Pages

Saturday, June 4, 2016

व्यथा कलाकार शिक्षकाची

व्यथा कलाकार शिक्षकांची - भाग १..... राहुल भोसले....

 गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षात (२०१५/१६) स्नेहसंमेलने  आणि विद्यार्थी कलाविष्कार सोहळे विशेषत्वाने संपन्न होत आहेत. टीव्हीवरच्या गायन वादनाच्या "रिऍलिटी शो" कार्यक्रमांमुळे पालकांनाही आपली मुले एखाद्या कलेत पारंगत असावीत असे वाटू लागले आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमातही चित्र शिल्प, गायन वादन, नृत्य नाट्य कलांना स्थान देऊन शासकिय व्यवस्थेने कलांचे महत्त्व अधोरेखित केले आहे..

 पण हे कला उपक्रम राबविण्यासाठी सर्वच शिक्षक बांधवांकडे कला असत नाही.
पण प्रत्येक शाळेत एक तरी  शिक्षक बांधव किंवा भगिनी असते; ज्यांना या कलांच्या संवर्धनाची जबाबदारी दिली जाते.  
"सांस्कृतिक विभागप्रमुख " ( अर्थात बिनपगारी फुल अधिकारी !! पगारचा अर्थ शिक्षकांचा पगार असा घेऊ नये...बिनपगारीचा अर्थ  पुढे येणार आहे....)

सांस्कृतिक विभागप्रमुख जबाबदारी स्वीकारणारा गुरुजी स्वत:च्या हौसेखातर हे लिगाड स्वीकारतो. त्याच्या मनात असतं," मी शाळा शिकलो तेव्हा एवढ्या सोईसुविधा नव्हत्या. पण आता माझ्या विद्यार्थ्यांना आपली कला व्यवस्थित दाखवता यावी अशी संधी निर्माण करायला काय हरकत आहे ??

नाचणाऱ्या पायांत बाई आपल्या भूतकाळात हरवलेले पदन्यास शोधतात.

गाणाऱ्या गळ्यांत गुरुजी कालपटात विरून गेलेले स्वर शोधतात.

 नाचणा-या इवल्या इवल्या पायांत बाई आपल्या नृत्याची अर्धवट राहिलेली बाराखडी पुन्हा नव्याने गिरवतात.

 नाटकांच्या संवादात गुरुजी  आपल्याच मूक भावनांना बोलके करतात.

 मुलांच्या घणाघाती वक्तृत्वातून आपलेच विचार व्यक्त होताना स्टेजच्या कोपऱ्यात उभे राहून छाती फुगवून टाळ्या वाजवतात.........

खरंतर आपल्या कलेचं तादात्मिकरण गुरूजी बाई अनुभवतात....

 हे सगळं करताना, सांस्कृतिक कार्यक्रम बसवताना बरीच उलाढाल करावी लागते. त्याचा हा शब्दप्रपंच.........

कधीतरी अचानक केंद्रातून निरोप येतो. तुमच्या शाळेत केंद्रसंमेलन घ्यायचे आहे. ते ही चार तारखेला.....

मुख्याध्यापक सगळी तयारी एक दोन तारखेला करतात. आणि मग कुणालातरी दोन तारखेच्या संध्याकाळी करंट येतो......

"अहो संमेलनासाठी स्वागत गीत,ईशस्तवन बसवले पाहिजे....मग सांगा की भोसले गुरूजींना..   "
भोसले गुरूजी म्हणतात, " अहो परवा संमेलन आणि एक दोन दिवसात कसं काय शक्य आहे......??

 मुख्याध्यापक, सहकारी म्हणतात," अहो बसवा की दोन गाणी..... कोण लक्ष देतंय त्या गाण्यांकडं... आपली पद्धत आहे म्हणून म्हणायची दोन गाणी.....""

खरंतर संमेलनाची सुरूवात चांगली व्हावी, प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं अशा इतरही अनेक कारणांसाठी आपण ईशस्तवन, स्वागतगीत बसवतो..... पण वेळेअभावी या कार्यक्रमाला केवळ "करायचं असतंय म्हणून" अशा औपचारिक पातळीवर नेऊन ठेवलं जातं..

पण गुरूजी सगळं विसरून तयारीला लागतात. मुलांची निवड करतात, गाण्यांची योजना करतात. गावात फिरुन तबलजी नाहीतर ढोलकीवाल्याला बोलावून आणतात. त्याला पदरचा चहापाणी देतात...(बिनपगारी फुल अधिकारी).  स्वागतगीत, ईशस्तवन बसवतात.

 संमेलन सुरु होते. कुंई कुंई करणारा माईक असला तरी गुरूजी मुलांना सांगतात, " म्हणा तुम्ही...चुकलं तर चुकू दे... सुरात, तालात म्हणा.""

मुलही अटोकाट प्रयत्न करुन एकदोन दिवसात बसवलेली गीतं सादर करतात......

प्रेक्षकांत बसलेले काही जाणकार (??) म्हणतात " ईशस्तवन जरा बरं झालं,, पण स्वागतगीत काही जमलं नाही..."".

आभाराच्यावेळी एखादं वाळलेलं , सुकलेलं गुलाबाचं फुल घेऊन गुरुजी समाधान मानतो. तबलजीच्या हातावर पदरचे ५०/१००टेकवतो..(बिनपगारी फुल अधिकारी)  आणि स्वत:च स्वत:चे कौतुक करून घेतो...एक दिवसात गाणी बसवली...............

 जी गोष्ट केंद्रसंमेलनाची तशीच तऱ्हा कला (शिल्प) आणि कार्यानुभव उपक्रमांची...

गेल्या दोन वर्षात " ज्ञानरचनावाद" या संकल्पनेने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात चैतन्य आले आणि हातात कुंचले घेऊन गुरूजी स्वत:च चित्रकार झाले. गुरुजनांच्या चित्रप्रतिभेला नवे पंख फुटले आणि शाळांतल्या भिंती, फरशा गुरूजींच्या कलेने संपन्न होऊ लागल्या.

आधुनिक जगाशी नाळ जोडणारं ई लर्निंग साहित्य बनवतानाही हाच कला दृष्टीकोन गुरूजनांना बळ देतो...
व्हीडीओ निर्मिती असो फोटो व्हीडीओ किंवा अन्य काही असो..
प्रत्येक ठिकाणी कलात्मक मांडणी दिसतेच दिसते  ..

 निदान रचनावादाने तरी गुरूजींची स्वप्नं वास्तवाच्या रंगात रंगू लागली.  रंगसंगतीच्या बीजांना नवे धुमारे फुटू लागले. नवनवीन कल्पनेने तयार झालेले शैक्षणिक साहित्य मुलांना कामांत गुंतवू लागले. गुरूजनांच्या कलेला योग्य स्थान मिळू लागले.

पण सगळेच नसतात कलासक्त,
नसतात सगळे कलेचे भक्त .....

परिक्षा किंवा मूल्यमापन करायची वेळ जवळ आली की मग प्रत्येक वर्गशिक्षकाला आपल्या कलाकार मित्रांची आठवण होते.. "भोसले सर माझ्या वर्गात काहीतरी कागदकाम मातकाम करून घ्या. लगेच गुरुजींमधला शिल्पकार आकार घेतो. नॉर्वे पेपर, क्रेप पेपर,
 जिगझॅग कात्री,रद्दी पेपर
सगळ काही स्वखर्चाने आणतो. (बिनपगारी.........फुल अधिकारी )

मुलंही उत्साहाने डींक सांडतात, कागद फाडतात, खराब करतात. त्यांना समजावून घेत घेत गुरूजी मुलांत मूल होतात. पक्षी होऊन आकाशात भरारी घेतात.
 कंदील बनवून मुलांच्या भविष्याचे दिवे त्यात लावतात.कागदकाम लवकर आटपत नाही, गुरूजींना (बाईंना) दुपारच्या घंटेचाही आवाज येत नाही....

 एक ना अनेक वस्तू करताना रंगीबेरंगी कागदांच्या
 ढिगात गुरुजी स्वत:ला हरवून बसतात..

इकडे स्टाफरुममध्ये मात्र दुपारच्या सुट्टीतला चहा रंगतो..एखादा बांधव हळूच कुजबुजतो...
" काय भोसले गुरूजी लय काम करून दाखवाय लागल्यात.... सुट्टी झाली तरी पोरांना सोडायला तयार नाहीत...
.
.
.
.
.
.
तेवढंच जमतंय........ दुसरं काय येतंय. गाणं आणि कागदाशिवाय........!!!

तरी गुरुजी राबत राहतात.
 मुलांना कारक कौशल्यानी भरत राहतात....

मुलांतल्या उत्साहाला कृतीकडे आणतात..

बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आयुष्याला घड्या घालत राहतात.........अगदी अविरत......

 मातकामाचीही काय मज्जा असते.  मातीचा गोळा वर्गात आणून एखादं प्रात्यक्षिक गुरूजी स्वत:च दाखवतात..

कुणीतरी मुलांबाबतही म्हणतं "मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे...शिक्षक त्यांना घडवणारा कुंभार आहे...."

खरंतर मातकाम शिकवणारा गुरुजी मुलांना मातीचा गोळा कधीच मानत नाही. समोरचे बसलेले विद्यार्थी चैतन्याचे पुतळे, सृजनाचे उमाळे, नाविन्याचे नव्हाळे, संवेदनेचे जिव्हाळे आहेत हे सर्व माझ्या गुरू- बंधूला माहीत असतात... तो मुलांना सांगतो." समजलं का रे मुलांनो... उद्या येताना तुम्हाला आवडणारा पक्षी, प्राणी, मातीची वस्तू तयार करून आणा...

मुलंच ती.. त्यांची उर्मी उसळी घेते. दरी डोंगरातली, शेताबांधाची माती प्लॅस्टिकच्या साखरंच्या पिशवीतून पोरं गोळा करून आणतात. गुरूजींच्या सूचनेप्रमाणं मळतात. मोर, बैल, मोबाईल, बैलगाडी, मण्यांच्या माळा आकार घेताना कपडे खराब होतात. ...

आणि पोरांच्या आया बोलतात, " काय रं हे पोरांनो.हेच शिकिवत्यात व्हय रं शाळेत.. अभ्यास सोडून मातीत खेळायला...... कोण त्यो मास्तर तुमचा..... त्येला तुमची कापडं धुवायला बोलवा...  .

दुसऱ्या दिवशी काही मुलं मातीच्या वस्तू आणतात. काही मुलं गुरुजीपुढं रडतात..." मातीत खेळायलो म्हणून आईनं मारलं.....तुमाला बी काय पायजे ते बडबडली...... "

तरीही गुरूजी शांत राहतो.

ज्या मातीतून जन्म घेतला, त्याच मातीला नावं ठेवली जातात...

गुरुजी आतून तिळतिळ तुटतो मात्र मातीशी नाळ कधीच तुटणार नाही यासाठी पुन्हा मातीत हात घालतो....   मुलांल मूल होऊन चिखलांत खेळतो.....


मातीची सृजनशिलता मुलांपुढे मांडतो आणि मातीच्या गोळ्यातून नवनवीन आकृत्या बनवतो.

 हाच गुरूजी निरागस बालकांच्या मनावर  स्वप्नांची पेरणी करतो ती ही माती पुढे ठेवूनच.....

 वार्षिक स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे ही कलाकार गुरूजींच्या सगळ्या गुणांचा कस पाहणारी वार्षिक परिक्षाच असते...........

कुठला कलाप्रकार बसवावा यासाठी कलाकार गुरूजी रात्रंदिवस विचार करतो.. इथंही शाळेतल्या सांस्कृतिक विभागाचं खापर त्याच्या डोक्यावर फुटण्यासाठीच असतं.....

प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक त्या कलाकार गुरूजींना सांगतात, " माझ्या वर्गाचा कार्यक्रम एकदम झकास बसला पाहिजे बघा.. "

आपल्या स्वत:च्या वर्गात जास्त न रमता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गांचे कार्यक्रम बसवत सगळ्या शाळेतून तारेवरची कसरत करतो....
कुणाच्या नृत्यातल्या स्टेप्स, त्याची ड्रेपरी,  कुणाच्या नाटकातले संवाद सांगायचे,
 ऐतिहासिक नाटकासाठी लागणाऱ्या ढाली तलवारी त्यानीच रात्र रात्र जागून तयार करायच्या,
कोळीगीताची वल्ही आपल्याच घरात बसून वल्हवायची,
 मुलामुलींच्या साड्या, कपड्यांची जोडणी त्यांनीच करायची,
प्रसंगी आपल्या बायकोची आवडती साडी शाळेतल्या कार्यक्रमासाठी एखाद्या  मुलीसाठी हळूच मागून न्यायची....

कार्यक्रमात उपयोगी पडेल अशी वस्तू घरात दिसली की नकळत उचलून न्यायचीच..

 एवढी सगळी उलाढाल केली तरी; एखादं गाणं प्रॅक्टिसला मागे पडलं किंवा ऐन कार्यक्रमात कुणाच्या ड्रेपरीचा घोळ झाला तरी सगळ्या स्टाफचं बोलून घ्यायचं, कलाकार गुरूजीनंच.....

काहीजण म्हणतात, " माझ्या वर्गाचं गाणं त्यांनी काही व्यवस्थित बसवलं नाही......."

कुणी म्हणतं," आपल्या वर्गाची तयारी तेवढी चांगली करून घेतली बघा......"

कुणी म्हणतं," गॅदरिंगच्या वेळी गावापुढं मिरवायला मिळतंय म्हणून पुढंपुढं नाचतोय........."

पण सगळे सकार नकार पचवून मुलांसाठी गुरूजी राबतो ........

सगळ्यांचे विखार ऐकूनही जीवनगाणे  गुरूजी बनवतो,

 आमच्याइकडे काही कलाकार गुरूजी लोकांनी प्रत्येक वर्षी गरजेला पडणारे कपडे, साहित्य खरेदी करून, शिलाई करून घेऊन ठेवलं आहे..

पण त्यांना या साहित्याचा जेवढा उपयोग होतो, त्यापेक्षा जास्त उपयोग इतर फुकटे लोक करून घेतात. ("फुकटे" हा शब्द अगदी अनुभवाने व जाणीवपूर्वक वापरला आहे. कृपया कुणी राग मानू नये.) कारण कार्यक्रमासाठी घेऊन जाताना दहा नेहरू शर्ट आणि बारा विजारी नेल्या तरी काही फुकटे लोक जमा करताना दहाला दहा ड्रेस जमा करतात आणि विचारलं तर म्हणतात,"अहो आम्ही बरोबर दहाला दहा ड्रेस नेले होते.( नेणाऱ्यांकडून दोन विजारी हरवलेल्या असतात..)

तरीही हरवलेल्या गोष्टींची खंत न करता गुरूजी मनाचं व मागणाऱ्या मित्राचं समाधान करतो, " बरं जाऊ दे गेले तर कपडे....एखाद्या लहान मुलानं हरवले असतील, कपडे काय पुन्हा घेता येतील पण..मैत्री आण् कलेचा आनंद पुन्हा नाही मिळत..........."

 या आणि अशा अनेक अनुभवानं संपन्न होत कलाकार गुरूजींची कलासाधना सुरूच राहते... याबदल्यात मिळतं काय .....?

" ............गुरूजी व्हय..त्येला गाण्याशिवाय काय येतंय....??  इति पालक मंडळी..

"काय गुरूजी आज वाजाप बंद हाय वाटतं...   ??  इति शा.व्य.समिती सदस्य.....

( २०११ साली आमच्याकडे एक सूर एक ताल कार्यक्रमात १००० विद्यार्थ्यांनी एका वेळी १० गिते म्हटली होती... या कार्यक्रमाच्या प्रॅक्टीससाठी दोन गुरूजी स्वत:च्या गाडीवर हार्मोनियम तबला घेऊन मुलांना शिकवण्यासाठी अनेक शाळांत फिरत होते...आमचेच सहकारी त्यांना म्हणत होते....

" काय गुरूजी आज कुठल्या शाळेत तमाशा.........????

 आमच्याकडे स्पर्धात्मक तयारीसाठी चौथी व सातवी शिष्यवृत्ती परिक्षेला खूप महत्त्व आहे..हे महत्त्व दिलंही पाहिजे.. पण म्हणून एखाद्या कलेसाठी प्रामाणिक पणे राबणाऱ्या गुरूजीला मात्र हीन समजले जाते...हे मात्र थोडे चुकीचे वाटते...

खरंतर स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांना विश्रांती म्हणून विविध छंद, कला, कागदकाम, अवांतर वाचन, संगीत, नृत्य यांचा उपयोग नक्कीत होतो.

इथं कला मुरलेल्या लोणच्यासारखी आनंद देते.  नवीन अभ्यासाला आणि क्लिष्ट संकल्पना समजून घ्यायला मनाला उभारी देते....

नवीन भाषेत स्पर्धा परिक्षा अभ्यासतंत्रातलं टॉनिकच नाही का एखादी कला..?

." यांच्या गाण्यावाजवण्यानं शाळेचं वाटोळ झालं. !"

असं आमचेच काही बांधव आणि पालक तर म्हणतात. पण.....

 तेव्हाही आपलं काम करत गुरूजी अध्यापन आणि कलेची सांगड घालत राहतो..
 जगण्यासाठी कला की कलेसाठी जगणं या वादात न पडता दैनंदिन जीवन जगताना थोडा विरंगुळा, थोडी मस्ती, थोडा विसावा, थोडा आनंद म्हणत कलेची जोपासना करत राहतो....

 दैनंदिन जगण्यासाठी लागणारं व्यावहारिक ज्ञान तो मुलांना देतच असतो, पण ज्या गाण्याची सुरूवात गर्भातल्या हृदयाच्या पहिल्या तालापासून होते आणि हा लयबद्धताल बंद झाल्यावरच जीवनगाणे थांबते त्या कलेचंही देणं तो जगतो...केवळ कलेसाठी.....

ही व्यथा कुणा एकाची नाही...

तमाम महाराष्ट्रात इतर सर्व विषयांसह कला कार्यानुभव उपक्रम राबवणाऱ्या शिक्षक बंधुभगिनींची आहे.  

घामाला मोल मिळवून देणाऱ्या श्रमप्रतिष्ठा मूल्य राबवणाऱ्या व रुजवणाऱ्या गुरूजींची आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी धडपडणाऱ्या कलारसिक गुरूजींची आहे...

रचनावादाची पेरणी स्वत:च्या कलेतून करणाऱ्या कलासक्त कलंदरांची....

आधुनिक जगाशी जोडणाऱ्या, नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमध्ये कलात्मक दृष्टीकोन वापरणाऱ्या अवलियांची....

 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना जगापुढे आणू पाहणाऱ्या सूज्ञ कला समिक्षकाची आहे....

अजून बरंच काही भळभळणारं बोलायचं राहिलंय...
पण बेसूर व्यथा आणि बेताल कथा जास्त उगाळणं बरं नाही.....

तरी....
बोलू नंतर कधीतरी.  

राहुल मारूती भोसले..
जोगेवाडी, ता.राधानगरी
जि.कोल्हापूर

मो.नं.९०११२५५७२१
वॉटसप ९५५२२८३३२६

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...