Pages

Tuesday, August 8, 2017

डभोईचा किल्ला

डभोईचा किल्ला

गुजरात भ्रमंतीत सरदार सरोवराबरोबरच डभोई किल्ला हमखास पर्यटकांच्या यादीत असतो.

अमित सामंत | Updated: August 2, 2017 1:54 AM

गुजरात भ्रमंतीत सरदार सरोवराबरोबरच डभोई किल्ला हमखास पर्यटकांच्या यादीत असतो. त्यात पर्यटकांना सर्वाधिक आकर्षण असते ते किल्ल्याचे अप्रतिम कोरीव काम असलेले दरवाजे. आपले गुजरात पर्यटन समृद्ध करायचे तर हा किल्ला आवर्जून पाहायला हवा.

गुजरातमधील सरदार सरोवर धरण पाहण्यासाठी हल्ली बरेच पर्यटक जातात. त्याच मार्गावर बडोद्यापासून ३० किलोमीटरवर डभोई नावाचे ठिकाण लागते. गुजरातमधल्या डभोईचा महाराष्ट्राशी संबंध म्हणजे एक मोठी लढाई डभोईच्या किल्ल्याच्या साक्षीने झाली होती. १ एप्रिल १७३१ रोजी पेशवे बाजीराव यांची सेनापती त्रिंबकराव दाभाडे, पिलाजी गायकवाड, धारचे पवार यांच्या संयुक्त सन्याशी लढाई झाली होती. या युद्धात दाभाडे मारले गेले.

सहाव्या शतकात बांधलेल्या डभोई ऊर्फ दर्भावती हा किल्ला वेगवेगळ्या काळात सोलंकी वाघेला, मुगल, मराठे यांच्या आधिपत्याखाली होता. हा नगरकोट असल्याने भारतातल्या सगळ्या नगरकोटांची जी अवस्था झाली आहे तशीच डभोईची अवस्था झाली आहे. किल्ल्यात असलेल्या नगराने वाढता वाढता किल्ल्यालाच गिळून टाकलेले आहे. किल्ल्याचेच सामान वापरून यातील अनेक घरे बांधलेली आहेत. इतर नगरकोटात उरतात त्याप्रमाणे येथेही किल्ल्याचे चार दिशांना असणारे चार दरवाजे उरलेले आहेत. पण हे दरवाजेच या किल्ल्याचे वैशिष्टय़  आहेत. बाराव्या शतकात बांधलेले, अप्रतिम कोरीव काम असलेले हे दरवाजे पाहण्यासाठी डभोईला वाट वाकडी करून जायला हरकत नाही. गुजरात पुरातत्त्व खात्याने हे दरवाजे अतिशय सुंदरपणे जतन केले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी केवळ संरक्षित स्मारकाचा निळा फलक न लावता त्या ठिकाणी रक्षक नेमलेले आहेत. अशी ऐतिहासिक पाश्र्वभूमी आणि कलात्मक प्रवेशद्वारे असलेला किल्ला एका तासात व्यवस्थित पाहता येतो.



बडोद्याकडून डभोई गावात शिरतानाच डाव्या बाजूला किल्ल्याचा एक बुरुज, तटबंदी त्याला लागून असलेला पाण्याने भरलेला खंदक आणि तलाव पाहायला मिळतो. गावात शिरल्यावर आपल्यासमोर येते किल्ल्याचे भव्य असे पश्चिम द्वार. याला वडोदरा भागोल (प्रवेशद्वार) या नावाने ओळखले जाते. २० फूट उंच असलेला दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी पिवळ्या दगडात (सँडस्टोन)मध्ये बांधलेली आहे. या दरवाजाला सहा कमानी असून, त्या लाल दगडात बनवलेल्या आहेत. या कमानींवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. त्यात पक्षी, फूल, वेलबुट्टी, व्याल, कीर्तिमुख कोरलेले आहेत. दोन कमानींच्या मधल्या भागात विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूला २० खांब असलेले एक सुंदर दालन आहे. हा दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. त्याला उत्तर दरवाजा (माहुडी भागोल) या नावाने ओळखले जाते. या दरवाजातून जाणाऱ्या रस्त्याने रहदारी चालू असते. दरवाजा पाच कमानींवर तोललेला असून कमानींवर कोरीव काम केलेले आहे. दोन कमानींच्या मध्ये मूर्ती आहेत. या पुढील दरवाजा पूर्व दिशेला आहे. या दरवाजाला हिरा भागोल या नावाने ओळखले जाते. किल्ल्याचा हा सर्वात सुंदर दरवाजा असून या दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला असलेल्या तटबंदीत १०० मीटर अंतरापर्यंत अप्रतिम कोरीव काम केलेले आहे. यात अनेक गवाक्षे, देवकोष्टके आहेत. त्यात विष्णू, लक्ष्मी, चामुंडा अशा अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. समुद्रमंथनापासून अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले या ठिकाणी पाहता येतात. घोडय़ावर बसलेले योद्धे, हत्ती, हंस, व्याल, फुले, वेलबुट्टी याने हा दरवाजा सजवलेला आहे. दरवाजा सहा कमानींवर तोललेला असून, कमानींवर कोरीव काम केलेले आहे. या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस एक दरवाजा असून त्याची कमान ढासळलेली आहे, पण उरलेल्या भागावरील कोरीव काम सुंदर आहे.

बाराव्या शतकात बांधलेल्या या दरवाजाबद्दल एक दंतकथा या भागात प्रचलित आहे. या दरवाजाचे बांधकाम करणारा स्थापती हरीधर याने या दरवाजासाठी आणलेले दगड चोरून आणि इथलेच मजूर वापरून आपल्या बायकोसाठी तेन तलाव नावाचा तलाव डभोईपासून तीन किलोमीटरवर बांधला. हा अपहार राजाला कळल्यावर हरीधरला या दरवाजातच चिणून मारण्यात आले. त्यामुळे या दरवाजाचे नाव हिरा भागोल पडले आहे.

किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे दक्षिण दरवाजा. हा दरवाजा नांदोडी भागोल या नावाने ओळखला जातो. सहा कमानी असलेल्या या दरवाजाच्या कमानींवर आणि दरवाजाच्या वरही कोरीव काम केलेले आहे. या दरवाजाच्या संरक्षणासाठी बाहेरच्या बाजूस अजून एक दरवाजा बांधलेला आहे.

कसे जाल?

बडोदा- डभोई राज्य मार्ग १६१ने बडोद्यापासून ३० किमीवर डभोई गाव आहे. मुंबईहून बडोद्याकडे येताना बडोद्याच्या अलीकडे करजन गाव आहे. करजन गावातून राज्यमार्ग १११ने डभोईला जाता येते. हे अंतर ३० किलोमीटर आहे.

अमित सामंत amitssam9@gmail.com

Monday, August 7, 2017

गाढवावरचं पुस्तकालय

आज रोज युध्दाची भाषा बोलली जाते. सत्तासंघर्ष अटळ असला तरी या संघर्षाचे बळी ठरतात ती लहान मुलं. जपानमधील वेदनादायी कथा याचं मूर्तीमंत उदाहरण.
हे जरी खरं असलं तरी मुलांसाठी सतत कष्टणारे लोकही या विश्वात आहेत. त्यांना कुणी हिरो समजत नाही.कारण ती लहानासाठी काम करतात. अशाच एका लुइसची कथा. पुस्तकं वाटून त्यानं मुलांना आनंद तर दिलाच सोबत स्वप्नंही दिली.
दि. ०५/०८/२०१७ रविवारी #नवा_काळ मधून प्रकाशित झालेली ही कथा.
शुक्रिया -अरविंद गुप्ता सर
Vaibhav Chalke भाई
...................................................
           #गाढवावरचं_पुस्तकालय.
                                       
  लेखक : जेनिट विंटर                                            हिंदी अनुवाद : अरविंद गुप्ता                                                                  मराठी अनुवाद : फारूक एस.काझी
 farukskazi82@gmail.com
9921380966
.............................................
कोलंबियाच्या दाट जंगलात एक माणूस राहायचा.
लुईस त्याचं नाव.
त्याला पुस्तकं फार आवडायची.

एक पुस्तक वाचून झालं की तो नवीन पुस्तक घेऊन यायचा.
हळूहळू त्याचं घर पुस्तकाने भरून गेलं.
त्याची बायको डायना त्याच्यावर खूप चिढायची.

ती नेहमी चिढून त्याला एकच प्रश्न विचारायची.
“कशाला आणता ही पुस्तकं ? एवढ्या पुस्तकांचं काय करायचं? भाताबरोबर खायचंय का त्यांना ?”
यावर लुईस शांत राहायचा. काहीच बोलायचा नाही.

लुईसला मोठा प्रश्न पडला होता. पुस्तकांचं काय करायचं?
विचार करता करता त्याला एक कल्पना सुचली.
“मी ही पुस्तकं डोंगरा पलीकडच्या लोकांसाठी घेऊन जाईन. ज्यांच्याजवळ पुस्तकं नाहीत त्यांना देईन.
दोन गाढवं विकत घेईन. एकावर पुस्तकं ठेवीन आणि दुसऱ्यावर मी बसेन.”

लुईसने दोन धष्टपुष्ट गाढवं विकत घेतली.
त्यांची नावं होती ......अल्फा आणि बीटा.

गाढवाच्या पाठीवर पुस्तके ठेवण्यासाठी त्याने एक क्रेट बनवलं.
आणि त्यावर एक बोर्ड लावला.
‘गाढवावरचं पुस्तकालय’.
डायनाने क्रेटमध्ये पुस्तकं भरली.

दर आठवड्याला लुईस ,अल्फा आणि बीटाला घेऊन दूरवरच्या डोंगर –दऱ्यांतील गावांचा दौरा करायचा.
लोकांना , मुलांना वाचायला पुस्तकं द्यायचा.

या आठवड्यात तो इल-टोरोमेंटो या गावी जाणार होता.
प्रवासात उन्हाचा तडाखा वाढल्यावर तिघांनी ओढ्याकाठी बैठक मारली.
आराम केला. ओढ्याचं पाणी प्याले. फ्रेश होऊन जायला निघाले.
पण बीटा काही केल्या पुढे जायला तयार होईना.
बीटाच्या पाठीवर पुस्तकं होती.
तो नाही आला तर मुलांना काय वाटणार ?
‘बीटा ,हे बघ मुलं आपली वाट पाहत असतील. तू नाही आलास तर त्यांना पुस्तकं कशी देणार?”
असं म्हणताच बीटा ओढा पार करून लुईसबरोबर चालायला लागला.

डोंगरावर चढताच पुढचा रस्ता एकदम निर्जन होता.
आसपास कुणीच नव्हतं. अंधार पडू लागला होता.
पाखरांचा आवाज फक्त ऐकू येत होता.
इतक्यात त्या गुडुप्प अंधारातून एक डाकू समोर येऊन उभा राहिला.
लुईस घाबरून विनंती करू लागला.
‘कृपा करा. आम्हाला जाऊ दया.मुलं आमची वाट बघत असतील.”
लुईसजवळ पुस्तकं पाहून डाकू चिढला.
त्याने एक पुस्तक  काढून घेतलं आणि दरडावून सांगितलं.
“लक्षात ठेव पुढच्या वेळी मला चांदी पाहिजे.”

डाकू जाताच ते चालतं बोलतं पुस्तकालय पुढं सरकलं.
डोंगर पार करत चालू लागलं.
शेवटी लुईसला घरं दिसली.
इल-टोरमेंटो ची मुलं लुईसकडे धावतच आली.
पुस्तकं देण्याआधी लुईस नेहमी  एक गोष्ट सांगायचा.
“आज मी तुमच्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय.” असं म्हणून त्याने पुस्तकांच्या गठ्ठ्यामागून मुखवट्यांचं एक बंडल बाहेर काढलं.  ते मुखवटे लहान प्राण्यांचे होते.
मुलांना त्याने ते वाटले. मुलं खुश झाली.
“आता तुम्ही आपापले मुखवटे घाला. मी तुम्हाला प्राण्यांची एक गोष्ट सांगणार आहे.”

लुईसने मुलांना गोष्ट सांगितली.
गोष्ट संपताच मुलांनी आपल्या आवडीचं पुस्तकं निवडून घेतली.
लुईसचा निरोप घेऊन मुलं घराकडे निघून गेली.
जाताना पुस्तक त्यांनी आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं.
लुईस,अल्फा आणि बीटा डोंगर दऱ्या पार करत घरी परत आले.
घरी परतताना त्यांना सर्व जंगल,टेकड्या पार कराव्या लागल्या.

घरी परतताच लुईसने आपल्या भुकेल्या गाढवांना चारा टाकला. डायनाने आपल्या उपाशी नवऱ्याला खाऊ घातलं.
थकलेला असतानाही लुईस लवकर न झोपता एक पुस्तक घेऊन वाचत बसला. रात्री उशिरापर्यंत तो  वाचत बसलेला असतो.
आणि नेमकं त्याचवेळी दूरच्या एका डोंगरावरील घरातही मेणबत्त्या अन कंदिलं जळत होती.
तिथंही मुलं पुस्तकालयातून घेतलेली पुस्तकं वाचत बसली होती.अगदी अर्धी रात्र उलटून गेली तरी.
...................................................
(लुईस सोरयीआना याची ही खरी खुरी कथा. कोलम्बियामधील ला- ग्लोरिया इथला राहणारा. त्याने या पुस्तकालयाची सुरवात ७० पुस्तकांनी केली. आता त्याच्याजवळ ४८०० पुस्तके आहेत.)

एक बिनभिंतीची शाळा

एक बिनभिंतीची शाळा...शिक्षण हे माणूस घडणीचे ..आयुष्याला आकार देणारे

सर्वच विषयांत नापास होणारा तरूण चालवत आहे.

या शाळेला भिंती नाहीत, अभ्यास नाही, गृहपाठ नाही, परीक्षा नाही आणि पास नापासाचे मापदंडही नाहीत. खेळा आणि फक्त खेळा अस म्हणणारी ही शाळा दर शनिवारी भरते. ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलात. तिच नावच आहे 'स्कूल विदाउट वॉल्स' बिनभिंतीची शाळा.

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची अपेक्षा करणाऱ्या आजच्या व्यवस्थेत साताठ तरुणांनी आपल्या पातळीवर शिकण्याची व्याख्या बदलण्याच ठरवल आणि उभी राहिली एक बिनभिंतीची शाळा. परिस्थितीशी जुळवून हवे ते साध्य करणारा तरुण म्हणजे पंकज गुरव. बारावीमध्ये जवळपास सर्वच विषयांत नापास होणारा हा तरूण आज येऊर मध्ये लहान मुलांमध्ये बिनभिंतीची शाळा चालवत आहे. विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करून आलेले सामाजिक भानच त्याच्यासाठी दिशादर्शक ठरले.

चिरागनगर इथल्या वस्तीत राहणारा पंकज गुरव 'समता विचारक संस्थे'च्या विविध उपक्रमांमध्ये २००२ पासून काम करत होता. गावाभेटीच्या उपक्रमातून विविध गावांच्या समस्यांची जाणीव पंकजला झाली. ग्रामीण भागातील मुलांसाठी वेगळे काम करण्याचा निश्चय त्याने केला.येऊर गावात पंकजने बिनभिंतीची शाळा सुरू केली. खेळ, नाटक, नृत्य आणि अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम या शाळेत घेतले जातात. मात्र यातून मिळणारे शिक्षण हे माणूस घडणीचे आणि आयुष्याला आकार देणारेच असते.कोणत्याही साहित्याशिवाय स्थानिक खेळांवर भर असतो. मात्र खेळांतून शिक्षण कस देता येइल, भूगोल, गणित वगैरे विषयांशी जोडण्यावर भर असतो.

ठाण्यापासून इतक्या जवळ असूनही या मुलांचा शहरी संस्कृतीशी कोणताही परिचय नाही. शाळेत येण्यापेक्षा आई-वडिलांबरोबर जंगलात जाण, त्यांना कामात मदत कारण, धाकट्या भावंडांना सांभाळण, जंगलात रहात असल्यामुळे जनावरांच्या भीतीने लवकर घरी जाण या त्यांच्या सहाजिक गरजेच्या गोष्टी.शाळा सुरू झाल्यापासून हळूहळू उपस्थिती वाढू लागली. पाचवीत शिकणाऱ्या मुलाला स्वत:चे नावही लिहिता येत नाही अशी परिस्थिती होती. अशा मुलांना अक्षर ओळखण्याचे शिक्षण देण्यात आले.

ठाण्यातील अभिनव उपक्रमात  शाळेच्या मुलांचा सहभाग असतो आणि त्यात त्यांनी पारितोषिके मिळवली ज्याचे महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकारांनी खूप कौतूक केले आणि मुलांना प्रोत्साहन दिले. अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेल्या पंकजने अशाच वर्गातील मुलांसाठी उचललेले हे पाउल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

256 वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट!

२५६ वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट!

२५६ वर्षात एकदाही दारू किंवा तंबाखूला स्पर्श केला नाही

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: August 5, 2017 7:37 PM



एखाद्या माणसाचं वयोमान जास्तीत जास्त किती असू शकतं तुम्हाला कल्पना आहे का? कुणी म्हणेल ७५ ते ८५ कुणी म्हणेल १०० वर्षे.. पण आज आम्ही तुम्हाला या बातमीतून सांगतोय २५६ वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट. वाचून आश्चर्य वाटेल पण चीनच्या ली-चिंग यूएन या माणसाचा मृत्यू वयाच्या २५६ व्या वर्षी झाला. ही गोष्ट कोणतीही परिकथा नाही तर वास्तव आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं या ली चिंग यूएन यांच्या १५० व्या वाढदिवसासंबंधीचा एक लेख १९३० मध्ये प्रकाशित केला होता. चेंगाडू विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक वू- चुंग- चियाह यांनी ली-चिंग यूएन यांना १५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा १८२७ मध्ये दिल्या होत्या आणि ते १५० वर्षे कसे जगले यासंदर्भातला लेख लिहीला होता, जो १९३० मध्ये पुन्हा छापण्यात आला होता.

ली चिंग यूएन हे २०० वर्षांचे झाल्याचंही १८७७ मध्ये चीन सरकारनं आपल्या दप्तरी नोंदवलं होतं. तसंच शाही घराण्यानं त्यांचा सत्कारही केला होता. वयाच्या दहाव्या वर्षी ली चिंग यूएन यांनी वनऔषधींचा विक्रेता म्हणून काम करायला सुरूवात केली. ली चिंग यूएन हे डोंगर रांगांमध्ये जाऊन वनऔषधी गोळा करत असत. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत त्यांनी हा व्यवसाय केला आणि ते डोंगरांमध्ये जाऊन त्यांना वनऔषधींची चांगली माहिती झाली.



आहार काय घ्यावा आणि तंदुरूस्त कसं राहावं यासंबंधी त्यांनी काटेकोर पथ्य पाळायला सुरूवात केली. लिंग ची यूएन यांचा जन्म १६७७ साली चीनच्या शेजिया शहरात झाला होता. आपल्या संपूर्ण आयुष्यात ली चिंग यूएन यांनी २३ वेळा विवाह केला आणि त्यांना २०० मुलं झाली. ली चिंग यांनी वनऔषधी देणारा डॉक्टर म्हणूनही ख्याती मिळवली. ६ मे १९३३ रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय २५६ वर्षे होतं.





आपल्या १० वर्षे ते ४० वर्षांच्या वयात ली चिंग यांनी कान्सू, शन्सी, तिबेट, अनाम, सिआम आणि मंचुरिया इथल्या पर्वतरांगा पालथ्या घातल्या होत्या आणि तिथल्या वनऔषधींची त्यांना खडान् खडा माहिती होती. ली चिंग यांना मार्शल आर्टचीही माहिती होती. त्यांनी जवळपास २५ पिढ्या आपल्या डोळ्यासमोर मोठ्या होताना पाहिल्या आहेत. ली चिंग यूएन यांच्याबाबत हा लेख ‘स्टीव्हन बॅनक्राझ’ यांनी लिहीला आहे आणि ‘स्पिरिट अँड मेटा फिजिक्स’ या संस्थेनं हा लेख प्रकाशित केला आहे.

मृत्यूशय्येवर असताना काय म्हटले होते ली चिंग?

मन शांत ठेवा, कबुतराप्रमाणे चाला, कासवासारखं बसा आणि कुत्र्यासारखं झोपा तुमचं आयुष्य वाढेल असं ली चिंग मृत्यू शय्येवर असताना म्हटले होते. आहाराची काटेकोर पथ्य पाळणं हेदेखील माझ्या दीर्घ आयुष्याचं रहस्य आहे असंही ली यांनी म्हटलं आहे. मी या जगात जन्माला आलो आणि मला हवं ते सगळं केलं असंही ली यांनी आपल्या शेवटच्या क्षणी म्हटलं होतं.

ली चिंग यूएन यांची संपूर्ण माहिती विकिपीडियावरही उपलब्ध आहे. १९०८ मध्ये या दीर्घायुषी माणसावर एक पुस्तकही लिहीलं गेलं. मार्शल आर्ट ही कला त्यांनी ज्या ज्या शिष्यांना शिकवली ते कायम निरोगी राहिले. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकदाही अॅलोपथी औषध घेतलं नाही, दारू, तंबाखू किंवा इतर व्यसनांना स्पर्शही केला नाही. तसंच आहारावर कायम नियंत्रणही ठेवलं असंही ली चिंग यूएन यांनी म्हटलं आहे. एखाद्या माणसाचं वयोमान हा चर्चेचा विषय नसतो. मात्र ली चिंग यूएन यांचं २५६ वर्षांचं वय हेच आता चर्चेचा विषय ठरलं आहे.

NATIONAL SECURITY - Indian Navy: Ensuring secure seas for a resurgent na...

NATIONAL SECURITY - ITBP: वैली ऑफ़ गॉड्स

NATIONAL SECURITY: BSF in Mysterious Rann of Kutch (रण का रहस्य)

MISSION KASHMIR - " RAKSHAK" THE REAL HEROES OF INDIA

NATIONAL SECURITY: सीमा सुरक्षा बल: पूर्वी सरहद | BSF in Eastern Theatre

Featured post

डाॅ. कलाम यांचे १० नियम शाळेत शिकविले गेले पाहिजेत

डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत. -----------------------------------...