल?’ असे प्रश्‍न विचारले जात... स्वयंपाकानंतर भांडी घासण्याचीही कामं करावी लागत असत.. जीवशास्त्राचे शिक्षक आम्हाला परिसरात फिरायला नेत व झाडांविषयी प्रश्‍न विचारत व त्यावरून विद्यार्थ्यांचं आकलन तपासत...
टॉलस्टॉयच्या ‘इव्हान द फूल’ या कथेत एक अंध म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत, त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते. मला वाटतं, ही मूल्यव्यवस्था शिक्षणात आणायला हवी. ‘नई तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणं मला योग्य वाटत नाही. कारण, शाळेत मी केवळ शेती शिकलो नाही, तर शेतकऱ्यांचा सन्मान करायला शिकलो, त्यामुळं ती जीवनदृष्टी आहे.

‘नई तालीम’चं आकर्षण वाढत आहे ः बरंठ
‘‘देशभरात वेगवेगळ्या राज्यांत आज पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. या शाळा ‘नई तालीम’चा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. श्रमाला महत्त्व, परिसराशी शिक्षण जोडणं, मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होत आहे,’’ असं ‘नई तालीम’ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘नई तालीम’कडं आम्ही एक शाळा म्हणून बघत नसून, सर्वोदयी समाजरचनानिर्मितीचं साधन म्हणून पाहतो बघतो.’’ http:/www.naitalimsamiti.org/ ही समितीची वेबसाइट असून, http://www.lokbharti.org व http://puvidham.in/puvidham-learning-centre/ अशा काही शाळा या शिक्षणविचारावर प्रभावीपणे काम करत आहे

हेरंब कुलकर्णी (९२७०९४७९७१)

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...