Pages

Wednesday, June 1, 2016

तंत्रस्नेही शिक्षण, ब्राझील

🔵जगभरातील  तन्त्रस्नेही शिक्षण पद्धतीचा आढावा घेणारा  लेख आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधे🔵



 तंत्रस्नेही शिक्षणाचा ‘ब्राझिलियन’
प्रयोग….@ रणजितसिंह डिसले




ब्राझील म्हटले
कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे
आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला
दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी
ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल २०१६ मध्ये या
देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा
जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला
आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या
अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली
आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
सेंट लुईस हा
अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा
मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस
अन त्याचा मित्र फर्नांडीस हे दोघे यावर्षी ११
वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच
उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची
परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण
घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय
होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे
—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा
मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी
गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा
प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने
अंमलात आणलेला कृती आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही
शिक्षणाचा ब्राझिलियन प्रयोग’.
सन २००९
साली आपला भारत देश १४ वर्षाखालील मुलांना
मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला
म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी
ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना
गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन
याची उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६
अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात
गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला
गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य
करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये
एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात
वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,०००
मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील
ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या
गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक
स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा
शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले
ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच
शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे
उभारण्यात आली.सरकारी मालकीची
दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार व
स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या
टप्प्यात तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही
सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत
सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला
नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण
देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात
कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली
गेली.ब्राझील मधील विख्यात
शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र
अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या
मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या
मुलांची भौगोलिक
परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय
यांच्या अभ्यासातून व्यवसायाभिमुख कौशल्ये
विकसित करत शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट
साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला.
कौशल्याधीष्ठीत अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट
प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी
ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड
केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील
केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत
राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात
होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन
(Classroom-Management ) व
मूल्यमापनाचे ( Evaluation) चे विशेष
प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न
होता अधिक परिणामकारक होण्यासाठी
द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात
आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली
अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत
होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी
ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या
मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित
मुल्यमापनाचा अवलंब करण्यात आला.मुलांचे
मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक
करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या
आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला
गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या
आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील
आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.
प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक
अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना
वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
सलग ३ वर्षे
याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता
पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील
याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा
प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच परिणाम म्हणून
संयुक्त राष्ट्राने ब्राझील मधील एक ही मूल
माध्यमिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून
वंचित नाही असे प्रशस्तीपत्र दिले.संयुक्त
राष्ट्राने घोषित केलेली शाश्वत विकासाची
उद्दिष्टे गाठण्यासाठी सारे जग प्रयत्न करत
असतानाचा ब्राझीलच्या या यशाने सर्वांसमोर
आदर्श उभा राहिला आहे.
लोकसंख्या व
अर्थव्यवस्थेचा आकार याबाबत भारताशी काही
प्रमाणात साम्य असणारा हा देश जे यश साध्य करू
शकला ते आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी
आहे.ब्राझीलच्या या शैक्षणिक मॉडेल मधील बऱ्याच
बाबी आपल्या देशाला मार्गदर्शक आहेत.जिथे
वैद्यकीय शिक्षणासाठी सबंध भारतभर ‘नीट’
नेटकी परीक्षा असावी असा आग्रह आम्ही धरत
असतानाच स्थानिक गरजांचे प्रतिबिंब
अभ्यासक्रमात उमटले तर त्याची उपयुक्तता वाढते
हेच ब्राझील च्या नव्या मॉडेल ने दाखवून दिले
आहे.पारंपारिक शिक्षण व अभ्यासक्रम यांची
वास्तविक जीवनाशी असणारी फारकत या
निमित्ताने पुढे आली आहे.महाराष्ट्रासारख्या
राज्यात जिथे मराठवाड्यातून दरवर्षी लाखो मुले
उसतोडीच्या निमित्ताने किमान ६ महिन्यासाठी
शाळाबाह्य राहतात. या मुलांच्या गरजा,
कौटुंबिक परिस्थिती यांचा अभ्यास करून वेगळा
अभ्यासक्रम आखला जाणे गरजेचे आहे.बीड सारख्या
जिल्ह्यात या धर्तीवर पथदर्शी प्रयोग राबवता
येवू शकेल.या पायलट प्रोजेक्ट मधील येणाऱ्या
समस्यांचा अभ्यास करून काही उपाय निश्चितपणे
समोर येतील.या पर्यायांची उपयुक्तता पडताळून
मगच याचे सार्वत्रिकीकरण केले जाणे उचित
ठरेल.मुलांचे होणारे स्थलांतर व गळती
रोखण्यासाठी पालकांचे मन वळवण्याचा पर्याय
दरवर्षीच लागू पडेल याबाबत शंकाच वाटते.मात्र
साखर शाळांचे पुनरुज्जीवन करून तिथे या मुलांच्या
गरजानुरूप अभ्यासक्रम आखून त्याच्या
अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ
शकेल.केवळ शैक्षणिक सुविधा पुरवण्यात RTE चे यश
मानणे म्हणजे अल्प संतुष्टपणा ठरेल.शैक्षणिक
सुविधांची उपलब्धता याही पुढे जाऊन आपल्याला
गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने वाटचाल
करायला हवीय.. ब्राझीलचा हा पॅटर्न आपल्या
गरजानुरूप बदल करून अंमलात आणायला काहीच
हरकत नाही. स्थलांतर स्थानिक गरजा लक्षात घेत
अर्थार्जनासाठी शिक्षण देण्याबाबत आम्हा
भारतीयांना विचार करावा लागेल.असे शिक्षण
देताना ते अधिक लवचिक असण्याची गरज
आहे.संगणक,टॅबलेट आदी साधनाच्या मदतीने
तंत्रस्नेही शिक्षण देण्यात बाबत आपला देश
गोंधळलेल्या अवस्थेत असताना ब्राझील चे
तंत्रस्नेही प्रारूप मार्गदर्शक आहे. तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर करून घनदाट जंगलात देखील
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गंगा अव्याहतपणे वाहू
शकते हे यातून दिसून येते. प्रचंड पाऊस व महापूर
हा जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अमेझॉन
मधील मुलांच्या अभ्यासक्रमात आपत्ती
व्यवस्थापन,पर्यावरण संरक्षण यांचा जाणीवपूर्वक
समावेश केला गेला. विषारी साप ओळखणे व साप
पकडण्याचे तंत्र अवगत करण्यासाठी सिम्युलेशन ची
मदत घेतली गेली.त्यामुळे सर्प दंशाने मृत्युमुखी
पडण्याचे प्रमाण ब्राझील मध्ये लक्षणीयरीत्या
घटले आहे, असेही निरीक्षण संयुक्त राष्ट्राने
नोंदवले आहे.मुलांना शाळेत शिकण्यासाठी त्यांचे
सामाजिक अभिसरण होणे महत्वाचे असते हा आपला
भारतीय समज देखील यानिमित्ताने फोल ठरला
आहे.कारण अमेझॉन मधील अनेक शाळांमध्ये केवळ २-४
मुलेही शिक्षण घेत आहेत.मुलाच्या दैनंदिन जीवनाशी
निगडीत शिक्षण असेल तर ते शाश्वत शिक्षण ठरते
हेच या निमित्ताने समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...