Pages

Friday, June 3, 2016

शिक्षणात कल्पकतेचा वापर

शिक्षणात कल्पकतेचा वापर

आजची शिक्षणपद्धती ही केवळ परीक्षा केंद्रीत आहे हे सर्वमान्य आहे. ही शिक्षणपद्धती बदलण्याबाबत मोठ्या प्रमाणावर विचारमंथनदेखील होत आहे.मात्र सद्यस्थितीतील शिक्षणपद्धती अशीच का याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जगाच्या इतिहासात डोकवावे लागेल.
1930 सालच्या जागतिक मंदीनंतर ज्या शाळा सुरू झाल्या त्यांची पद्धत कारखान्यांसारखी होती. कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने काम चालते त्याचपद्धतीने शाळांचे कामकाज चालू लागले. कामगारांच्या शिफ्टस्प्रमाणे विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या वेळा, परीक्षापद्धतीचे प्रमाणीकरण अशा अनेक बाबींचे उदाहरण याबाबत घेता येईल. शाळांधील उत्पादन म्हणजे विद्यार्थी. मग हे उत्पादन चांगले, दर्जेदार असावे याकरीता शाळांकडून एकाच पद्धतीने विचार
करण्यात आला व त्यासाठी सर्व शाळांमध्ये एकच पद्धती अवलंबण्यात आली.

खरे पहाता विद्यार्थी म्हणजे कोणी उत्पादन नव्हे. त्यामुळे त्यांना जोखण्यासाठी किंवा ज्ञान देण्यासाठी त्यांच्या कलाने त्यांना वाढवणे महत्वाचे. परंतु शाळांमधून हा मूळ विचारच नाहीसा झाला. विद्यार्थी परीक्षार्थी बनले. गुण मिळवण्यासाठी शिक्षण असेच समीकरण झाले. त्याचबरोबर शिक्षण पद्धतीद्वारे कारखान्यांना उपयुक्त ठरेल असे उत्पादन निर्माण करण्याकडे कल वाढला.त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला कारखान्यामध्ये उपयुक्त ठरतील अशी कौशल्ये शिकवण्याकडेच शिक्षणपद्धतीचा ओघ वाढला. तत्कालिन परिस्थिती पहाता त्यावेळी तशा पद्धतीचे शिक्षण योग्यच होते. मात्र तशी शिक्षणपद्धती आजच्या काळाला अनुरूप मात्र नाही हे तितकेच खरे आहे.

बाजारपेठेत झालेले मूलभूत बदल हे शिक्षणपद्धती घडवण्यास कारणीभूत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच आजच्या बाजारपेठा बघता नावीन्य आणि कल्पकता या बाबींना अत्यंत महत्व आले आहे. म्हणूनच शिक्षणातील कल्पकतेचा वापर वाढवणे हे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे. विद्यार्थ्यांमध्ये कल्पक दृष्टीकोन विकसित होण्याकरीता शाळा व शिक्षकांबरोबरच पालक देखील तितकेच जबाबदार ठरतात.

आपल्या पाल्याला वाढवताना पालकांनी विशेषत्वाने त्यास कल्पक दृष्टीकोन दिला पाहिजे. किंबहुना त्यास तशी सवयच लावली पाहिजे. याचे कारण विद्यार्थी हे काही कारखान्यातून बाहेर पडणारे उत्पादन नव्हेत. तुमचा पाल्य ही व्यक्ती आहे. त्यामुळेच त्यास भावभावना, विचारक्षमतादेखील आहे. वेगळ्या विचारानी जगण्याकरीता, समाजात काही भरीव कामगिरी करण्याकरीता परंपरेपेक्षा वेगळा विचार करण्याची गरज असल्याने पालकांनी आपल्या पाल्याला कल्पक
दृष्टीकोनाची देणगी देणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्याकडे मात्र अनेक पालक व शाळा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने विचार करण्याची सवय लावण्याबाबत काहीसे उदास दिसतात. आपल्या व्यस्त दिनक्रमातून मुलांची जडणघडण नेटकी व्हावी याकरीता ती जबाबदारी पालक
शाळेवर ढकलतात याउलट शाळांवर विशिष्ट शिक्षणपद्धती राबवण्याची सक्ती असल्याने शाळा देखील विद्यार्थ्यांना घडवण्यात अयशस्वी ठरतात. वर्गातील चुणचुणीत मुले कायम सर्व ठिकाणी चमकतात त्यामुळे मागे पडणा-या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. खरंतर शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. याकरीता ज्या विद्यार्थ्याला शिक्षणात ज्या बाबीमध्ये अडचण येते त्याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसते.

फिनलंडमधील शिक्षणपद्धतीचे उदाहरण येथे मला द्यावेसे वाटते. येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या समस्या येतात त्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते.शाळेतील विद्यार्थ्याला येणारी अडचण सोडवणे, जे कौशल्य येत नसेल त्यावर
अधिक भर दिला जातो आणि विशेष म्हणजे याकरीता शिक्षक देखील अधिक वेळ खर्ची घालण्यास तयार असतात. आपल्याकडे देखील असे शिक्षक आहेत मात्र दुर्दैवाने त्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.

कल्पकतेचा शिक्षण पद्धतीत वापर करण्यासाठी पालक व शिक्षकांचा अधिक व नेमका सहभाग अपेक्षित आहे याबाबतचे विवेचन पुढील लेखात ..

शिरीन कुलकर्णी
संचालक,काऊन्सिल फॉर क्रीएटीव्ह एज्युकेशन, सीसीई फिनलंड

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...