Pages

Sunday, July 31, 2016

विद्वतेने अहंकारी बनू नका

विद्वत्तेने अहंकारी बनू नका


कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.

कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र आणि दुसरा सूर्य जे दिवस रात्र चालतच असतात.

कालिदास म्हणाले मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?

कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत एक धरती आणि दुसर झाडं. धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारली तरी ती मधुर फळच देतात.

कालिदास आता हतबल झाले,    

कालिदास म्हणाले मी हट्टी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नखं आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच.

कालिदास आता कंटाळले  आणि

कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली मूर्ख तर  फक्त दोनच आहेत एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.

कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले.

वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज ऐकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले.

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका,
अहंकारी बनू नका,
अन्यथा हाच गर्व आणि अहंकार तुमची विद्वत्ता नष्ट करू शकतो.

Wednesday, July 27, 2016

डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

विज्ञानेश्वराचे प्रस्थान

क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह अवकाशात सोडण्याचे क्षेत्र असो की अणुस्फोट चाचणी, डॉ. अब्दुल कलाम यांचा त्यात मोठा वाटा होता. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक मानसन्मान मिळाल्यानंतर ते राष्ट्रपती बनले. तेथेही त्यांच्या कार्यामुळे त्या पदाची उंची वाढली. कलाम असे उंचच राहिले. या उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले.
कोळ्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम या पोरास वैमानिक व्हावयाचे होते. तशी संधी आली असता ती त्यास नाकारली गेली. हवाई दलाचे वैमानिक होण्यासाठी ते अपात्र ठरले. ते योग्यच झाले. कारण विमानास पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण बंध तोडण्याचा अधिकार नसतो. कितीही शक्तिशाली असले तरी विमान पृथ्वीच्या वातावरणाच्या मर्यादा सोडत नाही. एखादा काँकार्ड विमानाचा अपवाद. अन्यथा विमान आपल्या अंगभूत मर्यादेतच घुटमळत राहते. एपीजे कलाम यांच्या आकांक्षेस ती मर्यादा मानवली नसती. त्यांना अवकाश खुणावत होते. साध्या समूहगानास अपात्र ठरलेल्या एखाद्या गायकाने पुढे स्वत:ची एकल बठक भरवण्याइतकी गाण्यात प्रगती करावी, तसे हे झाले. आकाशयानासाठी अपात्र ठरलेले एपीजे पुढे इतके वाढले की ते आकाशाच्या सीमा ओलांडून अवकाशाकडे झेपावले. कलाम यांचे उड्डाणप्रेम इतके तीव्र की वैमानिक म्हणून नाकारले गेल्यानंतर त्यांनी या क्षेत्राशी संबंध राहावा म्हणून िहदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये कनिष्ठ पदाची नोकरी पत्करली. रामेश्वरसारख्या दूरस्थ खेडय़ात जन्मलेला, साध्या शालेय शिक्षणासाठीदेखील वर्तमानपत्र टाकण्याचे काम करून अर्थार्जन करावे लागलेला एक गरीब मुलगा देशाचा राष्ट्रपती आणि अवकाश क्षेत्राचा चेहरा बनून जातो, ही कहाणीच विलक्षण प्रेरणादायी आहे. कलाम यांच्याभोवती जी काही प्रभावळ तयार झाली ती या पाश्र्वभूमीमुळे. ज्या समाजात प्रचंड मोठय़ा घटकास वंचित राहावे लागते, ज्या समाजात प्रगतीच्या संधीचा सुग्रास घास मूठभरांच्याच ताटात सहज पडतो त्या समाजात रामेश्वरात मुसलमान कुटुंबात जन्माला येऊन धर्म, जात, प्रांत, भाषा अशी सर्व बंधने ओलांडून अवकाशाकडे झेपावणारे कलाम आदर्श आणि अनुकरणीय ठरतात यात नवल नाही.
वास्तविक कलाम यांच्या आधी अवकाश वा तत्संबंधी क्षेत्रात भारतात काही घडत नव्हते असे नाही. विक्रम साराभाई, त्यांचे पूर्वसुरी होमी भाभा आदींनी विज्ञानक्षेत्राची मजबूत पायाउभारणी आपल्याकडे केली होतीच. या धुरंधरांना पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या द्रष्टय़ाचे नेतृत्व लाभल्याने त्या काळातील प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी होती. परंतु तरीही या सर्व महानुभावांना कलाम यांच्यासारखी लोकप्रियता मिळाली नाही. ते सर्वच आदरणीय होते. पण त्यांच्याविषयीचा आदर दडपणाच्या कोंदणातून यायचा. कलाम यांचे तसे नाही. त्यांची तुलनाच करावयाची झाल्यास ती महात्मा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाशी करावी लागेल. महात्मा गांधी यांच्या आधीही लोकप्रिय राजकारणी होते. परंतु एक बाळ गंगाधर टिळक यांचा अपवाद वगळता ते जनसामान्यांना आपलेसे वाटत नसत. महात्मा गांधी यांनी रस्त्यावरच्या जनसामान्यांच्या देशप्रेमासही किंमत दिली. देशासाठी आपणही काही करू शकतो असे सामान्यांतल्या सामान्यास वाटू लागणे हे महात्मा गांधी यांचे यश. विज्ञान क्षेत्राच्याबाबत हे पुण्य कलाम यांच्या खाती जमा होते. आपणास जे साध्य करावयाचे आहे ते होईपर्यंत प्रयत्न करीत राहणे हे त्यांचे वैशिष्टय़. अशा प्रयत्नांवर निष्ठा असणाऱ्यांना फार दूरचे दिसते. कलामांना तसे दिसत असे. त्यामुळे अमेरिका आदी बडय़ा देशांनी भारतावर र्निबध घातले तरी भारतीय तंत्रज्ञ त्यातून मार्ग काढू शकतात, हा विश्वास त्यांना होता आणि स्वत:चाच विश्वास सार्थ ठरवून दाखवण्याची धमक त्यांच्यात होती. बडय़ा देशांनी १९७४ साली अणुचाचण्या केल्या म्हणून भारतास युरेनियमपुरवठा बंद करण्याची शिक्षा दिली. त्यानंतरही न डगमगता भारतात.. त्यातही रामेश्वरच्या किनारपट्टी परिसरात.. प्रचंड प्रमाणावर आढळणाऱ्या थोरियमचा वापर करून युरेनियम तयार करता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवण्याचे महान कार्य ज्या तंत्रज्ञांनी करून दाखवले त्यात कलाम यांचा अंतर्भाव होतो. सामान्य नागरिकास कदाचित याचे महत्त्व कळणार नाही. परंतु थोरियमचे हे गुणदर्शन भारतासाठी अत्यंत दूरगामी महत्त्वाचे आहे, हे नि:संशय. याच काळात भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात मोठय़ा घडामोडी घडत होत्या. क्रायोजेनिक इंजिनांच्या साहाय्याने मोठे उपग्रह कसे अवकाशात सोडता येतील, यासाठी बरेच संशोधन सुरू होते. कलाम यांचा त्यात मोठा वाटा आहे. आज या क्षेत्रात पाच बडय़ा देशांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची योग्यता ज्या देशांनी मिळवली त्यात भारतासारख्या दरिद्री देशाचा समावेश होतो. हे यश कलाम, डॉ. अनिल काकोडकर अशा तंत्रज्ञांचे. त्या अर्थाने कलाम हे उच्च दर्जाचे अभियंते होते. आपल्याकडे विज्ञानक्षेत्राशी संबंधित सर्वानाच वैज्ञानिक म्हटले जाते. कलाम हे तसे वैज्ञानिक नव्हते. हे काही त्यांच्यातील न्यून नाही. खुद्द कलाम यांना आपल्यातील या तंत्रज्ञाची जाणीव होती. तरीही एखादा वैज्ञानिकही करू शकणार नाही, असे एक मोठे काम त्यांच्या हातून घडले.
ते म्हणजे विज्ञान प्रसाराचे. कलाम मूíतमंत विज्ञानवादी, प्रयत्नवादी होते. ही बाब आपल्यासारख्या दांभिक समाजात अत्यंत महत्त्वाची. याचे कारण विज्ञान आणि धर्मातील कर्मकांड या दोन्ही डगरींवर तोल सांभाळत जगणाऱ्यांची संख्याच आपल्या समाजात जास्त. ही कसरत कलाम यांनी कधीही केली नाही. जाणीवपूर्वक. देशातील सर्वोच्च पदावर निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात निवास करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा कोणत्या मुहूर्तावर आपण राष्ट्रपती भवनात राहावयास येणार असे सरकारने विचारले असता, कलाम यांनी उत्तर दिले.. प्रत्येक दिवस माझ्यासाठी सुमुहूर्त असतो. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. कलाम त्याप्रमाणेच वागले. भूमिका अशी घ्यावयाची आणि चोरून मुहूर्त पाहावयाचा असली लबाडी करण्याची वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही. विचार आणि वागणे यांच्याशी त्यांचा थेट संबंध होता. त्यामुळे वेगवेगळ्या श्रेयांसाठी ओळखले जात असतानाही आपल्याला विज्ञानवादी शिक्षक ही ओळख सर्वात प्रिय आहे, असे कलाम म्हणत. विज्ञानाची विविध गुह्य़े जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे त्यांना मनापासून आवडे. ते हे काम न कंटाळता करीत. अणुऊर्जा आयोगाशी संबंधित असताना मुंबईत त्यांचे वारंवार येणे असे. त्या वेळी कलाम यांच्याशी अनेकदा संवाद झाला. विज्ञानविषयक वार्ताकन करणारे वार्ताहर त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत. परंतु त्यातील एकाही प्रश्नाला वा प्रश्नकर्त्यांला कलाम यांनी कमी लेखले असे झाल्याचे एकही उदाहरण नाही. काही काही विषयांवर भाष्य करण्यात त्यांना अंगभूत मर्यादा येत. ते कलाम पाळत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने कधीही वाद वगरे झाले नाहीत.
हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़ होते. त्यांच्या हयातीत के. संथानम, होमी सेठना आदींनी कलाम यांच्यावर थेट टीका केली आणि त्यांच्या क्षमतेसंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले. त्यास उत्तर देण्याच्या फंदात कलाम कधी पडले नाहीत. खरे तर अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कालखंडात कलाम भारतीय अणुऊर्जा क्षेत्राच्या केंद्रस्थानी होते. अमेरिका ते सोविएत रशिया या टापूत बरेच काही घडत होते आणि बऱ्याचदा भारतही त्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होता. परंतु यातील कशाचीही वाच्यता कलाम यांच्या आत्मचरित्रात नाही. एका अर्थाने ही त्यांची मर्यादादेखील ठरते. पण अशा मर्यादेची एक बाजू चांगुलपणाची असते. कलाम यांच्या राष्ट्रपती भवनातील वास्तव्यात ती दिसून आली. २००४ सालच्या निवडणुकीत काँग्रेस बहुमताच्या जवळ गेल्यावर पंतप्रधानपदी सोनिया गांधी यांची निवड होणार हे स्पष्ट होते. परंतु तसे झाले नाही. गांधी यांनी ऐन वेळी माघार घेतली. त्या वेळी त्यांचे परदेशी मूळ लक्षात घेऊन राष्ट्रपती कलाम यांनी त्यांना पंतप्रधानपद न स्वीकारण्याची मसलत दिली, असे बोलले गेले. कलाम यांनी त्या विषयी कधीही ब्रदेखील काढला नाही. राष्ट्रपती म्हणून मुदत संपल्यावर त्यांना आणखी एक संधी दिली जाणार होती. ती खुद्द कलाम यांनी अव्हेरली. पद नाकारणारे भारतासारख्या देशात दुर्लभच ठरतात आणि तसे कोणी आढळल्यास भाबडी जनता अशा व्यक्तीस आनंदाने ऋषिपद बहाल करते. कलाम यांना ते तसे मिळाले. त्यांचा मोठेपणा हा की या ऋषिपदास तडा जाईल अशी एकही कृती कलाम यांच्या हातून घडली नाही. त्यात जोडीला असलेला अंगभूत साधेपणा. भारतात लोकप्रियतेच्या शिखराचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्यासाठी या बाबी पुरेशा ठरतात. अशा व्यक्तींना पदासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, पदच त्यांचा शोध घेत येते. कलाम यांचे तसे झाले. त्यामुळे पीसी अलेक्झांडर यांच्या ऐवजी राष्ट्रपतिपदाचे सर्वसंमत उमेदवार म्हणून कलाम यांची निवड झाली. अलेक्झांडर हे एके काळी काँग्रेसला जवळचे. दिवंगत इंदिरा गांधी यांचे विश्वासू. तेव्हा त्यांच्या नावास काँग्रेस आक्षेप घेणार नाही, हा अटलबिहारी वाजपेयी सरकारातील प्रमोद महाजन यांचा होरा. तो चुकला. कारण सोनिया गांधी यांनी अलेक्झांडर यांना पािठबा नाकारला. त्यानंतर कलाम यांचे नाव पुढे केले गेले. ते मान्य झाले. त्यांना राष्ट्रपतिपदासाठी उभे करण्यात खरे तर एक राजकारण होते. परंतु या राजकारणाचा गंध राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर दूरान्वयानेही कलाम यांच्या वागण्यास आला नाही. ते होते तसेच राहिले. उलट त्यांच्यामुळे त्या पदाची उंची वाढली.
कलाम हे असे उंचच राहिले. या उंचीचा, अनंत उंचीचा त्यांना ध्यास होता. ते त्यांचे प्रेयस होते आणि आपल्या जगण्याने त्यांनी ते श्रेयसही केले. ते विविधांगी जगले. या सर्व अवतारांत एक सूत्र समान होते. ते म्हणजे विज्ञानप्रेम. ते कधीही आटले नाही. त्या प्रेमाचाच आविष्कार होता विद्यार्थाशी गप्पा. या अशा गप्पांतच त्यांच्या आयुष्याची इतिश्री व्हावी हा एक विलक्षण योगायोग. तो आणखी एका कारणाने उठून दिसतो. भद्र-अभद्र, शुभ-अशुभ वगरे काहीही न मानणाऱ्या कलाम यांचे सोमवारी निधन झाले. श्रद्धाळू, धर्म-अधर्माच्या गत्रेत अडकलेला जनसमुदाय आषाढी एकादशी पाळून आपल्या खात्यात काही पुण्य जमा व्हावे यासाठी मग्न असताना या विज्ञानेश्वराने अनंताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. लोकसत्ता परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.

Monday, July 25, 2016

NFC Technology

सर्व मित्रांना *कैलास गवळे*चा नमस्कार 🙏🏻🙏🏻
   नाशिक येथील कार्यशाळेत *संदीप गुंड* सरांनी *NFC* चा उल्लेख करुन काही माहिती दिली.
        त्यात भर म्हणून मी त्याविषयी अधिक माहिती मिळवली
ती आपल्यासाठी share करतो👇👇

एनएफसी (NFC) ही एक मस्त नवीन टेक्नॉलॉजी आहे. आजकालच्या बहुतेक आघाडीच्या स्मार्टफोन्समध्ये हे एनएफसी फीचर असतंच. एनएफसी म्हणजे निअर फिल्ड कम्युनिकेशन. वायफाय, ब्लुटूथ कसं असतं तसंच हे, मात्र एनएफसीची  रेंज आणि क्षमता मात्र या दोन्हीपेक्षाही कमी असते. वायफायची रेंज वायफायचा प्रकार आणि राऊटरवर अवलंबून असली तरी ती साधारण 3 मीटरच्या घरात असते. ब्लुटूथची रेंज 5 मीटर्पयत असते. एनएफसी तंत्रज्ञान मात्र 1क् सेमी इतक्या कमी रेंजमध्ये काम करते.

एनएफसीसाठी दोन गोष्टी लागतात.
एक म्हणजे एनएफसी चिप असणारे, आपल्या स्मार्टफोनसारखे, डिव्हाइस आणि  या डिव्हाइसला ठरावीक काम करण्याच्या सूचना देणारा एनएफसी टॅग. या टॅगमध्ये ठरावीक सूचना प्रोग्रॅम केलेल्या असतात. उदाहरणार्थ, स्क्र ीन ऑफ करणो किंवा मोबाइल वॉलेटमधून ठरावीक रक्कम वसूल करणो वगैरे. या सूचना प्रोग्रॅम करणो सोपे असते. यासाठी काही अॅप्स असतात जे वापरून आपण एनएफसी टॅगमध्ये सूचना स्टोअर करू शकतो. यात कळीचा मुद्दा असा आहे की, एक एनएफसी टॅग फक्त एकच काम करतो.

एनएफसी वापरायचं कसं?
एनएफसी वापरण्यासाठी तुम्हाला या गोष्टी लागतील.
1) एनएफसी असलेला फोन.
तुमच्या फोनमध्ये एनएफसी आहे की नाही, हे बघण्यासाठी सेटिंग्जमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ वगैरेनंतर असलेल्या ‘मोअर’वर टॅप करा. यात एनएफसी ऑन-ऑफ करण्याचे स्विच असते. काही ठरावीक कामांसाठी दोन  एनएफसी फोन असले तरी काम होते. काही विशिष्ट कामांसाठी मात्र तुम्हाला एनएफसी  टॅग्ज लागतात. या एनएफसी टॅग्जमध्ये काही अॅप्स वापरून तुम्हाला विशिष्ट सूचना स्टोअर करता येतात. तुमचा एनएफसी एनेबल्ड फोन या टॅगजवळ नेला की त्यातील सूचनांची अंमलबजावणी फोनमध्ये होते. अमॅझॉन सारख्या वेबसाइटवर हे टॅग शंभर रुपयांपासून  उपलब्ध आहेत. काही टॅग्जमध्ये आधीच विशिष्ट सूचना प्रोग्रॅम केलेल्या असतात तर काही टॅग्जना आपण प्ले स्टोअरमधील अॅप्स वापरून प्रोग्रॅम करू शकतो. यापैकी ट्रीगर हे अॅप एनएफसी टॅग प्रोग्रॅमिंगसाठी लोकप्रिय आहे.

एनएफसी काही इंटरेस्टिंग उपयोग
हे सगळं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या एनएफसीचा नक्की उपयोग काय? तर त्याचे काही भन्नाट उपयोग आहेत.

अॅण्ड्रॉइड बीम
बीमचा वापर दोन एनएफसी फोनमध्ये कन्टेंट शेअर करण्यासाठी होतो. सेटिंग्जमध्ये एनएफसीच्या खाली अॅण्ड्रॉइड बीमचे स्विच असते. बीम ऑन केलेले दोन फोन एकमेकांना टच केल्यावर आपल्या फोनवर ओपन असलेले वेब पेज, अॅप, व्हिडीओ किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स लगोलग शेअर होतात. दुस:या फोनमध्ये जर ते अॅप इन्स्टॉल नसेल तर प्ले स्टोअरमधील त्या अॅपचे पेज शेअर होते. सॅमसंगसारखे काही फोन मात्र एनएफसीचा वापर फक्त पेअरिंगसाठी करतात आणि कन्टेंट शेअर होतो ब्लूटूथवरून.

एनएफसी टॅग्ज
एनएफसीची खरी मजा आहे ती या टॅग्जमध्ये. पूर्वीच्या एका लेखात सांगितल्याप्रमाणो तुमचा स्मार्टफोन स्मार्टर बनविण्यासाठी एनएफसी टॅग्ज वापरता येतात. वर सांगितल्याप्रमाणो एखाद्या इकॉमर्स वेबसाइटवरून हे टॅग खरेदी करा आणि एनएफसीसारखे अॅप वापरून ते टॅग खालील वापरांसाठी प्रोग्रॅम करा.
1) झोपताना
एनएफसी टॅग तुमच्या बेडजवळ चिटकवा. झोपण्यापूर्वी फोन त्या टॅगवर ठेवल्यावर किंवा टॅगला स्पर्श केल्यावर फोन वायफाय टर्न ऑफ करणं किंवा फोन सायलेंट करणं यासारखी कामं बिनबोभाट होतात.
2) कारमध्ये
 कारमध्ये तुमच्या मोबाइल होल्डरवर हा टॅग चिकटवा. नेव्हिगेशन ऑन करणं किंवा म्युङिाक प्लेअर ऑन करणं किंवा बॅटरी वाचवण्यासाठी वायफाय ऑफ करणं यासारख्या सूचना तुम्ही या टॅगमध्ये वापरू शकता.
3) पाहुण्यांसाठी
 ‘वायफाय पासवर्ड काय आहे?’ हा कुठेही गेल्यावर विचारला जाणारा परवलीचा प्रश्न झाला आहे. तो पासवर्ड सांगा किंवा स्वत:च टाइप करून द्या, यासारखी कामं घरातला टेककर्ता माणूस या नात्यानं आपल्यालाच करावी लागतात. या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी तुमच्या वायफाय राऊटरजवळ एक टॅग चिकटवा आणि वायफायप्रेमी पाहुण्यांना या टॅगला स्पर्श करून तुमच्या टेक सॅव्हीनेसचा परिचय करून द्या.

याशिवाय इंटेलिजंट लॉकजवळ फोन नेऊन लॉक उघडणं, लाइट्स ऑन करणं, ब्लुटूथ स्पिकरजवळ फोन नेल्यास म्युङिाक प्लेअर ऑन करणं, बिझनेस कार्ड शेअर करणं यासारखी अनेक कामे तत्परतेने होतात.

एनएफसी पेमेंट
भारतात कॅशबरोबर कार्डचा वापर आता चांगलाच प्रचलित झाला आहे. त्याहीपुढे जाऊन, आपण आता पेटीएमसारखे मोबाइल वॉलेटदेखील वापरू लागलो आहोत. पेमेंट करण्यातला सुटसुटीतपणा ही यातली मुख्य गोष्ट आहे. येत्या काही वर्षात पेटीएमसारखी वॉलेट्स, दुकानात आपण कार्ड स्वाईप करतो त्याप्रमाणो, सर्वदूर प्रचलित होतील. फक्त कार्ड स्वाईप करण्याऐवजी तुमचा एनएफसी एनेबल्ड फोन काउंटरवरील पेमेंट टर्मिनलजवळ नेल्यावर आपण मोबाइल वॉलेटमध्ये टाकलेली रक्कम आपोआप दुकानदाराला मिळेल. म्हणजे नोटाच काय पण कार्डदेखील सांभाळायची कटकट नाही.
   *KAILAS                              GAVALE*
*ʐ.ք.ֆcɦօօʟ- ӄօcɦaʀɢaօռ,  ɖɨռɖօʀɨ,ռaֆɦɨӄ*

Tuesday, July 19, 2016

पायाभूत चाचणी मराठी प्रश्नपत्रिका

https://drive.google.com/drive/mobile/folders/0B1BKrwucMaz6bEstcVItcjFMdlk/0B1BKrwucMaz6NXBxaE5qQ2RBS0k/0B1BKrwucMaz6RElMWTYxZHRkT1E?tab=jo&sort=13&direction=a

Monday, July 11, 2016

पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका

प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीच्या  प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे  यामध्ये प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थी प्रश्नपत्रिका व शिक्षक सूचनापत्र असे साहित्य आहे …

गणितासाठी - https://goo.gl/OlQSgq

भाषासाठी - https://goo.gl/SXaWms 

शिक्षण आणि करिअर

*आपली मुलं खरेच मनापासून शिकतातयेत की त्यांनी काहीतरी शिकलंच पाहिजे, असा *'बळस्कार' व्यवस्था त्यांच्यावर करतेय?*

शिक्षण क्षेत्रातील एका संवेदनशील कार्यकर्त्यांनं *तुम्ही आम्ही पालक* मासिकासाठी लिहिलेलं हे दीर्घ टिपण जरुर वाचाल.

*करिअर म्हंजी काय रं भाऊ?*

लेखक: *भाऊसाहेब चासकर*

तुम्ही शिकता कशासाठी? असा प्रश्न मी आजवर शेकडो युवक-युवतींना विचारलाय. शिकल्यावर नोकरी मिळते, पैसे मिळतात, चांगले करिअर होते. बहूतेक मुलांचे असेच उत्तर असते! तात्विक आणि सैद्धांतिक पातळीवर शिक्षणाची थिअरी मांडताना देशातील शिक्षणतज्ज्ञांनी, धोरणकर्त्यांनी काहीतरी वेगळीच मांडणी केलेली असते. तसले काही असले तरी आजचे पालक मुलांना शिकवताहेत किंवा मुलंही शिकताहेत, यामागची मूळ प्रेरणा शिकल्यावर नोकरी मिळते, दोन पैसे हातात येतात, पैसे आले की गरजा भागवता येतात, आयुष्य नीट जगता येते, पैशाशिवाय जगणे मुश्किल आहे. वगैरे... शिकण्यामागची अशी पक्की ठोकळेबाज धारणा बनली आहे. विशेषतः ज्या कुटुंबातील पहिली किंवा दुसरी पिढी शिकतेय, तिथे हे जास्त ठळकपणे दिसतेय. अर्थात हे वाटणे अजिबात चुकीचे नाही. शिक्षणातून अनेक कुटुंबांचा उत्कर्ष झालेला त्यांनी बघितलाय.

शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवणे वगैरे असा शिक्षणामागचा महनीय विचार बिचार सांगणारे यच्चयावत दस्ताऐवज असले तरीही ‘शिक्षण = नोकरी’ (करिअर) हे समीकरण कोणालाही नाकारता येणार नाही, हा सांगायचा मुद्दा आहे. किंबहूना तसे केल्यास ती आपणच आपली फसवणूक करून घेतल्यासारखे होईल. करिअरच्या कमानीखालून आत शिरायला पदवीचे भेंडोळे मुलांना, पालकांना हातात लागतेय. या शिकण्याचा ज्ञान मिळवणे, बौद्धिकदृष्ट्या उन्नत होणे, काही विशेष गोष्टी अवगत होणे, जबाबदार नागरिक घडवणे याशी काडीमात्र संबंध उरलेला नाहीये, हे नक्की!

दुसरा मुद्दा म्हणजे बारावीनंतरच्या शिक्षणातील सगळे ‘यश’ आपल्याकडे संपूर्णपणे परीक्षेत मिळालेल्या गुणांशी जोडले गेलेले आहे. ‘गुण आणि गुणवत्तेचा फारसा संबंध नसतो’, अशी वाक्ये फार फार तर सुविचार म्हणून शाळेच्या भिंतीवर लिहायला भाषणात बोलायला ठीक! आज परीक्षेत मिळालेले मार्क्स हेच मुलांच्या शैक्षणिक आयुष्यातले अत्यंत क्रूर वास्तव आहे. त्याचा आयुष्यावर भलाबुरा परिणाम होतो, हेच तंतोतंत खरे आहे.
तरुण मित्रांशी बोलताना नेहमी जाणवते की, बहूतेक मुलं जे शिकताहेत, ती स्वतःची आवड म्हणून नव्हे, तर व्यवस्थेने त्यांच्यावर केलेली ती एकप्रकारची बळजबरीच आहे! भारतीय शिक्षणात अत्यंत दुर्दैवाने मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा विचार कुठेही होताना दिसत नाहीये. कलचाचण्या कशाशी खातात हे आपल्याकडे माहीत नाही. मोठ्या मोठ्या शाळांत साधी समुपदेशनाची सोय नाही. आज विविध शाखांमध्ये जी काही मुलं शिक्षण घेताहेत, त्यांचा एखादा सर्वे कोणीतरी करायलाच हवा म्हणजे आपल्याला समजेल की, किती मुलं आपल्या आवडीनिवडीनुसार शाखा निवडताहेत ते!

‘लाईफमध्ये तुम्ही शाळा-कॉलेजात जाऊन काहीतरी शिकायलाच पाहिजे, असं पॅरेंन्टसचं आणि मेन म्हणजे सिस्टीमचं जाम प्रेशर असतं. प्रेशरपेक्षाही ते कम्बल्शनच असतं म्हणा. अनेकदा काय शिकायचं याचाही चॉईस आम्हा मुलांना नसतोच. आमचे अनेक प्रोजेक्टस् म्हणजे निव्वळ डॉन्की वर्क असते! सो मग काय करणार?’ उच्च शिक्षण घेणारी नेहा सांगत होती.

मुलांना आवडेल तसे शिकवायचे. त्यात गरजेइतके पैसे मिळवून आनंदाने जीवन जगता येईल, अशी व्यवस्थाच आपण निर्माण करू शकलेलो नाहीये. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था या मुंबई येथील संस्थेची सद्यस्थिती कशी आहे, तिथले लोकं नेमके काय करत आहेत, याचा जरा कानोसा घेतला म्हणजे आपण आपल्या 'भविष्या'वर किती गांभीर्यपूर्वक काम करतोय हे समजेल.

करिअरच्या हजारो वाटा असतात. पण आम्ही मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि स्पर्धा परीक्षांवरच अडून बसलेलो असतो. केवळ यात यशस्वी झालेल्यांवर आम्ही यशाची, गुणवत्तेची मोहर लावतो! मग यातले यशस्वी मुलं आयडॉल बनून राहतात. मग याचेच अनुकरण केले जाते. मागून येणारे पालक आणि शिक्षण व्यवस्था या दलदलीत विद्यार्थ्यांना ढकलत राहतात. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रांत गुणवत्तेवर एकूण संख्येपैकी किती टक्के मुलांना प्रवेश मिळणं शक्य आहे? अधिकारी होऊन होऊन किती होऊ शकतात? म्हणूनच शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या याशी जोडून पाहिल्यावर लोकप्रिय कोर्सेसला मुकलेल्या मुलांना काय झेलावं लागत असेल याचा अंदाज बांधता येतो. मुलभूत विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात आम्ही भरपूर मार खातो वगैरे आशा चर्चा होत राहतात. यासाठी वातावरण, सुविधा आणि आवश्यक पैसा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची? याचा विचार करायला कोणाला सवड आहे कोणाकडे?

करिअरचे भूत पालकांच्या मानगुटीवर बसले आहे. ते उतरायला तयार नाहीये. शिकणाऱ्या मुलांच्या मनावर पिअर्सचे मोठे प्रेशर असते. अभ्यास केलाच पाहिजे, त्या कठोर शिस्तीतल्या परीक्षा दिल्याच पाहिजेत, चांगले मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजेत. मगच नोकरी मिळण्याची शक्यता असते. असे झाले तरच आयुष्याची इतिकर्तव्यता होते! यातून होतंय असं की, आपल्या देशातील आजचं तरुण मनं अभ्यासाच्या मोठ्या ओझ्याखाली दबलेली दिसताहेत. मनातल्या मनात चरफडताहेत. ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’, अशी त्यांची दारुण मनोवस्था आहे.

मुग्धा म्हणाली “बारावी सायन्सला फक्त केमिस्ट्रीचं पाचशे पेजेसचं पुस्तक आहे. हजारो वर्षांत फिजिक्समध्ये जे काही घडलेय, शोध लागलेत, ते आख्खं कंटेंट कंसेप्टसह आम्ही पोरांनी फक्त दोन वर्षांत कसे काय अभ्यासायचे? शिकवणारे शिक्षकही नीट समजून सांगण्याचे स्किल्स असलेले मिळतीलच असे नाही. अनेक प्राध्यापकांनाच कंसेप्टस क्लिअर आहेत का, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांना पोर्शन कंप्लिट करायचा असतो, बस्स. कधी लॅबमध्ये नीट प्रॅक्टिकल धड होत नाही. शिकवलेले मुलांना समजतेय की नाही? याचा विचार फारसा होत नाही. यात आम्हा मुलांच्या डोक्याचा पार भुगा होतो. पण आमची कोणाला काहीच पडलेली नाहीये. न्यूटन जन्माला आला नसता तर बरे झाले असते असे वाटते कधी कधी..!"

आपल्याकडे बारावीनंतरच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांवर मुलांचे ‘भविष्य’ ठरते. बारावीनंतरच्या JEE mains आणि advance याशिवाय अभियांत्रिकी प्रवेशासाठीची सीईटी, वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची ‘नीट’ याशिवाय अन्य चांगल्या शैक्षणिक संस्था/महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा वेगळ्या. या निरनिराळ्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सध्याच्या शिक्षणाला समांतर अशी बाजारू शिक्षण व्यवस्था उभी राहिलीय. यात मुलांचे मानसिक, भावनिक, बौद्धिक, शारीरिक आणि पालकांचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. काही लाख रुपये ओतले. मुलांना एकदा तिकडे घातले की, आपल्या मुलांचे करिअर बनून जाईल, अशी पालकांची अपेक्षा असते. यामुळे झालेय असे की, शहरांतील कनिष्ठ महाविद्यालये जवळजवळ ओस पडलेली दिसताहेत. या प्रकारच्या परीक्षांची तयारी करून घेणारे गल्लाभरू कोचिंग क्लासेस सध्या जोरात सुरू आहेत. त्यातल्या काहींचा वर्षाचा टर्न ओव्हर पाचशे ते हजार कोटींच्या घरात आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यापर्यंत यांची मजल गेली आहे! या इथल्या व्यवस्थेने मुलांना आणि पालकांनाही शब्दशः वेठीला धरले आहे.

“एखाद्या विषयात/शाखेत आवड असणं निराळं आणि त्या कोर्सला अॅडमिशन मिळवायला सीईटीसारखी अत्यंत टफ अशी एखादी इंट्रास एक्झाम क्रॅक करावी लागणं वेगळं. खरे तर ते एक टेक्निक असतं. काही मुलांना ते साधतं, स्मरणात ठेवून उत्तर लिहिता येते. काही मुलांची अक्षरशः वाट लागते. विषयातील आवड कोणच विचारत नाही. अशा वेळी खूप चिडचिड होते. त्रास होतो. पण आमचं ऐकतंय कोण." शुभम सांगत होता...

"मला चौथीपर्यंत शाळा शिकायला आवडायचं, पुढे शिकताना मी आनंदानं कधी शाळा/कॉलेजात गेली नाही!"
मनस्वीनी सांगते.

मुलांच्या मौनातला आकांत खरेच शिक्षक-पालकांना ऐकू येईनासा का झालाय ?  आपली कॉलेजेस, विद्यालयं भयालंय तर झालेली नाहीयेत ना? मुलांशी बोलताना प्रश्न पडतो आणि आता याचा गंभीर विचार करायची वेळ आता आलीये.

“आठवीपासून JEEची तयारी करणारा एक मुलगा या सगळ्यातून जाताना अपयश पदरी पडल्याने खूपच डिप्रेशनमध्ये गेला. पुढची दोन वर्षे तो मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेत होता...” धनेश सांगत होता.

राज्यस्थानातील कोट्यामध्ये या प्रकारच्या प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेल्या मुलांना अभ्यासाचे दडपण आणि कथित अपयशाने पछाडले आहे. तिकडे आत्महत्या वाढत आहेत. २०१५मध्ये १९ तर २०१६ मध्ये चार महिन्यांत पाच विद्यार्थ्यांनी आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवलीये. या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या रविकुमार सुरपूर या कोट्याच्या कलेक्टर महोदयांनी तिथं कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तब्बल दीड लाख पालकांना आणि क्लास चालकांना भावनिक आवाहन करणारे पत्र अलीकडेच लिहिलेय.

‘अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रं वगळून इतर क्षेत्रं निवडण्याचा सल्ला त्यांनी मुलांना-पालकांना दिला आहे. जीवन खूप सुंदर आहे, आयुष्यात परीक्षा हेच सर्वस्व नाही!’ असेही त्यांनी सांगितले आहे. प्रशासनाला अशाप्रकारची दखल घ्यावी लागणं म्हणजे ही एका अर्थाने ‘शैक्षणिक आणीबाणी’ नाहीतर काय आहे? परीक्षेला बसलेल्यांपैकी किती टक्के मुलांना अशा परीक्षांतून प्रवेश मिळतो, याचा विचार ना पालक करतात. ना त्याचे इथल्या धुरिणांना किंवा व्यवस्थेला काही घेणे देणे आहे.

एक अभ्यास असं सांगतो की भारतातले सुमारे पाच लाख मुलं JEE मेन्स ही प्रवेश परीक्षा देतात. त्यातले दहा हजार मुलं निवडले जातात, तेव्हा चार लाख ९० हजार मुलं ऑलरेडी बाहेर फेकले गेलेले असतात. राज्यातल्या २६ हजार कनिष्ठ महाविद्यालयांतून शिकणारी मुलं संख्येने किती आहेत आणि त्यांच्यासाठी एमबीबीएसच्या राज्यात सर्व मिळून जागा आहेत त्या २५ हजार! या रॅट रेसमध्ये मुलं स्वतःही सहभागी होतात, पण जास्तकरुन पालक ढकलतात! उसाचं टिपरु चरकात घातल्यावर त्याचं जसं चिपाड होतं तसं मुलांचं होताना दिसतं, हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही का?

मुलं ज्या घरातली आहे, तेच लोकं बघून घेतील, असा आपला त्रयस्थ दृष्टीकोन असतो. मुलं म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे, या देशाचं भविष्य आहे, त्यांना चांगल्या प्रकारे वाढवणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे, असं आपल्याकडे मानलंच जात नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा मुलांना काही विचित्र प्रकारच्या निर्णयांमुळे त्रासाला सामोरे जावे लागते तेव्हा, आपली सबंध व्यवस्था याबाबत फारशी संवेदनशील नसल्याचा अनुभव वारंवार येत राहतो. अनेकदा तर केंद्र आणि राज्य सरकारं एकमेकांकडे बोट दाखवत राहतात. तेव्हा खूप चीड, अस्वस्थता येते, वाईट वाटते. ‘तरुण आपल्या देशाचे बलस्थान आहेत,’ अशा बाता आपले कारभारी भाषणांतून मारतात. कृतीचा दुष्काळ मुलांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरतो. हे तरुण मन जर असे पोखरले गेलेले असेल, तर त्यांनी भविष्यात देशासाठी काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावे, अशी अपेक्षा तरी कशी ठेवावी?

जीवनात सहजासहजी कोणाला काहीही मिळत नाही, हे खरेच आहे. आयुष्य अनपेक्षित घटितांनी भरलेले आहे. आयुष्याला सामोरे जाण्याची, संघर्ष करायची मुलांची तयारी असली पाहिजे. यात अजिबात दुमत नाही. मुलांनी आपला अभ्यास केला पाहिजे, परीक्षा दिल्याच पाहिजेत, मार्क्स/ग्रेडस मिळवलेच पाहिजे. नोकरी, उद्योग, व्यवसाय काहीतरी करुन जगायपुरते पैसे कमावलेच पाहिजेत, हे खरेय. पण त्यासाठी असा जुगार का खेळायला लागावा? इतकी जबर किंमत का मोजायला लागावी? आपले आयुष्य डावाला लावायला लागणे, ही म्हणजे एकूण शिक्षण व्यवस्थेला लांच्छन आणणारी शर्मनाक गोष्ट आहे.

ज्या मुलांची स्मरणशक्ती उत्तम असते, त्या ‘हुशार’ मुलांनाही परीक्षा नावाच्या कठोर व्यवस्थेची इतकी भीती का वाटावी? कारण अनिश्चितता आणि असुरक्षितता हीच जणू आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेने मुलांसाठी दिलेली ‘देण’ आहे. त्या भोवऱ्यात मुलं गोलगोल फिरत राहतात. अनेक मुलांच्या नाकातोंडात पाणी शिरून ते गटांगळ्या खात राहतात. आम्ही काठावर बसून ‘मला काय त्याचे’, म्हणत शांतपणे बघत असतो.

बरं आपल्याकडे JEE, NEET यासारख्या प्रवेश परीक्षा द्यायला केवळ दोन संधी दिलेल्या आहेत. त्यात दुसरी संधी घेतली की आधीचे मिळालेले मार्क्स पुसून जातात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत SAT, ACT यांसारख्या प्रवेश परीक्षा द्यायला विद्यार्थ्यांना सहा वेळा संधी दिली जातेच. शिवाय आधीच्या दिलेल्या परीक्षेतले तुलनेनं जे जास्त मार्क्स मिळालेत ते तिकडे ग्राह्य धरले जातात. गणित आणि भाषेची मुलभूत क्षमता तपासण्यासाठी आधी युरोपियन देशांत घेतली जाणारी PISA ही परीक्षा आता जगभरातल्या बऱ्याच देशांत घेतली जाते. जगभर नावाजलेल्या या परीक्षेत फिनलंड हा लहान देश जगभरात आघाडीवर आहे. या परीक्षेची तयारी करून घेताना फिनलंडमध्ये मुलांमागे ‘स्ट्रॉँग सपोर्ट सिस्टीम’ उभी केली जाते. आपल्याकडे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणे अवघड नाहीये. पण गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची! मुलांना समजून घेण्याची आणि त्यांच्या संवेदनशील मनाला आणि मेंदूला जपण्याचीही...

‘दुःख परीक्षा असण्याचं नाहीये. परीक्षा जरूर असाव्यात. वैताग त्यात नावीन्य नसल्याचा आहे. इतक्या मास स्केलवर मुलांचे मूल्यमापन करायला असे काहीतरी टूल लागणारच. आक्षेप त्याच्या स्वरूपावर आहेत. आपला अभ्यासक्रमही application based असायला हवा. रिसर्चसाठी पोषक वातावरणाची गरज आहे. थिअरीसोबतच प्रॅक्टीकल्सचं, प्रोजेक्ट्सचं महत्त्व वाढायला हवं. पण हा फक्त चर्चेचा विषय म्हणून काही काळ टिकतो, पुढे काय होतं आपल्याला माहितीच आहे!’ मुंबई विद्यापीठात शिकणारी अश्विनी सांगत होती...

अमुक इतके मार्क्स मिळाले म्हणजे अमुक कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल? कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं म्हणजे छानपैकी करिअर होईल? याविषयी मुलं आणि पालक यांच्यात प्रचंड संभ्रम आहे. या संभ्रमाची कडू गोड फळे (इच्छा असो अगर नसो!) मुलांना चाखावीच लागतात. बरं एक गंमत म्हणजे इतके सारे शिकायचेय ते तरी कशासाठी? तर दूर देशात किंवा मोठ्या बहुराष्ट्रीय  कंपनीत मोठे पॅकेज देणारी नोकरी मिळावी यासाठी! जे शिकल्यावर नोकरी मिळते तितकेच शिकायचे असते! (कारण हा देश/समाज नोकरदारांचा आहे, हे ब्रिटिशांनी आधीच आपल्या समाजमनावर पक्के बिंबवलेय.) पैसा मोठा झालाय. आपण त्या दुष्टचक्रात फसलोत. फार मार्क्स नसले तरी तुम्ही आयुष्यात छान काही करु शकता, थोडे कमी पैसे मिळाले तरी मस्त आनंदात जगू शकता, हा विश्वास आपण मुलांना द्यायला हवा. पुढच्या काळात ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांचे नव्हे तर ज्यांचे आरोग्य चांगले असेल ते 'श्रीमंत' असतील, हे पण मनावर ठसवावे लागेल. मुख्य म्हणजे पालकांनी हे ठरवायला हवे की, आपल्याला कोणासोबत जगायचेय? मुलांनी आधी कमावलेल्या गुणांबरोबर आणि नंतर कमावलेल्या पैशांबरोबर की मुलांसोबत?

शेवटी असे आहे की, आपली मुलं शिकत असताना ‘मार्क्स मशीन्स’ आणि कमावती होतात तेव्हा ‘मनी मशीन्स’ नसतात.... एकदा पैसे आले की, मग पुढे तेच पाश्चिमात्यांचे आंधळे अनुकरण सुरू होते. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, ते चंगळवादी पर्यटन, त्या लखलखीत्या चंदेरी दुनियेत जगणं. पुढे जाऊन आयुष्याच्या एका टप्प्यावर यातला फोलपणा लक्षात येतो. ताणतणाव, आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले असतात. तेव्हा बराच उशीर झालेला असतो, तेव्हा पश्चाताप करणं, दु:खी होणं, माघारी फिरणं...  (म्हणजे याला अपवाद असू शकतील.) मग स्वभाविकच करिअर म्हणजे काय, असा प्रश्न पडतोच. तिकडे दूर अमेरिकेत आर्थिक मंदी येते त्यांचे परिणाम इथल्या मुलांच्या करिअरवर आणि एकूण अर्थकारणावर होत राहतात.

वास्तविक कोणतीही व्यक्ती जेव्हा आवडीच्या क्षेत्रात काम करते. तेव्हा ती आपल्यातले जे बेस्ट आहे ते त्यात ओतत असते. पण आपल्याकडे असे आहे की अनेकांचा आवडीचा विषय एक असतो आणि उत्पन्नाचा विषय भलताच! यातून एकूण समाजातल्या बौद्धिक वैभवालाच ग्लानी येण्याची शक्यता असते. यामुळं आपल्या ज्ञान परंपरेचेही मोठे नुकसान झालेय. मान्य आहे की, ज्ञान मिळवण्यासाठी शिकणे, ही वंचित घटकांतील अनेक कुटुंबांतल्या मुलांसाठी 'चंगळ' असू शकेल! जागतिकीकरणासोबत आलेल्या बाजारव्यवस्थेचे आपत्य असलेला हा करिअरवाद सगळीकडे बोकाळलाय. बाजार माणसाला माणूस म्हणून ओळखतच नाही. वस्तू खरेदी करणारा ‘ग्राहक’ म्हणून ओळखतो. त्याचे केवळ आर्थिक नाही तर सामाजिक परिणामही झाले आहेत.

आपली प्राचीन कोणती ती 'ज्ञान परंपरा' वैभवशाली होती, असे खुपदा सांगितले जाते, हे म्हणणे ठीक. पण हा इतिहास ती किती दिवस उगाळत बसायचा? वर्तमानात तुम्ही काय करत आहात, त्यातून नवा इतिहास रचला जातो, याचे भान ठेवायला नको? आणि आपले वर्तमान अस्वस्थ करणारे आहे, हे निश्चित.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये बहूतेक भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ काम करतात, त्यांना अमुक इतके पॅकेज मिळते वगैरे वगैरे... या गोष्टींचा वृथा अभिमान काय बाळगायचा? कारण त्यांच्या शिक्षणावर इथल्या सरकारने, समाजाने खर्च केलाय. ते तिकडच्या देशात जाऊन कुठल्यातरी कंपनीचा नफा वाढवायला हातभार लावत आहेत! त्यांचे ज्ञान, कौशल्य या देशाला विकासाकडे नेण्यासाठी उपयोगी पडायला हवे. मात्र तसे होत नाहीये.

मुलभूत विज्ञान संशोधनात तर आनंदी आनंद आहे. सरकार याविषयी गंभीर कधी होणार, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. नोबेल पारितोषिके मिळालेल्या शास्रज्ञांमध्ये किती भारतीय संशोधकांची नावं आहेत? जागतिक कीर्तीचे कलावंत, ऑलिंपिकमध्ये पदके जिंकलेले खेळाडू, लेखक-साहित्यिक, उद्योग-व्यापारात नाव कमावलेले लोकं किती आहेत? याचे कारण आमच्याकडे गुणवत्ता असलेली मुलं अल्पसंतुष्ट किंवा स्वार्थी तरी आहेत. नाहीतर त्यांची बौद्धिक झेपच तितकीशी मोठी नाही! म्हणूनच आपल्याकडे ज्याला गुणवत्ता म्हणतात त्याचाच नीट विचार व्हायला हवा. कोणी याला मोघम विधानही म्हणेल. पण जे चित्र दिसते, त्याचे विश्लेषण करू जाता हेच वास्तव समोर उभे ठाकते. याविषयी कधी तरी बोलायला हवे. कारण शोधांनी, संशोधनाने जग बदलते. याकडे डोळेझाक करता कामा नये. ती आपणच आपली केलेली फसवणूक होईल.

करिअर म्हणजे काय तर आधी म्हटल्याप्रमाणे दूर शहरात किंवा परदेशात जाऊन नोकरी करणे आणि पैसे कमावणे, अशी आपली ठाम समजूत आहे. आजही हा देश खेड्यांचा आहे, याचे भानच उरलेले नसल्याने शहरांकडे बेकारांचे लोंढेच्या लोंढे जाताना दिसत आहेत. तिकडं नीट काम मिळत नसल्यानं शहरांवरील भार आणि बकालीकरण वाढत आहे. नागरी सोयी-सुविधांवर भलता ताण येत आहे. या तरुणांच्या हाताला हाताला काम मिळाले असते तर स्थलांतर रोखणे शक्य होऊ शकतं. याशिवाय ग्रामीण विकासाला हातभार लागेल. शेतीतील अन्न धान्य आणि इतर जीवनावश्यक उत्पादनं सर्वांना हवी असतात. ती उत्पादित कोणी करायची? आज शेती करायला तरुण धजावत नाहीत. कारण हातानं काम करणारे लोकं आम्ही हलकट लेखतो. डोक्यानं काम करणारे लोकं सर्वच अर्थानं श्रेष्ठ असल्याचं आपली व्यवस्था मनावर बिंबवत राहाते. आपल्या मूल्य व्यवस्थेच्या मोजपट्ट्याही तसंच अधोरेखित करत असतात. प्रतिष्ठा कोणाला, कशाला द्यायची याचा विचार करताना आपल्या एकूण मूल्यव्यवस्थेला देखील काही प्रश्न विचारावे लागतील.

वास्तविक आपल्या गावाची गरज ओळखून अनेक सेवा, उद्योगांच्या वाढीला, विस्ताराला आज मोठा वाव आहे. बँकांचे कर्ज उपलब्ध आहेत. पण अशा गोष्टी करायला आम्ही मुलांचं मानस घडवलं कुठंय? एकीकडे उद्योगांना, सेवा क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळत नाहीये आणि दुसरीकडे तरुणांच्या हाताला काम नाहीये, अशा विचित्र कोंडीत आपण सापडलो आहोत. यासाठी करिअरच्या नव्या वाटा धुंडाळण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावे लागेल. करिअर या कंसेप्टकडे व्यापक अर्थाने बघायला मुलांना शिकवावं लागेल.

आज समाजाला उपयोगी पडेल, असे संशोधन करणे किंवा तत्सम काहीतरी सामाजिक स्वरूपाचं काम करणे या गोष्टीला कथित यशस्वी करिअरमध्ये जागाच नाहीये. करिअरीस्टीक मुलं परीक्षार्थी बनून जगतात. अभ्यास एके अभ्यास करताना झापडबंद नजरेने आयुष्याकडे, समाजाकडे बघत असतात. अशा अनेक मुलांचं एकूण व्यक्तिमत्त्व सुमार दर्जाचे असल्याचे दिसते.

शेवटी असे आहे की, भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांतून वैयक्तिक कुटुंबाचा उत्कर्ष जरूर होऊ शकेल. पण ज्या देशाने/समाजाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केलेला असतो त्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजोपयोगी गोष्टी करायचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवाये. आज तो होताना दिसत नाहीये, याचा खेद वाटतो. नोबेल पारितोषिक विजेते ख्यातनाम अर्थशास्रज्ञ अमर्त्य सेन म्हणतात की, ‘आपल्याकडील ज्ञान, कौशल्य आपल्या अवतीभोवतीच्या समाजाच्या उन्नयनासाठी, उत्थापनासाठी उपयोगी पडत नसेल तर ते कुचकामी ठरेल.”

*भाऊसाहेब चासकर,*
९४२२८५५१५१.
bhauchaskar@gmail.com
(लेखक जिल्हा परिषदेच्या शाळेत सहायक शिक्षक असून, शिक्षण क्षेत्रातील  कार्यकर्ते आहेत.)

Sunday, July 10, 2016

आनंदाचा झरा

!! आनंदाचा झरा ॥

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

'साहेब, जरा काम होतं.'

'पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?'

'नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.'

'अरे व्वा ! या आत या.'

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

'किती मार्क मिळाले मुलाला ?'

'बासट टक्के.'

'अरे वा !' त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं.
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता.

'साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !'

'अच्छा, म्हणून पेढे वगैरे !'

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला,
'साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले - यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते - शांत वातावरन ! - आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.'

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, 'साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको - सगल्य्यांना वाट !
हे नुसते पेढे नाय साहेब - हा माझा आनंद आहे !'

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, 'शिवराम, मुलाचं नाव काय?'

'विशाल.' बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं - प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात रहा - तुझ्या बाबांसारखा !

'शिवराम हे घ्या.'

'साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.'

'हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातुन.'

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

'चहा वगैरे घेणार का ?'

'नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून...’

‘घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !' मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खुप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा - तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.

आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !

‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ - आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोजिशन', आणखी टक्के.. !
या 'आणखी'च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !

RTE - 2009 ची कलमे

RTE ची कलमे

✏RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे
शीर्षक,
कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.

कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास
प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक
त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी
शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची
स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा
अधिकार.


शाळा

शाळा...!!!!!

अमोल परब

आज सकाळी बाल्कनीमध्ये उभा होतो.सहज म्हणून समोरच्या देशपांडेंच्या घरात लक्ष्य गेल.आज त्याच्या घरात बरीच गडबड ऐकू येत होती. काय तर म्हणे छोट्या प्रथमेशचा आज शाळेचा पहिला दिवस होता. घरात त्याच्याच तयारीची लगबग चालु असताना प्रथमेश मात्र अगदी तयार होउन दारात उभा होता. त्या दोन -सव्वा दोन फ़ुटी देहाची भारी गंमत चाललेली दिसत होती. निळ्या रंगाची हाफ़ पॆंट, सफ़ेद रंगाचा शर्ट,शर्टाच्या खिशाला अडकवलेला गुलाबी रुमाल,कोरे करकरीत बूट,ह्या वयात पाठीमागे उगाचच अडकवलेले दफ़्तर, गळ्यात डौलात डोलणारी नाजूक वॊटरबॊटल, आणि ह्या सगळ्यांच्या सोबतीला आता ह्याने एव्हढा रेनकोट घातलाच आहे मग आपणही थोड तरी का होईना बरसलं पहिजे अश्या अर्विभावात आलेला पाउस.सगळं कसं मस्त जुळून आल्यासारखं वाटत होतं.
थोड्याच वेळात आजीचा हात पकडुन पाठीमागे उभ्या असलेल्या आईला जोर-जोरात टाटा करुन स्वारी अगदी खुशीत मोहिमेवर निघाली. ह्या इवल्याश्या प्रथमेशला शाळेत जाताना पाहुन मला ही माझा शाळेतला पहिला दिवस आठवला मी ही असाच खुश होतो. नवीन नवीन ड्रेस,छान छान बूट,पहिल्यांदाच मिळालेले दफ़्तर,सुंदरशी वॊटरबॆग आणि वर सगळ्यांनी आपलं केलेल कौतुक. फ़ार मस्त फ़िलींग होत ते.आईचा हात पकडून शाळॆत जाताना फ़ार मजा येत होती.पण माझा हा उत्साह शाळेच्या गेटवर आईने हात सोडल्या सोडल्या धारातीर्थी पडला.सभ्य भाषेत सागांयच तर "गळपटलान"......
मग काय विचारता ही रडारड नुसती......तिथे माझ्यासारखे बरेच समदुखी: होते.घरी मी मस्ती केली की बुआ येइल आणि त्याच्या घरी घेउन जाइल ही आजीची धमकी आता खरी वाटायला लागली....ही जागा एकदम वाईट आहे हे माझ एकमत झालं पण ते जास्त दिवस टिकलं नाही. ती जागा, तिथल्या बाई, त्यांनी शिकवलेली गाणी, सांगितलेल्या गोष्टींमध्ये मन रमायला लागलं, रोजच्याच सवयीच्या पण नवीन नवीन गोष्टी शिकताना मजा येउ लागली. ही जागा वाटली होती तितकी काही वाईट नाही अस मन हळुहळु मला समजावू लागलं.

माझ्या प्रथमदर्शी अंदाजानुसार शाळा वाटत होती तेव्हढी काही त्रासदायक नव्हती. हो...फ़क्त सकाळी लवकर उठायचा तेव्हढाच काय तो एक त्रास होता. शाळेत आम्हाला तसं काही विशेष काम नसायची. तशी नाही म्हणायला काही न टाळता येण्यासारखी काही कामे होतीच त्यातल एक महत्त्वाचे काम म्हणजे दररोज शाळेत येणे. शाळेत सर्वप्रथम व्हायची ती प्रार्थना त्यानंतर राष्ट्रगीत पुढे पुढे ही सकाळची प्रार्थना आणि राष्ट्रगीत हे दिवसाचे अविभाज्य घटक बनून गेले.नंतर थॊडावेळ आभ्यास चालायचा. तो आभ्यास म्हणजे तरी काय तर शिकता शिकता खेळणे आणि खेळता खेळता शिकणे. ह्यात सुरुवातीला शिकण्यापेक्षा खेळण्याचाच शेअर जास्त होता.
शाळेत शिकवणार्‍या बाई ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसुन आपलीच कुणीतरी मावशी ,आत्या किंवा काकी आहे फ़क्त सगळ्या मुलांनी तिला वेगवेगळ्या नावांनी हाक मारल्यावर तिने गोंधळून जाउ नये म्हणून तिला "बाई" अशी हाक मारायची हा (गैर) समज माझा बरीच वर्ष म्हणजे बाईंची मॆड्म होईपर्यंत कायम होता.
दिवसामागुन दिवस जात होते. मस्तीची जागा हळुहळु आभ्यासाने घ्यायला सुरु केली.
"अ" रे अननसातला........."आ" रे आगगाडीतला..........
सुरात म्हणताना आमची मुळाक्षरांची गाडी आता हळुहळु रुळावर येउ लागली होती. अंकलिपीच्या मदतीने छोटी छोटी वाक्य म्हणायला फ़ार मजा यायची
"अमर इकडे ये"
"कमल पाणी घे"
"वैभव वैरण घाल"
अशी वाक्य म्हणता म्हणता एकेदिवशी अतिशहाणपणाने "बाबा चपला आण" म्हटल्यावर मिळालेला धपाटा आज ही लक्ष्यात आहे. त्यावेळेस आपल नक्की काय चुकलं होत हे समजायचे ते वयच नव्हते. ती समज पुढे शाळेनेच दिली

एव्हाना आमचं आयुष्यातलं पहिलं वहिलं प्रमोशन झालं होतं. म्हणजे आम्हाला शिशु-वर्गातून पहिलीला बढती मिळाली होती. पण एक गोची झाली होती. ती म्हणजे,आजवर एकाच पुस्तकात सख्या भावंडासारखे गुण्यागोविंदाने रहाणारे सारे विषय, एखाद्या हिंदी चित्रपटाच्या स्टोरीसारखं अचानक प्रत्येकाने आपापला वेगळा संसार थाटावा तसे आपापली सेपरेट पुस्तक घेउन आले होते. मी तर जाम बावचळून गेलो होतो. पण आम्हाला शिकवणार्‍या शिक्षकानां मात्र ह्या गोष्टीचं कसलचं टेन्शन नव्हतं. खरंतर त्यांना हे सगळे विषय एकसाथ एकत्र कसे काय येतात हाच त्यावेळी माझ्यासाठी एक आभ्यासाचा विषय होता. पण तरीही एकूण हा सारा प्रकार सुखावणारा होता. आम्हाला मात्र अचानक एकदम मोठं झाल्याचा फ़िल येउ लागला. पण या नविन फ़िलींगसोबत एका नवीन संकटाचीही वर्दी मिळाली आणि हे संकट तात्पुरतं नसून,आता ह्या शाळेत असे पर्यंत आपल्याला ह्या संकटाशी सामना करावा लागणार आहे हे ही कळून चुकलं. मोठी माणसं ह्याला "परिक्षा" म्हणायचे.
शाळेतली परिक्षा आणि नाक्यावरची रिक्षा ह्याचा काहीतरी संबध नक्की असावा असं मला नेहमीच वाटायचं. निदान परिक्षेला जाताना तरी नेहमी रिक्षाने जायलाच पहिजे अशी त्यावेळी माझी ठाम समजूत होती. पण माझ्या आणि त्या रिक्षावाल्याच्या दुर्दैवाने मी अनेकदा समजावून माझ्या आईची तशी काही समजूत झाली नाही तेव्हाच मला कळले की ही काही माझ्या इतकी समजूतदार नाही....असो......

शैक्षणिक आभ्यासासोबत आमची सामाजीक आणि सांस्कृतीक जडणघडणही फ़ार जोमाने होत होती. १५ ऒगस्ट, २६ जानेवारी ह्यादिवशी होणारे ध्वजवंदन, परेड, मुख्याध्यापक सरांच भाषण, देशभक्तीपर गीते, आमच्यापैकीच कुणीतरी गांधी, कुणी पंडितजी तर कुणी सरोजीनी नायडू बनलेले असायचे. ह्या सगळ्या गोष्टीनी सारं वातावरण कसं भारावलेले असायाचे. आषाढी एकादशीला न चुकता पालखी निघायची. मिरवणुकीच्या लेझिम पथकापुढे झेंडे नाचावायला आमच्यात फ़ार चढाओढ लागायची. कृष्ण-जन्माष्टमी, सरस्वती पुजन हे सण आमच्या शाळेत साजरे व्हायचे. रक्षाबंधनला मैत्रीणीकडुन तेही स्व:ताहून बांधुन घेतलेल्या राख्यांनी भरलेला हात मिरवताना आज आठवला की खुप हसु येतं. डिसेंबर महिना उजाडला की सगळ्या शाळेला वेध लागायचे ते सहलीचे.
आजही आठवत की मला सहलीच्या आदल्या रा्त्री कधीही झोप लागयची नाही. कारण सहलीच्या दिवशी हमखास न चुकता मला शाळेत पोहचायला अंमळसा उशीर झालाय आणि सहलीची बस मला एकट्याला टाकून निघून गेली आहे अशी काही बाही तेव्हा स्वप्न पडायची. एकतर सहलीची तयारी मध्यरात्रीपर्यंत चाललेली असायची त्यात परत पहाटे पहाटे पडललेली स्वप्ने खरी होतात असं कुणीतरी सांगितलेले लक्ष्यात असायचे.....उगाच आपल्याला ते दळभर्दी स्वप्नं नेमक तेव्हाच पडलं तर काय घ्या......त्यापेक्षा न झोपणं हा ह्या प्रोब्लेमवरचा तत्कालीन एकमेव उतारा होता....
सहलीची ठिकाणंही ठरलेली होती......एक तर राणीची बाग , नाहीतर छोटा काश्मीर अगदीच लांब जायचं तर म्हातारीचा बूट......त्या म्हातारीच्या बूटाला पाहून एव्हढा मोठा बूट घालणारी ती म्हातारी नक्की रहाते तरी कुठे हे माझ आजतागायत न सुटलेलं कोडं आहे.वर्षाच्या शेवटच्या सत्रांत येणारे स्नेह-संमेल्लन म्हटलं की आमच्या दृष्टीने एक पर्वणीच असायची. शाळेतले शिक्षक आमचा नाच तसेच आमची गाणी पोवाडे बसवायचे फ़ार फ़ार मज्जा यायची. आजवर आम्हाला आपल्या छडीच्या तालावर नाचवणारे आमचे शिक्षक चित्रपट संगीतावर आमचा नाच बसवताना पहाताना आम्हाला नवल वाटायचं. एकदम M.P.D. चीच केस वाटायची. स्नेह-संमेल्लनाच्या दिवशी आपला कार्यक्रम स्टेजवर चालु असताना नजर मात्र प्रेक्षकांमध्ये आपल्याकडचं कुणी आलयं का? ह्याचा शोध घेत असायची आणि शोधता शोधता आपल्याला हवं ते माणूस गवसलं की आपल्या नजरेतलं उत्साह त्यांच्या नजरेतल्या कौतुकाला भेटुन यायचा. सरते शेवटी यायची ती परिक्षा....आता तिची पुर्वीसारखी एव्हढी भिती नाही वाटायची.आपण बरं आणी आपला आभ्यास बरा हा आजोबांनी सांगितलेला मंत्र लक्ष्यात ठेवला की ती ही फ़ार कटकट करायची नाही. थोडक्यात काय..तर अगदी मस्त चाललं होतं आमचं!!!!!

पहिली ते चौथी हा प्रवास तसा निवांत होता. पण एखाद्याची शाळा घेणं म्हणजे नेमकं काय हे मात्र पाचवीला कळलं माणुस जन्माला आल्यावर त्याच्या पाचवीला एव्हढ का महत्त्व देतात हे एकदातरी पाचवीला गेल्याशिवाय नाही कळणार. तसं बघायला गेलं तर फ़ारसं काही बदललं नव्हतं..पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र बदलली होती. आजवर सगळ्या विषयांसाठी एकच शिक्षक अशी साधी सोप्पी सवय होती. पण इथे तर प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक होते. आता तर माझ्यासोबत विषयांचीही काही खैर नव्हती.
भाषा, गणित, विज्ञान, इतिहास आणि भुगोल ह्या पांडवामध्ये आता "इंग्रजी" नावाच्या अजुन एका भांवडाची भर पडली होती. हा नक्कीच कर्ण असावा. कारण सगळे पांडव जरी एकापेक्षा एक भारी असले तरी ह्याचा दरारा जबरदस्त होता. "शिकणारा एक और शिकवणारे सहा......बहुत नाइंसाफ़ी है रे" अश्या असामाईक समीकरणाचा प्रश्न गब्बरला बहुदा सर्वप्रथम पाचवीलाच पडला असणार...............
इंग्रजी या विषयाचे सगळंच काही तर्हेवाईक होतं. आपलं मराठीत बरं असतं कुठलही अक्षराला वयाची मर्यादा नाही पण इथे लहान असतानाचा "a" वेगळा आणि तोच "A" जेव्हा मोठा होतो तेव्हा वेगळा. बरं पुन्हा सगळं इथवरच थांबलं असतं तोवर ठिक होत. पुन्हा त्यात कर्सु रायटिंग हा एक अजब प्रकार होता. बहुतेक ज्यांना डॊक्टर किंवा मेडिकलवाला व्हायचं आहे अश्या मुलांचा इन्टरेस्ट लक्ष्यात घेउनच ह्याचा शोध लावण्यात आला असावा ह्यावर माझं लवकरच शिक्का मोर्तब झालं. तसं नाही म्हणायला मी ही ह्याच्या वाटेला कधीतरी जाउन आलो होतो. अगदी उलट्या हाताने देखिल लिहुन पाहिलं तरी आमचा कर्सु काही सरळ येईना. तेव्हा कळलं की ही अगदी माझ्या हाताबाहेरची केस होती. प्रत्येक विषय आता स्वत:चा मोठेपणा पुढे पुढे करु पहात असताना मी मात्र वर्गात एक एक बेंच मागे सरकत होतो.........
अरे हो बेंचवरुन आठवलं.. शाळेत सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला गॆल्मर असेल तर ते म्हणजे शेवट्च्या बेंचला...ह्या बेंचची गोष्टच वेगळी होती. तशी वर्गातली पुढची बाके ह्याच्या वाटेला सहसा कधी जात नसत.
पुढची बाके आभ्यासात हुशार, तर ही दुनियादारीत.
पुढची बाके एक्कलकोंडी, तर ही सदा गर्दीचा सेंटरपोंईट,
पुढची बाके टिचररुममध्ये फ़ेमस, तर हा टिचररुमचा चर्चेचा विषय.
पुढच्या बाकांवर शिक्षकांचे विषेश लक्ष्य, तर ह्याच्यावर बारीक नजर
पुढची बाके आपल्या अक्कल हुशारीने ह्याच्यांकडे जाणूनबुजून जरी दुर्लक्ष्य करत असले तरी त्या बिचार्‍यानां माहित नव्हते की त्यांची हुशारीचे कौतुक ह्यांच्या शर्यतीत भाग न घेण्याच्या आळशीपणावर अवलबूंन होते. पण हे सारे बेंच कसेही असले तरी त्यावेळी ते त्यावर बसणार्याची प्राईव्हेट प्रोर्प्रर्टी होते. बरं ही एव्हढी प्रोर्प्रर्टी त्यावेळी नुसती त्यावर करकटकने आपलं नाव कोरुन आपल्या नावावर करता येत होती. वर बसायच्या जागेवर मधोमध आपल दफ़्तर टाकलं कि झाली आपली टेरीटरी मार्क्ड. खरचं किती सोप्प होतं आयुष्य तेव्हा...........

जस जस शाळेचे वय वाढु लागलं तसं तसं
भाषेतल्या गोष्टी अजून मोठ्या होत गेल्या. गणिताची आकडेमोड हातापायांच्या बोटांत मावेनाशी झाली. विज्ञान स्वत:सोबत माझ्यावरही वेगवेगळे प्रयोग करत होता. इतिहासातली सनावळ ही भुतावळीसारखी मानेवर बसली
होती, भुगोल स्व:ताचा देश सोडुन एखाद्या N.R.I सारखा इतर देशांचे गोडवे गाण्यात धन्यता मानु लागला होता. नागरीकशास्त्राने आपल्याला आपल्या आकारमानामुळे कुणीच भाव देत नसल्याचे लक्ष्यात येताच त्यानेही आता अर्थशास्त्राला सोबतीला घेउन आम्हाला जेरीला आणण्याचा जणू विडा उचलला होता. पण आम्हीही आमच्या कुवतीनुसार ह्या सगळ्या स्वार्‍यानां मोठ्या हिमतीने तोंड देत होतो. ज्यांची हिंमत तुटायची असे आमच्यातले काही शूरवीर मग गनिमी काव्याचा वापर करायचे...
आता हा गनिमी कावा म्हणजे काय हे मी तुम्हाला वेगळ सांगयाला नको.............
सातवीनंतर शाळा थोडी बिनदास्त बनू लागली. आतापर्यंत अगदी आखीव रेखीव असणार्‍या केसांच्या परंपरेत हळुच एक कोंबडा किंवा एक बट भुरभुरु लागली. शर्टाची कॊलर पुढनं खाली आणी मागनं उभी राहु लागली. बोलण्यात इतरांना ऐकायला जड जातील असे शब्द येऊ लागले. आजवर एकटे एकटे फ़िरायचो आता फ़िरताना खांद्यावर एक हात कायम असायला लागला. गप्पांचे विषय बदलले. जे इतर कुठे बोलता यायचे नाही ते गुपीत सांगायला एक विश्वासाचा कान मिळाला. राडा झाल्यावर आपल्या बाजुने घुमणारा आवाज मिळाला.शाळेत आजवर ओळखी तर होत्या,पण आता एक सोबतीही मिळाला. आजवर सगळी नाती समजली पण दोस्तीची खरी ओळख ही शाळेनेच करुन दिली. खरी मैत्री म्हणजे काय हे शाळेशिवाय नाही कळणार. मैत्री नंतरही भरपूर झाल्या. काहीशी आवडी जुळल्या तर कुणाशी व्यवहार, पण बिनमतलबी मैत्री ही फ़क्त शाळेतच झाली. बाकिच्या ठिकाणी फ़क्त मेंदुच जुळला मन फ़ार क्वचित जुळली.....काय पटतयं ना...!!!

बघता बघता शाळा मॆच्युअर्ड होउ लागली. आजवर अंगात असलेल्या सुप्तगुणांना शाळेने व्यासपीठ दिला. मला आजही आठवतयं पहिल्यांदाच भाषणासाठी व्यासपीठावर उभं रहाताना समोरचा श्रोतावर्ग पाहुन हातापायाला कापरं भरलं होतं. तेव्हा कोपर्‍यात उभे असलेल्या मराठीच्या सरांकडे नजर जाताच त्यांनी डोळ्यांनी "मी आहे इथे तु घाबरु नकोस" असा विश्वास दिला. मी अख्खच्या अख्ख भाषण त्यांना पाहुन ठोकलं. बक्षिस मिळालं नाही ह्याची काडिमात्रही खंत नाही, पण त्यानी मला मी बोलु शकतो हा जो विश्वास दिला तो आज प्रत्येक ठिकाणी कामी येतो. आम्हाला शिकवणार्‍या शिक्षकांची शिकवतानाची धडपड पाहुन आम्हालाही शिकण्याचा हुरुप येत होता. शाळेतली टिचररुम ही बाजारात मिळणार्‍या कुठल्याही गाईड किंवा अपेक्षितपेक्षा जास्त परिणामकारक वाटु लागली.
शाळेतल्या शेवटच्या वर्षाला शिक्षकदिनानिमित्त आम्हाला एकदा एका दिवसासाठी शाळा चालवायला दिली होती. सुरुवातीला उत्साहाने उचलेली हि जबाबदारी उत्तरोत्तर डोईजड वाटु लागली तेव्हा जाणवलं की आजवर शिक्षकांनी आम्हाला किती नाजुकपणे सांभाळल होतं..फार काळजीपूर्वक घडवलं होतं.......मातृदेवो भव: पितृदेवो भव: बरोबर गुरुदेवो भव: का म्हणायचं हे त्यावेळेस उमगलं. घराबाहेर आमचे पालकांच्या भुमिकेत असलेले हे शिक्षक वेळेला आमच्या त्या अडनड्या वयात आमच्या समजुतदार मित्रांची भुमिकाही चोख पार पाडत असत. आजवर शिक्षकांच्या बाबतीतली असलेल्या भितीची जागा आता त्यांच्याविषयीच्या आदरांने घेतली होती. सुरुवातीपासुन आभ्यासाप्रती असलेल्या नाइलाजाची जागा आता आवड घेउ लागली. भाषा, गणित, विज्ञान आणि इतर सारे विषय आता आपले संवगडी वाटु लागले होते. तर परिक्षा एक खोडकर मैत्रीण...दहावी नावाच्या शेवटच्या वर्षाचा घरच्यांनी दाखवलेला बागुलबुआही आम्हाला कधी घाबरवू शकला नाही कारण शाळेतल्या शिक्षकरुपी देवापुढे त्यांची मजल नाही ह्याची आम्हाला खात्री होती...

सगळं कसं अगदी व्यवस्थीत चालु असताना नेमका तो दिवस आला.....
"सॆंड-ऒफ़"
इतके दिवस ह्या दिवसाच आकर्षण होते......आणि आज तो नेमका उजाडला..........
त्यादिवशी कुणालाही गणवेषाची बंधन नव्हतं प्रत्येकजण आपल्याला आवडेल अश्या पेहरावात आले होते. मुलं शर्ट किंवा त्यावेळची अल्टीमेट फ़ॆशन म्हणजे टी-शर्ट. त्यावेळी त्याखाली घालण्यासाठी जीन्सशिवाय कुणालाच काही पर्याय नव्हता. मुली मात्र पंजाबी सूट आणि साड्यांमध्ये आल्या होत्या.इतके दिवस अजिबात लक्ष्यात न आलेली गोष्ट म्हणजे खरंच आजवर आमच्या आजुबाजूला वावरणार्‍या ज्यांना आम्ही साळकाया- म्हाळकाया म्हणून चिडवायचो. त्या आज खंरच मोठ्या झाल्या होत्या. मुख्याध्यापकांचे भाषण झाले, नंतर शिक्षकांचेही मनोबल वाढवणारे चार शब्द सांगुन झाले, आपण आणि आपली शाळा ह्याच्यावर पुढल्या बाकांचे धडाधड एक दोन निबंधही बोलुन झाले. नंतर एक छोटीशी पार्टी.....मग बराचसा धांगडधिंगा करण्यात वेळेचे भानच राहिलं नाही. वेळ संपल्याची जाणिव झाली ती मुलींच्या रडण्याने.दोन मुंग्यानी कसं एकामेकांनच्या समोर आल्यावर मुमु..मु.....मु.....केलेच पाहिजे तश्या आविर्भावत कुठल्याही दोन मुली समोरासमोर आल्यावर रडत होत्या. इतक्यावेळच्या जुही चावला आणि करिष्मा कपूर अचानक आशा काळे व अलका कुबल वाटु लागल्या. आमची मात्र हसता हसता पुरेवाट झाली. थोडावेळ टाईम-पास करुन आम्हीही शेवटची चार डोकी पांगायला लागलो.....शाळेच्या गेटवर येउन. "चल बाय उद्या भेटु........." बोलल्यावर लगेच्च बोलण्यातली चुक उमगली.

उद्या भेटु??????

पण कुठे, कधी, कशाला, कुणाला........सणकन डोक्यात घंटा वाजली.......अरेच्च्या शाळा तर सुटली.
आता सकाळची प्रार्थना नाही......राष्ट्रगीत, प्रतिज्ञा नाही.......
वर्गातला आपला बेंच नाही......ऒफ़ पिरीयडचा दंगा नाही......
किती गोंधळ घालता म्हणून शिक्षंकांचा ओरडा नाही......
वर्गाबाहेर शिक्षा म्हणून ओणवं उभ रहाताना एकामेंकाना धक्के मारणं नाही
राष्ट्रदिनाला कडक गणवेषात मारली जाणारी परेड नाही............
मधल्या सुट्टीत एकाच वडापावची तिघांमध्ये वाटणी नाही....
भैय्याला मस्कामारुन नंतर नंतर फ़ुकटची हुल देउन फ़क्त शाळेबाहेरच मिळणारी एक्स्ट्रा मसाला मारलेली काकडी किंवा पेरुची फ़ोड नाही............
पी.टी ची कवायत, वार्षीक स्नेह- संम्मेलन ,त्या गृहपाठाच्या वह्या, त्या परिक्षा नाहीत
मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षकांची शाबासकी किंवा मित्रांचे कौतुक नाही......
आणि सगळ्यांत महत्त्वाचं.........
"आजचा दिवस भरला आता उद्या या......... आज शाळा सुटली........" अस सांगणारी घंटा नाही....

लगेच मागे वळुन पाहीलं आणि नेमका शाळेत येतानाचा पहिला दिवस आठवला. गेटवर मी अगदी तसाच उभा होतो रडवेल्या चेहर्याने मागे वळुन पहाणारा.....फ़क्त आता दिशा बदलली होती. पहिल्या दिवशी शाळेत येताना आई जशी धुसर होत गेलेली, तशी आज शाळाही हळुहळु डोळ्यात धुसर होत होती. हे दोन्ही दिवस आजही माझ्यासाठी अगदी तस्सेच होते फ़क्त त्यादिवशी आईने हात सोडला तेव्हा मी तिथे एकटा होतो पण आज जेव्हा शाळेचा हात सुटला तेव्हा माझ्यासोबत
माझा आत्मविश्वास होता,
डोळ्यात उद्याची स्वप्ने होती,
कुठल्याही परिस्थितीत मला सावरणारी संस्काराची शिदोरी होती
आणी मनांत कधीही न पुसल्या जाणार्या आठवणी होत्या...............

आज ही शाळेच्या गेटवरुन शाळेकडे पहाताना पापण्यांच्या कडा नकळत ओलावतात. तिला पहाताना उर भरुन येतो. तेव्हा मन पुन्हा तिला साकडं घालतं की
"मला पुन्हा तुझ्या सावलीत घे.....परत एकदा शाळेत घे.......मला परत एकदा शाळेत घे............"

National Highways in India

National Highways in India

NH 1 - Delhi-Jalandhar-Amritsar-Wagah Border
NH 1A - Jalandhar-Jammu-Srinagar-Uri
NH 2 - Delhi-Agra-Allahabad-Kolkata
NH 3 - Agra-Indore-Dhule-Mumbai
NH 4 - Thane-Pune-Bangalore-Chennai
NH 5 - Jharpokaria-Baleshwar-Cuttack-Vijaywada-Chennai
NH 6 - Dhule-Nagpur-Kolkata
NH 7 - Varanasi-Nagpur-Bangalore- Kannyakumari
NH 8 - Delhi-Jaipur-Ahmadabad-Mumbai
NH 8A - Mandvi - Ahmadabad
NH 8B - Porbandar to Bamanbor
NH 8D - Somnath to Jetpur
NH 9 - Pune-Solapur-Hyderabad-Vijaywada
NH 10 - Pacca-Chisti-Fazilika-Abohar-Delhi
NH 11 - Agra-Jaipur-Bikaner
NH 12 - Jaipur-Bhopal-Jabalpur
NH 13 - Solapur-Bijapur-Chitradurga
NH 14 - Radhanpur- Sirohi-Beawar
NH 15 - Pathankot- Amritsar-Jaisalmer- Samkhiyali
NH 16 - Nizamabad-Mancheral-Jagdalpur
NH 17 - Panvel - Mapusa - Mangalore-Kozhikode
NH 18 - Kurnool- Kalakada- Chittoor
NH 19 - Ghazipur - Rudrapur- Sonpur-Hajipur- Patna
NH 20 - Pathankot-Gaggal-Palampur- Mandi
NH 21 - Chandigarh- Bilaspur-Mandi-Kullu-Manali
NH 22 - Ambala-Kalka-Solan-Rampur-Jangi-Khab
NH 23 - Chas-Ramgarh-Ranchi-Samal-Nuhata
NH 24 - Delhi-Bareilly-Lucknow
NH 25 - Lucknow-Jhansi-Shivpuri
NH 26 - Jhansi-Sagar-Lakhnadon
NH 27 - Allahabad - Sohagi- Mangawan
NH 28 - Lucknow to Barauni
NH 29 - Varanasi- Sarnath- Gorakhpur
NH 30 - Mohania -Kochas-Patna- Bakhtiyarpur
NH 31 - Barhi-Chandi-Purnia-Nalbari- Guwahati
NH 32 - Gobindpur- Asansol- Purliya-Jamshedpur
NH 33 - Barhi -Hazirabagh- Chandil- Baharagora
NH 34 - Kolkata -Rajinagar- Durgapur- Dalkhola
NH 36 - Nagaon-Dabaka-Dimapur
NH 37 - Goalpara-Dispur-Chabua-Saikhoa Ghat
NH 39 - Numaligarh-Golaghat-Dimapur-Kohima-Mayanmar Border
NH 40 - Jorabat-Umling-Shillong-Jowai
NH 41 - Kolaghat - Tamluk- Durgachak-Haldia
NH 42 - Sambalpur - Angul-Cuttack
NH 43 - Raipur-Keskal-Sunabeda-Chittivalasa
NH 44 - Shillong to Sabroom
NH 45 - Chennai - Tiruchchirappalli- Dindigul
NH 45A - Viluppuram - Pondicherry- Nagore -Nagapattinam
NH 45B -Tiruchhirapalli to Tuticorin
NH 46 - Ranipettati- Arcot-Vellore -Krishnagiri
NH 47 - Salem-Kollam- Thiruvananthapuram-Kannyakumari
NH 48 - Mangalore - Hassan-Solur- Nelamangala
NH49 - Kochi to Rameswaram
NH 50 - Pune - Khed- Nadur- Sinner
NH 53 - Imphal-Silchar-Bhanga
NH 55 - Siliguri - Matigara- Darjeeling
NH 56 - Lucknow-Jaunpur-Phulpur - Varanasi
NH 57 - Muzzaffarpur - Madhepur-Purnia
NH 58 - Mana -Badrinath-Haridwar - Meerut- Modinagar- Delhi
NH 59 - Ahmadabad-Rajgarh-Dhar-Indore
NH 60 - Asansol - Medinipur- Basta0-Rupsa- Balasor
NH 63 - Ankola-Hubli-Bellari- Gooty
NH 64 - Chandigarh -Banar-Patiala- Barnala- Bhatinda-Dabwali
NH 65 - Ambala -Fatehpur -Jodhpur -Pali
NH 66 - Krishnagiri -Nattur-Kiliyanur-Pondicherry
NH 67 - Coimbatore -Karur- Thanjavur-Nagappattinam
NH 68 - Salem- Attur-Elavanasur-Ulundurpettal
NH 69 - Obaidukkagan-Multai-Chicholi-Nagpur
NH 71 - Jalandhar -Jind- Rohtak- Rewari-Bawal
NH 72 - Ambala -Paonta Sahib-Dehradoon-Haridwar
NH 73 - Ambala -Saharanpur- Roorkee
NH 74 - Bareilly -Sitarganj-Nagina-Haridwar
NH 75 - Gwalior-Jhansi-Panna-Satna-Rewa
NH 76 - Pindwara-Jhansi-Attara - Allahabad
NH 77 - Sonbarsa -Dumra-Muzzafarpur-Hazipur
NH 78 - Katni-Pali-Nagpur-Karabel-Gumla
NH 79 - Ajmer-Bhilwara-Ratlam -Ghat Bilod
NH 83 - Patna - Gaya- Bara -Dobhi
NH 87 - Nanital-Ranibagh-Haldwani- Rampur
NH 200 - Raipur-Bilaspur-Naikul-Sukinda
NH 201 - Bargarh - Kesinga- Ampani-Boriguma
NH 202 - Hyderabad - Ghanpur- Nagaram - Bholpalpatnam
NH 204 - Ratnagiri - Malkapur - Kolhapur
NH 205 - Anantapur -Tiruparti- Nagari - Chennai
NH 206 - Honavar -Sagar- Kadur- Banavar-Tumkur
NH 208 - Kollam -Sivagiri- Kallupatti -Madurai
NH 209 - Bangalore - Pollachi- Palani - Dindigul
NH 210 - Tiruchchirapalli - Kiranur- Devipattinam
NH 211 - Solapur- Vedshi-Adul-Dhule
NH 222 - Kalyan - vishakhapattanam

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर

*शास्त्रीय उपकरणे*
                   *व*
          *त्यांचा वापर*

*डायनामोमीटर—* इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरण

*हॉट एअर ओव्हम —*अधिक तापमान वाढविणारे उपकरण

*कॉम्युटर—*
क्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र

*रेफ्रीजरेटर—* तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण

*स्पिडोमीटर—* गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण

*हायड्रोफोन—* पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण

*टेलेस्टार—* तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.

*टाईपराईटर—* टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण

*टेलीग्राफ —*सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.

*अल्टीमीटर—* समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

*ऑक्टोक्लेव्ह—* दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.

*सिस्मोग्राफ—* भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र

*अॅमीटर—* अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.

*अॅनिमोमीटर—* वार्‍याचा वेग व दाब मोजण्यासाठी

*गायग्रोस्कोप—*वर्तुळाकार भ्रमण करणार्‍या वस्तूची गती मोजणारे उपकरण.

*पायरोमीटर—* उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण

*बॅरोमीटर—* हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण

*टेलिप्रिंटर—* तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.

*मायक्रोस्कोप—*सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

*क्रोनीमीटर—* जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.

*लॅक्टोमीटर—* दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.

*कार्डिओग्राफ—* हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.

*सायक्लोस्टायलिंग—* छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.

*कार्बोरेटर—* पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.

*मॅनोमीटर—* वायुचा दाब मोजणारे उपकरण

*ऑडिओमीटर—* ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी

*मायक्रोफोन—* ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.

*रडार—*रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.

*हायड्रोमीटर—* द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

*मायक्रोमीटर—* अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी

*बी.ओ.डी. इंक्यूबेटर —* 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण

*थर्मोस्टेट—* ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.

*थिअडोलाईट—* उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.

Friday, July 8, 2016

झोपेचा तास

आजच्या (रविवार, २६ जून २०१६) ऍग्रोवनमध्ये आमच्या बहिरवाडी शाळेतील 'झोपेच्या तासा'विषयी आलेला माझा लेख...

  झोपेचा तास !

-लेखक भाऊसाहेब चासकर

यंदा पहिलीचा वर्ग मिळणार होता. निरागस, नितळ, निर्मळ मनाची लहान लहान मुलं म्हणजे साक्षात चैतन्यच वर्गात येणार होतं. पहिलीतल्या मुलांबरोबर राहता येणार आहे. खेळ, गाणी, गप्पागोष्टी, आणि भरपूर दंगामस्ती करता येणार आहेत. चिमुरड्यांसोबत राहून त्यांना समजून घेता येणार आहे, या कल्पनेनेच मी रोमांचित झालो होतो. कारण आजवरच्या नोकरीत पाचवी ते सातवीचे वर्ग मिळालेले होते, म्हणूनच खूप उत्सुकता लागून होती.

लहान मूल कसं शिकतं, मुलं कसा विचार करतात, घर परिसरातल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक पार्श्वभूमीचा आणि तिथल्या एकूण वातावरणाचा मुलांच्या जडणघडणीवर, शैक्षणिक संपादणूकीवर कसा परिणाम होतो, लहान मुलांच्या भावविश्वात नेमके काय काय असते, अशा अनेक गोष्टी समजून घेण्याची, निरीक्षणाची संधी आता रोज आयतीच मिळणार होती. त्यासाठी काही संदर्भ मी शोधत होतोच. चर्चा करत होतो.

पहिलीचा वर्ग आल्यावर मुलं आणि मी मस्त हसत खेळत, गप्पागोष्टी करत मजेमजेने नव्या नव्या गोष्टी रोज शिकत होतो. मुलांशी छान दोस्ताना झाला होता. वर्गातलं वातावरण अत्यंत अनौपचारिक कसे राहील यावर माझा कटाक्ष असे. समजून घेणारं उबदार वातावरण आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यानं मुलं मस्त खुलून बोलायला लागली होती. गप्पांच्या ओघात मुलं मनातलं बिनधास्तपणे सांगू लागली होती.

“तुमाला एक सांगायचंय. सांगू का?”

लाडात येऊन साई मला विचारत होता.

“सांग ना रे साई!” मी म्हणालो.

“पण रागावायचं नाही अं, तरच सांगंण. नायतर नाही सांगणार ...”

“अरे बाबा, अजिबात रागावणार नाही, तू सांग तर आधी...”

“दुपारचं जेवल्यावं लई कटाळा येतो. पार झोपच येती.” जरासं गुतत गुततच साईनं त्याचं मनोगत सांगितलं.

“हां सर खरंचये साई म्हणतोय ते. जेवल्यावं त लय कटाळा येतोय. तुमाला नाही माहिती!”

स्नेहलने साईच्या सुरात सूर मिसळला.

“जेवण झाल्यावर थोडंसं खेळायचं. मस्त उड्या मारायच्या. भिंतीवर लिहिलेले अक्षरं, शब्द वाचायचे आणि मग वर्गात येऊन बसायचं, चालेल ना?”

मी मुलांसमोर एक ‘प्रस्ताव’ ठेवला. तो बहुतेक मुलांना तो आवडलाही, त्यांना आनंद झाला. साई मात्र त्यावर खुश दिसत नव्हता. त्यालाजवळ घेत, विश्वासात घेऊन विचारल्यावर तो म्हणाला,

“सर, आपल्या शाळेत (त्याला बहुदा वर्गात म्हणायचं असावं.) भाषेचा, गणिताचा, खेळायचा तास असतो ना. तसा झोपेचा तास का बरं नसतो? दुपारी लय झोप येती तवा झोपायचा तास ठेवाया पायजेल...”

“हां, सर लय मज्जा येईल, झोपायचा तास ठेवल्यावं.” आणखी काही मुलांनी साईच्या ‘सूचने’ला ‘अनुमोदन’च दिले!

“आपल्या वर्गातले काही लहान पोरं (ज्यांचं शाळेत नाव घातलेलं नाही, पण वर्गात येऊन बसतात अशी मुलं!) दुपारचं जेवल्यावं लगेच झोपात्यात. त्यांना तुमी खुशाल झोपून देत्या. मग आमाला बी झोप आल्याव तसं थोडा वेळ झोपून द्यायचं...”

वैष्णवी म्हणाली.

“हां सर आता नाही म्हणायचं नाही...”

सारी मुलं एका सुरात बोलली. आता मुलांचं बहुमत झालं होतं आणि मी अल्पमतात होतो! मला मुलांचं ऐकणं भाग होतं. मी होकार दिला. मुलांना कोण आनंद झाला. हेहेहेहेsss म्हणत वर्गात एकच दंगा सुरु केला. मुलांचे चेहरे मला अगदीच वाचता येत होते. आवडीची खेळणी विकत घेतल्यावर, नवीन ड्रेस किंवा आवडीची वस्तू/खाऊ मिळाल्यावर जेवढा आनंद होणार नाही, इतका आनंद मुलांना झाला होता! वर्ग डोक्यावर घेऊन त्यांनी तो व्यक्त केला. त्या क्षणी वर्गात जल्लोषपूर्ण वातावरणात जे काही सुरु होतं, तो प्रसंग इथं शब्दांत पकडणं केवळ अशक्य आहे. शिक्षक असल्यानेच अशा अनमोल आनंदक्षणांचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेकदा माझ्या वाट्याला आल्याचं समाधान मी अनेकदा अनुभवलंय.

मुलांचं शिकणं शास्रीय पद्धतीनं समजून घ्यायला लागल्यापासून आम्ही शाळेतले कठोर शिस्तीचे वातावरण हद्दपार केलेय. मुलांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब शाळेच्या दैनंदिन कामकाजात पडताना दिसते. एकूण शिक्षण प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

मुलांच्या मागणीनुसार पहिलीच्या वर्गात दुपारी झोपेचा तास सुरु झाला! जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटं मुलं शांतपणे झोपी जातात. रिल्याक्स होतात. उठायचं, चेहऱ्यावर पाणी मारायचं, पाणी पिऊन मस्तपैकी फ्रेश होऊन वर्गात येऊन बसायचं.
विशेष म्हणजे आधी दुपारच्या वेळी मुलांचे चेहरे सुकायचे. मुलं आळसावलेले दिसत असत. आता शाळा सुटेपर्यंत मुलांचा मूड टिकून राहतो. अर्थात वेगवेगळे विषयदेखील आनंददायी पद्धतीने शिकवायचा प्रयत्न असतो, हेही त्याचं एक कारण असावं.

झोपेच्या तासाची अजून एक गंमत सांगायची राहिली. तास सुरु झाला तेव्हा आधी आधी फक्त मुलंच झोपायची. मी वर्गातच काहीतरी लेखी कामकाज करत बसायचो. कोणी डोळे मिटलेले नाहीत, कोण हसतंय, याचं निरीक्षण करत बसायचो.

‘तुमी पण झोपा आमच्याबरोबर...’ असं काही दिवसांनी मुलं म्हणू लागली. ‘आपण कसं काय झोपायचं बॉ? पालक-अधिकारी वर्गात आले तर काय उत्तर द्यायचं?’ असे अनेक विचार मनात आले. मुलांना माझ्या नजरेतून दिसणाऱ्या अडचणी सांगायच्या नव्हत्या. काही दिवस मी आढेवेडे घेतले. काही दिवसांनी माझी मानसिकता तयार झाली. धाडस वाढले. मग मी पण झोपेच्या तासाचा विद्यार्थी झालो! मुलांबरोबर मी झोपू लागलो. लक्षात असं आलं की, त्या घडीभाराच्या विश्रांतीनं आपण किंचित का होईना जास्त क्षमतेनं काम करायला ‘चार्ज’ होतो आहोत.

व्हॉटसअप्सच्या ग्रुप्समध्ये, फेसबुकवर आमचा झोपेचा तास फोटोसह शेअर केल्यावर त्याचं भरपूर कौतुक झालं. झोपेच्या तासाचे अनेक फायदे तिथल्या काही डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या मित्रांनी सांगितले. बौद्धिक काम करून येणारा थकवा किंवा कंटाळा घालविण्यासाठी हा चांगला उपक्रम असल्याचं सांगितलं. वामकुक्षी घेतल्यानं कार्यक्षमता कशी वाढते? याबाबत काही संशोधनं झाल्याची माहितीही मिळाली.

अशी प्रशस्ती मिळाल्यावर मग आमचाही आत्मविश्वास दुणावला. जगभरातल्या काही शाळांमध्ये झोपेचा तास सुरु असल्याचंही समजलं.पाठोपाठ भारतात आसाममध्ये एका शाळेत दुपारी मुलं झोपल्याचा फोटो बातमी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली. काही देशांत ऑफिसातच अँटी चेंबरमध्ये विश्रांती घेता येते.
कॉर्पोरेट जगतातली 'पॉवर नॅप' नावाची संकल्पना समजली. 'पॉवर नॅप' म्हणजे कामातून थकवा आल्यावर दुपारच्या वेळला डुलकी घेणे! ही सारी माहिती माझ्यासाठी अगदीच नवीन होती. 'गुगल' करुन झोपेविषयी आणखीन अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली. माझ्या परीने ती मुलांना सांगितली. आपला हा वेडेपणा नसून, आपण योग्य वाटेवर आहोत, याचीही खात्री पटली.
शिक्षक म्हणून मुलांच्या मनात आलेला विचार ऐकून घेतला. तशी कृती केली. तो इतका सर्व व्यापक असू शकतो, याची प्रचीती या निमित्तानं आली. मुलांना भरपूर सांगायचं असतं. घरी-दारी मुलांचं ऐकून घेणारे कमी आणि त्यांना ऐकवणारे लोकं जास्त झालेत, त्यामुळे मुलांच्या कल्पना शक्तीला आम्ही बांध घालून त्यांचं सृजनशील मन संकुचित केल्यासारखं वाटतं. आधी घरी आणि पुढं शाळेत हा मोकळेपणा नसल्यानं तो जगण्याचा स्थायी भाव बनत नाहीये. म्हणून शिक्षणात मुलांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब उमटायला पाहिजे. माणूस म्हणून घडण्यासाठी ते फार आवश्यक आहे, असे वाटते.

पाचवी सहावीत असताना आमचे गणिताचे शिक्षक दुपारच्या सत्रात त्यांच्या तासाला डुलक्या घेणाऱ्या मुलांवर डाफरायचे, खवचटसारखं बोलायचे. तेव्हा मुलांचं ते डुलक्या घेणं चूक आहे, असं वाटे. भर वर्गात सरांदेखत डुलक्या घेणारी म्हणजेच झोपणारीमुलं अपराधीच आहेत, असंवाटायचं. आता शिक्षक म्हणून टेबलच्या या बाजूला उभं राहून बघताना या गोष्टींची गरज लक्षात येतेय. शिक्षक शिक्षकांना विश्रामीकेत शिक्षक विश्रांती घेऊ शकतात, तर मग मुलांसाठी अशी सोय शाळेत का नाही/नसावी? असा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याने विचारला तर माझ्याकडं कुठं शिक्षक म्हणून काही उत्तर आहे? शाळा जर का मुलांकरिता असतील तर तिकडे मुलांच्या मनोभूमिकेतून शिक्षणाचा एकूण पट मांडला जायला हवा असंही मला वाटतं.

मुलांना समजून घेतल्याशिवाय, विश्वास दिल्याशिवाय मुलं आपल्यासाठी त्यांच्या मनाची कवाडं कदापि उघडणार नाहीत, याची खात्री पटलीय.म्हणूनच विद्यार्थी असताना जे आपल्याला मिळायला हवं होतं पण मिळालं नाही, त्या गोष्टी मुलांना द्यायचा माझा सतत प्रयत्न राहिला आहे.

लहान मुलांचं विश्व निराळंच असतं. उनाड वाऱ्यासारखं अवखळपणे खेळणं, हसणं-खिदळणं मुलांना आवडतं. अनेकदा हे स्वातंत्र्य शाळा आणि शिक्षक मुलांना नाकारतात. मग विद्यालयं आनंदालयं नाहीतर भयालयं वाटत राहतात. शाळेच्या वेळापत्रकात परिपाठापासून परीक्षेपर्यंत अनेक गोष्टींविषयी मुलांना काहीतरी म्हणायचं असतं. ते सांगण्यासाठी मुलांना मोकळा अवकाश दिला की मुलं मुक्तपणे व्यक्त होऊ लागतात. मुलांना शिकवण्यापेक्षा ती शिकती कशी होतील, हे बघताना मुलांना जीव लावणं आणि त्यांना उबदार शैक्षणिक पर्यावरण आवश्यक असतं.

भाऊसाहेब चासकर,

मोबाईल- 9422855151.
bhauchaskar@gmail.com

(लेखक नगर जिल्हा परिषदेच्या बहिरवाडी शाळेत सहायक शिक्षक असून, Active Teachers Forumचे संयोजक आहेत.)

Thursday, July 7, 2016

ऐतिहासिक पंढरपूर


ऐतिहासिक पंढरपूर
पंढरपूर हे दक्षिण भारतातील प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे देवस्थान वेरूळचे जगदविख्यात कैलास लेणे निर्माण होणेपूर्वीचे आहे, भागवत धर्माचे आद्यपीठ, संताचे माहेर व दक्षिण काशी असे संबोधले जाते. पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्व स्कंदपुराणात वर्णन केले आहे. मान्यखेटचे राष्ट्रकूट यांचेपैकीच सोलापूरचे राष्ट्रकूट घराणे होते. त्यातील अविधेयक नामक राजाने आपल्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षी जयद्विढ्ढ नावाचा भार्गव गोत्रज ब्राम्हणास शंभु महादेवाच्या डोंगराच्या पूर्वेस असणारी आणेवारी, चाळ, कंदक, दुग्धपल्ली यासह पांडुरंगपल्ली (पंढरपूर) हे गांव दान दिले. पांडुरंगाचे देवालय पल्लीत होते. म्हणून तिचे नांव पांडुरंगपल्ली पडले आहे, असे हे पांडुरंगपल्ली गांव म्हणजे पंढरपूर होय.
इ.स.83 मध्ये या क्षेत्रास शालिवाहनाने पंढरपूर हे नांव दिल्याचा व इ. स. 516 च्या राष्ट्रकूट घराण्यातील अविधेय राजाने दिलेल्या ताम्रपटातही त्याचा उल्लेख आहे. या पुरातन मंदिराचा शके 1225 च्या सुमारास चक्रवर्ती राजा रामचंद्र देवराय यांनी त्यांचे प्रधान हेमाद्री पडित यांचेकडून देवळाचा विस्तार केल्याचे दिसून येते. आदिलशाही राजवटीमध्ये सन 1659 मध्ये खासा अफजलखान शिवरायावर मोहिम काढून वाईकडे जात असताना त्यांने पंढरपूर क्षेत्रास उपसर्ग केल्याची नोंद आहे श्री क्षेत्र पंढरपूर हे तीर्थ क्षेत्र पवित्र अशा चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे. हिरे आणि माणिक यांनी जडवलेला लफ्फा हा हार दत्ताजी शिंदे, ग्वाल्हेरचे सरदार यांनी देवास दिलेला आहे. रत्ने, मोती, हिरे व सोन्याचे तारेने गुंफलेला शिरपेच हा अलंकार अहल्याबाई होळकर यांनी दिलेला आहे. अतिमौल्यवान रत्ने वापरून बनविलेला मोत्याचा कंठा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानी अर्पण केलेला आहे. पंढरपूर येथील पांडुरंग मंदिरामध्ये वेगवेगळ्या भाविकांनी वेळोवळी कामे करून दिलेली आहेत. रखुमाजी अनंत पिंगळे यांनी कृष्णाजी मुरार यांच्या हस्ते इ.स.1618 मध्ये महाद्वार बांधलेचा उल्लेख आहे. मुख्यमंदिराचा सोळखांबी मंडप दौंडकर यांनी बांधलेला असून या मंडपाच्या दक्षिणेकडील भाग मैनाबाई आनंदराव पवार यांनी बांधलेचा उल्लेख आहे. भोरच्या पंत सचिवांनी देवळाचे शिखर बांधलेचा उल्लेख आहे. पहिल्या बाजीरावापासून सर्वजण पंढरपूरच्या देवदर्शनास येत. पहिला बाजीराव पेशवा यांनी पंढरपूरला अनेकदा मुक्काम केल्याची नोंद इतिहासामध्ये आहे.  दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी सुद्धा पंढरपूरला अनेकदा मुक्काम केलेचा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो.
पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदेसरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणी साहेब यांनी बांधलेले आहे. स्वातंत्र्यानंतर साने गुरूजींच्या पुढाकाराने श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर सर्वधर्म व सर्व जातीच्या लोकांना खुले करून देण्यात आले. सन 1973 मध्ये श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर शासनाने ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर मंदिरे अधिनियम 1973 चा कायदा केला. सन 1985 पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे व्यवस्थापन शासननियुक्त समितीकडून केले जात आहे. सन 2009 मध्ये पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने पंढरपूर विकास प्राधिकरण स्थापन केलेले आहे.

पंढरपूर वारी


||वारी||

      वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.

      अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.

      वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.

      वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.
मुख्य चार यात्रा(वार्‍या)
१) चैत्री यात्रा

     
चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात.

२) आषाढी यात्रा

     
आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ " आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.

     
"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपुर येथे सार्‍या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्‍यांना गोपालकाला वाटला जातो.

३) कार्तिकी यात्रा

     
कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.

४) माघी यात्रा

     
माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...